Wednesday, April 19, 2017

| उतराई ©

भिमा बगाडे, निर्मला बगाडे या मातंग समाजातील कष्टकरी दाम्पत्याला आज मी काॅलेजला जाताना लिफ्ट दिली. उन्हाच्या कारात हे जोडपं रोज पिंपळवाडीच्या शिवारात हळदीचा सोरा वेचण्यासाठी जातं. कालपण काॅलेजहुन येताना मी त्यांना पांगरीपर्यंत ट्रिपल सिट घेऊन आलतो. दोघांच्या डोक्यावर दोन मोठी चुंगडी होती हे ओझं घेऊन ती दिवसाकाठी रोज सोळा किलोमिटरची पायपीट करतात. आजही सकाळी मी नेहमीप्रमाणे पांगरीहुन काॅलेजला निघालो असता. उक्कडगांवच्या घाटावर हि जोड चालत निघालेली दिसली; मी गाडी थांबवुन त्यांना बसवलं.
गाडीवर बसल्यावर भिमा भाऊ बोलाय लागले. "आव धाकलं मालक, आसल्या उन्हाच्या कारात तुम्ही आमच्यासाठी गाडी थांबीवली राव. कालपण तुमच्यामुळच लवकर गेलाव घरी नायतर रात झाली आस्ती आम्हास्नी बगा" मी भिमा भाऊ ला मध्येच थांबवत म्हणलो "भिमा भाऊ मला मालक वगैरे म्हणु नका, मिळालेल्या आयुष्याचे आपणच आपले मालक असतो जरी भुतकाळात कोणी तुम्हाला चार घास दिले असतील तरी ते तुमच्या कष्टाचे फळ होते हे लक्षात असुद्या; मी तुमच्या लहाण मुलासारखा आहे" त्यावर भिमाभाऊ उत्तरले " न्हाय पण आमच्या तिन पिढ्या तुमच्या घरात जगल्यात, आमची आय झुंमका म्या गुडग्याएवडा आसल्यापसुन तुमच्यात शेण झालवट करत व्हती, आता तुम्हास्नी आठवत नसलं पण तुमचं पंजुबा नाना आन् आजुबा बापुंनी आमाला लई संभाळलय बगा आन् आता दादा, आण्णा बी लई जिव लावत्यात. म्हागल्या महिण्यात तुमच्या घरचं सरपान फोडल्यावर आण्णांनी चाहा पाजुन चारशे रूपये दिलतं बगा.
या व अशा कित्येक मातंग समाजातील दांम्पत्यांनी भुतकाळात फक्त भाकर तुकड्यावर केलेल्या कामांची उतराई आजच्या घडीला त्यांचे पाय धुतले तरी फिटणार नाही. प्रेम आणि जिव्हाळा यांच्या वाणीत ठासुन भरलेला आहे तो जाणुन घ्यायचा असेल तर प्रत्येकाने एकदा त्याना प्रेमाने जवळ करायला हवे. जुनी जाणती हि माणसं उपकार कधीच विसरली नाहीत, अडाणीपणा पदरी पडला असला तरी शहाणपण कधीच विसरली नाहीत.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ एप्रिल २०१७

