Sunday, July 16, 2017

| छपरातला वकील ©

मेडीला बांदाट्या बांधुन त्येज्यावर ऊसाचं पाचट हाथरून तयार केलेल्या छपरात एक वकील राहतंय त्यजं नांव श्रीरंग लाळे.
व्हय, ह्यो हाय माझा मोहोळ तालुक्यातील घाटने गांवचा जिवा भावाचा दोस्त. तब्बल तिन डिग्र्या घिऊन आवड म्हणुन छपरात राहतोय. म.फु.कृ.विद्यापिठातुन बी.एस्सी.अॅग्री, आय.एल.एस काॅलेजमदुन लाॅ आन् इग्नु मधुन एम.ए केलंय त्येनं. अभ्यासाचं आन् फिरायचं गड्याला लई याड हाय. हे समदं शिक्षण घ्यात घ्यात वडलांच्या आन् भावाच्या साथीनं हजार दिड हजार टन ऊसाचं उत्पन्नबी शेतात घेतोय. गावात ह्येजा मोठा वाडा हाय पण ह्याला आसंच रानात राहायला आवडतंय. काल मी व्याख्यानाला मोहोळला गेल्तो तेव्हा येताना या दोस्ताच्या छपरातला गावरान पाहुणचार घिऊनच मग गावाकडं आलो.
मी येणारंय हे कळल्यापसुनच बहाद्दरानं समदा बेत आखुन ठिवला व्हता. म्या कायबी कारणं सांगीतली तरी टाळणं आवघाड व्हतं तवा जाता जाताच त्येला सोबतीला घिऊन व्याख्यान आटपुन आलो. वस्तीवर पोहचल्यावर फोर्ड कोट्यावर लावुन, आंगावरच्या व्याख्यात्याच्या झुली उतरून; त्या कोट्यात दिसलं ती शर्ट आन् हाफ चड्डी घालुन मी, हानमा आन् श्रीरंग त्यंच्या शिवारात फिरायला गेलाव. सिनामाईच्या नदिखोऱ्यात चार पाच किलोमिटरची पायपीट करून शिवटी वस्तीवर आलाव.
ईकिकडं कंगवा खवल्याला, ईकीकडं आंड्रेटी वाळवायला एक वळण, टावेल वाळु घालायला एक वळण, कापडं आडकवायला एक खिळं हाणल्याली पट्टी, वायरीला आडकिवल्याला एक साठचा बल्प, मोबाईल चार्जींगसाठी मिडीला आडकिवल्याला एक बोर्ड, यातच पुस्तकाने भरलेलं एक गोदरेजचं कपाट आन् थोबाड बघायला टु व्हिलरचा तुटलेला आरसा आसं एकंदरीत इंटेरीअर असलेल्या या छपरात रहायची मजाच काय और हाय.
श्रीरंग सारख्या बलदंड आणि बुद्धीमान दोस्तांमुळंच म्या विचारांच्या रणांगनात निर्भिडपणे विहार करतुय. हे माझे दोस्त माझ्या दिमतीला एका शब्दावर उभं राहत्यात मनुनच ईषय कोण्चाबी आसुद्या त्या त्या क्षेत्रातला श्रीरंगासारखा तज्ञ दोस्त आपल्याकडं हाय; न्हायतर जग जिंकाया आजुन लागतंयच काय वो ? आसले पाच पन्नास दोस्त कमीवलं कि ईषयच क्लोज.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १६ जुलै २०१७

Wednesday, July 12, 2017

| सरपन ©

आज रोडवरून जाता जाता रस्त्याच्या कडेला तीन लहाण मुली स्वतःच्या छोट्याशा भावासह सरपन वेचताना दिसल्या. संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी चुलवनाला जळण पाहिजे म्हणुन त्या लाकडाची सोय  करत होत्या. जवळच दोन झोपड्या होत्या त्या झोपडीत त्यांचे कुटुंब राहते. फिरस्तीमुळे शाळा बिळाच्या भानगडीत बहुधा त्या नसाव्यात. पोरगी झाली तर घरकामासाठी आईला मदत करणे आणि पोरगं झालं तर गुरे ढोरे राखण्यात बापाला मदत करणे एवढंच काय ते करिअर त्यांच्या हाती असतं.
हे सरपन गोळा करताना या लेकरांच्या मनात फक्त चुलीची सोय करने एवढेच काय ते डोक्यात असते परंतु ज्या देशात प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा आहे त्याच देशात अशा लेकरांना हि कामे देणे कितपत योग्य आहे याचा विचार पालकांनी करावा.
अशिक्षीत माणसांची अवस्था देखील वाळलेल्या लाकडासारखी असते पडलेलं दिसलं की कुणीबी जळणासाठी वापरू शकतं. परंतु शिक्षित माणसांच्या आयुष्याला यशाची फळं लागतात ज्याच्यावर ईतरही माणसं जगु शकतात. हे उमगण्यासाठीही शिक्षणच असावं लागतं नाहीतर अशा हजारो काट्या मोडुनही जगण्याचं मर्म त्यात सापडत नाही.
परिस्थितीने आपण कितीही गरिब असलो तरी शिक्षणाने श्रीमंत असायला हवं कारण परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षणातच असते.
ज्या प्रकारे हातातल्या लाकडाच्या फांदीला अनेक फाटे असतात तसेच ते आयुष्याला सुद्धा असतात परंतु कडेचे लहान थोर सगळे फाटे तोडुन आपण जो सरपनाचा ढिग लावतो अशीच काहीशी अवस्था आपण आपल्या आयुष्याचीही करून घेत असतो.
अनेक पर्याय उपलब्ध असतानाही सर्वांना फाटा देऊन आम्ही पुन्हा तेच ते पारंपारीक काम करत राहतो. आजवरचं आपलं फॅमिली बॅकग्राऊंड, बिजनेस, कल्चर, रितभात काहीही असो परंतु शिक्षणापासुन जर ते वंचीत ठेवत असेल तर आपणच आपल्यावर केलेला हा सर्वात मोठा अन्याय आहे. त्या पोरींशी थोडावेळ संवाद साधुन घरी गेल्यावर "आई बाबांना शाळेत घालण्याचा हट्ट करा" असे सांगुन त्यांच्या होकारार्थी मानांचा ईशारा पाहत-पाहत मी पुढे निघालो.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनाक : १२ जुलै २०१७

