Friday, June 30, 2017

| पेंटर ©

आज काॅलेजहुन येताना आमच्या पांगरीच्या काळ्या मारूतीजवळ असलेल्या मृदगंद अॅग्रो प्रोड्युस कंपनीच्या रोडटच बोर्डावर बार्शीचे जाधव पेंटर खुर्चीवर उभा राहुन हातात ब्रश घेऊन रंगकाम करताना दिसले. तिथुन जाताना माझ्या गाडीचा वेग जेवढा जास्त होता तेवढ्याच वेगाने पेंटरचे रंगकाम पाहुन मी दहा वर्ष मागे गेलो; कारण अशा गोष्टी हल्ली दुर्मिळच पहायला मिळतात. रोडवरून जाताजाताच सर्रकन गाडी वळवुन मी त्यांच्या जवळ जाऊन सेल्फी घ्यायलो. वसाड माळावर एवढ्या आवर्जुन माझ्या सारख्या कलाकारासोबत ह्यो कोण बरं फोटो काढत आसलं ? असं त्यांना वाटलं, तेवढ्यात मी त्यांना माझी ओळख सांगुन गप्पा माराय लागलो. बार्शीचे सुप्रसिद्ध पेंटर राम गरड हे आमच्याच खान्दानातले त्यांच्या कुंचल्यातुन साकारलेली जिवंत अक्षरे अजुनही सबंध बार्शीत दिसतील. आजही कुठे सुंदर ऑईलपेंट वर्क पाहीले कि कोपऱ्यात त्या पेंटरचे नांव शोधायला नजर धडपडत असते. माझे हे बोलणे ऐकुण त्यांनीही त्यांचे काही अनुभव मला सांगितले.
आजच्या डिजीटल होर्डींगच्या जमान्यात जाधव पेंटर सारख्या कितीतरी हरहुन्नरी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षानुवर्ष टिकणाऱ्या ऑईलपेंट वर्क ऐवजी काही दिवस आयुष्य असलेल्या होर्डींगलाच जास्त पसंदी मिळत असल्याने अशी कामे करणारी माणसं आता क्वचितच दिसत आहेत.
जाधव पेंटर ए.टी.डी. आहेत. गेल्या चाळीस वर्षापासुनचा त्यांचा हा व्यवसाय आहे. "दहा बारा वर्ष्यापुर्वी लई सुकाळ होता. निवडणुक आल्यावर तर रात्रंदिवस कामं उरकत नव्हती पण आता कधीतरीच डिजीटल लावुन लावुन कटाळल्यावर आमच्यासारख्याला असा एकांदा बोर्ड रंगवायचं काम मिळतंय" असे ते सांगत होते. मोजक्याच पैशात पुढील दहा विस वर्ष न पुसणारं नांव; ही पेंटर मंडळी त्या बोर्डावर छापतात. कलाकाराच्या कुंचल्यातुन साकारलेली सुबक व उठावदार अक्षरे दिर्घायुषी असतात परंतु होर्डींगवरची नावे मात्र काही दिवसातच उडुन जातात.
अगदी काही महिन्यांपुर्वी घरात लग्नकार्य असले की मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजुला भालदार चोपदार काढले जायचे परंतु डिजिटल इंडीयात मात्र ते सुद्धा आता डिजीटलवरच छापुन मिळायलेत. अवघ्या काही मिनिटात आपल्याला हवे असे आणि पायजेल तितक्या प्रमाणात हे डिजीटल सहज उपलब्ध होत असल्याने लगीनसराईतली पेंटरची कामे संपली. भव्य दिव्य होर्डींग्जमुळे आणि आधुनिक छपाई यंत्रणेमुळे निवडणुकीची कामे संपली. परंतु जे जितक्या लवकर निर्माण होते त्याचे आयुष्यही त्याच्या निर्मितीच्याच पटीत असते हे ही तितकच खरं.
जुन्या पेंटर मंडळींना त्यांच्या तत्कालिन अभ्यासक्रमात ब्रश आणि रंगांचे प्रशिक्षण मिळाले होते परंतु कम्पुटर मधल्या कोरल ड्राॅ आणि अॅडाॅब फोटोशाॅप या साॅफ्टवेअर मध्ये ब्रश लागत नाही, ना रंग; फक्त ते हाताळण्याचे ज्ञान लागते. जलद गतीने धावणाऱ्या या बहुरंगी जगात टिकुन राहण्यासाठी आपल्या पिशवीत असलेल्या खडु, पट्टी, ब्रश आणि रंगांच्या डब्यांसोबतच फोटोशाॅप अपलोडेड लॅपटाॅप सुद्धा असणे आता तितकेच गरजेचे आहे.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० जून २०१७

