Thursday, September 3, 2026

सोनवणे सरांचे अभिष्टचिंतन

आमच्या संजीव सोनवणे सरांचे आडनाव सोनवणे का पडले असावे हे माहीत नाही पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांच्या आयुष्याचे सोने करून ते आडनाव सार्थकी लावलंय. वैयक्तिक माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर सरांनी त्यांचा हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि सोनं काय घेवून बसलात मी हिरा झालो हिरा. माझ्या व्यक्तिमत्वाला जेवढे केवढे पैलू पडले असतील ते आमच्या उक्कडगांवच्या सोनवणे कॉलेजमधेच. आजवर डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयात माझी तब्बल दिड दशकांची सलग सेवा झाली पण फक्त नोकरी म्हणून कधी ती केलीच नाही. एका दृष्ट्या माणसाने गोरगरिबांची लेकरं AIIMS आणि IIT ला लावण्याचे स्वप्न पाहिलं आणि या श्रेष्ठ कार्यात आपण कुठे खारीचा वाटा उचलू शकतो म्हणूनसाठी नोकरीच्याही पलीकडे जावुन योगदान देत आलो आणि अजूनही देत आहे. 


शिक्षण क्षेत्रात सोनवणे सरांनी उभा केलेला हा दीपस्तंभ तेवत ठेवण्यासाठी कधी वात बनून, कधी तेल बनून तर कधी त्या दिव्याची काजळी बनून आम्ही विद्यार्थ्यांना सदैव प्रकाशमान करत आहोत. आम्ही सर्व प्राध्यापक चंद्र आहोत आणि सोनवणे सर म्हणजे आमचा सूर्य. या सूर्याने आम्हाला इतके प्रकाशमान करून टाकलंय की आम्ही फक्त पौर्णिमेलाच नव्हे तर भर अमावास्येत सुद्धा प्रकाशित राहतो. आता तुम्ही म्हणाल अमावास्येत कुठे चंद्र असतो, अहो असतो हो; फक्त तो आपल्याला दिसत नाही इतकंच. त्याचे काय आहे आमचे सोनवणे सर म्हणजे फिजिक्सचे जानेमाने प्राध्यापक म्हणून मग त्यांचावर लेख लिहिताना हे असे खगोलशास्त्रीय संदर्भ आपसूकच येतात. त्यांच्याच संगतीचा हा परिणाम आहे. जगात जो काही चमत्कार घडतो तो फक्त फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमुळेच घडत असतो बाकी सब अंधश्रद्धा है असे त्यांचे ठाम मत असते. त्यांनी उभारलेल्या संकल्प सेवा संस्थेतून आजवर शेकडो प्राध्यापक नावारूपाला आलेत अन हजारो विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर झालेत. यात कितीतरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अशा आहेत की सरांनी त्यांना दत्तक घेवून शिकवले होते. आणि कितीतरी प्राध्यापक असे आहेत की त्यांचं जे काही मोठेपण आहे ते सोनवणे सरांमुळेच.


आज घडीला मी माझ्या अनेक वेगवेगळ्या ओळखी तयार केल्या आहेत पण प्राध्यापक ही माझी पहिली ओळख मला सोनवणे सरांमुळे मिळाली. आजवर मला शिक्षणकार्यासाठी जेवढे केवढे पुरस्कार मिळाले असतील आणि भविष्यात मिळतील ये सभी सोनवणे सर की बदौलत है. आज आमचे सोनवणे सर वयाची पासष्टी पूर्ण करत आहेत. जे त्यांच्या सहवासात आहेत त्यांना चांगले ठावूक आहे की त्यांच्यासाठी “Age is just a number” कारण पासष्ट वर्षांच्या या तरुणाला आजही जर हातात पेन दिला तर सलग चार पाच तास ते फिजिक्स शिकवू शकतात इतके ते पॅशनेट आहेत. सोनवणे सर म्हणजे फक्त फिजिक्स शिकवणारे प्राध्यापक नसून ते फिजिक्समधे जगणारे आणि विद्यार्थ्यांनाही फिजिक्समधे जगायला शिकवणारे प्राध्यापक आहेत. भविष्यात जर विद्यार्थ्यांच्या मनातून फिजिक्स विषयाची भीती घालवायची असेल तर त्यावर सोनवणे सरांएवढे भारी शिक्षकरूपी जालिम औषध दुसरे नाही. आमचं हे दुर्मिळ औषध असंच चिरतरुण राहो आणि आमच्या रिटायरमेंटपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत राहो हेच त्यांच्या  ६५ व्या वाढदिवसानिमित्त माझे अभिष्टचिंतन !


प्रा.विशाल गरड.

डॉ.चंद्रभानू सोनवणे क.महाविद्यालय, उक्कडगांव.

Saturday, August 22, 2026

विद्यार्थ्यांनो जागे व्हा !

