Thursday, August 22, 2024

विस्कटलेल्या वासना

कोपर्डी काय ? हिंगणघाट काय ? मणिपूर काय ? कलकत्ता काय ? आणि आता बदलापूर काय ? ते नराधम आपल्या लेकी बाळींना कधी जाळून मारतील, कधी सामूहिक बलात्कार करून मारतील, कधी नागडी धिंड काढतील, कधी मारून तुकडे करतील तर कधी अंगणात खेळायच्या वयात तिला कॉटवर नेतील. कारण मारणाऱ्यालाही एक पक्क माहित झालंय की मी काहीही केले तरी लगेच मरणार नाही. प्रकरण सोशल मीडियावर उचलले तरच मेन स्ट्रीम मिडिया मधे येईल, मेन स्ट्रीम मिडिया मधे आल्यावरच आंदोलन उभे राहील आणि आंदोलन झाल्यावरच सरकार खडबडून जागे होईल. आजवर अशा हजारो निर्भया हेडलाईन बनण्याआधीच डेड झाल्यात. काळ बद्दललाय, माणसं बदलली तश्या त्यांच्या मानसिकताही बदलत गेल्या पण न्यायव्यवस्था अजूनही म्हणावी तशी बदलली नाही. बलात्काराच्या घटना घडणार, फेसबुक, व्हाट्स ऍप निषेधांच्या पोस्टनी भरून वाहणार, मेणबत्त्या जळणार, मोर्चे निघणार, दुकाने बंद होणार. काही दिवसांनी, महिन्यांनी हे पुन्हा करावे लागणार.


चिमुकल्या जिवाकडे बघताना या लिंगपिसाट नराधमांच्या मनात असे विचार येतातच कसे ? चांगलं चुंगलं खाऊनही या मानवी शरिरात हे नासकं वीर्य उत्पन्न होतेच कसे ? अशा प्रकारच्या अत्याचाराचा विकार डोक्यात येणाऱ्या मेंदुचा खिमा करून गिधाडांना खायला टाकायला हवा. जिवंतपणीच यांच्या अंगावरची चामडी काढुन हे नागडे देह तळपत्या उन्हात पशु पक्षांना खाण्यासाठी रस्त्यावर टाकायला हवेत. अशा बलात्काऱ्यांचे मांस खाताना त्या पशुपक्षांनाही उल्टी येईल एवढा वाईट विचारांचा वास त्या नरदेहातुन सुटलेला असेल. जितक्या यातना बलात्काऱ्यांनी त्या स्त्रीला दिलेल्या असतात त्याहून हजारपटीने सोपे मरण त्यांना फाशीच्या रूपात मिळते. अशा शिक्षा ठोठावल्यापासून त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत हे आरोपी जेलमध्येच आरामात दहा बारा वर्षाचे बोनस आयुष्य जगून निघतात. मग याला न्याय म्हणायचा का ? 


नेहमीच पहिल्या गियर वर चालणाऱ्या न्यायव्यवस्थेने अश्या भयंकर घटनांसाठी तरी निदान टॉप गियर टाकायला हवा. बलात्कार रोज होण्याच्या, मर्डर रोज होण्याच्या, खूप घटना आहेत पण नराधमांना फाशी झालेल्या बातम्याच हल्ली ऐकू येत नाहीत. हेच खरं दुखणं आहे. “हजार गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा नाही झाली पाहिजे” हे तर मी पण वाचलंय ओ, पण ते सुटलेले हजार किती निरपराध्यांना मारत असतील याचा विचार अक्षरशः छळतो मनाला. हे माननीय न्यायदेवते, तुला एवढंच मागणे आहे. मान्य आहे तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे पण तरीही अश्या घटनांचे निकाल देऊन त्याची अंमलबजावणी होईपर्यंत तुझी पट्टी थोडीशी सैल ठेवत जा. पोरींच्या आत्म्यास शांती मिळेल गं.