Saturday, July 8, 2017

| रिकामी जागा ©

फोटोतली हि जागा आहे उक्कडगांवच्या माळावर राहणाऱ्या महादु हागवणे यांची. मी त्यांना प्रेमाणे भऊ म्हणतो. माझ्या काॅलेजला जाण्याच्या रस्त्यालगतच त्यांचा कोटा आहे. शेरडं कोंबड्या आणि उसाचा फड अशी त्यांची प्राॅपर्टी. मी गाडीवर काॅलेजला जाताना भऊचा मला ठरलेला राम राम असायचा. पैलवानी शरीर यष्टी, धोतरावर तिन गुंड्याचा ढवळा सदरा, पायात कातडी चप्पल आणि डोक्यावर गुलाबी फेटा असा रूबाबदार पोहरावात कोट्याजवळच्या एका मोठ्या दगडावर हातात काटी घेऊन भऊ निवांत बसलेलं असायचं.
एकदा माझ्या गाडीखाली त्यांचा बेण्याचा कोंबडा आला होता. मला वाटलं जखमी झाला असल पण तो ठार झाला होता. माघारी येताना वाटलं; भऊ आता त्याची भरपाई वगैरे घेतात का काय पण हाक मारून त्यांनी मला त्याच कोंबड्याच्या जेवणाचं आमंत्रण दिलं. तुमच्याकडुन मेला म्हणुन खायला तरी मिळाला नायतर आम्ही नसता कापला. त्यांच्या या दिलदारकीने मला जिंकलं होतं. जर बाजारा दिवशी कधी ते गावात आलं तर माझ्या गाडीची वाट पाहत बसायचे मग त्यांना त्यांच्या कोट्यावर सोडुनच मी पुढे काॅलेजला जायचो.
जेव्हा केव्हा मी त्या वाटेवरून गेलो तेव्हा तेव्हा तो दगड आणि त्यावर बसलेलं भऊ हे गणित ठरलेलंच असायचं. आज नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच काॅलेजवर निघालो तोच रस्त्यावरून एक टमटम येताना दिसलं मी हळुच मागच्या हाऊदात पाहीलं तर भऊ निपचीत पडुन होते. मी थांबलो आणि विचारलं काय झालंय त्यावर त्यांच्या भावाने रडत रडत सांगीतलं. "भऊला अटॅक आलता सर, डाक्टरकडं न्हिऊस्तोवरच जिभ बाहीर टाकली...मोठ्याने रडता रडता....भऊ गेलं सर" हे शब्द ऐकुण क्षणभर ह्रदय थांबल्यासारखं झालं, डोळ्यात पाणी साकाळलं. आज अचानक असं काही होईल हे मनाला पटत नव्हतं. सत्तर पंच्चयाहत्तर वय असणारे भाऊ एखाद्या मराठी चित्रपटात सावकार शोभतील अशा व्यक्तीमत्वाचे परंतु झाडाचं पान सहज गळुन पडावं तसं आज ते जिंदगीच्या झाडावरून निखळले.
विधात्याने आपल्याला किती आयुष्य दिलंय माहित नाही परंतु शेवटच्या श्वासापर्यंत दिसणाऱ्या व भेटणाऱ्या हर एक माणसाला सन्मान देऊन मनाची श्रीमंत मिळवणं हिच खरी माणुसकी होय हे त्यांच्याकडुन शिकायला मिळालं, नाहितर आपलंही वागणं आणि जगणं किड्या मुंग्यांसारखं होऊन जाईल; कधी, कुठे आणि कसं मेलं हे देखील लक्षात राहणार नाही.
भऊच्या निर्जीव देहाकडे पाहुन माझ्या डोळ्यातील अश्रुंनी श्रद्धांजली अर्पन केली आणि गाडीची किक मारून पुन्हा त्याच रस्त्याने काॅलेजकडे निघालो. गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आज खंडीत झाली होती. काल सायंकाळी येताना ज्या जागेवरून भऊंचा अखेरचा राम राम झाला होता ती रिकामी जागा इथुन पुढे सदैव सलणार होती..

