Saturday, July 4, 2026

शिवरायांच्या महाराष्ट्रात, नर्तिकांचा हैदोस.


सध्या बीभत्स नृत्याविष्कार सादर करणाऱ्या काही नर्तिकांनी महाराष्ट्रभर नुसता हैदोस माजवलाय. संतांचा अभंग आणि ओव्यात न्हावून निघणारा महाराष्ट्र अलीकडील काळात नर्तिकांच्या फडात रेंगाळताना दिसतोय. जत्रा, यात्रा, उरुस, दहीहंडी किंवा इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने नर्तिकांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रमाण गेल्या सात आठ वर्षात प्रचंड वाढलंय. अशात अश्लील हावभाव करणाऱ्या आणि अवयवांची संमोहित हालचाल करणाऱ्या नर्तिकांना जास्त डिमांड आलय. मुळात त्याला नर्तन म्हणता येईल का इतक्या खालच्या थराला जावून काही नर्तिका नृत्याच्या नावाखाली अंग प्रदर्शन करत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि भविष्याला न शोभणारा हा वर्तमानकाळ आहे. याला जेवढ्या त्या नर्तिका जबाबदार आहेत तेवढेच आयोजकही आहेत. अशातही सार्वजनिक आचारसंहिता समजून पारंपारिक वस्त्र परिधान करून शुद्ध नृत्य करणाऱ्या नर्तिकांबद्दल आम्हाला आदरच आहे अन पुढेही राहील. करून करून भागले अन देव पूजेला लागलेल्यांचाही थोड्याफार प्रमाणात आहे पण “अमुक तमुक बाईसारखंच मलापण व्हायचंय, तिच्यासारखा स्टारडम मलाही मिळवायचाय या येडापायी तिचीच री ओढत या व्यवसायात नव्याने आलेल्या नर्तिकांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे अन्यथा महाराष्ट्राच्या लोककलेला आणि संस्कृतीला या कुठपर्यंत रसातळाला नेतील याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.


एखाद्या गावात किंवा शहरात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवायचा म्हणलं की काही गावकरी वर्गणी द्यायला इवळतात पण तिथंच जर नर्तिकेचा कार्यक्रम होणार असेल तर मात्र एका रात्रीत फक्त व्हॉट्सअपवर तीन चार लाख गोळा करतात. कमी जास्त प्रमाणात सगळीकडे हीच परिस्थिती पाहायला मिळेल. त्या कातील नृत्यांगणेला आणण्यासाठी तर पोरा ठोरांसोबत पार म्हातारी कोतारीसुद्धा कात टाकून तयार असतात. जुन्या काळातले तमाशे हे अत्ताच्या डान्स शो पेक्षा कितीतरी पटीने सरस होते. लावण्या असायच्या पण झाकून चोपून. त्यातूनही श्रोते घायाळ व्हायचेच की पण ते फक्त अदाकरीतूनच. चेहरा, कोपरापासूनचा हात, पायांचा पंजा अन चार बोट कंबर; बस यापलीकडे त्यांचे शरीर दिसत नसायचे पण कला मात्र उठून दिसायची. आता महाराष्ट्राच्या लावणीला परप्रांतीय नर्तिकांच्या बीभत्स नृत्याने पछाडले आणि एक नवीनच मादक व्हर्जन तयार झाले ज्यात छाती अन ढुंगणाच्या हालचाली म्हणजेच लावणी म्हणू लागलेत. त्याला ना शेंडा आहे ना बुड, बीट वाजले की लागले हलायला.. ढंगडांगऽऽ ततडांगऽऽ, ढंगडांगऽऽ ततडांगऽऽ.


अहो पहिले गावात तमाशे यायचे तेव्हा त्या तमाशाचा फड गावाबाहेर असायचा. पण हल्ली मात्र गावातील भर चौकात, सार्वजनिक ठिकाणी डान्स शोच्या नावाखाली हा मादक नृत्याचा हैदोस सुरू असतो. त्या तमाशाला सुद्धा बाहेरून पडदा असतो पण इथे मात्र सगळा खुल्लम खुल्लाच. अगदी रस्त्यावर जाणारे, शेजारच्या अपार्टमेंट किंवा घरातले, चौकातले, पारावरचे ह्या सगळ्यांनाच तो फ्री असतो. कुणीही या बघायला हरकत नाही. मुळात फक्त प्रौढांनी चार भिंतीच्या आत बघण्याच्या लायकीचे मादक नृत्य आता काही आयोजकांनी पार सार्वजनिक चौकात आणि भर रस्त्यावर आणून ठेवलेत. पुढच्या पिढी साठी हे किती भयंकर ठरेल याची पुसटशीही कल्पना त्यांना नाही. तुम्ही असे कार्यक्रम बघायला जाताना लहान लेकरांना सुद्धा घेवून जात आहात. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेली पोरं तर या मोह कुंडात दणादण उड्या घेत आहेत. आपण समाज म्हणून फक्त हे पाहत आहोत किंबहुना असे थिल्लर कार्यक्रम आयोजित करून त्यांना उड्या मारण्यास बळ देत आहोत. 




