Friday, January 26, 2018

माझ्या राजाची नजर खाली का ?

दिल्ली येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ राजपथावर अवतरला याचा अभिमान वाटला परंतु ज्या राजाने दिल्लीच्या औरंगजेबाला भरल्या दरबारात डोळ्यात डोळे घालून अपमानास्पद वागणूकीबद्दल ठणकावून महाराष्ट्राची अस्मिता जोपासली त्याच दिल्लीवर राजाचा खाली मान झुकलेला अश्वारूढ पुतळा मिरवला गेला. अरे गावात साधं घरात लावायला शिवरायांचे पोष्टर जरी घ्यायचे म्हणले तरी राजाच्या बाणेदार नजरेला आपण महत्व देतो पण ज्या सोहळ्यावर साऱ्या जगाचे लक्ष होते त्या महाराष्ट्राच्या चित्ररथातल्या महाराजांच्या मुर्तीची नजर उंच आणि मान ताठ दाखवणे बंधनकारकच असायला हवे होते. मी कुणी ईतिहासकार वगैरे अजिबात नाही. परंतु महाराजांच्या विचारावर प्रेम करणारा एक युवक या नात्याने मला एवढं तरी नक्कीच कळतं की माझ्या राजाने दिल्लीत कधीच मान झुकवली नव्हती. मग हा चित्ररथातला पुतळा नेमका असाच का बरं बनवला? तो बनवताना एवढी साधी गोष्ट का बरं कुणाच्या लक्षात आली नाही? एरवी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बनवताना उधळलेल्या घोड्यावर बसुन तलवार उंच उगारलेली, मान ताठ ठेवून महाराजांची नजर आभाळाकडे असते मग नेमकं या चित्ररथातल्या दर्शनीय पुतळ्यातच तलवार जमिनीकडे, मान आणि नजर झुकलेली असे का बरे ? हि मुर्ती बनवलेल्या त्या कलाकाराच्या कलेला मी दाद देतो परंतु चित्ररथावरची मुर्ती अशीच असावी अशी संकल्पना मांडलेल्या मेंदुचा मी निषेध करतो.
महाराजांची प्रतिभा, किर्ती, पराक्रम, साहस, आणि अस्मिता या एका चित्ररथामुळेच प्रचंड वाढली किंवा कमी झाली हा विषय नाही परंतु जर दिल्लीत राजाची मुर्ती मिरवायची होती तर नजर आणि मान ताठच असायला हवी होती असे मला वाटते. बाकी सगळ्या गोष्टींत भव्य दिव्यता नसती तरी चालले असते पण निदाना नजरेत तरी ती दाखवायला हवी होती. आज हा चित्ररथ शेअर करताना करोडो लोकं पाहिली परंतु राजाच्या नजरेकडे कुणाचे लक्ष गेले नाही याचे दुःख वाटले. या चित्ररथातली शिवरायांची झुकलेली नजर पाहुन तो व्हिडीओ शेअर करण्याची माझी ईच्छाच नाही झाली. उलट सकाळपासुनच राजाची ही खिन्न मुद्रा पाहुन माझ्या मनात कालवाकालव सुरू होती. सरतेशेवटी मनातुन उचंबळून बाहेर पडलेला माझा हा वैयक्तिक विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जिवावर आपल्या सर्वांसमोर मांडला आहे. अखेरीस एवढंच वाटतं की; महापुरूषांसंदर्भातली कोणतीही गोष्ट बनवताना, दाखवताना, लिहिताना, बोलताना आणि मिरवताना खबरदारी घ्यायलाच हवी अन्यथा विचारांची विटंबना होते जी सहजा सहजी भरून काढता येत नाही.
ज्यांना छत्रपतींचा ईतिहास माहित नाही त्यांनी फक्त कलाकृती पाहुण आनंद व्यक्त करणे स्वाभाविक आहे परंतु ज्यांना माहित आहे त्यांनी तरी निदान विचार करावा. महापुरूष हे मुर्त्यामध्ये जिवंत नसुन ते विचारांनी जिवंत आहेत पण जर मुर्त्यांतून कुणी विचार मारण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कदापी खपवून घेतले जाणार नाही.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २६ जानेवारी २०१८ 




2 comments:

  1. माझ्या राज्याची मान कधीच झुकली नाही...
    कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
    पण एकही मंदिर नसताना
    जे अब्जावधींच्या #हृदयावर आधिराज्य करतात
    त्यांना "#छत्रपती" म्हणतात !


    पण...
    एकच खंत आहे
    माझ्या राजाची नजर खाली नसायला पाहिजे होती... 😐😐
    मी निषेध करतो त्यांचा ज्यांचे असे विचार आहे..

    ReplyDelete
  2. आपला राजा अश्वारूढ असून ते पाहून कोणाला खिन्नता वाटत असेल तर हा लेख लिहिणारा आणि पसरवणारे पण तेवढेच दोषी

    आता राहिला प्रश्न ती अश्वारूढ प्रतिमा तिथं घेण्याची गरज होती की नव्हती

    ते राज्य सरकार आणि दिग्दर्शक जाणो

    पण आता अशी टीका करणे योग्य नाही.

    विषय आणि आशय आणि विचार महत्वाचा समजणारे आपन आहोत आपल्याला असे वाद शोभत नाही

    ReplyDelete

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...