Monday, March 28, 2022

सायकल मार्ट

उन्हाळ्याचं दिवस व्हतं. आम्ही दवाखान्यातल्या वडाखाली खेळत व्हताव. एवढ्यात धनगरवाडीचं सुरेश मामा आमच्या घराकडं जाताना दिसलं म्हणून म्या लगीच घराकडं धुम ठुकली. चहा पाणी करून मामा घरा बाहीर पडताच त्येज्या म्हागं मीबी बाहीर आलो, लंय वाडुळ म्हागं फिरल्यावर गावाकडं जाताना सुरेश मामानं माज्या हातावर एक रुपायाचा मोठ्ठा ठोकळा टिकीवला. रुपाया हातात पडताच म्या पळतच अंबिका सायकल मार्टकडं निघालो. तिकडं जाता जाताच वडाखाली खेळत बसल्याल्या राहुल्या, सच्या, ईनुद्या, म्हाद्या, शऱ्या ह्येन्ला वरडून सांगितलं की "म्या बारकी सायकल भाड्यानं आणायला चाललोय" तीबी मग वाट बघत बसली.

तिकडं सायकलच्या दुकानात बाळासाहेब हातात रजिस्टर घिऊन बसलं व्हतं. तिथं जाऊस्तोर कुणी दुसऱ्यानं सायकल न्हिऊनी म्हणून पळतच दुकान गाठलं. लांबूनच बारकी सायकल बघून मला जाम आनंद झाला. ल्हाकत ल्हाकत पहिलं सायकल हातात घितली. बाळासाहेबांनी लगीच रजिस्टर उघडलं आन् घड्याळाकडं बघत रजिस्टरमदी विशाल गरड १२:१० लिहिलं. म्या बी घड्याळाकडं नजर टाकली आन् लगीच सायकलचा पायेंडेल मारलान दुसऱ्याच मिनटात वडाखाली पोचलो. तिथं गेल्या गेल्या पोरं सायकलची चक्कर मागायली पण म्या तेन्ला म्हणलं "थांबाय लका, मला तरी खिळू दया आधी" पोरांना तिथंच सुडून म्या तालमीपसून थेट दऱ्याबुवा पर्यंत जाऊन आलो. तिकडून आलो की दिवीच्या चौकातून एक चक्कर आणली मग गोडसे गल्लीतुन ईशीत आन् ईशीतुन पुन्हा वडाखाली आलो. आल्यावर राहुल्या मला म्हणला "ईसल्या, चल निळोबाला जाऊन यिऊ" पण लंय येळ लागलं म्हणून मी त्येला नकु म्हणलो.

दवाखान्यातल्या वडाखालीच राहुल्या, ईनुद्या आन् सच्याला सायकलची एक एक चक्कर दिली. लंय येळ झाल्यासारखं वाटलं त्येज्यामुळं पुन्हा अंबिका सायकल मार्ट मधल्या घड्याळात येळ बघायला गेलो. तास संपून जाईल हेज्या भेनं भेनं दून तीन चक्रा तर दुकानाकडंच झाल्या. आखीर बाळासाहेब म्हणलं "आजून पाच मिनिटं राहिल्यात, लांब जाऊ नकु न्हायतर दोन तासाचं पैशे द्यावं लागत्याल" हे ऐकून म्या शेवटची चक्कर मारायची म्हणून पुन्हा तालमीपशी जाऊन आलो. सायकल जमा करताना बाळासाहेबानं दुनी टायरची हवा हातानं दाबून चेक किली. म्या खिशातला ईकुलता येक रूपाया बाळासाहेबाच्या हातावर टिकीवला आन् त्येंनीबी पटमन रजिस्टरमदी माज्या नावापुढं १:१० लिहून जमेचा शेरा मारला. 

एक रूपायात एक तास सायकल खिळून माझं मन भरलं नव्हतं. आता पुन्हा कवातरी दोन रुपये साचलं की दोन तास सायकल खेळायची आसं ठरवून झपझप पावलं टाकून म्या घर गाठलं. दसऱ्याला आणि पाडव्याला अंबिका सायकल मार्टमदी येणाऱ्या नवीन सायकली बघून लंय भारी वाटायचं. पुढं निळूभाऊनं श्री गणेश सायकल मार्ट टाकलं आन् त्येज्या दुकानातल्या बारक्या सायकली फुकट चक्कर मारायला मिळायल्या. भऊच्या बँकीजवळच्या टपरीवर तास दोन तास बसलं की थर्माकॉलच्या डबड्यातली एक स्नेहल पेप्सी आन् सायकलची चक्कर हमखास मिळायची. गावात कुणी नवीन सायकल मार्टचं दुकान टाकलं की आमाला लंय अप्रूप वाटायचं. 