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खवड्या डोंगरावरून एका १८ वर्षाच्या मुलाने (वाचलेल्या बातमी नुसार) आय फोनचे हाफ्ते तटले म्हणून उडी मारून जीव दिला त्यात त्याला वाचवायला गेलेले वडीलही पडले व त्या दोघांना पडताना पाहिल्याने पाठीमागून आईनेही उडी घेवून जीवनयात्रा संपवली. आईबापाचा जीव त्या पोराने घेतला. कसली भयंकर गोष्ट आहे ही. चार पाच दिवस चर्चा करून सगळे पुन्हा आपापल्या कामाला लागतील पण थोडे थांबून विचार करा हे का घडतंय ? इवलीशी लेकरं इतकी टोकाचे वागायली. पालकांचा लेकरांसोबत संवाद कमी होत चाललाय. कमी वयात त्यांना जास्तीचे एक्सपोझर मिळतंय. सोबतच्या मित्र मैत्रिणीकडे असलेल्या गॅझेटचे आकर्षण वाढतंय. आपल्या आई वडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाजा न घेता वाट्टेल त्या गोष्टींची मागणी करत वेळप्रसंगी आत्महत्येची भीती दाखवून ते ब्लॅकमेलिंगचे प्रकार करत आहेत. दहावीत ९२ % मार्क मिळवूनही जर त्या मुलाला ही औदसा सुचली असेल तर लक्षात ठेवा तुमची लेकरे शाळेत हुशार असली म्हणजे ती समजूतदार असतील असे नाही.


शालेय असोत किंवा महाविद्यालयीन असोत सध्या या सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी समुपदेशनाची, प्रबोधनाची गरज आहे. सध्या किती संस्थामध्ये पूर्णवेळ काउन्सेलर आहेत ? सगळ्यांना फक्त विद्यार्थ्यांचे मार्क हवे आहेत ? What about thier Physical or Mental health ? मोबाईलच्या विळख्यात अडकलेली पिढी पुन्हा पुस्तकांकडे वळवणे मोठे दिव्य आहे पण प्रयत्न व्हायलाच हवा. फक्त पैसा कमावण्याच्या मागे लागलेल्या पालकांना जेव्हा कळेल की आपली लेकरे हीच खरी संपत्ती आहे तेव्हाच बदल व्हायला सुरुवात होईल. आज पोरं पोरी स्मार्ट फोन घेवून त्यावर वाट्टेल तो कंटेंट सहज बघत आहेत याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर होतोय व त्यांच्या निर्णय क्षमतेवर सुद्धा म्हणूनच गांव व शहरात गणपती, नवरात्री किंवा महापुरुषांच्या जयंती निमित्त बहुतांश जागी समाज प्रबोधनपर व्याख्यानांऐवजी फक्त डॉल्बी आणि नर्तिकांच्या कार्यक्रमांना पसंती दिली जात आहे. पोरं प्रचंड नादावलेली आहेत. एखादी नर्तिका बीभत्सपणे नाचत असताना एकदा त्या तरुणाच्या डोळ्याकडे आणि त्यांच्या हावभावांकडे बघा, कोवळ्या जीवांना किती विषारी नजरेने ग्रासले आहे हे दिसेल. तरीही पालक म्हणून, गावकरी म्हणून, पोलिस म्हणून आणि सरकार म्हणून आपल्याला काहीच करायचे नसेल तर मग पोरांच्या आत्महत्या आणि मुलींचे बलात्कार शांतपणे बघत बसा.


ही मोबाईलच्या सहवासात जन्माला आलेली पिढी आता आई वडिलांचे, वडिलधाऱ्यांचे ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे. चांगले सांगणाऱ्याला तर पहिल्यांदा वेड्यात काढतात हे. बेधुंद होवून थिरकण्याचे हे विष या युवा पिढीला प्रचंड काळोखाच्या गर्तेत घेवून जात आहे याची त्यांनाही कल्पना नाही. फोन घ्यायला, गाड्या घ्यायला, मजा करायला आई बापाचा प्रचंड पैसा आहे. कमवायची अक्कल शून्य असणारे तर नर्तिकांचे कार्यक्रम आयोजित करायला भाया सारून पुढे आहेत. ती नर्तिका बेधुंद होवून नाचत असताना तिच्या अदाकाऱ्या पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी ते आयफोनमधे कैद करून ठेवण्यासाठी आपल्याकडेही एक आयफोन असावा असेही अनेक युवकांना वाटते. यामध्ये पैसेवाल्या बापांची वाया गेलेली अनेक मुले तुम्हाला दिसतील पण सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही त्या संगतीचा परिणाम लागला की मग घरेची घरे उध्वस्त होतात. हे बिहारी कल्चर महाराष्ट्रात रुजण्याआधी जर सरकार आणि समाजाने मिळून नाही थोपवले तर स्वतःची लेकरे डोळ्यादेखत वाया जाताना पाहण्याशिवाय पर्याय उरणार नाही.


