Tuesday, March 27, 2018

| दोस्ती ©

कवी विकास पाटील म्हणजे माझ्या फेसबुकवरचा एक फाॅलोअर गतवर्षी जयसिंगपूरला झालेल्या व्याख्यानात आम्ही पहिल्यांदा भेटलो. गेली तीन वर्षापासुन तो आणि मी फेसबुक मित्र आहोत. लांबच्या प्रवासावर असताना माझ्या विचारांवर प्रेम करणाऱ्या विकास सारख्या दोस्तांना भेटायला मला आवडते. काल सांगलीला जात असताना विकासच्या ईस्लामपूरातील नवनाथ टि स्टाॅलला सदिच्छा भेट दिली. विकासचे वडील गेल्या दहा पंधरा वर्षापासुन हा व्यवसाय करतात. अतिशय कष्टाच्या जोरावर त्यांनी सर्व मुलांचे शिक्षण पुर्ण केले आहे. छोट्याशा घराचा बंगला तयार करायला त्यांना तब्बल तेरा वर्ष लागली. मुंगी सारखे काम करून हत्ती एवढे सामर्थ्य तयार केलेल्या विकासच्या वडीलांचा अभिमान वाटला. पर्वा बेंबळी येथील व्याख्यान आटोपल्यानंतर रात्रभरचा प्रवास करून पहाटेच ईस्लामपूरात पोहचलो. विकास पहाटे पाच वाजल्यापासुनच स्टॅण्डवरच्या त्याच्या टपरीवर माझी वाट पहात होता. गाडीतुन उतरताच कडकडुन मारलेल्या मिठीतुन विकासचे प्रेम वाहू लागले. मग आम्ही लगोलगच त्याच्या घरी प्रस्थान केले. आंघोळ अष्टमी उरकुन मी तयार होईपर्यंत मला ओळखणारे ईस्लामपुरातील अनेक युवक विकासच्या घरी आले. कुणी फुले आणली, कुणी बुके आणले तर कुणी शाल आणली. कधीही न भेटलेली व पाहिलेली ही माणसं फक्त आपल्या शब्दांमुळे ईतके प्रेम करतात हे पाहुण कृतार्थ झालो. आयुष्यात ही खऱ्या माणसांची दौलत कमावल्याचे सार्थक वाटले.
जमलेल्यांपैकी अझर काझी कडुन माझ्याबद्दलचीच माहिती ऐकताना मी स्वतःला आरशात बघीतल्याचाच भास झाला. ही माणसं आपल्याबद्धल एवढं सगळं ऐकुण आहेत हि गोष्टच मुळात बळ देणारी असते. चार जिल्हे ओलांडूनही लोकं एवढं प्रेम करतात हे पाहूण शब्दावरची श्रद्धा अजून दृढ होते. खिशात किती पैसे याहून डोक्यात किती विचार आणि ह्रदयात किती प्रेम भरलंय यावरूनच निस्वार्थी प्रेमाचा जन्म होत असतो व असे प्रेम अनुभवने हा सुद्धा एक स्वर्गीय अनुभव असतो जो मला ईस्लामपूरातील मित्र मंडळींकडून मिळाला. दोस्तहो तुम्हा सर्वांचे मनापासुन धन्यवाद. माझ्यासारख्या वाटसरूला तुम्ही दिलेला पाहुणचार आणि प्रेम चार शब्दात व्यक्त करणे कठिणय बस्स हा प्रेम व जिव्हाळा असाच आखीरी दम तक आबाद रहे यही दुवा..

