`आमच्या प्रेतांच्या पायऱ्या रचाव्या लागल्या तरी चालेल पण कोंढण्याच्या पायरीला आऊसाहेबांचे पाय लागायला पाह्यजेल’ या एका प्रतिज्ञेवर सुभेदारांसह साडेतीनशे मावळ्यांनी कोंढण्यावर दिलेलं बलिदान इतिहासात अजरामर आहे. कोंढण्याचा रणसंग्राम याआधी तानाजी आणि हर हर महादेव या दोन चित्रपटांतून दाखवला गेलाय. गोष्ट तीच आहे जी आपल्या सर्वांना लहानपणापासूनच माहीत आहे तरीही ती सादर करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते म्हणून सुभेदारही तुम्ही पाहायलाच हवा.
सर्वच पात्रांच्या जवळ घेवून जाणारी चित्रपटातली वेशभूषा आणि शिवकालीन भाषेत घट्ट रुतलेला अभिनय अतिशय सुंदर झालाय. अजय पुरकर हा नट जणू शिवरायांनीच खास त्यांच्या मावळ्यांच्या भूमिका अजरामर करायला पृथ्वीवर धाडला असावा इतक्या प्रचंड कष्टाने त्यांनी भूमिकेला न्याय दिलाय. श्री शिवराज अष्टकांतील आजवरचे चारही भाग मी पाहिलेत एक शिवभक्त म्हणून त्या कलाकृती पाहाणं मी कर्तव्यच समजतो. परंतु पाचव्या भागासाठी माझे प्रिय मित्र श्रमिक गोजमगुंडे सहनिर्माता असल्याने हा भाग आपसूकच जवळचा होवून गेलेला.
दिग्पाल सरांच्या सर्वच टिमचं शुटींग करत असतानाचे शिवकालीन पात्रांसंदर्भात असलेलं समर्पण, ते पाळत असलेली आचार संहिता, शिवरायांवरील श्रद्धा या गोष्टी आपसूकच चित्रपटांत उतरतात. शिवचरित्र ही जशी पुन्हा पुन्हा ऐकण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहेत तशीच ती पुन्हा पुन्हा पाहण्याची सुद्धा आहे. जसे संत तुकारामांचे अभंग कितीही वेळा ऐकले तरी जुने होत नाहीत तसंच सुभेदार तानाजी मालुसरेंचा पराक्रम कितिंदा जरी पाहिला तरी पुन्हा पुन्हा अंगावर काटा येतोच.
राजे जेव्हा तानाजी मालुसरेंच्या कमरेला सुभेदारपदाची तलवार बांधतात, आग्र्याहून सुटून राजगडावर येवून राजे जेव्हा माँसाहेबांच्यापायावर डोके ठेवतात. बेलभंडारा हातात घेवून जेव्हा सुभेदार `आधी लगीन कोंढण्याचं मग रायबाचं’ ही शपथ घेतात तेव्हा आपसूकअंगावर शहारे उभारतात. शेवटी उदयभानाला मारुन जेव्हा सुभेदार शिवरायांच्या कुशीत जीव सोडतात तेव्हा काळजाच्या खोलवर आलेला हुंदका डोळ्यातील अश्रूंना बाहेर येणास भाग पाडतो.
या चित्रपटातील अलका कुबल यांनी साकारलेलं `जना गराडीन’ हे पात्र पाहिल्यावर मी त्याचा संबंद्य लगेच माझ्या आडनावाशी जोडला कारण पटलाच्या बायकोला जसे पाटलीन म्हणतात तसेच आमच्या घरातील स्त्रियांना सुद्धा गरडीन म्हणतात. सुभेदार मधील गराडीन हे नाव खरंच शिवकालीन आहे की स्क्रिप्ट लिहिताना लेखकाने दिलंय हे दिग्पाल सरांना भेटल्यावर मी नक्की विचारेन.
शेवटी एक विनंती,
चित्रपट तर सहकुटुंब थिएटर मधे जाऊनच बघा फक्त शेवटची दृश्य मोबाईलमधे रेकॉर्ड करुन व्हिडीओ स्टोरी वगैरे ठेवण्याचा मोह आवरा. अशाने नवीन प्रेक्षकांच्या उत्कंठेचा अतिउच्च बिंदू लोप पावतो. बाकी महाराजांचे विचार त्यांच्या मुळ इतिहासाची तोडफोड न करता त्याला भव्यता प्रदान करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्यांचा प्रत्येक शिवभक्ताला सदैव अभिमानाच वाटेल. पुन्हा एकदा सुभेदारच्या सर्व टिमचे कौतुक आणि पुढील भागास शुभेच्छा.
विशाल गरड
२७ ऑगस्ट २०२३, पांगरी