Saturday, April 15, 2017

| बुट पाॅलिश ©

बुट पाॅलिश हा बड्या शहरातील लोकांचा रोजचा विषय आहे परंतु चपला वापरणाऱ्यांसाठी तो कधीमधीचा विषय असतो. तसंच काही माझंही आहे. पाच वर्षापुर्वी घेतलेल्या रेड चिफला अजुनही पाॅलिस करून वापरतोय. घेतल्यापासुन फक्त तिनदा पाॅलिश केलाय. उद्या एका हाय प्रोफाईल कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी बुटाडं पाॅलिश करून घ्यायची होती म्हणुन आमच्या पांगरीच्या ज्योतीर्लिंग फुट वेअरचे संचालक नितीन रामगुडे यांच्याकडे गेलो होतो. बुट पाॅलिश करणे हा नितिनचा पारंपारिक व्यवसाय आहे आणि माणसांच्या डोक्याला विचारांची पाॅलिश करणे हा माझा छंद आहे. आमची क्षेत्र वेगवेगळी असली तरी पेशा एकच आहे.
आपण आरशापुढे गेल्यावर जितक्या तल्लिनतेने चेहऱ्यावर मेकअप करतो त्याहिपेक्षा जास्त मन लावुन नितीन बुटाला पाॅलिश करत होता. मी आपलं शेजारी बसुन एकटक त्याच्या कृतीकडं पाहत होतो. खरंतर चेहरा चमकण्यासाठी जेवढी सौदर्य प्रसाधनं तोंडावर थापावी लागतात त्यापेक्षा जास्त सौदर्य प्रसाधनं बुट चमकवायला वापरली जातात. साधी क्रिम, कलर क्रिम आणि चमक क्रिम या तिन्ही क्रिम अधुन मधुन बारका ब्रश, कलरचा ब्रश आणि चमक ब्रश वापरून बुटाला लावाव्या लागतात. सलग दहा मिनीटांच्या अथक प्रयत्नातुन फुफाट्यात मळलेला बुट लग्नातल्या नवरदेवासारखा चमकायला लागतो.
बुटाडांच्या पाॅलिश एवढीच मनाची पाॅलिश सुद्धा तितकीच महत्वाची असते. यात वेगवेगळी पुस्तके आणि प्रेरणादाई माणसं विविध क्रिम सारखी कामं करतात. दुसऱ्यांच्या मनावरची धुळ झटकुन त्यांचे व्यक्तिमत्व चमकवण्यासाठी आणि ऊसवलेली मने शिवण्यासाठी आपणही कधीतर चांभार व्हायला हवे. बुटावर नुसती क्रिम लावुन बुट चमकत नाही त्यावरून पुन्हा-पुन्हा फिरवलेल्या ब्रशमुळेच त्याला चकाकी मिळते तसेच आपल्याही आयुष्यात फक्त पुस्तक घेऊन किंवा विचार ऐकुण आपली मनं चमकत नसतात तर परत-परत त्या विचारांचे अनुकरण केल्याने आणि पुस्तकांचे चिंतन केल्याने मनाला झळाली मिळते.
जसे मळलेले पाय पाॅलिश केलेल्या बुटात झाकुन जातात तशेच मळलेली मने आणि विचारही सुंदर चेहऱ्या मागे झाकले जाऊ शकतात. परंतु असं करण्यापेक्षा आपण आपल्या डोक्यातल्या विचारांनाही सतत पाॅलिश करत रहायला हवे जेणेकरून ते चकाकत राहतील आणि इतरांनाही चमकवत राहतील. शेवटी बुटाच्या पाॅलिश पेक्षा आणि चेहऱ्याच्या मेकअप पेक्षा डोक्यातल्या मेंदुला चांगल्या विचारांची क्रिम लावुन त्यावरून अनुकरणाचे ब्रश सतत फिरवत राहिल्यानेच समाजात आपले व्यक्तीमत्व चमकत राहते.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १५ एप्रिल २०१७