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २७ मार्च २०१८

Sunday, March 25, 2018

बबन | चित्रपट परिक्षण ©

बबनचा पहिल्याजुटचा शो बघाया मिळाला. आख्खा पिच्चर हुस्तोर कधी सुरू झाला आन् कधी संपला कळलच नाय. प्रिमियरला इंटरवल बिंटरवलची भानगड नस्ती त्यज्यामुळं आपुट पिच्चर सलग बगाया मिळाला. दोन तासाच्या आखंड पिच्चरमंदी भाऊराव कऱ्हाडेनी लई जीव वतलाय. गावाकडच्या माणसांला तर बबनमदल्या हारेक पात्रावुन जीव ववाळुन टाकू वाटलं आशी अॅक्टींग किलीया समद्यांनी. पिच्चरमदी सुरूवातीला पुलिस स्टेशनमदी साहेब पोट भरायला डबा उघडतंय आणि शेवटाला मानवी आत्याचाराची बळी ठरल्याली हिराॅईन तिज्या पोटातलं पाप कुंबडीचं आंडं फुटावं तसं भित्ताडावर आपटून संपीवती. सुरूवात आन् शेवट आंगावर काटा आणणारा हाय. मधल्या येळत दुधाच्या धंद्याचं वास्तव, गावातलं खत्रुड राजकारण, बैजू पाटलाची दारूगीरी, काॅलेजमदली मस्ती आन् भांडणं बगाया भेटत्याती. गावरान,ईरसाल बबन्या कोमलच्या माग फिरताना, बोलताना आणि टपकं खाताना दिसतंय तरीबी नाद नाय सोडत 'हम खडे तो साला सरकार से बडे' म्हणत म्हणत दुस्मानांशी दोन हात करत बसतंय.

पिच्चरचा हिरो जरी बबन आसला तरी समदी माणसं आपुणमत्त्याच बैजू पाटलाच्या पिरमात पडत्यात कारण ही भुमिका दस्तुरखुद्द डायरेक्टर भाऊरावनी वटीवल्यामुळं त्येला दोनशे टक्के न्याय मिळालाय. मला सुदा बैजू बेंद्रे पाटलाचं पात्र लयच झ्याक वाटलं. गावात राहत आसताना आपल्या तोंडात येणाऱ्या गावरान शिव्या जश्श्आन तश्श्या बबनमदी ऐकायला मिळत्यात्या. ती तसलं शिवी देताना बीप बीप ची भानगडं हितं आज्याबात नाय. ए ग्रेड तर ए ग्रेड गेलं झॅटमारी आशीच भुमिका डायरेक्टरनं घेतल्यामुळं समद्या शिव्या हितं ऐकायला मिळत्यात्या. हाँ आता आसल्या शिव्या ऐकायची सवय नसणाऱ्याला जरा कसनुसं वाटलं; पण बुरा ना मानो ये कलाकारी है आसं म्हणुनशान सुडुन द्या.

आमच्या बार्शीचा कलाकार अभय चव्हाण या चिकण्या हिरोनं व्हिलनगीरी भारी साकारली हाय, त्येज्यातला समदा मध हित बघाया भेटतंया. पिच्चरमदी त्येजा रोल जितका कडू हाय त्येज्याऊन जास्त मला आभ्याची अॅक्टींग जास्त ग्वाड वाटली. आमच्या पांगरीचा सुपुत्र आन् बबनचा लाईन प्रोड्युसर शुभम गोणेकरनंबी अॅक्टींगची झलक भारीच मारलीया. आन् व्हय व्हय महत्वाचं म्हंजी तब्बल पस्तीस तासाच्या फुटेजला कात्र्या लावू लावू फकस्त दोन तासाचा पिच्चर बनीवलेल्या बबनचा एडिटर प्रदिप पाटोळेचं सुद्धा लई कौतुक वाटतंय मला. हे तिघंबी जिगरी गँगमदली हैत आपल्या.

पडद्यामागच्या कलाकारांना भाऊंनी पडद्यावरबी चान्स दिलाय म्हणून योगेश डिंबळे,प्रमोद चौधरी, इंद्रभान कऱ्हे, संदिप बोरगे, संभाजी देवीकर हि माझी दोस्त गँग येगयेगळ्या पात्रात बबनमदी दिसली. यवग्याने नानाची भुमिका जग्वारमदी बसुन अरूण गवळीगत डॅशींग साकारली, तसंच भाऊसाहेब शिंदे यांनी बबनची भुमिका पायजे आशीच साकारली त्येला गायत्री जाधव व शितल चव्हानने चांगली साथ दिल्याली हाय, एकुनच समद्याची केमिस्ट्री, फिजिक्स आन् बायोलाॅजी चांगलं जमुन आलंया.