हे असले कार्यक्रम आधी महाराष्ट्रात होत नव्हते. ऑर्केस्ट्रा वगैरे असायचे पण त्यात इतरही बरेच कार्यक्रम, संस्कृती बघायला मिळायची पण अलीकडील काळात मात्र एका नर्तिकेचे यश पाहून अनेक नवोदित नर्तिकांनीही या कुंडात उड्या घेतल्यात. आता तर अशा कार्यक्रमात बीभत्सता दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली की काय इतक्या टोकाचे थिल्लर डान्स होताना दिसत आहेत. असे कार्यक्रम कोणत्याही चौकात होवू द्या, त्याच दिवशी त्या नर्तिकेचे शे पाचशे रिल्स सोशल मीडियावर पडतात. ज्यांनी पाहायला नको त्यांच्या पण फीड मधे ते पुन्हा पुन्हा दिसत राहतात. नर असलेला प्रत्येक देह क्षणभर का होईना पण ते लटके झटके बघतोच. मुळातच हे आकर्षण नैसर्गिक आहे त्यामुळे त्याला बळी पडण्यापासून वाचताच येत नाही. अगदी लहान लहान लेकरांच्या हातात सुद्धा तासन्नतास मोबाईल आहेत, नकळत त्यांच्यापर्यंतही हा कंटेंट सहज पोहोचत आहे. 




नाचता नाचता एखादं लहान पोरगं स्टेजवर जातं अन ती नाचणारी नर्तिका सर्व गर्दीसमोर त्याला तिचा पापा घायला लावते. त्याने तिचा पापा घेतला की मग उपस्थित गर्दीही त्याने मर्दुंगी दाखवल्याप्रमाणे टाळ्या पिटते, शिट्ट्या फुकते. पुढे तर ती नर्तिकाच त्या लेकराची तोंड धरून पप्पी घेते. अरे नृत्या सारख्या पवित्र आणि श्रेष्ठ कलेला अशा तथाकथित नर्तिकांनी पार गटारीत ढकलून दिलंय. लावणी सारख्या नृत्यात हात अन पाय सर्वात जास्त नाचत असतात पण लावणीच्या पोशाखात हल्लीच्या काही नर्तिका नको त्याच अवयवांचे जास्त नृत्य करतात मग आंबट शौकिनांचा मेळा तिथे का बरे नाही भरणार ? पार एका मेकांच्या बोकांडी बसून, गाड्यावर, पत्र्यावर, गच्चीवर, झाडावर बसून त्यांचे लटके झटके बघायला का बरे नाही गर्दी होणार ? लहान वयातच पोरांच्या नजरा वासनांध का बरं नाहीत होणार ? जिभल्या चाटत शाळकरी पोरं कशी बरं नाहीत नाचणार ? थांबा ! विचार करा, मुळापासून नासत चाललेलं हे सगळं समाजात पडणारं विषारी विरजण जर वेळीच थांबवलं नाही तर विचारशील पिढी नासून जायला वेळ लागणार नाही हे ध्यानात असू द्या.


नृत्य कलेला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा आहे पण या दशकात जेवढे केवढ्या अश्लील हावभाव आणि लटक्या झटक्यांनी तिच्यावर अतिक्रमण केलंय त्याने नृत्यकला बदनाम होत आहे. विवेक सोडून दिलेल्या काही प्रसिद्धीपिपासू नर्तिकांमुळेच नृत्य कलेत हे अतिक्रमण झालंय. आता तर देव देवतांच्या गाण्यांना सुद्धा रिमिक्सचा तडका देवून या आधुनिक हाडळणी बीभत्सरित्या थैय्या थैय्या नाचत आहेत आणि तथाकथित धर्म रक्षणावर वगैरे गप्पा मारणारे डोळे बंद करून झोपले आहेत. स्टेजच्या फ्लेक्सवर महापुरुषांचे फोटो आहेत पण याचे ना नाचणाऱ्यांना भान ना नाचवणाऱ्यांना. शिवरायांचा महाराष्ट्र आहे म्हणणाऱ्यांनो हे तुम्हाला पटतं का ? देव अन धर्माची आचार संहिता माहीत असणाऱ्यांनो तुम्हाला हे रुजते का ? शिवभक्तांनो आपल्या राजाच्या एकाही किल्ल्यावर नर्तिकालयासाठी इंचभर सुद्धा जागा नव्हती हे तुम्हाला ठाऊक नाही का ? नर्तिका ही एक स्त्री असते तिच्यातील त्या स्त्रीचा कायम आदरच असेल पण ती जर गैरनृत्य करून इथल्या युवापिढीला नादावून सोडत असेल तर तिच्या त्या कलेचा निषेध करावाच लागेल की. 


अशा डान्स शो च्या परवानग्या देतानाच पोलीस स्टेशन स्तरावर कठोर निर्बंध घालायला हवे. सदर कार्यक्रमात जर  युवकांना उकसावणारी बीभत्स नृत्य झाली तर संबंधित आयोजक आणि नर्तिकेवरही गुन्हे दाखल व्हायला हवे. मुळात असे कायदे आहेतही पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही हेच दुर्दैव. असले कार्यक्रम आयोजित करणारेही मोठे मासे असताना आणि त्यांच्यामागे त्याहून मोठे शार्क मासे असतात मग अशा अवस्थेत पोलीस प्रशासनाकडून तरी कारवाईची काय अपेक्षा ठेवायची ? अन्यथा आजवर जे डान्स शो झालेत त्या रीतसर परवानग्या घेवूनच झाले असतील की, मग तरीही एवढा नंगा नाच कसा पचवला जातो ?