माझ्या बारक्यापणी रूपाया दोन रूपायात आभाळाएवढा आनंद दिल्याली आमच्या पांगरीतली अंबिका सायकल मार्ट, श्री गणेश सायकल मार्ट, दिपक सायकल मार्ट, जय भवानी सायकल मार्ट, वसीम सायकल मार्ट, मुन्ना सायकल मार्ट ही समदी दुकानं आज फकस्त आठवण म्हणून राहिल्याती. आज मी माझ्या दारात उभा आसलेल्या फोर्डमदी बसून शंभर किलोमीटर जरी फिरून आलो तरी एक रूपाया तासानं सायकल घिऊन मारलेल्या चक्करांची सर त्याला येणार न्हाई. हल्ली समद्या लेकरांच्या वाढदिसालाच त्येंचे मायबाप भारी भारी सायकली आणत्यात त्येज्यामुळं म्या वरी ल्हिवलेला ह्यो अनुभव आता तेंच्या वाट्याला कधीच येणार न्हाय पण त्येंला आपल्या येळच्या आनंदाची कथाबी ठाऊक आसावी म्हणून ही ईस पंचवीस वर्षाम्हागटल्या डोसक्यातलं शबुद मोबाईलवर टायपिलं. लेख आवडला तर द्या लेकरासनी वाचायला. गावरान भाषेत ल्हिवल्यामुळं तेंन्ला थोडा आवघड जाईन वाचायला पण काय करणार आईची भाषाबी जित्ती ठिवावीच लागल की म्हणुनशान ह्यो आट्टास.

विशाल गरड
२८ मार्च २०२२

Tuesday, March 22, 2022

बरमगावचा बालाजी

हा आहे उस्मानाबाद तालुक्यातील बरमगाव बुद्रुक या गावचा युवक बालाजी ढवळे. पर्वा त्याच्या गावच्या इतिहासातले पहिलेच व्याख्यान मी पार पाडले. गोष्ट सहा सात वर्षा पूर्वीची आहे. बालाजी हा शिक्षणनिमित्त सोलापूर जिल्हा वसतिगृहात राहत होता. तिथेच रहाणारा बालाजीचा मित्र व आत्ताच्या प्रार्थना बालग्रामचा संस्थापक युवा समाजसेवक प्रसाद मोहिते याने वसतिगृहात माझे व्याख्यान आयोजित केले होते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सभागृह तुडूंब भरून गेले होते त्याच गर्दीत बसून माझे व्याख्यान ऐकलेल्या बालाजीने तेव्हाच  ठरवले होते की सरांना आपल्या गावाकडे व्याख्यानासाठी न्यायचे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो नोकरीच्या निमित्ताने पुण्याला गेला, तिथेच संसार थाटला पण तरीही गावाची ओढ होतीच.

काही दिवसांपूर्वी इकडे गावात जेव्हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची बैठक झाली तेव्हा त्याने व्याख्यानासाठी माझ्या नावाची शिफारस केली. याआधी गावात कधीच व्याख्यानाचा कार्यक्रम झाला नसल्याने गावकऱ्यांनाही व्याख्यानाचा फारसा अनुभव नव्हता. वक्त्याची तारीख मिळेल का ? कार्यक्रमाला लोक जमतील का ? वक्ता चांगला बोलेल का ? नियोजन होईल का ? हे सारे प्रश्न त्यांना पडले पण बालाजी म्हणाला माझ्या गॅरंटी वर तुम्ही सरांना बोलवा. आपल्या गावाला ज्या विचारांची खरी गरज आहे ते विचार सर खूप प्रभावी मांडतील यावर माझा विश्वास आहे. बालाजीच्या विचारांना समितीच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला आणि अवघ्या चार पाच दिवसात कार्यक्रमाचे देखणे नियोजन केले.

दिनांक २० मार्च रोजी, संध्याकाळी बरमगावात माझे व्याख्यान पार पडले. ग्रामस्थांना शिवचरित्रातले आजपर्यंत न ऐकलेले पैलू उलगडून सांगितले एवढेच नाही तर गावच्या आणि गावातील नव्या पिढीच्या भविष्यासाठी मौलिक विचार मांडले. व्याखान संपल्यावर सुमारे अर्धा तास माझ्या सभोवतालची गर्दी हटली नाही. प्रत्येकजण हातात हात घेऊन व्याख्यानाबद्दल प्रतिक्रिया देत होता. सेल्फीसाठी पोरांची झुंबड उडाली होती. लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून बालाजीच्या चेहऱ्यावर उमटलेले विजयी हास्य माझ्यासाठीही जिंकल्याची निशाणी होती.

