Saturday, August 13, 2022

कष्टमेव जयते

ही आहे आमची शारदामाऊ चव्हाण, पत्र्याच्या घरातून आज टुमदार बंगल्यात प्रवेश करत आहे. आयुष्यभर मोलमजुरी करून शारदा माऊ आणि दिऊ बापूंनी संसाराचा गाडा हाकत हाकत पोरांना वाढवलं. मी लहान असल्यापासून शारदा माऊला आमच्या शेतात काम करताना पाहत आलोय. मोठा मुलगा अक्षय अवघ्या वर्षभराचा असताना सुद्धा त्याला झाडाखाली झोपवून ती कामावर यायची, मी अक्षयला खेळवत बसायचो. आज अक्षय इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करून नोकरी करतोय. शारदा माऊचा दुसरा मुलगा ऋषिकेश उर्फ पिल्या जास्त शिकला नाही परंतु पडेल ते काम करून रोजगार मिळवण्याच्या वृत्तीने तो बेरोजगारही राहिला नाही. शारदा माऊची दोन्ही पोरं आई बापासारखीच होतकरू आणि मेहनती निघाली म्हणूनच तिच्या घरावरचे पत्रे निघून आज स्लॅब पडलाय. या चौघांनी त्यांच्या जीवनात प्रचंड मेहनत घेऊन पै पै साचवली आहे म्हणूनच आज कसलही गृहकर्ज वगैरे न उचलता फक्त कष्टाच्या जोरावर त्यांनी बंगला बांधलाय. 

त्याच चौकात उभा असलेला दुसरा बंगला आहे दत्ता भराडे आणि मोहन भराडे यांचा तिथेही सागर, किशोर आणि शंभू सारखी मेहनती पोरं हिंमतीने उभारली आणि छोट्याशा घराचे बंगल्यात रूपांतर केलं. आमच्या घरामागे शेळक्याच्या कोपऱ्यावर उभा असलेला बंगला सुध्दा दिपक शेळकेने मोठ्या कष्टाने उभारलाय. या सर्वांचाच मला अभिमान वाटतोय. स्वतःचं पक्कं घर उभारल्याचा जेवढा आनंद त्यांना झालाय तेवढाच आम्हालाही झालाय. ते घर जेवढं त्यांचं आहे तेवढंच ते आमचंही वाटतंय यातच काय ती आमच्यातली आपुलकी आली. परिस्थिती बदलते फक्त ते बदलण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असलं पाहिजे. तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही काय करून दाखवलं याचेच लोकांना जास्त अप्रूप असतं. शारदा माऊने बांधलेलं घर त्याचीच निशाणी आहे. खूप खूप शुभेच्छा.

विशाल गरड
१३ ऑगस्ट २०२२, पांगरी

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...