त्या मुलाने एका आयफोनसाठी आईला वेठीस धरले. अरे जरा बापाकडे बघायला हवे होते तुझ्या पोटासाठी आणि शिक्षणासाठी तो घराबाहेर राहून अहोरात्र ट्रक चालवत होता. ट्रकमधे फक्त सामानाचे ओझे नव्हते तर त्याच्या संसाराचेही होते. त्याचा स्वतःचा मोबाईल किती तरी वेळा त्याने नीट करून घेतला असेल. तुम्हाला सगळे आयते बसून मिळत आहे ना म्हणून हे चोचले वाढत जात आहेत. पालकांनीही ध्यानात ठेवावे तुमच्याकडे पैसे असतील नसतील. लेकरांचे प्रत्येक हट्ट पूर्ण करत बसू नका. त्याला एखादे काम द्या ते पूर्ण केल्यावरच मोबदल्याच्या स्वरूपात त्याला पैसे द्या. एक दिवस तुमच्या मुलांना तुम्ही करत असलेल्या कामावर घेवून जा, त्यांनाही कळूद्या तेवढे पैसे कमावण्यासाठी तुम्हाला किती शारीरिक आणि मानसिक श्रम करावे लागते. मी लहान असताना जे मला मिळाले नाही ते सगळे माझ्या मुलाला मिळायला हवे हीच मानसिकता तुमच्या लेकरांना अधू करत आहे. आपल्याला काही गोष्टी आपल्या बापाकडून मिळाल्या नाहीत म्हणूनच त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण कष्ट केले, शिक्षण घेतले, व्यवसाय केला आणि आता श्रीमंत झालोत.  आता जर तुमची श्रीमंती तुमच्या लेकरांत दिसायली तर त्याची स्वतः कष्ट करून कमवण्याची ईच्छा कशी वृद्धिंगत होईल ? 


पोरांनो, आईबापाने तुम्हाला जन्म दिलाय हाच खूप मोठा उपकार केलाय तुमच्यावर. चांगले शिक्षण घ्या, नोकरी करा, व्यवसाय करा वेळप्रसंगी रोजंदारी करा अन स्वतः सोबत आईबापाचे हट्ट पूर्ण करा. तुमच्या दोन घासांची सोय करण्यासाठी त्यांनी लय आशा अपेक्षा मारून टाकल्या आहेत रे अशा क्षुल्लक गोष्टींसाठी त्यांचा जीव घेऊ नका. खवड्या डोंगरावरून मुलाला वाचवण्यासाठी जीव दिलेल्या त्या बापाला आणि डोळ्यादेखत कुटुंब संपले म्हणून त्याच डोंगरावरून उडी घेवून आत्महत्या केलेल्या त्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली. तो मुलगा मात्र श्रद्धांजलीस पात्र नाही त्याने केलेल्या कृतीचा उलट तीव्र निषेध. 


विशाल गरड 

लोकव्याख्यानकार 


(टिप- या लेखासंदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया इथे कमेंट करून नक्की नोंदवा)

Saturday, July 4, 2026

शिवरायांच्या महाराष्ट्रात, नर्तिकांचा हैदोस.


सध्या बीभत्स नृत्याविष्कार सादर करणाऱ्या काही नर्तिकांनी महाराष्ट्रभर नुसता हैदोस माजवलाय. संतांचा अभंग आणि ओव्यात न्हावून निघणारा महाराष्ट्र अलीकडील काळात नर्तिकांच्या फडात रेंगाळताना दिसतोय. जत्रा, यात्रा, उरुस, दहीहंडी किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रमाण गेल्या सात आठ वर्षात प्रचंड वाढलंय. अशात अश्लील हावभाव करणाऱ्या आणि अवयवांची संमोहित हालचाल करणाऱ्या नर्तिकांना जास्त डिमांड आलय. मुळात त्याला नर्तन म्हणता येईल का इतक्या खालच्या थराला जावून काही नर्तिका नृत्याच्या नावाखाली अंग प्रदर्शन करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि भविष्याला न शोभणारा हा वर्तमानकाळ आहे. याला जेवढ्या त्या नर्तिका जबाबदार आहेत तेवढेच आयोजकही आहेत. अशातही सार्वजनिक आचारसंहिता समजून पारंपारिक वस्त्र परिधान करून शुद्ध नृत्य करणाऱ्या नर्तिकांबद्दल आम्हाला आदरच आहे अन पुढेही राहील. करून करून भागले अन देव पूजेला लागलेल्यांचाही थोड्याफार प्रमाणात आहे पण “अमुक तमुक बाईसारखंच मलापण व्हायचंय, तिच्यासारखा स्टारडम मलाही मिळवायचाय या येडापायी तिचीच री ओढत या व्यवसायात नव्याने आलेल्या नर्तिकांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे अन्यथा महाराष्ट्राच्या लोककलेला आणि संस्कृतीला या कुठपर्यंत रसातळाला नेतील याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.


