Thursday, January 5, 2017

| कळसुबाई ©

सोलापुरच्या ईकोफ्रेन्डली क्लबने आयोजित केलेल्या नववर्ष स्वागत मोहिमेत महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन नववर्षाचा संकल्प केला. आजवर फक्त जनरल नाॅलेज म्हणुन पुस्तकात वाचलेली गोष्ट आज पायाखालुन घातली. खरंतर ट्रेकिंगचा मला फारसा अनुभव नव्हता परंतु ईको फ्रेन्डली टिमने त्याचे प्रशिक्षण दिल्याने हि मोहिम फत्ते करण्यास मदत झाली.
माणुस कितीही कष्ट करायला तयार असतो, धोका पत्करायला तयार असतो फक्त त्याला तसे स्वप्न दाखवावे लागते. माझंही असंच काहीतरी झालं, दिड वर्षापुर्वी परशुराम कोकणे आणि एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च उंचीवर बोलण्याचे स्वप्न दाखवले आणि आज ते स्वप्न पुर्ण झाले. स्वप्न पाहण्यापासुन ते सत्यात उतरण्यापर्यंतचा कालखंड प्रेरणादाई असतो आणि तितकाच जोखमीचाही.
कळसुबाई मोहिमेवर जायचं म्हणुन गेल्या पंधरवड्यापासुन माझ्या काॅलेज प्रक्षेत्राच्या बालाघाट डोंगररांगात रोज चार किलोमिटर चालण्याचा सराव करत होतो. दिनांक ३१ डिसेंबरला सुरू झालेली पायाची भिंगरी १ जानेवारी रोजी कळसुबाई सर करूनच थांबली. या आधी गड किल्ले चढाई केलेली पण शिखर सर करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावातुन शिखराकडे उंच मान करून पाहताना चालण्याचा अंदाज येत नव्हता पण जस जशी पाऊले पडायली तस तशी त्या शिखराची भव्यता लक्षात येऊ लागली. सह्याद्रीची विशालता अनेक शिवचरित्रांतुन वाचुन अनुभवलेली परंतु आज ती साक्षात अनुभवायला मिळाली. उंचावर गेल्यावर नजर तर मोठी होतेच शिवाय स्वप्नही मोठी होतात. अवाढव्य काळ्या पाषाणातुनही माणसाने पाडलेली वाट कठिण संकटांमधुन मार्ग काढण्याची शिकवण देते. वाऱ्याच्या प्रचंड वेगात सुद्धा चालत राहण्याची सवय प्रवाहाविरूद्ध लढण्याचे बळ देते, शरिरातली सर्व ताकत संपुन पायाला क्रॅम्पस येतात, शरिर घामाने चिंब होतं, तोंड कोरडं फट्ट पडतं, तळपाय पांढऱ्या पालीसारखे होतात आणि अशा स्थितीत उंच शिखरावर फडकणारा भगवा ध्वज दिसतो आणि सर्व गोष्टी विसरून पाऊल पुढं पडतं हे सारं माझ्यासाठी अविस्मरणीय होतं.
मोहिमेत साडेचार वर्षा पासुन शहात्तर वर्षापर्यंतचे सत्तरहुन अधिक गडप्रेमी सहभागी झाले होते. सर्वच आपापल्या परिने चढाईचा प्रयत्न करत होते. कधी कधी माझ्यापेक्षाही कमी व जास्त वयाची माणसं मला ओव्हरटेक करायची तेव्हा स्वतःच्या शरिराला तुझं वय किती? असा प्रश्न विचारावासा वाटायचा. खरंच एखादं शिखर सर करण्याचा प्रवास म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला अभिमानाचाच क्षण असतो कारण प्रचंड उर्जा खर्च करून त्याच्या दुपटीत ती मिळवण्याचे यासारखे दुसरे माध्यम नाही.
कळसुबाई डोंगराच्या पायथ्यापासुन शिखरापर्यंतची सात किलोमिटरची खडी चढण पार करायला मला चार तास वेळ लागला अखेर दिनांक १ जानेवारी २०१७ रोजी दुपारी १ वाजुन १८ मिनिटांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर मी माझं पहिलं पाऊल टाकलं. चढाई करताना शरिरातुन संपलेली उर्जा त्या एका पाऊलानं भरून निघाली. घामाने डबडबलेलं शरिर वाऱ्याच्या वेगाने वाळुन गेलं, सभोवतालचे क्षितिज पाहताना डोळ्यांची बुबुळं रूंदावली, शुद्ध ऑक्सिजन फुफ्फुसात भरून बोलण्यासाठीची शक्ती एकवटली. कळसुबाईचे दर्शन घेतले आणि पुढील कार्यक्रमास सुरूवात झाली.
ईकोफ्रेन्डली क्लब आयोजित नववर्ष दिनदर्शिकेचे अनावरण, संभाजी भोसलेंचा वाढदिवस, डाॅ.अरविंद कुंभार सरांचा सन्मान, महेन्द्र राजेंचे चित्र, मनोज देवकरांच्या मुलाचं बारसं, शिवछत्रपतींच्या आणि भारतमातेच्या घोषणा, संविधानाचे वाचन, माझे व्याख्यान, सोनवणे महाविद्यालयाचा झेंडा आणि गायक सोनकर मॅडमच्या वेडात मराठे हे गाणे या सर्व गोष्टी महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
हि मोहिम यशस्वी करण्यासाठी अरविंद म्हेत्रे, मनोज देवकर, परशुराम कोकणे, भाऊराव भोसले आणि डाॅ. संभाजी भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच हे शिखर सर करताना बाळा, विश्वास आणि अभय या पंढरपुरच्या पोरांनी मला खुप मदत केली. हे सर्व क्षण शिखराएवढ्याच उंचीच्या खोलीवर माझ्या ह्रदयात कोरले गेलेत. सर्वोच्च उंचीवर पोहचण्याचे स्वप्न पुर्ण झालंय आता त्याच उंचीवरून पाहिलेली स्वप्न पुर्ण करण्याचा प्रवास पुन्हा सुरू झालाय...

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : १ जानेवारी २०१७

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...