Wednesday, April 12, 2017

| जत्रा ©

सायंकाळची येळ मी, राहुल्या, काक्या, बंड्या आन् किट्या टु व्हिलरवर येडाईच्या जत्रला निघालाव. पांगरी ते येडाई रोड मुंग्यावनी वाहत व्हता. दर दुन तीन गाड्यागणीस एकांद्या गाडीत आराध्यांचा ताफा आसायचा. जहांजा आन् संबळाचा आवाज दुमदुमत व्हता. उक्कडगांवच्या घाटातुन वरी गेलं किच येडाईच्या बुरजाचं दर्शन झालं. दर्शन घेणं बोतच नाय; ही तोबा गर्दी. नुसतं डोंगराकडं बगुनच हात जोडलं आन् थेट येरमाळ्याच्या जत्रत घुसलावं. स्वतःचं व्यक्तिमत्व, मानसन्मान, आब ईबात, वळख पाळख, गाडीच्या हँडलला आडकुन जत्रचा आनंद घ्ययला माझ्या लहाणपणीच्या सवंगड्यांसोबत "पंचमीचं चांदणं चमकतंय लकलका आंबा खेळती झोका" ह्ये गाणं गुणगुणत रस्त्याकडंच्या दुकानांकडं बगत-बगत आमराईकडं निघालाव. काय-काय बगु, कुठं-कुठं बगु आन् काय-काय घिऊ नुस्ता धिंगानाच डोस्क्यात. जत्रतल्या सगळ्यात मोठ्या पाळण्यात बसणं, मौत का कुआ बघणं, तमाशाची आण पिच्चरच्या टुरींग टाक्यांची पोष्टरं बघतं बसणं, लईच भुक्याजल्यावर काॅन्ट्री करून आंडा आम्लेट खाणं आन् पुना राह्यलेल्या पैशात कलिंगडावर ताव मारणं, टुरींग टाकीजचा पिच्चर वावरात झुपुन बघणं हे समदं केल्याबीगीर येडाईच्या जत्रला गेल्यावणीच वाटत नाय.
गेल्या-गेल्या मोठ्या पाळण्यात बसुन एकदा समदी जत्रा डोळ भरून बगायची मग तासंतास हारेक दुकानावरून विंडो शाॅपिंग करत फिरायचं. खिशात फक्त मोजकंच पैशे ठिवायचं त्येज्याशिवाय तारांबळीची मजा येत नव्हती. येटीएम मदी बक्कळ पैसा व्हता पण जत्रत तसलं नखरं चालत न्हायतं म्हणुन हजार रूपयाच्या दहा दहाच्या नोटावर जत्रा उरकायची. साबणात गोल काडी टाकायला, बंदुकीनं फुगं फोडायला, कुडमुड्यावर पैसं लावायला ह्या दहा रूपड्याची लई मदत व्हयची.
आज जत्रत लई मनसोक्त फिरलो पण
भोंगे आन् पिपाण्यांच्या आवाजानं कान किर्रर्र झालं, ब्रेक डान्स मधल्या पाळण्यांनी आंग मोकळं झालं, गोल पाळण्यात वर जाताना मजा ययची पण खाली येताना पोटात गोळा ययचा आन् पायातला जिव छाताडात जायचा. मौत का कुव्या समोर कसल्यातरी गाण्यावर कसल्यातरी बाया नाचत व्हत्या त्येना बघायलाच माणसांची मुरकंड पडल्याली. तमाशाचा बाज तर निराळाच व्हता. दिवस मावळतीला लागला व्हता, दिवसभर आमराईत ठिवल्याल्या पालखीकडं जाणारं पाय आता हळु हळु घराकडं निघालं व्हतं. मुक्कामी राहुट्या मधल्या चुली पेटल्या होत्या आन् आम्ही परतीच्या मार्गाला लागला व्हताव एवढ्यातच चालता-चालताच एक अपंग माणुस भुक लागली मनुन भिक मागत व्हता आन् त्येज्या शेजारी आसल्याल्या एका मोठ्या दगडावर पाच पन्नास निवद ठिवलं व्हतं पण देव पाप करलं म्हणुन त्यो खाऊ शकत नव्हता. ह्यो आसला ईरोधाभास बगुन काळीज पिळवटुन गेलं राव.
खरंच जत्रत लय काय-काय बगाया मिळतंय आन् शिकायला तर त्याऊन जास्त मिळतंय म्हणुनच दर वरसाला म्या माज्या लहाणपणीच्या दोस्तांबरूबर येडाईच्या जत्रला जातोच. कमी येळंत मला हितं हजारो चेहरं आन् त्येंच्या येगयेगळ्या तऱ्हा आनुभवायला मिळत्यात. आता पुढच्या वर्षीच्या चैतीलाच आमराईत जायचं तवर आपली रोजची जत्रा सुरूच राहणार येडाबाईच्या आशिर्वादानं.
बोला आई राजा उदं उदं......