मी एक लोकव्याख्यानकार आहे. समाजात चांगला विचार रुजवणं आणि वाईट विचारांना मूठ माती देणं माझं काम आहे. माझ्या व्याख्यानातून तर मी या गोष्टींवर नेहमीच आसूड ओढत आलोय पण एक लेखक म्हणूनही गेली काही वर्ष मनाला खटकत असलेली आणि माझ्या विवेकी मेंदूला न पटणारी गोष्ट इथे परखडपणे मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. माझ्या लिखाणाशी आपण सहमत असाल नसाल पण बिथरत चाललेली युवा पिढी मी खूप जवळून अनुभवत आहे. विभयभंग, छेडछाड, बलात्कार या सारख्या घटना वाढण्यामागे अनेक कारणे आहेत त्यातलेच एक हे देखील आहे. या नर्तिका नाचत असताना स्टेजच्या अवती भवती उभा राहून तिच्यावर खिळलेल्या नजरा एकदा निरखून बघा. तुम्हाला त्या डोळ्यात या लेखाचे तात्पर्य दिसेल. 


बाकी हा लेख कोणत्याही विशिष्ठ एखाद्या व्यक्तीबद्दल लिहिला नसून तो एका बीभत्स वृत्तीबद्दल लिहिला आहे. या विषयाबद्दलच्या तुमच्याही काही भावना असतील, अनुभव असतील तर कमेंटबॉक्समधे अवश्य नोंदवा. पोस्ट वाचणाऱ्यांचे कमेंट वाचूनही प्रबोधन होईल याची खात्री आहे. काही आवली पोरांनी जर वाकड्या तिकड्या कमेंट केल्याच तर चांगल्या तेवढ्या वाचा, लय इरसाल अन बिलिंदर असतील तर दुर्लक्ष करा. शक्यतो वृत्तीबद्दल लिहा, विशिष्ठ व्यक्तीबद्दल लिहिणे टाळा. आणि मी लेखात उल्लेख केलेल्या तथाकथित नर्तिकांचे फोटो/व्हिडिओ वगैरे पोस्ट करणे टाळा. सार्वजनिक स्थळी नाचण्याची आचार संहिता आधुनिक नर्तिकांना कळेल का नाही माहीत नाही पण किमान त्यांना बोलवणाऱ्यांनी तरी ती पाळावी म्हणून हा अट्टाहास.


विशाल गरड.

लेखक तथा लोकव्याख्यानकार (महाराष्ट्र)

Thursday, June 25, 2026

आरोग्यदायी तुकाराम

दूधाच्या भावात अवघ्या महिनाभरातच लिटरमागे दहा बारा रुपयांची वाढ आजवर सरकारला शक्य झाली नाही पण ते तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईमुळे शक्य झाले. बाजारातील डुप्लिकेट दूध बंद झाले त्यामुळे आपोआपच ओरिजनल दुधाची किंमत वाढली. जर मुंढे साहेबांनी काही दिवसात एवढे जबरदस्त काम केले असेल तर या आधी अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त काय फक्त भेसळखोरांचे आणि गुटखा माफियांचे हाफ्ते खावून ढेकरा देत होते का? या आधी आयुक्त पदावर काम केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या आरोग्याचे काळजी न घेतल्याबद्दल दोषारोप दाखल करून त्यांची चौकशी व्हायला हवी तसेच इडी ने अशा अधिकाऱ्यांच्या संपत्तीची जरा मन लावून माहिती काढायला हवी. 


राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या थेट आरोग्याशी संबंधित असलेल्या विभागावर कुचकामी, भ्रष्टाचारी आणि हतबल अधिकारी बसवणे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणे आहे. आजवर कमी वयात जे अटॅक येवून मेले, फुड पॉयझनिंगने गेले, लहान लेकरे दगावली, कॅन्सरची वाढ झाली, बीपी आणि मधुमेहाची जणू लाटच आली याला मुख्य कारण आहार आहे. शहरात तर पॅकिंग शिवाय काहीच घरात येत नाही. जन्मापासून जर प्रिझर्वेटिव्हचा रतीब पोटावर होणार असेल तर शरीराचे काय होत असेल. 


सध्या गावागावातले गाई म्हशींचे गोठे दिसेनासे झालेत. गावातील कळप ची कळप संपले आहेत. एकीकडे दुधाचे उत्पन अति प्रचंड प्रमाणात घटले असताना दुधाची मागणी मात्र अति प्रचंड प्रमाणात वाढली आहे. तरीही अगदी कोणत्याही दुकानात पिशवीतले दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध कसे ? समाजातील उच्चभ्रू व्यक्ती तीनशे चारशे रुपये किमतीने दूध पित असतात. मुळात शुद्ध गाई म्हशीच्या कासेतून निघालेल्या दुधाची हीच खरी किंमत असते. जे ओरिजनल असते ते महाग असते मग चाळीस पन्नास रुपये लिटर मधे मिळणारे ते काय असले ? इथे दुधाचीच जर ही गत आहे तर खवा आणि पनीर बाबत किती भेसळ असेल ?


