
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खवड्या डोंगरावरून एका १८ वर्षाच्या मुलाने (वाचलेल्या बातमी नुसार) आय फोनचे हाफ्ते तटले म्हणून उडी मारून जीव दिला त्यात त्याला वाचवायला गेलेले वडीलही पडले व त्या दोघांना पडताना पाहिल्याने पाठीमागून आईनेही उडी घेवून जीवनयात्रा संपवली. आईबापाचा जीव त्या पोराने घेतला. कसली भयंकर गोष्ट आहे ही. चार पाच दिवस चर्चा करून सगळे पुन्हा आपापल्या कामाला लागतील पण थोडे थांबून विचार करा हे का घडतंय ? इवलीशी लेकरं इतकी टोकाचे वागायली. पालकांचा लेकरांसोबत संवाद कमी होत चाललाय. कमी वयात त्यांना जास्तीचे एक्सपोझर मिळतंय. सोबतच्या मित्र मैत्रिणीकडे असलेल्या गॅझेटचे आकर्षण वाढतंय. आपल्या आई वडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाजा न घेता वाट्टेल त्या गोष्टींची मागणी करत वेळप्रसंगी आत्महत्येची भीती दाखवून ते ब्लॅकमेलिंगचे प्रकार करत आहेत. दहावीत ९२ % मार्क मिळवूनही जर त्या मुलाला ही औदसा सुचली असेल तर लक्षात ठेवा तुमची लेकरे शाळेत हुशार असली म्हणजे ती समजूतदार असतील असे नाही.
शालेय असोत किंवा महाविद्यालयीन असोत सध्या या सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी समुपदेशनाची, प्रबोधनाची गरज आहे. सध्या किती संस्थामध्ये पूर्णवेळ काउन्सेलर आहेत ? सगळ्यांना फक्त विद्यार्थ्यांचे मार्क हवे आहेत ? What about thier Physical or Mental health ? मोबाईलच्या विळख्यात अडकलेली पिढी पुन्हा पुस्तकांकडे वळवणे मोठे दिव्य आहे पण प्रयत्न व्हायलाच हवा. फक्त पैसा कमावण्याच्या मागे लागलेल्या पालकांना जेव्हा कळेल की आपली लेकरे हीच खरी संपत्ती आहे तेव्हाच बदल व्हायला सुरुवात होईल. आज पोरं पोरी स्मार्ट फोन घेवून त्यावर वाट्टेल तो कंटेंट सहज बघत आहेत याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होतोय व त्यांच्या निर्णय क्षमतेवर सुद्धा म्हणूनच गांव व शहरात गणपती, नवरात्री किंवा महापुरुषांच्या जयंती निमित्त बहुतांश जागी समाज प्रबोधनपर व्याख्यानांऐवजी फक्त डॉल्बी आणि नर्तिकांच्या कार्यक्रमांना पसंती दिली जात आहे. पोरं प्रचंड नादावलेली आहेत. एखादी नर्तिका बीभत्सपणे नाचत असताना एकदा त्या तरुणाच्या डोळ्याकडे आणि त्यांच्या हावभावांकडे बघा, कोवळ्या जीवांना किती विषारी नजरेने ग्रासले आहे हे दिसेल. तरीही पालक म्हणून, गावकरी म्हणून, पोलिस म्हणून आणि सरकार म्हणून आपल्याला काहीच करायचे नसेल तर मग पोरांच्या आत्महत्या आणि मुलींचे बलात्कार शांतपणे बघत बसा.