कंडोमचा किस्सा व मक्याच्या फडातली बबन्या आन् पप्पीची झकडपकड पोट दुखस्तोर हाशीवती. ह्यातच भरीसभर म्हणून बैजू पाटील जवा लिंबाच्या काडीला कोलगेट लावून दात घासतंय आणि सरीकडं दारू प्यायला शंभर रूपये मागतंय तवातर आतडी फाटूस्तर हासू वाटतंय. आता माझं लिव्हल्यालं वाचूनच हासत बसू नका थेट्रात जाऊन बबन बघून या आन् पुना तुमीच मला सांगचाल व्हय राव डिक्टो आसंच हाय.

बाकी शहरात राहिलेल्या माणसांला सुट्टयांत गावाकडं ययची गरज नाय तो फिल तुमास्नी बबन बगुन शंभर टक्के मिळलंच. पोट भरून हसायला, धिर गंभीर व्हायला, किव यायला, गुलाबी गोष्टी बघायला, फायटिंग पहाया, प्रेमाचं चाळं शिकाया, आन् ह्ये समदं बघीतल्यावर पिच्चरची लास्ट फ्रेम बगुन डोस्क्यात मुंग्या आणणारा ईच्चार घुसवुन घेण्यासाठी बबन नक्की बघा.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २५ मार्च २०१८


Wednesday, March 21, 2018

| जळलेला माळ ©

काही महिण्यांपुर्वी याच माळरानाला कास पठारची उपमा देऊन लेख लिहिला होता आज त्याच माळाला जळलेला माळ असं नांव देऊन लेख लिहित आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर फुटणाऱ्या अंकुरापासुन सुरू झालेला गवताचा प्रवास अखेरीस राख होऊन संपतो. माळावर सहज चालता चालता किंवा मोहोळ वगैरे झाडताना गौरी पेटवण्यासाठी लावलेली आग जर वेळेवर नाही विझवली तर हजारो हेक्टरचे वाळलेले गवत जळून राख होतं. काडी टाकणाऱ्याला जर एवढी अक्कल आली तर अशी जळणारी कित्येक वने वाचतील. वाळलेलं गवत जळल्याचे दुःख आहेच परंतु त्याच गवताच्या आळवनात पक्षांनी घातलेल्या अंड्यांचा व डोळेही न उघडलेल्या पशुपक्षांच्या पिल्लांचा झालेला संहार मन हेलावून टाकणारा असतो. हजारो वन्यजीवांच्या तोंडचा घास धुरांच्या लोटात जळताना पाहून काळीज फाटून जातं. निसर्ग देवता हे सारं काही पाहत असते, एका क्षणात पाऊस पाडुन आग विझवण्याचे सामर्थ्य ठेवणारा निसर्ग अशा वेळी मात्र गप्प राहतो कारण त्याने मानवासाठी स्वतःला घालुन घेतलेले नियम तो शक्यतो स्वतःच पाळत असतो. परंतु असा वणवा पेटण्याच्या घटना पाहून त्याच्या लेकरासाठी त्याचाही जीव तिळतिळ तुटत असावा यातुनच जर उन्हाळ्यात पाऊस पडला तर आश्चर्य कशाचे. मी निसर्गाला देव मानणारा माणूस आहे. त्याच्याच लेकरांचा जर आपण असा छळ करायला लागलो तर तो वेळी अवेळी त्याच्या वेळापत्रकात बदल करून आपल्यावर बरसतो त्यालाच मग आपण अवकाळी व गारपीठ म्हणतो. आकाशात उडायची स्वप्न बघणारे पंख जेव्हा माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळे आगीत भस्मसाथ होतात तेव्हा त्याला कोण जबाबदार असतं ? परंतु ऐन तारूण्यातली पोरू जेव्हा अकाली मरतात तेव्हा देवाला शिव्या घालून आपण लगेच मोकळे होतो. निसर्ग स्वतःहून कुणाचं वाईट करत नाही आपणच आपल्या मृत्युची कारणे तयार करूण ठेवलेली असतात त्याला तो तरी काय करणार. जर माणसांचा तळतळाट एका माणसाला लागू शकतो तर निसर्गाचा तळतळाट का बरे आपल्याला लागणार नाही?