एखाद्या गावात किंवा शहरात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवायचा म्हणलं की काही गावकरी वर्गणी द्यायला इवळतात पण तिथंच जर नर्तिकेचा कार्यक्रम होणार असेल तर मात्र एका रात्रीत फक्त व्हॉट्सअपवर तीन चार लाख गोळा करतात. कमी जास्त प्रमाणात सगळीकडे हीच परिस्थिती पाहायला मिळेल. त्या कातील नृत्यांगणेला आणण्यासाठी तर पोरा ठोरांसोबत पार म्हातारी कोतारीसुद्धा कात टाकून तयार असतात. जुन्या काळातले तमाशे हे अत्ताच्या डान्स शो पेक्षा कितीतरी पटीने सरस होते. लावण्या असायच्या पण झाकून चोपून. त्यातूनही श्रोते घायाळ व्हायचेच की पण ते फक्त अदाकरीतूनच. चेहरा, कोपरापासूनचा हात, पायांचा पंजा अन चार बोट कंबर; बस यापलीकडे त्यांचे शरीर दिसत नसायचे पण कला मात्र उठून दिसायची. आता महाराष्ट्राच्या लावणीला परप्रांतीय नर्तिकांच्या बीभत्स नृत्याने पछाडले आणि एक नवीनच मादक व्हर्जन तयार झाले ज्यात छाती अन ढुंगणाच्या हालचाली म्हणजेच लावणी म्हणू लागलेत. त्याला ना शेंडा आहे ना बुड, बीट वाजले की लागले हलायला.. ढंगडांगऽऽ ततडांगऽऽ, ढंगडांगऽऽ ततडांगऽऽ.


अहो पहिले गावात तमाशे यायचे तेव्हा त्या तमाशाचा फड गावाबाहेर असायचा. पण हल्ली मात्र गावातील भर चौकात, सार्वजनिक ठिकाणी डान्स शोच्या नावाखाली हा मादक नृत्याचा हैदोस सुरू असतो. त्या तमाशाला सुद्धा बाहेरून पडदा असतो पण इथे मात्र सगळा खुल्लम खुल्लाच. अगदी रस्त्यावर जाणारे, शेजारच्या अपार्टमेंट किंवा घरातले, चौकातले, पारावरचे ह्या सगळ्यांनाच तो फ्री असतो. कुणीही या बघायला हरकत नाही. मुळात फक्त प्रौढांनी चार भिंतीच्या आत बघण्याच्या लायकीचे मादक नृत्य आता काही आयोजकांनी पार सार्वजनिक चौकात आणि भर रस्त्यावर आणून ठेवलेत. पुढच्या पिढी साठी हे किती भयंकर ठरेल याची पुसटशीही कल्पना त्यांना नाही. तुम्ही असे कार्यक्रम बघायला जाताना लहान लेकरांना सुद्धा घेवून जात आहात. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेली पोरं तर या मोह कुंडात दणादण उड्या घेत आहेत. आपण समाज म्हणून फक्त हे पाहत आहोत किंबहुना असे थिल्लर कार्यक्रम आयोजित करून त्यांना उड्या मारण्यास बळ देत आहोत. 




हे असले कार्यक्रम आधी महाराष्ट्रात होत नव्हते. ऑर्केस्ट्रा वगैरे असायचे पण त्यात इतरही बरेच कार्यक्रम, संस्कृती बघायला मिळायची पण अलीकडील काळात मात्र एका नर्तिकेचे यश पाहून अनेक नवोदित नर्तिकांनीही या कुंडात उड्या घेतल्यात. आता तर अशा कार्यक्रमात बीभत्सता दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली की काय इतक्या टोकाचे थिल्लर डान्स होताना दिसत आहेत. असे कार्यक्रम कोणत्याही चौकात होवू द्या, त्याच दिवशी त्या नर्तिकेचे शे पाचशे रिल्स सोशल मीडियावर पडतात. ज्यांनी पाहायला नको त्यांच्या पण फीड मधे ते पुन्हा पुन्हा दिसत राहतात. नर असलेला प्रत्येक देह क्षणभर का होईना पण ते लटके झटके बघतोच. मुळातच हे आकर्षण नैसर्गिक आहे त्यामुळे त्याला बळी पडण्यापासून वाचताच येत नाही. अगदी लहान लहान लेकरांच्या हातात सुद्धा तासन्नतास मोबाईल आहेत, नकळत त्यांच्यापर्यंतही हा कंटेंट सहज पोहोचत आहे. 




नाचता नाचता एखादं लहान पोरगं स्टेजवर जातं अन ती नाचणारी नर्तिका सर्व गर्दीसमोर त्याला तिचा पापा घायला लावते. त्याने तिचा पापा घेतला की मग उपस्थित गर्दीही त्याने मर्दुंगी दाखवल्याप्रमाणे टाळ्या पिटते, शिट्ट्या फुकते. पुढे तर ती नर्तिकाच त्या लेकराची तोंड धरून पप्पी घेते. अरे नृत्या सारख्या पवित्र आणि श्रेष्ठ कलेला अशा तथाकथित नर्तिकांनी पार गटारीत ढकलून दिलंय. लावणी सारख्या नृत्यात हात अन पाय सर्वात जास्त नाचत असतात पण लावणीच्या पोशाखात हल्लीच्या काही नर्तिका नको त्याच अवयवांचे जास्त नृत्य करतात मग आंबट शौकिनांचा मेळा तिथे का बरे नाही भरणार ? पार एका मेकांच्या बोकांडी बसून, गाड्यावर, पत्र्यावर, गच्चीवर, झाडावर बसून त्यांचे लटके झटके बघायला का बरे नाही गर्दी होणार ? लहान वयातच पोरांच्या नजरा वासनांध का बरं नाहीत होणार ? जिभल्या चाटत शाळकरी पोरं कशी बरं नाहीत नाचणार ? थांबा ! विचार करा, मुळापासून नासत चाललेलं हे सगळं समाजात पडणारं विषारी विरजण जर वेळीच थांबवलं नाही तर विचारशील पिढी नासून जायला वेळ लागणार नाही हे ध्यानात असू द्या.


