Saturday, October 13, 2018

खबरदार ! युवराजांचं राजेपण जपा

छत्रपती संभाजी महाराजांनी अजरामर ईतिहास घडवला ही प्रकृती होती, त्यांचा जाज्वल्य ईतिहास ईमाने ईतबारे जतन करणे ही आपली संस्कृती आहे. परंतु स्वतः संशोधन न करता दुसऱ्यांच्या उष्ट्या वादग्रस्त लिखानाचा आधार घेऊन महापुरूषांबद्दल चुकीचे लिखान करणे ही विकृती आहे जी विकृती डाॅ.शोभा साठे नामक लेखिकेने "समर्थ श्री रामदास स्वामी" या पुस्तकातुन केली आहे. सर्वप्रथम याचा मी तीव्र निषेध करतो. त्या लेखिकेने तथाकथित पुस्तकात नेमके काय लिहिले आहे तो मजकुर इथे शेअर करणे मी मुद्दाम टाळला आहे; कारण त्यांनी लिहिलेले ते शब्द उगांच हजारो लोकांपर्यंत पोहचवून पुन्हा त्यांचाच हेतू साध्य होईल म्हणुन. पण हल्ली अशा विकृतींना जरा जास्तच जोर चढलाय. सुपिक मेंदुमध्ये असे नासके विचार जन्माला घालण्यामागे कारणेपण तशीच असावीत बहुधा. आज सोशल मिडियामुळे अशा विकृत गोष्टी लगेच समोर येत आहेत पण विचार करा व्हाॅट्स अॅप आणि फेसबुकच्या आधी असे विकृत लिखान असलेली कितीतरी पुस्तके आमच्याच माणसांच्या उबऱ्यापर्यंत पोहचली असावीत. ज्यांनी महापुरूषांबद्दल एक अवाक्षरही वाचले नसेल अशांनी जर असे विकृत लिखान वाचले तर तेच खरे समजून ते वागतील, जगतिल. त्यांच्या डोक्यावर छापलेली हि विषारी शाई पुसायला पुन्हा आपली किती वर्ष जातील ?

विकृती करणाऱ्याचे लिंग न पाहता त्याची मानसिकता ठेचायला हवी. गाबुळा अभ्यास करून महापुरूषांबद्दल भलतं सलतं लिहिणाऱ्यांना लाज वगैरे नसतेच मुळी म्हणुनच तर ते बदनामी करू शकतात. महापुरूषांच्या विचारांचा प्रभाव असलेली माणसं चुकीचा ईतिहास लिहित नाहीत आणि सांगतही नाहीत. परंतु हेतुपुरस्पर एखाद्या व्यक्तिमत्वाला संशयाच्या भोवऱ्यात उभा करून बदनाम करण्याचे षडयंत्र जर कोणी रचत असेल तर त्यांना नक्कीच धडा शिकवायला हवा आणि वाचनातुन हे विष लहान लेकरांना पाजण्याचा हा डाव वेळीच हाणुन पाडायला हवा. या ज्या कोणी बाईं राजांबद्दल चुकीच्या गोष्टी वकल्या आहेत त्यांची डाॅक्टरकी गटारीत भिजवायला हवी. त्यांनी जे काही संदर्भ यासाठी वाचले असतील ते देखील बदनामीचे झरेच असावेत. मी कुणी ईतिहासकार नाही आणि शास्रज्ञही नाही परंतु एक शंभूभक्त म्हणुन आजवर संभाजी महाराजांचा जेवढा केवढा ईतिहास वाचला असेल त्यातुन मला प्रचंड प्रेरणाच मिळाली आहे. कायद्याचे राज्य असल्याने न्यायिक मार्गाने निषेध नोंदवत आहोत अन्यथा अशी विकृती करण्याऱ्यांची बोटेच छाटायला हवीत. सत्य असेल तर जरूर मांडा पण असत्याला आपल्या सोयीने सत्य करून जर कोणी आमच्या अस्मिता दुखावत असेल तर त्याची गय केली जाणार नाही हे लक्षात ठेवा.

पाण्यावर तरंगता तोफखाना तयार करणारे छत्रपती संभाजी महाराज पहिले राजे होते. आता तोफखाना चालवायचा म्हणल्यावर त्यासाठी दारूगोळा तर अत्यावश्यकच असतो की. मग असा दारूगोळा खरेदी करण्यासंदर्भातली समकालिन पत्रे व तत्सम साहित्य काही गिण्यान मातीत गेलेल्या आणि हेतुपुरस्पर शंभुराजांना बदनाम करणाऱ्या व्यक्तींनी संदर्भ म्हणुन घेतले आणि त्यातला 'गोळा' काढुन फक्त 'दारू' याच शब्दाला अधोरेखित केले आणि नासवला आपल्या पराक्रमी, चारित्रवान युवराजांचा ईतिहास. लिहायची एवढीच खुमखुमी आली असेल तर जिवंत असलेल्या माणसांबद्दल लिहा की. हयात नसलेल्या व्यक्तींना बदनामीचा हार कशाला घालता. आणि तसंही छत्रपतींबद्दलच हे सगळं का घडतंय याचे एकमेव कारण म्हणजे प्रत्येकाच्या ह्रदयात असलेले त्यांचे अढळ स्थान. समाजाचे लक्ष जलद गतीने विचलित करण्याचे विखारी माध्यम कोणते असेल तर ते म्हणजे महापुरूषांची बदनामी; आणि समाजकंटक नेमकं हेच करत आले आहेत, बस्स झालं आता, खबरदार ! युवराजांचं राजेपण जपा.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ ऑक्टोंबर २०१८


No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...