आपला जीव हा कोणताही पक्ष, नेता आणि सरकारपेक्षा मौल्यवान असतो. जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे सरकारचे परम कर्तव्य असायला हवे. मागे भलत्याच प्रकरणामुळे चर्चेत आलेले या खात्याचे मंत्री त्यांच्याच खोलीत सापडलेल्या वस्तूंवरून या खात्याला कितपत न्याय देवू शकतात यावर प्रश्नचिन्ह आहे. पण तुकाराम मुंढे साहेबांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे भविष्यात त्यांचा आपोआपच कार्यक्षम मंत्री म्हणून उल्लेख होईल. भविष्यात त्यांनीही मुंढे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा राहायला पाहिजे म्हणजे त्यांच्या समोरील प्रश्न चिन्ह निघून जाईल. 


सरकार तुम्ही जनतेचे पालक आहात. आपली लोकसंख्याच इतकी आहे की भेसळ करूनही उत्पादनांची कमतरता भासेल. पण जर भेसळचा माल बंद झाला तर आपसूकच शेतकऱ्यांचा शंभर नंबरी अस्सल माल थेट ग्राहकांना मिळू लागेल. भाव चांगला मिळू लागल्यास शेतकरी नव्याने उत्पादन वाढीवर भर देतील. शिकलेली पोरं सुद्धा शेतीकडे वळतील अन महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करतील. सुरुवातीला ग्राहकांना पडल थोडी झळ पण शरीरापेक्षा महत्वाचं दुसरं काय आहे ? रोड, बिल्डिंग, कार्यालये, उड्डाणपुले, स्मारके यासोबतच लोकांच्या आरोग्याचा विकास करण्यासाठीही सरकारने मजबूतीने तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभा राहायला हवे. आता जर या पदावरून त्यांची उचलबांगडी झाली तर जनतेच्या रोषास सरकारला सामोरे जावे लागेल. अन जर कार्यकाळ पूर्ण होण्याआधी साहेबांची बदली केली तर जनता समजून जाईल भेसळखोर आणि गुटखा माफियांनी सरकार विकत घेतले. 


बाकी विविध विभागांच्या आयुक्त पदावर कार्यरत असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांनीही जर मुंढेंची री ओढली तर एक महिन्यात महाराष्ट्र धुवून निघेन. भ्रष्टाचारातून पैसा कमवून स्वतःच्या दहा पिढ्यांचा उद्धार करण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील पुढच्या दहा पिढ्यांनी तुमचे नांव घेतले पाहिजे असे कार्य करा. फार काही नाही फक्त कायद्याने जे अधिकार दिलेत तेवढेच तत्परतेने वापरा, गोरगरीबांचे कल्याण होईल. FDA मधे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनो, एक आई जेव्हा तिच्या दोन वर्षाच्या बाळाला पिशवीतले दूध पाजत असते ते फक्त तुमच्या विश्वासावर. आजवर इथल्या व्यवस्थेने तुमचे हात बांधले होते आता तुकाराम मुंढे साहेबांनी जनहितार्थ त्याला मोकळीक दिली आहे. “भले तरी देवू कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी”- तुका म्हणे. याप्रमाणे आपल्या पदाशी इमान राखून तुम्हीही तुमचे योगदान द्यावे हीच अपेक्षा.


विशाल गरड 

लोकव्याख्यानकार तथा लेखक. 

२५ जून २०२६, पांगरी 

Monday, October 21, 2024

भेटला विठ्ठल

कधी कधी वाटते की इन्स्टाग्रामवर माझे एक लाख नाही तर एक करोड फॉलोवर्स आहेत. कारण हल्ली सहज जरी कुठे बाहेर पडलो तरी एखादा तरी फॉलोअर्स भेटतोच. माझा प्रत्येक फॉलोवर हा माझ्याशी विचारांनी जोडला गेला असल्याने त्यांच्यासाठी मी त्यांचा जवळचा मित्र असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा स्वभाव त्यांना चांगला ठाऊक असल्याने मी कुठेही दिसू द्या ते अगदी हक्काने हाक मारतात आणि भेटतातच. आजचा किस्साही असाच आहे.


न्यू एरा पब्लिकेशनला मुलाखत देण्यासाठी मी जात असताना कर्वे रोडच्या सिग्नलवर गाडी थांबली. काही क्षणात शेजारी उभारलेल्या गाडी स्वाराने त्याचे हेल्मेट काढले आणि मला “विशाल सर” म्हणून हाक मारली. मी त्याला ओळख विचारताच त्याने सांगितले “सर, मी विठ्ठल लांबरुट, मोहोळ तालुक्यातील खुणेश्वरचा आहे. तुम्हाला खूप दिवसापासून फॉलो करतोय. एकदम दिसलात म्हणून हाक मारली” इतक्यात सिग्नल सुटला मग जाता जाता त्याला मी म्हणालो “पुढील चौकात थांब, तुला चहा पाजतो”. पुढे गेल्यावर आम्ही एका कँटीनवर चहासाठी थांबलो. मला वेळेत पोहोचायचे होते पण इतक्या आपुलकीने भेटलेल्या फॉलोवर्सला थोडा वेळ देवून, त्याला चहा पाजून थोड्या गप्पा मारल्या. गावाकडची, नोकरीची विचारपूस केली आणि निघून गेलो.