नृत्य कलेला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे पण या दशकात जेवढे केवढ्या अश्लील हावभाव आणि लटक्या झटक्यांनी तिच्यावर अतिक्रमण केलंय त्याने नृत्यकला बदनाम होत आहे. विवेक सोडून दिलेल्या काही प्रसिद्धीपिपासू नर्तिकांमुळेच नृत्य कलेत हे अतिक्रमण झालंय. आता तर देव देवतांच्या गाण्यांना सुद्धा रिमिक्सचा तडका देवून या आधुनिक हाडळणी बीभत्सरित्या थैय्या थैय्या नाचत आहेत आणि तथाकथित धर्म रक्षणावर वगैरे गप्पा मारणारे डोळे बंद करून झोपले आहेत. स्टेजच्या फ्लेक्सवर महापुरुषांचे फोटो आहेत पण याचे ना नाचणाऱ्यांना भान ना नाचवणाऱ्यांना. शिवरायांचा महाराष्ट्र आहे म्हणणाऱ्यांनो हे तुम्हाला पटतं का ? देव अन धर्माची आचार संहिता माहीत असणाऱ्यांनो तुम्हाला हे रुजते का ? शिवभक्तांनो आपल्या राजाच्या एकाही किल्ल्यावर नर्तिकालयासाठी इंचभर सुद्धा जागा नव्हती हे तुम्हाला ठाऊक नाही का ? नर्तिका ही एक स्त्री असते तिच्यातील त्या स्त्रीचा कायम आदरच असेल पण ती जर गैरनृत्य करून इथल्या युवापिढीला नादावून सोडत असेल तर तिच्या त्या कलेचा निषेध करावाच लागेल की. 


अशा डान्स शो च्या परवानग्या देतानाच पोलीस स्टेशन स्तरावर कठोर निर्बंध घालायला हवे. सदर कार्यक्रमात जर  युवकांना उकसावणारी बीभत्स नृत्य झाली तर संबंधित आयोजक आणि नर्तिकेवरही गुन्हे दाखल व्हायला हवे. मुळात असे कायदे आहेतही पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही हेच दुर्दैव. असले कार्यक्रम आयोजित करणारेही मोठे मासे असताना आणि त्यांच्यामागे त्याहून मोठे शार्क मासे असतात मग अशा अवस्थेत पोलीस प्रशासनाकडून तरी कारवाईची काय अपेक्षा ठेवायची ? अन्यथा आजवर जे डान्स शो झालेत त्या रीतसर परवानग्या घेवूनच झाले असतील की, मग तरीही एवढा नंगा नाच कसा पचवला जातो ?




मी एक लोकव्याख्यानकार आहे. समाजात चांगला विचार रुजवणं आणि वाईट विचारांना मूठ माती देणं माझं काम आहे. माझ्या व्याख्यानातून तर मी या गोष्टींवर नेहमीच आसूड ओढत आलोय पण एक लेखक म्हणूनही गेली काही वर्ष मनाला खटकत असलेली आणि माझ्या विवेकी मेंदूला न पटणारी गोष्ट इथे परखडपणे मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. माझ्या लिखाणाशी आपण सहमत असाल नसाल पण बिथरत चाललेली युवा पिढी मी खूप जवळून अनुभवत आहे. विभयभंग, छेडछाड, बलात्कार या सारख्या घटना वाढण्यामागे अनेक कारणे आहेत त्यातलेच एक हे देखील आहे. या नर्तिका नाचत असताना स्टेजच्या अवती भवती उभा राहून तिच्यावर खिळलेल्या नजरा एकदा निरखून बघा. तुम्हाला त्या डोळ्यात या लेखाचे तात्पर्य दिसेल. 


बाकी हा लेख कोणत्याही विशिष्ठ एखाद्या व्यक्तीबद्दल लिहिला नसून तो एका बीभत्स वृत्तीबद्दल लिहिला आहे. या विषयाबद्दलच्या तुमच्याही काही भावना असतील, अनुभव असतील तर कमेंटबॉक्समधे अवश्य नोंदवा. पोस्ट वाचणाऱ्यांचे कमेंट वाचूनही प्रबोधन होईल याची खात्री आहे. काही आवली पोरांनी जर वाकड्या तिकड्या कमेंट केल्याच तर चांगल्या तेवढ्या वाचा, लय इरसाल अन बिलिंदर असतील तर दुर्लक्ष करा. शक्यतो वृत्तीबद्दल लिहा, विशिष्ठ व्यक्तीबद्दल लिहिणे टाळा. आणि मी लेखात उल्लेख केलेल्या तथाकथित नर्तिकांचे फोटो/व्हिडिओ वगैरे पोस्ट करणे टाळा. सार्वजनिक स्थळी नाचण्याची आचार संहिता आधुनिक नर्तिकांना कळेल का नाही माहीत नाही पण किमान त्यांना बोलवणाऱ्यांनी तरी ती पाळावी म्हणून हा अट्टाहास.