लेखक : प्रा. विशाल गरड
दिनांक : ०८ जुलै २०१७

Wednesday, July 5, 2017

| वेळ ©

आज बऱ्याच दिवसांनी पांगरीच्या स्टॅण्डवर राहुलच्या टपरीमध्ये बसलो होतो. निवांत ईकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. स्टुलवर बसुन बालु कुंभार वजन कमी करण्यासाठी "सर, तुम्ही सोयाबीन मधलं गवत काढायला जात जावा" असंल काहीचे काही भन्नाट नुस्खे सांगत होता. तेवढ्यात टपरीवर फेसबुकवर हवा करणाऱ्या एस.आर भैची एन्ट्री झाली. हाताला सतत फेव्हिस्टीकने चिकटवल्यासारखा ऑप्पोचा मोबाईल आणि मोबाईलसारखीच शरिरयष्टी असणारा सद्दाम रईस उर्फ एस.आर भै स्क्रिनला बोटाने स्र्काॅल करत करत राहुल सोबत संवाद साधु लागला. कमेंन्ट, लाईक, ब्लाॅक, हॅक, रिपोर्ट, आॅनलाईन, डाटा, जियो, शेअर, फाॅलोअर्स, टॅग अशा मोबाईल साहित्यातील शब्दांनी टपरी हाऊसफुल्ल झाली. मी खुर्चीवर बसुन निवांत या मोबाईल अॅडिक्टेड युवा पिढीच्या संवादाचा आस्वाद घेत होतो. एस.आर भैचा सोशल मेडीयातला गाढा अभ्यास पाहता जर त्याने पारंपारिक शिक्षण सोडुन मोबाईल जगतातले काही शिक्षण घेतले असते तर नक्कीच गोल्ड मेडल मिळवलं असतं असं वाटलं.
अरे एस.आर तु दिवसातला किती वेळ मोबाईलवर घालवतोस ? असे जेव्हा मी त्याला विचारले तेव्हा तो मला म्हणाला आहो विशाल सर, अख्खा दिवसच ह्येज्यात घालिवतो. त्याच्या या उत्तरावर राहुल आणि मी पोटभरून हसलोत. पुढे तो आणखीन बोलु लागला. अहो सर सकाळी उठल्या उठल्या मोबाईल डवचवाच लागतो नाहीतर चैन पडत नाही. राडा करणारा रव्या, पांगरीचा पिल्या, महाराष्ट्राची लाडकी क्वीन आरोही, पप्याचा लाडका आरू, आण्णांचा लाडका गण्या, जाळ धुर करणारा परशा ह्यांच्या पोष्टला लाईक करूनच आपल्या दिवसाची सुरूवात व्हती.
त्याचे हे बोलणे ऐकुन खरंच सोशल मेडीयाने सध्याच्या युवा पिढीवर किती जम बसवलाय हे अधोरेखीत झाले. कुणाला किती लाईक मिळाल्या, कुणाचा फोटो एडीट करायचा, कुणाला शुभेच्छा द्यायच्या, किती जणांना स्वयंघोषित नेते करायचे, कुणाचा वाढदिवस साजरा करायचा हाच विचार सध्याच्या युवा पिढी मध्ये जास्त रूजताना दिसतोय. फेसबुकच्या अभासी दुनियेत लाईक मिळवण्यासाठीची धरपड करताना अॅटोलाईक सारख्या साॅफ्टवेअरवरून फोटो सोडुन वन के, टु के लाईक मिळवण्यातही बरेच युवक गुंतले आहेत तर काहीजण पोरींच्या फेक अकाऊंटवर रात ना दिन चॅटींग करू करू झुरत आहेत. हे सारं तत्वज्ञान आज एस.आर भै सोबत मारलेल्या गप्पांमधुन समजलं. हे वास्तव खरंच फार भयानक आहे. अभ्यास सोडुन अॅण्ड्राॅईडवर प्रचंड वेळ खर्चीणाऱ्या युवक वर्गाने सोशल मेडीयाचा वापर सोसल एवढाच करणे हितावह ठरेल. हि सगळी बिऱ्हाडं व्यक्त होण्यासाठी, कला प्रदर्शित करण्यासाठी किंवा मैत्री जपण्याचे माध्यम म्हणुन वापरणे ठिक आहे परंतु यालाच जर कोणी बेसिक निड म्हणुन स्थान देत असेल तर भविष्यात आपला खुप मोठा कार्यक्षम वेळ याच्यासाठीच खर्ची पडेल हे नक्की. आपण वेळेत पैसे कमवु शकतो पण पैशाने वेळ नाही कमवु शकत; कारण वेळ हा फक्त घालवण्यासाठीच असतो. तेव्हा तो कुठे, कसा, किती व का घालवायचा हे समजलं की यशाची सारी गणितं सहज सुटतात.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ जुलै २०१७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...