पशू, पक्षी आणि किटक सुद्धा प्रजननाचे नियम पाळतात. कुत्र्यांच्या हांडगुळी भाद्रपदातच दिसतात. गाईने माज केल्याशिवाय बैल तिच्याजवळ फिरकत नाही. लांडोरी जवळ आल्याशिवाय मोर प्रणय करत नाही. अहो एवढंच काय भुंगा सुद्धा फूल उमलण्याची वाट पाहतो, तो कधीच कळी कुरतडत नाही. पण माणूस हाच या पृथ्वीवरील असा एक प्राणी आहे ज्याला बारा महिन्यात कधीही, कुठेही आणि केव्हाही प्रणयाची भूक लागू शकते. आणि ती मिटवण्यासाठी निसर्गाचे नियम डावलून तो हैवान बनतो. कधी कधी त्याची क्रूरता पाहून त्यांना रक्षस म्हणणे त्या राक्षस समूहाचा सुद्धा अपमान असतो. अशा माणसावर थुंकणे म्हणजे थुंकण्याचा अपमान आहे, त्यांच्या अंगावर विष्ठा टाकणे हा त्या विष्ठेचा अपमान आहे, अशांना जनावरांची उपमा देणे हा जनावरांचा अपमान असतो. इतके ते भयंकर वागतात. 


जिथे महिला रात्री रस्त्यावर एकट्या फिरू शकत नाहीत अशा परिस्थितीत आपल्याला महासत्ता होण्याची स्वप्न तरी कशी पडू शकतात. जिच्या पोटातून जन्म घेतो तिलाच सुरक्षा प्रदान करू शकत नसुत तर आपल्या पुरुषत्वाचा काय फायदा. कायदा, कलमे, कोर्ट, कचेऱ्या, वकील, न्यायाधीश, पोलिस हे सगळं माणसांनीच तयार केलेल्या गोष्टी आहेत ना मग एका रात्रीत दुनिया बदलण्याची हिंमत ठेवणाऱ्यांनी हे कायदे आणि परंपरागत न्यायव्यवस्था नाहीत का बदलू शकत ? कोर्टाला नुसतं फास्ट ट्रॅक नाव देवून काय होणार. अवघ्या दोन तीन दिवसात खटला निकाली काढून चौथ्या दिवशी त्या नराधमाला फासावरलटकवल्याची बातमी बाहेर यायला पाहिजे मग बघा कोणी हिंमत नाही करणार पुन्हा. पण कोपर्डी सारख्या गुन्ह्यातील नराधम अजूनही जेलमध्ये दोनवेळचे जेवण करतात ही किती चीड आणण्यासारखी गोष्ट आहे. आजी माजी राज्यकर्ते याबद्दल फक्त एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत बसतात पण त्यांना लवकरात लवकर फासावर लटकवण्यासाठी सगळेच शेपूट घालून बसतात. 


अरे बलात्काऱ्यांनो, वासनेची इच्छा ही काही मिनिटांची असते. तुम्हाला तिच्याशी लढता आले पाहिजे. नसेलच येत लढता तर जरा डोळे उघडे ठेवून इतर प्राण्यांकडे बघा. ते उगाच कुणावर बळजबरी करताना दिसणार नाहीत. त्यांच्याहूनही तुमची पातळी घसरली असेल तर मग सरळ दवाखान्यात जाऊन तुमचे अंडकोष काढून या, कारण तसेही तुमचे एक मिलीग्राम वीर्य बाहेर काढण्यासाठी जर तुमची वासनांध नजर तीन-चार वर्षाच्या चिमुरड्या मुलींवर पडत असेल तर त्यापेक्षा तुमची अंडकोष निकामी करुन तुम्ही षंढ म्हणून जगणे तुम्हाला परवडेल अन्यथा आता समाज तुम्हाला कायद्याची तमा न बाळगता ठेचून ठेचून मारेल. 


प्रा.विशाल गरड

२२ ऑगस्ट २०२४, पांगरी




No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...