विशाल गरड.

लेखक तथा लोकव्याख्यानकार (महाराष्ट्र)

Thursday, June 25, 2026

आरोग्यदायी तुकाराम

दूधाच्या भावात अवघ्या महिनाभरातच लिटरमागे दहा बारा रुपयांची वाढ आजवर सरकारला शक्य झाली नाही पण ते तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईमुळे शक्य झाले. बाजारातील डुप्लिकेट दूध बंद झाले त्यामुळे आपोआपच ओरिजनल दुधाची किंमत वाढली. जर मुंढे साहेबांनी काही दिवसात एवढे जबरदस्त काम केले असेल तर या आधी अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त काय फक्त भेसळखोरांचे आणि गुटखा माफियांचे हाफ्ते खावून ढेकरा देत होते का? या आधी आयुक्त पदावर काम केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या आरोग्याचे काळजी न घेतल्याबद्दल दोषारोप दाखल करून त्यांची चौकशी व्हायला हवी तसेच इडी ने अशा अधिकाऱ्यांच्या संपत्तीची जरा मन लावून माहिती काढायला हवी. 


राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या थेट आरोग्याशी संबंधित असलेल्या विभागावर कुचकामी, भ्रष्टाचारी आणि हतबल अधिकारी बसवणे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणे आहे. आजवर कमी वयात जे अटॅक येवून मेले, फुड पॉयझनिंगने गेले, लहान लेकरे दगावली, कॅन्सरची वाढ झाली, बीपी आणि मधुमेहाची जणू लाटच आली याला मुख्य कारण आहार आहे. शहरात तर पॅकिंग शिवाय काहीच घरात येत नाही. जन्मापासून जर प्रिझर्वेटिव्हचा रतीब पोटावर होणार असेल तर शरीराचे काय होत असेल. 


सध्या गावागावातले गाई म्हशींचे गोठे दिसेनासे झालेत. गावातील कळप ची कळप संपले आहेत. एकीकडे दुधाचे उत्पन अति प्रचंड प्रमाणात घटले असताना दुधाची मागणी मात्र अति प्रचंड प्रमाणात वाढली आहे. तरीही अगदी कोणत्याही दुकानात पिशवीतले दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध कसे ? समाजातील उच्चभ्रू व्यक्ती तीनशे चारशे रुपये किमतीने दूध पित असतात. मुळात शुद्ध गाई म्हशीच्या कासेतून निघालेल्या दुधाची हीच खरी किंमत असते. जे ओरिजनल असते ते महाग असते मग चाळीस पन्नास रुपये लिटर मधे मिळणारे ते काय असले ? इथे दुधाचीच जर ही गत आहे तर खवा आणि पनीर बाबत किती भेसळ असेल ?


आपला जीव हा कोणताही पक्ष, नेता आणि सरकारपेक्षा मौल्यवान असतो. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे सरकारचे परम कर्तव्य असायला हवे. मागे भलत्याच प्रकरणामुळे चर्चेत आलेले या खात्याचे मंत्री त्यांच्याच खोलीत सापडलेल्या वस्तूंवरून या खात्याला कितपत न्याय देवू शकतात यावर प्रश्नचिन्ह आहे. पण तुकाराम मुंढे साहेबांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे भविष्यात त्यांचा आपोआपच कार्यक्षम मंत्री म्हणून उल्लेख होईल. भविष्यात त्यांनीही मुंढे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहायला पाहिजे म्हणजे त्यांच्या समोरील प्रश्न चिन्ह निघून जाईल. 


सरकार तुम्ही जनतेचे पालक आहात. आपली लोकसंख्याच इतकी आहे की भेसळ करूनही उत्पादनांची कमतरता भासेल. पण जर भेसळचा माल बंद झाला तर आपसूकच शेतकऱ्यांचा शंभर नंबरी अस्सल माल थेट ग्राहकांना मिळू लागेल. भाव चांगला मिळू लागल्यास शेतकरी नव्याने उत्पादन वाढीवर भर देतील. शिकलेली पोरं सुद्धा शेतीकडे वळतील अन महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करतील. सुरुवातीला ग्राहकांना पडल थोडी झळ पण शरीरापेक्षा महत्वाचं दुसरं काय आहे ? रोड, बिल्डिंग, कार्यालये, उड्डाणपुले, स्मारके यासोबतच लोकांच्या आरोग्याचा विकास करण्यासाठीही सरकारने मजबूतीने तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभा राहायला हवे. आता जर या पदावरून त्यांची उचलबांगडी झाली तर जनतेच्या रोषास सरकारला सामोरे जावे लागेल. अन जर कार्यकाळ पूर्ण होण्याआधी साहेबांची बदली केली तर जनता समजून जाईल भेसळखोर आणि गुटखा माफियांनी सरकार विकत घेतले. 