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २१ मार्च २०१८

Monday, March 19, 2018

| STEPHEN HAWKING ©

He is seating on a single chair since 33 years & his mind going out of earth for study. It doesn't matter where you are but what you think matters. His body parts not in his control still his brain was thinking about the universe. By overcoming personal disabilities he studied on wheelchair & achieved America's highest civilian award. He could't speak & move physically but he managed to write & speak with the help of technology. Here we have all the body organs in good condition & what we think ? What we study ? What we give to the nation ? This is a subject of introspection for all of us. Don't allow your disabilities to win over you instead defeat them & do as much as you can for nation.
Here is my small efforts to make his painting only by ball pen, at same time my fingers & eyes follow the instructions of my brain. My brain is full of his thoughts thats why it was possible. I have not only drawn this painting but also have studied the man who is in painting.

Author : Vishal Garad
Date : 19 March 2018


Sunday, March 11, 2018

| दिलखुलास ©

मी व्याख्यान करताना माझी ही छबी श्रोत्यांना एकदातरी पहायला मिळतेच. व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तीवर एखादी कोटी करून श्रोत्यांसह मनमुराद हसण्याचा मोह मला टाळताच येत नाही. धीरगंभीर व्याख्यान मला करता येत नसल्याने व्याख्यानाचा परिपुर्ण आनंद मी स्वतः घेतो म्हणूनच श्रोताही आनंदी होतो. वक्ता जर हजरबाबी आणि मिश्किल असेल तर श्रोत्यांसाठी ती एक वैचारिक मेजवानीच असते. मी व्याख्यानाच्या पाच सेंच्युऱ्या मारल्यानंतर आत्ता कुठे माझ्या अलिकडील व्याख्यानात वक्त्याचे हे दोन अलंकार स्वतःमध्ये उतरल्याची खात्री झाली आहे. अनुभव हाच सर्वात मोठा गुरू असतो याचीही जाणिव आता क्षणोक्षणी होत आहे.
व्याख्यानाच्या कार्यक्रमात समोर बसलेल्या श्रोत्यांचे आणि व्यासपीठावरील पाहुण्यांचे वक्त्याकडे बारिक लक्ष असते. गर्दीला खिळवुन ठेवण्याचे सामर्थ्य जसे जिव्हेत असते तसेच त्या गर्दीला आनंदी ठेवण्याचे सामर्थ्य देखील वक्त्याच्या हसण्यात असते. पुस्तक वाचल्यासारखी व्याख्याने, किंवा बोलण्याला ठरावीक आयत आखुन केलेली व्याख्याने श्रोत्यांना निरस वाटतात; कारण मी एक श्रोता म्हणुन केलेले हे परिक्षन आहे. आज जरी मी वक्ता असलो तरी माझ्या वक्तृत्वापेक्षा मी ईतरांना ऐकायला आणि ईतरांचे वाचायला जास्त वेळ देतो म्हणुनच माझी प्रगल्भता वाढत आहे. माझ्या तोंडापेक्षा माझे कान आणि डोळे मोठे आहेत (शब्दशः अर्थ घेऊ नये) म्हणुन शब्दांच्या फौजा माझ्या सदैव दिमतीला उभ्या असतात. सरतेशेवटी शब्दांच्या समुद्रात चमच्याने पाणी उपसणारा मी एक सामान्य वक्ता आहे अजुनतर सारा समुद्र उपसायचाय...

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ मार्च २०१८


गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...