जाताना माझ्यासोबत सेल्फी काढतानाचा त्याला मिळालेला आनंद दिलेला वेळ सार्थकी लावून गेला. अशीच प्रेम करणारी, माझ्या विचारांना फॉलो करणारी माणसं पावलो पावली भेटतात म्हणून मी पुण्यात तरी निदान स्कूटीवर फिरत राहतो. त्यानिमित्ताने मला ओळखणारे हक्काने भेटतात, प्रतिक्रिया देतात आणि मलाही कमी वेळात खूप जणांना भेटता येते. भविष्यात मर्सिडीजमधे जरी फिरताना दिसलो तरी माझ्या फॉलोवर्स लोकांना भेटण्याचा हा प्रवास असाच असेल. कारण विशाल गरडला ‘विशाल’ करण्यात अशा लाखो फॉलोवर्सचा वाटा आहे. माझा प्रत्येक वाचक, श्रोता, फॉलोवर, आयोजक माझ्यासाठी विठ्ठलच आहे. यानिमित्ताने त्या सर्वांचेसुद्धा आभार.


विशाल गरड 

२१ ऑक्टोबर २०२४, पुणे 





Monday, October 7, 2024

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय ! ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच्या हेडिंग्स त्याही दिवसभरात दहा पंधरा मिनिटे. मालिका, रियालिटी शो वगैरे तर जवळ जवळ नाहीच. यासाठी मी रिटायरमेंट नंतरचा वेळ राखून ठेवलाय. आपली लोकसंख्या पाहता माझ्यासारख्यांची संख्या मतदान केलेल्या आणि नियमित बिगबॉस पाहणाऱ्यांपेक्षा नक्कीच जास्त असेल. असेल कशाला आहेच.


तरीही मोबाईलवर जेवढे केवढे शॉर्ट्स दिसायचे त्यावरून वाटायचे की ट्रॉफी सूरज जिंकेल आणि त्यानेच जिंकावी पण जिथे लोक इ.व्ही.एमवर विश्वास नाहीत ठेवत तिथे एकच व्यक्ती जिथे ९९ वेळा मत देवू शकते अशा गोष्टींवर कसा विश्वास ठेवतील ? पण अशांना सुद्धा विश्वास ठेवायला सुरजने भाग पाडले हा त्याचा बिगबॉस पेक्षा मोठा विजय आहे.


त्याला विनर म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलली नाही. फक्त एक स्मित देवून तो रितेशच्या मिठीत सामावला. पराभवापेक्षाही विजय पचवने आणि तो नम्रपणे स्वीकारणे अवघड असते. अस्सल मातीतला, गावरान भाषेतला, सुरज चव्हाणचा SQRQZQ चा गुलीगत पॅटर्न कलर्स वाहिनीच्या बुक्कीत टेंगुळ आणून विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे कौतुक व सुरजचे अभिनंदन ! मरी आईच्या नावानं चांगभलं !


विशाल गरड 

७ ऑक्टोबर २०२४




Monday, August 26, 2024

शिवशिल्प उभारताना

खरं सांगू जेव्हा हे उद्घाटन झाले तेव्हाच मी महाराजांच्या या शिल्पाबद्दल लिहिणार होतो. पण आपली माणसं परखड गोष्टी मांडल्यावर सुद्धा टिकेचे धनी करतात. याआधीही जेव्हा महाराजांचा देखावा राजपथावर मिरवला होता त्यावेळी मी “महाराजांची मान खाली का ?” या शिर्षकाखाली लेख लिहिला होता. जो मुंबईच्या नवा काळ या आघाडीच्या दैनिकाने पहिल्या पानावर हेडिंग करून छापला होता. एक कलाकार या नात्याने प्रत्येक कलाकृतीकडे बघण्याची आमची एक नजर असते. आता या फोटोतले शिवशिल्प पाहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला शोभणारे हे शिल्प होते का ? तर अजिबात नाही. अगदी सुमार दर्जाची ही शिल्पकला होती. निसर्गालाच ती बघवली नाही म्हणून वादळाने ते शिल्प ढासळले असावे. त्या कामाचा दर्जा वगैरे काय असेल हे तर पुतळ्याच्या ठेवणीवरूनच समजून येते. खरंच सांगा आजवर तुम्ही जेवढे केवढे अश्वारूढ पुतळे पाहिले असतील त्याहून हा पुतळा तुम्हाला कसा


