Saturday, September 3, 2022

सोनवणे सर अभिष्टचिंतन

एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या पोराने डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या तो बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे, एका किराणा दुकानदाराच्या पोराने डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या तो एम्स वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे. एका विधवा माऊलीच्या पोरीने डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या ती मुंबईच्या जे.जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे. एका रिक्षाचालकाच्या पोरीने डॉक्टर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या ती धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे. एका गवंड्याच्या पोराने इंजिनिअर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या तो पुण्याच्या सी.ई.ओ.पी मध्ये शिकत आहे. एका शेतमजूराच्या पोराने इंजिनिअर व्हायचे स्वप्न पाहिले सध्या तो व्ही.जे.टी.आय मध्ये शिकत आहे. अशा शेकडो यशोगाथा आहेत आमच्या महाविद्यालयात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या.

टिव्हीशनला लाखभर रुपये खर्च करून शहरात खाणे पिणे आणि राहण्याला नाही म्हणलं तरी दिड दोन लाख रुपये लागतातंच त्यातही मग कपडे लत्ता, वह्या पुस्तके यासाठीचा वीस पंचवीस हजार खर्च आलाच. दोन घासाची जेमतेम सोय करणाऱ्या कुटुंबाला वर्षाकाठी अडीच पावणे तीन लाख रुपायांचा खर्च न परवडणारा असतो. अशात मग संजीव सोनवणे नावाचा एक माणूस उभा राहतो आणि बालाघाटच्या डोंगर कुशीत डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय बांधतो जिथे याच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना तो शहरात वर्षभरात होणाऱ्या खर्चात इथं दोन वर्षे निवासी सांभाळून शिकवतो आणि नीट जेईई परीक्षांना जिंकण्यासाठीचं सामर्थ्य त्यांच्यात भरतो.

डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नीट आणि जेईई सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची एन.सी.आर.टी अभ्यासक्रमानुसार परिपूर्ण तयारी हल्ली किती शासकीय कनिष्ठ महाविद्यालयात करून घेतली जाते ? मग गरिबांना खाजगी क्लासेस शिवाय दुसरा कोणता पर्याय उरतो ? तेव्हा अशा परिस्थितीत आजच्या शिक्षण व्यवस्थेत सोनवणे सरांचा पर्याय 'दिपस्तंभ' म्हणून उठून दिसतो. लेकरू शिक्षण घेताना वाईट वळणाला लागू नये, खराब संगतीत हरवू नये, मोबाईल आणि टिव्हीच्या व्यसनात वाहू नये म्हणून विद्यार्थ्यांना मोबाईल आणि बाईक वापरास बंदी असणारा, नीट, सिईटी, जेईई परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणारा, सर्व सोयी सुविधायुक्त कॅम्पस त्यांनी शहराच्या गर्दीतून दूर उभारलाय.

सध्याची वाहवत चाललेली युवा पिढी पाहता. डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयासारख्या निवासी संकुलाची समाजाला गरज आहे आणि म्हणूनच समाजाची ही गरज पूर्ण करण्यासाठी सोनवणे सरांसारख्या संस्था चालकांची गरज आहे. सरांनी पाहिलेल्या भव्य स्वप्नांचा एक खांब बनता आल्याचे मला नेहमीच समाधान वाटत आलंय. सोबतच पिढी घडवण्याच्या या कार्यात मी सरांसोबत मागील एक दशकापासून खंबीरपणे उभा असल्याचा अभिमानही उत्तरोत्तर वाढतच आहे. आज सोनवणे सरांचा वाढदिवस यानिमित्ताने सरांना दीर्घायुष्य लाभो आणि आमच्या संस्थेतुन हजारो विद्यार्थी घडून यशाच्या शिखरावर विराजमान होवोत एवढेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझे अभिष्टचिंतन. 

प्रा.विशाल गरड
०३ सप्टेंबर २०२२, पांगरी

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...