हे सगळं मी का सांगतोय ? तर बालाजीने सुमारे सात वर्ष मला त्याच्या डोक्यात ठेवले, माझा विचार पोसला आणि संधी मिळताच त्या संधीचे सोने केले. आज गावातील प्रत्येक नागरिक बालाजीजवळ व्याख्यानाचे कौतुक करतोय. गावाला  चांगले विचार मिळाल्याने गावकरी समाधानी आहेत याचे सारे श्रेय बालाजीला जाते. जोवर अशा एका विचारशील युवकांच्या मेंदूत आमचं वास्तव्य आहे तोवर हजारो मेंदूत शिवचरित्र रुजवण्याची प्रक्रिया सुरूच राहील.

विशाल गरड
२२ मार्च २०२२


Friday, March 18, 2022

आज भेटलो रायरीला

कादंबरी १९ फेब्रुवारीपासूनच वाचकांसाठी उपलब्ध झाली आहे तरीही अजूनपर्यंत माझ्या हातात माझ्या हक्काची प्रत आली नव्हती. फेब्रुवारीमध्ये व्याख्यानामुळे व्यस्त तर मार्च मध्ये बोर्ड परिक्षेमुळे व्यस्त त्यामुळे कादंबरी आणायला जायलाही वेळ नाही मिळाला. या साहित्यरूपी लेकराला जन्म दिल्यापासून ना त्याला कवटाळले, ना कोड कौतुक केले. पण आज अखेर ती इच्छा पूर्ण झालीच. न्यू एरा पब्लिशिंग हाऊसच्या ऑफिसमधून लेखकासाठीच्या प्रती आज घरपोच मिळाल्या.

तसं तर सर्व वयोगटाला वाचण्यासारखी ही कादंबरी आहे पण नुकतंच तारुण्यात पाऊल ठेवलेल्या, राजकिय महत्वकांक्षा बाळगणाऱ्या शिवभक्तांना ही कादंबरी वाचण्याचा माझा आग्रह असेल. सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला सामोरे जाताना या कादंबरीतला कंटेंट डोक्यात असायला हवा. कादंबरीच्या नावावरून आणि मुखपृष्ठावरून जरी 'रायरी' ऐतिहासिक वाटत असली तरी यात गावकुसातील सामान्य शिवभक्तांची गोष्ट सांगितली आहे.

रायरीचे प्रोमोशन अजून सुरू केले नाही पण आता कादंबरी हातात आल्याने त्याला बळ मिळेल. कादंबरी जनमानसात पोहोचण्याची प्रक्रिया तशी लांबच असते हे मी जाणतो तरीही अल्पवधित तिने शेकडो घरांच्या कपाटात स्थान मिळवल्याने मी समाधानी आहे. यापुढेही 'रायरी' जास्तीत जास्त लोकांनी वाचावी यासाठी एक लेखक म्हणून मी प्रयत्न करीत राहील  बाकी जोपर्यंत महापुरुषांना विचारांतून जिवंत ठेवण्याचा विषय येत राहील तोपर्यंत रायरीचा उल्लेख होत राहील.

कादंबरी : 'रायरी'
लेखक : विशाल गरड
प्रकाशक : न्यू एरा पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठ चित्र : रत्नदीप बारबोले
पृष्ठे: २४३
मूल्य : २५० ₹
कादंबरीसाठी संपर्क : 8999360416, 8888535282


Saturday, March 5, 2022

मग 'रायरी' वाचायलाच हवी

तुम्ही शिवरायांच्या विचारांवर प्रेम करणारे शिवभक्त आहात मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्हाला जडलेले वाईट व्यसन काही केल्या सुटत नाही मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्हाला राजकारणात यायचंय, चांगलं काम उभा करायचंय मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुमचा विरोधक बलाढ्य आहे तरीही त्याला पराभूत करण्याची तुमची इच्छा आहे मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्ही कार्यकर्ता आहात पण कार्यकर्त्याची कात टाकून तुम्हाला नेता बनायचंय मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्ही रायगडाचे शिलेदार आहात, मग त्या दुर्गराजची शक्ती अनुभवण्यासाठी तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात मग तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
तुम्ही आजवर खूप काही वाचलं असेल किंवा काहीच वाचलं नसेल तरीही तुम्ही 'रायरी' वाचायलाच हवी,
कारण
आजच्या आधुनिक शिवभक्तांच्या जगण्याला शिवचरित्राचा स्पर्श देऊन नुसती वेळ नाही तर काळ बदलण्याचे सामर्थ्य वाचकाला बहाल करण्याचा प्रयत्न रायरीतून झालाय. या प्रयत्नांना तुमचं पाठबळ मिळावं हीच अपेक्षा.