महाराष्ट्रात शिल्पकलेतील कलकारांची अजरामर नावे असताना हा पुतळा नेमका कोणाकडून बनवून घेतला असेल ? अरे महाराज उभे करताना किमान त्यांच्या कर्तृत्वाची जाण ठेवून तरी त्यांच्या पुतळ्याला न्याय द्यायला हवा. अर्ध्याहून अधिक भारत ज्यांच्या नावावर होता त्यांचे शिल्प उभा करताना सुद्धा तेवढी भव्यता साकारणे शक्य होत असेल तरच धाडस करत जावा. अन्यथा अशी सुमार दर्जाची शिल्पकला उभी न केलेली बरी. पुतळे उभा करण्याचा सरकारचा हेतू जरी चांगला असला तरी बांधकामे पक्की होण्यासाठी जरा वेळ जाऊच द्यावा लागतो. असे नेते वगैरे येणार म्हणून घाई गडबडीत उभारायला तो काय तात्पुरता देखावा वाटला की काय ? सदर पुतळा उभारलेल्या ठेकेदारांनो. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी गडावर लावलेला एक दगड सुद्धा प्रचंड ऊन, वारा, पाऊस झेलत अजून जागचा हालत नाही रे पण तुमची कामे ही अशी जर वाऱ्यावर उडून चालली तर कसे चालायचे. आता पुन्हा त्याच जागी शिवशिल्प उभा करायचे असेल तर ते अतिशय सुबक, दर्जेदार आणि महाराजांचा तलवार घेवून उभारल्याचा आवेश आणि आत्मविश्वास लख्ख प्रकट होणारे असावे एवढीच एक शिवविचारांचा सेवक नात्याने माझी माफक अपेक्षा. जय शिवराय !


विशाल गरड

२६ ऑगस्ट २०२४, पांगरी


(टिप : महापुरुषांच्या पडलेल्या किंवा तुटलेल्या पुतळ्याचे फोटो शेअर करणे माझ्या बुद्धीला पटत नाही. कारण ते पाहून जर माझ्याच भावना दुखावल्या जात असतील तर इतरांच्याही त्या दुखावण्याचा मला अधिकार नाही. आपणही त्या घटनेचे फोटो शेअर करणे टाळता आले तर टाळा ही विनंती.)






Thursday, August 22, 2024

विस्कटलेल्या वासना

कोपर्डी काय ? हिंगणघाट काय ? मणिपूर काय ? कलकत्ता काय ? आणि आता बदलापूर काय ? ते नराधम आपल्या लेकी बाळींना कधी जाळून मारतील, कधी सामूहिक बलात्कार करून मारतील, कधी नागडी धिंड काढतील, कधी मारून तुकडे करतील तर कधी अंगणात खेळायच्या वयात तिला कॉटवर नेतील. कारण मारणाऱ्यालाही एक पक्क माहित झालंय की मी काहीही केले तरी लगेच मरणार नाही. प्रकरण सोशल मीडियावर उचलले तरच मेन स्ट्रीम मिडिया मधे येईल, मेन स्ट्रीम मिडिया मधे आल्यावरच आंदोलन उभे राहील आणि आंदोलन झाल्यावरच सरकार खडबडून जागे होईल. आजवर अशा हजारो निर्भया हेडलाईन बनण्याआधीच डेड झाल्यात. काळ बद्दललाय, माणसं बदलली तश्या त्यांच्या मानसिकताही बदलत गेल्या पण न्यायव्यवस्था अजूनही म्हणावी तशी बदलली नाही. बलात्काराच्या घटना घडणार, फेसबुक, व्हाट्स ऍप निषेधांच्या पोस्टनी भरून वाहणार, मेणबत्त्या जळणार, मोर्चे निघणार, दुकाने बंद होणार. काही दिवसांनी, महिन्यांनी हे पुन्हा करावे लागणार.


चिमुकल्या जिवाकडे बघताना या लिंगपिसाट नराधमांच्या मनात असे विचार येतातच कसे ? चांगलं चुंगलं खाऊनही या मानवी शरिरात हे नासकं वीर्य उत्पन्न होतेच कसे ? अशा प्रकारच्या अत्याचाराचा विकार डोक्यात येणाऱ्या मेंदुचा खिमा करून गिधाडांना खायला टाकायला हवा. जिवंतपणीच यांच्या अंगावरची चामडी काढुन हे नागडे देह तळपत्या उन्हात पशु पक्षांना खाण्यासाठी रस्त्यावर टाकायला हवेत. अशा बलात्काऱ्यांचे मांस खाताना त्या पशुपक्षांनाही उल्टी येईल एवढा वाईट विचारांचा वास त्या नरदेहातुन सुटलेला असेल. जितक्या यातना बलात्काऱ्यांनी त्या स्त्रीला दिलेल्या असतात त्याहून हजारपटीने सोपे मरण त्यांना फाशीच्या रूपात मिळते. अशा शिक्षा ठोठावल्यापासून त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत हे आरोपी जेलमध्येच आरामात दहा बारा वर्षाचे बोनस आयुष्य जगून निघतात. मग याला न्याय म्हणायचा का ? 


नेहमीच पहिल्या गियर वर चालणाऱ्या न्यायव्यवस्थेने अश्या भयंकर घटनांसाठी तरी निदान टॉप गियर टाकायला हवा. बलात्कार रोज होण्याच्या, मर्डर रोज होण्याच्या, खूप घटना आहेत पण नराधमांना फाशी झालेल्या बातम्याच हल्ली ऐकू येत नाहीत. हेच खरं दुखणं आहे. “हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा नाही झाली पाहिजे” हे तर मी पण वाचलंय ओ, पण ते सुटलेले हजार किती निरपराध्यांना मारत असतील याचा विचार अक्षरशः छळतो मनाला. हे माननीय न्यायदेवते, तुला एवढंच मागणे आहे. मान्य आहे तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे पण तरीही अश्या घटनांचे निकाल देऊन त्याची अंमलबजावणी होईपर्यंत तुझी पट्टी थोडीशी सैल ठेवत जा. पोरींच्या आत्म्यास शांती मिळेल गं.