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ एप्रिल २०१७

Sunday, April 9, 2017

| कडबा ©

जवारीची सुगी झाली की रानात कडब्याच्या राशी लागत्यात ; मग त्येची गंज लावायची आन् तिवढुश्याच कडब्यावर शेतकऱ्याला वरिसभर रानातली गुरू ढोरं पोसावी लागत्याती. आज गावाकडं जाताना रस्त्यातच एक स्री शेतकरी बैलगाडीत कडबा भरून न्हेताना दिसली. आसल्या उन्हाच्या तडाख्यात शेतातली जवारी काढुन-बांधुन-भरून गंज लावायला न्ह्ययची म्हंजी हि लई जिकीरीचं काम आसतंय. पहिलं जवारी उपटत होती पण आता पाण्याआभावी रानं जाम वाळल्यामुळं जवारी कापावीच लागती. आश्या बिनबुरकुंडाच्या कडब्याच्या गंजी टकल्या मानसावनी दिसाय लागल्यात्या.
शेतामदी पुरूषांसोबतच स्रीयाबी खंद्याला खंदा लावुन काम करत्यात. ईतर कोणत्याबी क्षेत्रापेक्षा हितं शेतात आसं राबनं जाम आवघड आसतंय. आजवर शेतकरी मनलं कि फक्त माणुसच डोळ्यासमोर येतंय पण तितक्याच ताकदिनं त्येच्यासोबत रानात राबणारी स्री कधी समोर येत नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील स्रिया नवऱ्याच्या आत्महत्येचं भांडवलं न करता तितक्याच नेटानं पुन्हा रानात राबत्यात हे तितकच सत्य आहे. शेतात राबणाऱ्या शेतमजुरांमध्ये स्रीयांची संख्या जास्तय हे गावागावातुन सकाळी टुप्पा घिऊन निघालेल्या गाड्या बघितल्या की लक्षात येतंय.
पहिलं घरातलं जाणतं गडी रानात राबायचं आन् घरातल्या बायका ते पिकल्यालं धान शिजवुन, भाजुन खाऊ घालायच्या. आता त्यंच्या नशिबातली चुल आन् मुल हि चौकट तर म्हागच तुटुन पडलीया तरीबी चुलीच्या सरपनाची आन् चुलीवर ठिवल्याल्या भगुण्यातल्या भाजीची सोय करायला आजची शेतकरी स्री अहोरात्र झटत हाय. सोबतच नवऱ्यानं घेतलेल्या कर्जाचं हाप्तं बी प्रामाणिकपणे फेडत हाय.
एकीकडं शाळेतुन घरी येणाऱ्या लेकरांची वाट बघत बसल्याली आई तर दुसरीकडं रानातुन घरी येणाऱ्या आईची वाट बघणारी पोरं आन् गोठ्यातली ढोरं; हाच फरक आहे शेतकरी आणि ईतर कुटुंबातला....

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०९ मार्च २०१७

Saturday, April 8, 2017

| पानगळ ©

जिद्द आणि प्रतिकुल परिस्थितीतही तग धरून राहण्याची क्षमता असली कि मातीच काय पण पाषाणातही उगवता येते; हे एका पानगळ होऊन दगड धोंड्यांच्या विळख्यात ताठ मानेने उभा असलेल्या झाडाकडुन मला शिकायला मिळाले. या झाडावर लांबुन नजर टाकणाऱ्याला वाटेल कि हे झाड वटुन गेलंय, काहीजन तर कुऱ्हाडीचा गाव घालुनही बघतील पण तरिही हे झाडं उभेच असेन त्या मृगाच्या पहिल्या सरीसाठी. माणसांच्याही आयुष्यात बहर आणि पानगळ असते अशा वेळी जर आपणही या झाडांसारखेच आचरण केले तर दिर्घकाळ जगता येते. कित्येक जण अजुनही स्वतःचा बहर सदैव टिकुन राहण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु कधीतरी पानगळ झाल्याशिवायही बहर चांगला येत नाही.
त्या पाषाणात रूतलेल्या झाडांच्या मुळ्यांना किती चटका सोसावा लागत असेल तरिही मृगाच्या फक्त एका सरीच्या बरसण्याने त्याच मुळ्यांमध्ये जगण्याचं आणि पानांमध्ये उगवण्याचे सामर्थ्य निर्माण होते. उन्हाळ्यात एखाद्या कोऱ्या कागदावर काळ्या पेनच्या रेष्या ओढाव्या तशा सावल्या या झाडाखाली असतात परंतु श्रावणात काळ्या कुट्ट सावल्यातुन सुर्य सुद्धा झाकला जातो. दिवस सगळ्यांचेच येत असतात फक्त जिंदगीच्या या चढ उतारात आपण टिकुन रहायला हवे. आपल्यावर जळणारी माणसे व आपले वाईट चिंतणारी माणसे आपल्या वटण्याची (संपण्याची) वाट आतुरतेने पाहत असतात कधी-कधी ते सुद्धा माणुसरूपी झाडावर कुऱ्हाडीचा घाव घालुन त्या झाडाचे खोड जिवंत आहे का मेलेलं हे तपासुनही पाहत असतात. अशा वेळी वरवरून जरी वटलेलो दिसत असलो तरी आतुन मात्र जगण्याचं आणि सामर्थ्यानं लढण्याचं रक्त शिल्लक असल्याची जाणिव आपणाला करून द्यावीच लागते अन्यथा एखाद्याच्या चुलीचे सरपण म्हणुन आपल्यालाच जळावे लागेल...

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ एप्रिल २०१७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...