कादंबरी : 'रायरी'
लेखक : विशाल गरड
प्रकाशक : न्यू एरा पब्लिकेशन, पुणे
मुखपृष्ठ चित्र : रत्नदीप बारबोले
पृष्ठे: २४३
मूल्य : २५० ₹

रायगड हा कादंबरीचा आत्मा आहे म्हणूनच रायरीची पहिली प्रत महाराजांच्या पायावर ठेवून 'रायरी' तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. कादंबरी घरपोच मागवण्यासाठी खालील नंबरवर अवश्य संपर्क साधा.
न्यू एरा ऑफिस -📱8999360416

फोटो सौजन्य : किताबवाला


Wednesday, March 2, 2022

माझं इरकलीतलं विद्यापीठ

माझ्यावर आईहून जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आज्जी होती. दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सोमवारी पहाटे ५:०० च्या सुमारास ती मला पोरकं करून गेली. मायेचा समुद्र जणू तव्यावर पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखा चर्रर्र करून आटून जावा तशी ती निघून गेलीये पुन्हा कधीच न परत येण्यासाठी. पांगरीच्या निलकंठेश्वरावर तिची प्रचंड श्रद्धा होती, जोवर पायात त्राण होता तोवर प्रत्येक सोमवारी ती निलकंठेश्वराला जायचीच. स्वर्गाच्या दिशेने अखेरचा प्रवासही तिने सोमवारीच केला हा योगायोग नसून जणू महादेवानेच तिला महाशिवरात्री साजरी करायला स्वर्गात निमंत्रित केलं असावं एवढी ती विलक्षण घटना होती.

दिड वर्षापूर्वी बापू गेले तेव्हापासूनच आज्जीची तब्बेत कमी जास्त होत होती. तेव्हाही तिने बापू गेल्याचे दुःख पोटात ठेवून आम्हाला धीर दिला पण आतून ती खचली होती कारण सकाळी लवकर आंघोळ झाल्यावर जेव्हा ती कपाळाला मेन लावून त्यावर कुंकू लावायला बसायची तेव्हा पाच दहा मिनिटे तरी लागायची पण बापू गेल्यापासून तिजी तिलाच आरशात बघायला नकोसं व्हायचं. कपाळाचे भारदस्त कुंकू हे जुन्या बायांचा सर्वोच्च दागिना असायचा तोच हरवला तर त्यांचे मनही हरवून जातं असंच काहीसं आज्जीचं झालं आणि गेल्या दिड वर्षात ती पुरती थकून गेली. तरूण वयात शेतात प्रचंड कष्ट केलेली आज्जी वयाची ऐंशी पार करुस्तोवर तंदुरुस्त होती आमच्या जन्मापासून ती कधी आम्हाला म्हातारी वाटलीच नाही, अंगावर इरकल होती बस्स एवढीच तिच्या म्हातारपणाची काय ती निशाणी. कामाला म्हणलं तर आईच्या खांद्याला खांदा लावून राबायची. 

आज्जीच्या हातचे पिठलं, आंब्याची चटणी, टोमॅटोची चटणी, कडी, ताक या माझ्या प्रचंड आवडीच्या गोष्टी. घरी केलेली एखादी भाजी कधी नाही आवडली की आज्जी लगेच मला काहीतरी करून खाऊ घालायची. घरातल्या लहान लेकरांची काळजी घेणारं ती एक विद्यापीठ होती. इनबिन दुसरी पर्यंत शिकून अडाणी राहिलेली आज्जी नंतर मात्र स्वयंप्रयत्नातून साक्षर झाली, वाचायला शिकली. भजनाची आवड असल्याने तिने बरेच अभंग आणि गवळणी तोंडपाठ केल्या. किर्तन, भजन, हरिपाठात ती रमायची. देवपूजा आणि तुळशी माळेचा जप तिने अखंड ठेवला. घरातल्या कुणीही घराचा उंबरा ओलांडला की तो परत येईस्तोवर आज्जीचा जीवात जीव नाही राहायचा. तिचं सगळं आयुष्य कष्ट करण्यात आणि लेकरांना, नातवांना जीव लावण्यातच गेलं.

वैजियंताबाई नावाचं आमचं इरकलीतलं विद्यापीठ जरी आज काळाच्या पडद्याआड गेले असले तरी तिच्या संस्काराची शिदोरी आम्हाला टिकवून टिकवून खायची आहे. गरड घराण्याच्या तीन पिढ्यांवर संस्कार केलेल्या या स्त्रीच्या उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही. माझ्या कादंबरीला तिचा दोन वर्षांचा सहवास लाभला हे माझ्या पोरीचं भाग्यच. आता तिच्या आठवणी ह्याच  ठेवा आहेत ज्या जपल्या जातील आमच्या अखेरच्या श्वासापर्यंत. आज्जे तुझी लै आठवण येते, साश्रु नयनांनी तुला भावपूर्ण श्रद्धांजली.

विशाल गरड (वैजियंताबाईचा नातू)
२ मार्च २०२२, पांगरी

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...