पशू, पक्षी आणि किटक सुद्धा प्रजननाचे नियम पाळतात. कुत्र्यांच्या हांडगुळी भाद्रपदातच दिसतात. गाईने माज केल्याशिवाय बैल तिच्याजवळ फिरकत नाही. लांडोरी जवळ आल्याशिवाय मोर प्रणय करत नाही. अहो एवढंच काय भुंगा सुद्धा फूल उमलण्याची वाट पाहतो, तो कधीच कळी कुरतडत नाही. पण माणूस हाच या पृथ्वीवरील असा एक प्राणी आहे ज्याला बारा महिन्यात कधीही, कुठेही आणि केव्हाही प्रणयाची भूक लागू शकते. आणि ती मिटवण्यासाठी निसर्गाचे नियम डावलून तो हैवान बनतो. कधी कधी त्याची क्रूरता पाहून त्यांना रक्षस म्हणणे त्या राक्षस समूहाचा सुद्धा अपमान असतो. अशा माणसावर थुंकणे म्हणजे थुंकण्याचा अपमान आहे, त्यांच्या अंगावर विष्ठा टाकणे हा त्या विष्ठेचा अपमान आहे, अशांना जनावरांची उपमा देणे हा जनावरांचा अपमान असतो. इतके ते भयंकर वागतात. 


जिथे महिला रात्री रस्त्यावर एकट्या फिरू शकत नाहीत अशा परिस्थितीत आपल्याला महासत्ता होण्याची स्वप्न तरी कशी पडू शकतात. जिच्या पोटातून जन्म घेतो तिलाच सुरक्षा प्रदान करू शकत नसुत तर आपल्या पुरुषत्वाचा काय फायदा. कायदा, कलमे, कोर्ट, कचेऱ्या, वकील, न्यायाधीश, पोलिस हे सगळं माणसांनीच तयार केलेल्या गोष्टी आहेत ना मग एका रात्रीत दुनिया बदलण्याची हिंमत ठेवणाऱ्यांनी हे कायदे आणि परंपरागत न्यायव्यवस्था नाहीत का बदलू शकत ? कोर्टाला नुसतं फास्ट ट्रॅक नाव देवून काय होणार. अवघ्या दोन तीन दिवसात खटला निकाली काढून चौथ्या दिवशी त्या नराधमाला फासावरलटकवल्याची बातमी बाहेर यायला पाहिजे मग बघा कोणी हिंमत नाही करणार पुन्हा. पण कोपर्डी सारख्या गुन्ह्यातील नराधम अजूनही जेलमध्ये दोनवेळचे जेवण करतात ही किती चीड आणण्यासारखी गोष्ट आहे. आजी माजी राज्यकर्ते याबद्दल फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसतात पण त्यांना लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी सगळेच शेपूट घालून बसतात. 


अरे बलात्काऱ्यांनो, वासनेची इच्छा ही काही मिनिटांची असते. तुम्हाला तिच्याशी लढता आले पाहिजे. नसेलच येत लढता तर जरा डोळे उघडे ठेवून इतर प्राण्यांकडे बघा. ते उगाच कुणावर बळजबरी करताना दिसणार नाहीत. त्यांच्याहूनही तुमची पातळी घसरली असेल तर मग सरळ दवाखान्यात जाऊन तुमचे अंडकोष काढून या, कारण तसेही तुमचे एक मिलीग्राम वीर्य बाहेर काढण्यासाठी जर तुमची वासनांध नजर तीन-चार वर्षाच्या चिमुरड्या मुलींवर पडत असेल तर त्यापेक्षा तुमची अंडकोष निकामी करुन तुम्ही षंढ म्हणून जगणे तुम्हाला परवडेल अन्यथा आता समाज तुम्हाला कायद्याची तमा न बाळगता ठेचून ठेचून मारेल. 


प्रा.विशाल गरड

२२ ऑगस्ट २०२४, पांगरी




Monday, August 12, 2024

विलक्षण योगायोग

आज वडिलांसोबत सोलापूरला गेलो होतो. त्यांची प्रशासकीय कामे आटोपून परत फिरताना आमची गाडी दुपारी ३ च्या सुमारास सोलापूर-बार्शी टोल नाक्याच्या थोडे पुढे अचानक बंद पडली. अनेक स्टार्टर मारले पण काही केल्या गाडी उचलत नव्हती. मी बाहेर येवून गाडीचे बोनट उघडून ठेवले. इतक्यात रोडवरून जाणारे दुचाकीस्वार ॲड.राहुल जानराव मला पाहून थांबले. याआधी माझी त्यांची ओळख नव्हती पण ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरुन माझा कंटेंट पाहत असत त्यामुळे त्यांनी मला थांबून त्याबद्दल कौतुकाची प्रतिक्रिया दिली. आमचे थांबण्याचे कारण समजताच वकील साहेबांनी त्यांच्या परिचयाच्या वसीम शेख या फिटरला तात्काळ फोन करून गाडीजवळ बोलावले.