Thursday, June 29, 2017

| अज्ञानाचा बळी ©

पर्वा आमच्या पांगरी जवळील कुसळंब या गावी एका महिलेने स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी टाकुन आत्महत्या केली. हि बातमी समजल्यावर मन सुन्न झालं परंतु या घटनेचा तपशिल जेव्हा आमच्या पांगरीचे पत्रकार गणेश गोडसे यांच्या बातमीत वाचला तेव्हा तर अज्ञानाच्या धुंदीत अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांबद्दल माझ्या मनात तिव्र राग निर्माण झाला.
सदर मयत स्रीला दोन मुली झाल्या म्हणुन तिच्या सासरच्या माणसांकडुन तिचा अतोनात छळ सुरू होता. याच छळास कंटाळुन विहिरीजवळ स्वतःच्या एका पाच वर्षाच्या व दुसऱ्या तिन वर्षाच्या मुलीला साडीने बांधुन त्या विवाहित स्रीने विहिरीत उडी घेऊन जिवनयात्रा संपवली. या बातमीचे विश्लेषण मी एक आत्महत्या आणि दोन खुन असेच करेल. कारण त्या दोन चिमुरड्यांना मरायचं नसतानाही आईने स्वतःच्या कुशीत घेऊन जलसमाधी घेतली हे प्रचंड ह्रदयद्रावक आहे.
प्रगत आणि शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडणं खरंच लाजिरवाणं आहे. एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता शंभर टक्क्याहुन पुढे चालली तर दुसरीकडे याच समाजात राहणाऱ्या काही लोकांना नेमकं बायकोला मुलगा होत नसेल तर दोष कुणाचा ? याचं उत्तर ठाऊक नाही. टि.व्ही वर नाही तसल्या बावळट जाहिराती दाखवुन स्वतःचे प्रमोशन करणाऱ्या सरकारने स्रीला मुलगा वा मुलगी होण्यास कोण जबाबदार असतो याची एखादी जरी जाहिरात सह्याद्री वाहिणीवरून प्रक्षेपीत केली तरी अडाणी आणि अज्ञानी माणसांचे डोळे उघडतील व अशा घटनांना आळा बसेल.
मी माझ्या प्रत्येक व्याख्यानातुन स्री भ्रुणहत्या आणि समाजातील स्रीचे महत्व या विषयांना जाणिवपुर्वक स्पर्श करत आलोय. सध्याच्या समाजातील अशा प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी त्यांना समजेल ईतक्या गावरान भाषेत व्यक्त होत आलोय. परंतु अशी एखादी दुर्दैवी बातमी ऐकुण मन सुन्न होतं.
पारावर बसुन मोदीचे राजकारण, अमेरीकेची मैत्री, राष्ट्रपतीची निवडणुक, उपग्रह प्रक्षेपन असल्या बातम्या वाचुन घरी आल्यावर मात्र तुला मुलगाच का होत नाही म्हणुन स्रीला छळणाऱ्या, त्या व्यक्तीला दोष द्यावा, का त्याच्या अज्ञानाला हेच कळत नाही.
जे कोणी बायोलाॅजी शिकतात त्यांनाच याची सविस्तर माहिती असते परंतु अजुनही आपल्या समाजात असे कित्येक लोक आहेत कि ज्यांना वाटते मुलगा वा मुलगी होणे हे सर्वस्वी स्रीवरच अवलंबुन असते. ही गोष्ट किती खोटी आहे हे निदर्शनास आणने आपल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे.
एखाद्या स्रीला मुल होण्यासाठी जेवढा पुरूष जबाबदार असतो तितकाच तो मुलगा वा मुलगी होण्यासाठीही जबाबदार असतो हे एक वैज्ञानिक सत्य आहे. ग्रामिण भागात यावर चर्चासत्रे, व्याख्याने, शिबीरे, आयोजित केल्याने तसेच दुरचित्रवाणी व रेडीओ वरील जाहिराती आणि सोशल मेडीयावर याबाबत जनजागरन केल्याने कदाचित हे सत्य तळागाळापर्यंत पोहचेल; अन्यथा अशा आत्महत्या पुढेही होतच राहतील फक्त एका अज्ञानामुळे.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २८ जून २०१७