बाकी विविध विभागांच्या आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांनीही जर मुंढेंची री ओढली तर एक महिन्यात महाराष्ट्र धुवून निघेन. भ्रष्टाचारातून पैसा कमवून स्वतःच्या दहा पिढ्यांचा उद्धार करण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील पुढच्या दहा पिढ्यांनी तुमचे नांव घेतले पाहिजे असे कार्य करा. फार काही नाही फक्त कायद्याने जे अधिकार दिलेत तेवढेच तत्परतेने वापरा, गोरगरीबांचे कल्याण होईल. FDA मधे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनो, एक आई जेव्हा तिच्या दोन वर्षाच्या बाळाला पिशवीतले दूध पाजत असते ते फक्त तुमच्या विश्वासावर. आजवर इथल्या व्यवस्थेने तुमचे हात बांधले होते आता तुकाराम मुंढे साहेबांनी जनहितार्थ त्याला मोकळीक दिली आहे. “भले तरी देवू कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी”- तुका म्हणे. याप्रमाणे आपल्या पदाशी इमान राखून तुम्हीही तुमचे योगदान द्यावे हीच अपेक्षा.


विशाल गरड 

लोकव्याख्यानकार तथा लेखक. 

२५ जून २०२६, पांगरी 

Monday, October 21, 2024

भेटला विठ्ठल

कधी कधी वाटते की इन्स्टाग्रामवर माझे एक लाख नाही तर एक करोड फॉलोवर्स आहेत. कारण हल्ली सहज जरी कुठे बाहेर पडलो तरी एखादा तरी फॉलोअर्स भेटतोच. माझा प्रत्येक फॉलोवर हा माझ्याशी विचारांनी जोडला गेला असल्याने त्यांच्यासाठी मी त्यांचा जवळचा मित्र असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा स्वभाव त्यांना चांगला ठाऊक असल्याने मी कुठेही दिसू द्या ते अगदी हक्काने हाक मारतात आणि भेटतातच. आजचा किस्साही असाच आहे.


न्यू एरा पब्लिकेशनला मुलाखत देण्यासाठी मी जात असताना कर्वे रोडच्या सिग्नलवर गाडी थांबली. काही क्षणात शेजारी उभारलेल्या गाडी स्वाराने त्याचे हेल्मेट काढले आणि मला “विशाल सर” म्हणून हाक मारली. मी त्याला ओळख विचारताच त्याने सांगितले “सर, मी विठ्ठल लांबरुट, मोहोळ तालुक्यातील खुणेश्वरचा आहे. तुम्हाला खूप दिवसापासून फॉलो करतोय. एकदम दिसलात म्हणून हाक मारली” इतक्यात सिग्नल सुटला मग जाता जाता त्याला मी म्हणालो “पुढील चौकात थांब, तुला चहा पाजतो”. पुढे गेल्यावर आम्ही एका कँटीनवर चहासाठी थांबलो. मला वेळेत पोहोचायचे होते पण इतक्या आपुलकीने भेटलेल्या फॉलोवर्सला थोडा वेळ देवून, त्याला चहा पाजून थोड्या गप्पा मारल्या. गावाकडची, नोकरीची विचारपूस केली आणि निघून गेलो.


जाताना माझ्यासोबत सेल्फी काढतानाचा त्याला मिळालेला आनंद दिलेला वेळ सार्थकी लावून गेला. अशीच प्रेम करणारी, माझ्या विचारांना फॉलो करणारी माणसं पावलो पावली भेटतात म्हणून मी पुण्यात तरी निदान स्कूटीवर फिरत राहतो. त्यानिमित्ताने मला ओळखणारे हक्काने भेटतात, प्रतिक्रिया देतात आणि मलाही कमी वेळात खूप जणांना भेटता येते. भविष्यात मर्सिडीजमधे जरी फिरताना दिसलो तरी माझ्या फॉलोवर्स लोकांना भेटण्याचा हा प्रवास असाच असेल. कारण विशाल गरडला ‘विशाल’ करण्यात अशा लाखो फॉलोवर्सचा वाटा आहे. माझा प्रत्येक वाचक, श्रोता, फॉलोवर, आयोजक माझ्यासाठी विठ्ठलच आहे. यानिमित्ताने त्या सर्वांचेसुद्धा आभार.


विशाल गरड 

२१ ऑक्टोबर २०२४, पुणे 





Monday, October 7, 2024

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय ! ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच्या हेडिंग्स त्याही दिवसभरात दहा पंधरा मिनिटे. मालिका, रियालिटी शो वगैरे तर जवळ जवळ नाहीच. यासाठी मी रिटायरमेंट नंतरचा वेळ राखून ठेवलाय. आपली लोकसंख्या पाहता माझ्यासारख्यांची संख्या मतदान केलेल्या आणि नियमित बिगबॉस पाहणाऱ्यांपेक्षा नक्कीच जास्त असेल. असेल कशाला आहेच.