ही मोबाईलच्या सहवासात जन्माला आलेली पिढी आता आई वडिलांचे, वडिलधाऱ्यांचे ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे. चांगले सांगणाऱ्याला तर पहिल्यांदा वेड्यात काढतात हे. बेधुंद होवून थिरकण्याचे हे विष या युवा पिढीला प्रचंड काळोखाच्या गर्तेत घेवून जात आहे याची त्यांनाही कल्पना नाही. फोन घ्यायला, गाड्या घ्यायला, मजा करायला आई बापाचा प्रचंड पैसा आहे. कमवायची अक्कल शून्य असणारे तर नर्तिकांचे कार्यक्रम आयोजित करायला भाया सारून पुढे आहेत. ती नर्तिका बेधुंद होवून नाचत असताना तिच्या अदाकाऱ्या पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी ते आयफोनमधे कैद करून ठेवण्यासाठी आपल्याकडेही एक आयफोन असावा असेही अनेक युवकांना वाटते. यामध्ये पैसेवाल्या बापांची वाया गेलेली अनेक मुले तुम्हाला दिसतील पण सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही त्या संगतीचा परिणाम लागला की मग घरेची घरे उध्वस्त होतात. हे बिहारी कल्चर महाराष्ट्रात रुजण्याआधी जर सरकार आणि समाजाने मिळून नाही थोपवले तर स्वतःची लेकरे डोळ्यादेखत वाया जाताना पाहण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
त्या मुलाने एका आयफोनसाठी आईला वेठीस धरले. अरे जरा बापाकडे बघायला हवे होते तुझ्या पोटासाठी आणि शिक्षणासाठी तो घराबाहेर राहून अहोरात्र ट्रक चालवत होता. ट्रकमधे फक्त सामानाचे ओझे नव्हते तर त्याच्या संसाराचेही होते. त्याचा स्वतःचा मोबाईल किती तरी वेळा त्याने नीट करून घेतला असेल. तुम्हाला सगळे आयते बसून मिळत आहे ना म्हणून हे चोचले वाढत जात आहेत. पालकांनीही ध्यानात ठेवावे तुमच्याकडे पैसे असतील नसतील. लेकरांचे प्रत्येक हट्ट पूर्ण करत बसू नका. त्याला एखादे काम द्या ते पूर्ण केल्यावरच मोबदल्याच्या स्वरूपात त्याला पैसे द्या. एक दिवस तुमच्या मुलांना तुम्ही करत असलेल्या कामावर घेवून जा, त्यांनाही कळूद्या तेवढे पैसे कमावण्यासाठी तुम्हाला किती शारीरिक आणि मानसिक श्रम करावे लागते. मी लहान असताना जे मला मिळाले नाही ते सगळे माझ्या मुलाला मिळायला हवे हीच मानसिकता तुमच्या लेकरांना अधू करत आहे. आपल्याला काही गोष्टी आपल्या बापाकडून मिळाल्या नाहीत म्हणूनच त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण कष्ट केले, शिक्षण घेतले, व्यवसाय केला आणि आता श्रीमंत झालोत. आता जर तुमची श्रीमंती तुमच्या लेकरांत दिसायली तर त्याची स्वतः कष्ट करून कमवण्याची ईच्छा कशी वृद्धिंगत होईल ?
पोरांनो, आईबापाने तुम्हाला जन्म दिलाय हाच खूप मोठा उपकार केलाय तुमच्यावर. चांगले शिक्षण घ्या, नोकरी करा, व्यवसाय करा वेळप्रसंगी रोजंदारी करा अन स्वतः सोबत आईबापाचे हट्ट पूर्ण करा. तुमच्या दोन घासांची सोय करण्यासाठी त्यांनी लय आशा अपेक्षा मारून टाकल्या आहेत रे अशा क्षुल्लक गोष्टींसाठी त्यांचा जीव घेऊ नका. खवड्या डोंगरावरून मुलाला वाचवण्यासाठी जीव दिलेल्या त्या बापाला आणि डोळ्यादेखत कुटुंब संपले म्हणून त्याच डोंगरावरून उडी घेवून आत्महत्या केलेल्या त्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तो मुलगा मात्र श्रद्धांजलीस पात्र नाही त्याने केलेल्या कृतीचा उलट तीव्र निषेध.
विशाल गरड
लोकव्याख्यानकार
(टिप- या लेखासंदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया इथे कमेंट करून नक्की नोंदवा)