काही मिनिटांत वासिम आला. त्याने गाडी चेक करून लगेच निदान सांगितले. डिझेल सप्लाय व्यवस्थित होत नाही. प्रेशर पंप निकामी झालाय. मी माझ्या नेहमीचा फिटर दयानंद सूर्यवंशीला कॉल करून सेकंड ओपिनियन घेतला तेव्हा त्याचेही तेच म्हणणे आले. आता सर्वात मोठा प्रश्न उभारला की तो पार्ट मिळेल कुठे. कारण गाडी बंद पडण्याचा असा प्रॉब्लेम आधीपासूनच होता. पण गाडी बंद झाल्यावर थोडयावेळाने चालू व्हायची म्हणून जास्त गांभीर्याने घेतले नव्हते. फोर्डचे स्पेअर पार्ट सहज उपलब्ध होत नसल्याने तो पार्ट टाकण्यास विलंब होत होता. पण आज ती अशी बंद पडेल याची कल्पना नव्हती. अखेर वसीमने त्याच्या एका मित्राला सेकंद हँड पंप मिळेल का याची विचारपूस केली आणि काय आमचं नशीब थोर म्हणून तो पंप लागलीच उपलब्धही झाला.

एवढ्यात सोलापूरहून पीकअप घेवून निघालेला आमचा गावकरी गणेश बगाडे आमच्याजवळ थांबला. त्याला वाटले बोनट उघडून गाडी कडेला उभी आहे म्हणल्यावर काहीतरी बिघाड झालेला असणार. गणेशच्या येण्याने माझी गाडी टोचण लावून वसिमच्या गॅरेजपर्यंत नेता आली. वासिमजवळ गाडी दुरुस्तीसाठी लावून आम्ही त्याच्या पिकअपमधे वडाळ्यापर्यंत आलो. तिथून सोलापूर परांडा गाडीत बसलो. गाडीत प्रचंड गर्दी होती. तिकीट काढताना कंडक्टर झिरपे साहेबांनी मला ओळखले. त्यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. तुडुंब भरलेल्या गाडीत त्यांनी त्यांची कंडक्टर सीटवर माझ्या वडिलांना बसवले आणि स्वतः माझ्यासोबत उभारले. पुढे बार्शीत उतरताच प्लेटफॉर्मवर कराड-लातूर गाडी उभाच होती. आम्ही लगेच ती गाडी पकडून अंधार पडण्याच्या आत पांगरीला पोहोचलो.

 


आता ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली ते सांगतो. यातले ॲड.राहुल जानराव यांना मला भेटण्याची खूप ईच्छा होती. माझी आणि त्यांची भेट व्हावी असे त्यांना सतत वाटायचे. माझ्या व्याख्यानाचे ते चाहते आहेत. यातला गणेश बगाडे हा कधीच इतक्या उशिरा सोलापूरहून निघत नाही नेमके आजच त्याला उशीर झाला. एस.टी.कंडक्टर झिरपे साहेबांची कधीच सोलापूर-परांडा गाडीवर ड्युटी नसते. नेमकी आजच त्यांची त्या गाडीवर ड्युटी लागली. फिटर वसिम शेखने त्याच्या गॅरेजचे सगळे सामान दुसरीकडे शिफ्ट केले होते. काहीवेळात तो सोलापूर शहरात चालला होता. आणि मी माझे वडील विजय गरड (दादा) यांच्यासोबत कधीच त्यांच्या राजकीय किंवा प्रशासकीय कामांसाठी सोबत जात नाही. त्यांचे नेहमीचे सारथी रवी काकडे त्यांच्या सोबत असतात पण आज सहजच त्यांच्यासोबत जाण्याचा विचार माझ्या मनात आला आणि मी गेलो. 

यावरून एक गोष्ट अनुभवली. “अगर किसी चीज को तुम दिलो जानसे चाहते हो तो पुरी कायनात तुम्हे उसे मिलाने मे जुटी रेहती है.” हे सगळं नसतं घडलं तर कदाचित आम्हाला  खूप त्रास झाला असता पण संकट आले आणि अगदी दुसऱ्याच क्षणाला ही इतकी माणसं जादू सारखी भेटली आणि सगळं काही सुरळीत होवून आम्ही सुखरूप घरी पोहोचलो. या पृथ्वीवर अशी कोणतीतरी एक शक्ती नक्की आहे जी जात, धर्म, पंथ, वर्ण याच्या पलीकडे जाऊन हे सगळं इतक्या पध्दतशीरपणे घडवून आणते. आजच्या दिवशीचा हा अनुभव सदैव स्मरणात राहील. ॲड. राहुल जानराव, गणेश बगाडे, वसीम शेख, झिरपे साहेब, रवी काकडे या सर्वांचे मनापासून आभार. 


विशाल गरड

१२ ऑगस्ट २०२४, (सोलापूर-बार्शी रोडवरून)



शिवरायांच्या महाराष्ट्रात, नर्तिकांचा हैदोस.

​ सध्या बीभत्स नृत्याविष्कार सादर करणाऱ्या काही नर्तिकांनी महाराष्ट्रभर नुसता हैदोस माजवलाय. संतांचा अभंग आणि ओव्यात न्हावून निघणारा महाराष...