तरीही मोबाईलवर जेवढे केवढे शॉर्ट्स दिसायचे त्यावरून वाटायचे की ट्रॉफी सूरज जिंकेल आणि त्यानेच जिंकावी पण जिथे लोक इ.व्ही.एमवर विश्वास नाहीत ठेवत तिथे एकच व्यक्ती जिथे ९९ वेळा मत देवू शकते अशा गोष्टींवर कसा विश्वास ठेवतील ? पण अशांना सुद्धा विश्वास ठेवायला सुरजने भाग पाडले हा त्याचा बिगबॉस पेक्षा मोठा विजय आहे.


त्याला विनर म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलली नाही. फक्त एक स्मित देवून तो रितेशच्या मिठीत सामावला. पराभवापेक्षाही विजय पचवने आणि तो नम्रपणे स्वीकारणे अवघड असते. अस्सल मातीतला, गावरान भाषेतला, सुरज चव्हाणचा SQRQZQ चा गुलीगत पॅटर्न कलर्स वाहिनीच्या बुक्कीत टेंगुळ आणून विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे कौतुक व सुरजचे अभिनंदन ! मरी आईच्या नावानं चांगभलं !


विशाल गरड 

७ ऑक्टोबर २०२४




Monday, August 26, 2024

शिवशिल्प उभारताना

खरं सांगू जेव्हा हे उद्घाटन झाले तेव्हाच मी महाराजांच्या या शिल्पाबद्दल लिहिणार होतो. पण आपली माणसं परखड गोष्टी मांडल्यावर सुद्धा टिकेचे धनी करतात. याआधीही जेव्हा महाराजांचा देखावा राजपथावर मिरवला होता त्यावेळी मी “महाराजांची मान खाली का ?” या शिर्षकाखाली लेख लिहिला होता. जो मुंबईच्या नवा काळ या आघाडीच्या दैनिकाने पहिल्या पानावर हेडिंग करून छापला होता. एक कलाकार या नात्याने प्रत्येक कलाकृतीकडे बघण्याची आमची एक नजर असते. आता या फोटोतले शिवशिल्प पाहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला शोभणारे हे शिल्प होते का ? तर अजिबात नाही. अगदी सुमार दर्जाची ही शिल्पकला होती. निसर्गालाच ती बघवली नाही म्हणून वादळाने ते शिल्प ढासळले असावे. त्या कामाचा दर्जा वगैरे काय असेल हे तर पुतळ्याच्या ठेवणीवरूनच समजून येते. खरंच सांगा आजवर तुम्ही जेवढे केवढे अश्वारूढ पुतळे पाहिले असतील त्याहून हा पुतळा तुम्हाला कसा


महाराष्ट्रात शिल्पकलेतील कलकारांची अजरामर नावे असताना हा पुतळा नेमका कोणाकडून बनवून घेतला असेल ? अरे महाराज उभे करताना किमान त्यांच्या कर्तृत्वाची जाण ठेवून तरी त्यांच्या पुतळ्याला न्याय द्यायला हवा. अर्ध्याहून अधिक भारत ज्यांच्या नावावर होता त्यांचे शिल्प उभा करताना सुद्धा तेवढी भव्यता साकारणे शक्य होत असेल तरच धाडस करत जावा. अन्यथा अशी सुमार दर्जाची शिल्पकला उभी न केलेली बरी. पुतळे उभा करण्याचा सरकारचा हेतू जरी चांगला असला तरी बांधकामे पक्की होण्यासाठी जरा वेळ जाऊच द्यावा लागतो. असे नेते वगैरे येणार म्हणून घाई गडबडीत उभारायला तो काय तात्पुरता देखावा वाटला की काय ? सदर पुतळा उभारलेल्या ठेकेदारांनो. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी गडावर लावलेला एक दगड सुद्धा प्रचंड ऊन, वारा, पाऊस झेलत अजून जागचा हालत नाही रे पण तुमची कामे ही अशी जर वाऱ्यावर उडून चालली तर कसे चालायचे. आता पुन्हा त्याच जागी शिवशिल्प उभा करायचे असेल तर ते अतिशय सुबक, दर्जेदार आणि महाराजांचा तलवार घेवून उभारल्याचा आवेश आणि आत्मविश्वास लख्ख प्रकट होणारे असावे एवढीच एक शिवविचारांचा सेवक नात्याने माझी माफक अपेक्षा. जय शिवराय !


विशाल गरड

२६ ऑगस्ट २०२४, पांगरी


(टिप : महापुरुषांच्या पडलेल्या किंवा तुटलेल्या पुतळ्याचे फोटो शेअर करणे माझ्या बुद्धीला पटत नाही. कारण ते पाहून जर माझ्याच भावना दुखावल्या जात असतील तर इतरांच्याही त्या दुखावण्याचा मला अधिकार नाही. आपणही त्या घटनेचे फोटो शेअर करणे टाळता आले तर टाळा ही विनंती.)






सोनवणे सरांचे अभिष्टचिंतन

​ आमच्या संजीव सोनवणे सरांचे आडनाव सोनवणे का पडले असावे हे माहीत नाही पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांच्या आयुष्याचे सोने करून त...