ओम भावा, खरंच याची गरज होती का ? होतीच तर मग सत्ययुगाला कलियुगाच्या काळ्या पाण्यात बुडवून तू काय साध्य केलेस ? आदिपुरूषने रामायणाची गोष्ट अजुन मोठी झाली का खोटी ? लका सहाशे कोटी बजेटमधे तर आम्ही पन्नास साठ पिच्चर करुन मोकळंझालं आसताव. वर्षानुवर्ष जे रामायण मनावर छापलं गेलंय त्याला सिनेमॅटिक लिबर्टीच्या नवाखाली हॉलिवुड चित्रपटांच्या सुपरहिरोंच्या भेळमिसळीने तू सुरंग लावलास. ज्या VFX वर एवढा खर्च करण्यात आलाय ते प्रत्यक्षात मात्र ऍनीमेशनपटापेक्षाही साधारण झालंय.
हे जरी कलियुगातले रामायण असले तरी मुळव्याध झाल्यासारखा चालणारा रावण, एका लाईनमधे दहा तोंड बसत नाहीत म्हणूनत्यांची दोन लाईनमधे केलेली अलाइनमेंट, फ्लॅशची कॉपी असलेला टॅटूवाला इंद्रजीत, हनुमानजींची दाढी, प्रभू श्रीरामाच्या मिशा, रावणाची केशभूषा, काळी लंका आणि पात्रांचे हास्यास्पद डायलॉग बुद्धीला पटले नाहीत.
रामायण म्हणजे जर कोकिळेचा मंजूळ आवाज असेल तर त्यावर आधारित आदिपुरूष चित्रपटाला तू वटवाघुळ करुन ठेवलंस. संपूर्ण चित्रपटात जर मला काय आवडले असेल तर ते आपल्या अजय-अतुलचे संगीत, गाणी आणि बीजीएम. अख्खा पिच्चर बीजीएमने जणू खांद्यावर उचलून घेतलात. बाकी `जय श्रीराम’ हे देवरसाने परिपूर्ण असलेले अतिशय प्रेरणादाई गाणे तू आदिपुरूषच्या निमित्ताने आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुझे कायम ऋणी राहू.
विशाल गरड
१६ जून २०२३, धाराशिव
No comments:
Post a Comment