Saturday, June 17, 2017

| पांघरून ©

हिरव्यागार आंथरूनावरचं तुझं हे पाणीदार पांघरून असंच राहु दे, तुला गार वारा लागुन त्यातुन असंख्य धारा वाहु दे, चिंब चिंब भिजवलंस तु नदी नाले दुथडी भरलेत, शेतातले बांध आता ओसंडुन वाहिलेत.
काल काॅलेजहुन पांगरीला येत असताना उक्कडगांवच्या घाटावरून पांगरी शिवाराच्या अंगावरचं हे निसर्गाचे पांघरून पाहुन वरील शब्द आपसुकच उमगले. असा निसर्गाचा आविष्कार दिसला कि माझ्या मनातली हिरवळ गवतावनी हुरळुन जाते. यातुनच शब्दांचा कल्लोळ डोक्यात धिंगाणा घालायला लागतो. या साऱ्या शब्दांना एका परिच्छेदात मांडता मांडता नाकी नऊ येतात पण प्रयत्न थांबवणे रक्तातच नसल्याने त्या हरएक शब्दांना लाईनीत लावण्यासाठी मेंदुची शिस्त अविरत सुरूच असते म्हणुनच दोन दिवसांच्या गर्भकाळानंतर हा परिच्छेद छायाचित्रासह आपणापर्यंत पोहचलाय.
डोळ्यांनी पाहिलेली निसर्गाची अद्भुत कलाकृती आपल्या कवीमनाला सदैव ढुसण्या मारित असते. जोपर्यंत त्या घुसळण्यातुन शब्दरूपी लोणी बाहेर पडत नाही तोपर्यंत हे असंच सुरू असते. कधी कधी एका सेकंदात सुचणारा शब्द, दिवसभर विचार केल्यावर देखील सुचत नाही.
काल दिसलेलं हे काळेकुट्ट आभाळ जणु बाष्प स्वरूपात हवेत तरंगणारे एक तळेच होते. जर यांना वेळेतच थंड वारा झोंबला तर बोराच्या आटुळी एवढ्या थेंबांचा पाऊस पडुन अवघ्या तास दोन तासातच नद्याला पुर येतो. शेतकरी राजाचं सर्वात आवडतं पांघरून म्हणजेच हे पाण्याने भरलेले ढग असतात, ते नुसतं दिसुन उपयोग नसतो त्याला बरसण्यासाठी गार वारा पण लागतो आणि गार वारा निर्माण होण्यासाठी त्याला झाडं लागतात. आसल्या रौद्र ढगांना पाझर फोडण्यासाठी झाडे लावलीच पाहीजे. सरतेशेवटी "पाणी आडवा, पाणी जिरवा" या सोबतच "झाडे लावा, पाणी पाडा" हे सुद्धा अग्रक्रमाने महत्वाचेच.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १७ जून २०१७

Thursday, June 8, 2017

| पौस ©

शेतकऱ्याला मानसिक श्रीमंती बहाल करणारा निसर्गाचा सर्वात अद्भुत आणि हुकमी घटक म्हणजेच पाऊस होय. आज पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने उक्कडगांवच्या नदीला पुर आला आहे. अशातच काॅलेजची ड्युटी आटोपुन घराकडे निघताना या नदीतुन गाडीवरून येत असताना माझी खुप पंचाईत झाली. वास्तविक पाहता पुर आलेल्या नदीवरून वाहन घालणे हे अतिशय धोक्याचे असते परंतु पुर ओसरल्यानंतर पिंडरीएवढं पाणी वाहत असतानाच मी गाडी घालण्याचे धाडस केले. हि काळजी सर्वांनीच घ्यायला हवी कारण वाऱ्याच्या आणि पाण्याच्या वेगापुढं माणसाने बनवलेल्या सगळ्याच वस्तु गवताच्या काडीसारख्या वाहत जाऊ शकतात.
नदीच्या पुराची तिव्रता लक्षात घेऊन मी खुप वेळ नदीतिरावरच थांबणे पसंद केले शेवटी जेव्हा एक जण व्यवस्थितपणे बाहेर पडला तेव्हा मी पण पायातले साॅक्स मिटरजवळच्या खोबणीत कोंबले, बुटाडं ब्रेक आणि क्लचच्या वायरीत अडकवले आणि पॅन्ट जाईल तेवढी वर सरकवुन आभाळातुन पडलेल्या या तांबड्या अमृतावरून मी माझी गाडी यशस्वीपणे बाहेर काढली.
हे वाहणारं पाणी दिसायला जरी गढुळ असलं तरी गावाबाहेरच्या डोंगरातुन व बरडाऊन वाहुन आलेलं स्वच्छ पाणी आहे. पुढे हिच नदी गावच्या कडेने जात पाथरीच्या तळ्याला भेटते. गेल्या वर्षभरात साचलेली घाण आणि गावचा कचरा पोटात घेऊन गावकुस स्वच्छ करून हि नदी पुढे-पुढे जात राहते. माझ्या मते स्वच्छ भारत अभियानात सर्वात प्रभावी आणि प्रामाणिक कामगीरी जर कुणाची असेल तर ती अशा नद्या व नाल्यांचीच आहे.
आपल्या शरिरातली एखादीजरी रक्तवाहिणी चोकअप झाली तरी आपल्याला हार्टअटॅक येतो, असंच काहीसं या निसर्गाचे सुद्धा असेल असे मला वाटते. नद्या नाल्यांमध्ये जर आपणही वर्षभर सगळ्या गावाची आणि शहराची घाण टाकत राहिलो तर एक दिवस ते सुद्धा चोकअप होऊन निसर्गाला अटॅक येऊ शकतो जो मनुष्य जातीला कधीच परवडण्यासारखा नसेल.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ जून २०१७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...