आज ऍमेझॉन प्राईमवर अमर देवकर दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त म्होरक्या चित्रपट पाहिला. खूप संघर्षातून अमर सरांनी म्होरक्या म्होरं नेवून दाखवलाय. हा चित्रपट तयार होवून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेचाही एक नवीन पिच्चर होवू शकतो किंवा पुस्तक होवू शकतं इतके चढ उतार त्यांनी पाहिले आहेत. असो, म्होरक्या प्राईमवर रिलीज झाल्यापासून तो पाहायला मला जरा नव्हे तर बराच उशीर झालाय हे मान्य पण कलाकृती कधीच जुनी होत नसते ती जोपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही तोपर्यंत ती नविनच असते. सो तुम्हीही अजुन नसेल पाहिला तर नक्की बघा.
रमन देवकरने आशाची आणि ऋतुराज कऱ्हाडेने बाळ्याची भूमिका प्रभावी साकारली आहे. शाळकरी मुलांकडून कसलेला अभिनय करुन घेण्यात अमर सर यशस्वी ठरलेत. या चित्रपटात प्रमुख कलाकारांसह कॅडेट नावाचा कुत्रा, काजोल नावाची म्हैस आणि कटरीना नावाची मेंढी स्टार्ट टू एंड चित्रपट पाठीवर घेवून फिरताना दिसते. जेव्हा आशा मेंढरं राखताना उभा राहतो तेव्हा त्याच्या सावलीत भारताचा नकाशा दिसतो. मग जशी आपली सावली आपला पिच्छा सोडत नसते तशीच देशभक्ती, देशप्रेम, परेड या गोष्टी कथानकाला अजिबात सोडत नाहीत. शुद्ध आर्ट फिल्म असली तरी यात अगदीच हलकी फुलकी दुधावर साय जमावी एवढी गोड लव्हस्टोरी आहे. पिच्चर पाहताना मेंदू विचार करण्यात गुंग असतानाच निकिता स्क्रिनवर आली की मग ह्रदयाचा लहानपणीचा कप्पा उघडतो आणि बचपण का प्यार जागवतो.
अस्सल ग्रामीण बार्शीच्या शिव्यांनी संवादाला सोन्याचा मुलामा दिलाय. लोकेशन्स अचूक निवडल्यात, ब्ल्यू हावर मधे शूट केलेले सगळेच सीन बाप चित्रित केलेत. अमर देवकरांनी साकारलेला डबलरोल नवख्या माणसाच्या सहसा लक्ष्यात येत नाही, पण त्यांनी अर्धमुक्या युवकाचा नाकातून संवाद अप्रतिम केलाय. यात मारुतीच्या डोळ्याला पट्टी बांधलेला एक सिन आहे. सद्य परिस्थिती पाहता काही माणसांनी देवांच्या सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधल्याचे लेखकाला सांगायचे असावे.
बाभळीच्या झाडाचा डिंक काढताना, दोऱ्याने पपई चिरताना, मेंढीची डिलिव्हरी होताना, देवांच्या चित्रांची पाकीटे खेळताना, कोयत्याने झाडलेली मोहोळे, गोमतर आबाच्या पायातला काटा काढताना, तांब्यात कोळसा घालून इस्तरी करताना, आशा संडासला बसल्यावर त्याच्या टंबराळ्यात पडलेला मुंगळा काटकीवरुण बाहेर येताना, लिंबाऱ्याच्या खोडाला पालवी फुटताना हे सगळे सिन काळजावर छापण्यासारखे आहेत. म्होरक्याला राष्ट्रीय पुरस्कार का मिळाला असेल याचे उत्तर वरील फ्रेममधून मिळते.
`दुश्मन आतच’ आहे हा वेडा आण्ण्याचा डायलॉग माणसाच्या आतच देशाचा खरा शत्रू दडला असल्याचे संकेत देतो म्हणूनच आधी आपल्यातल्या गद्दाराशी युद्ध व्हायला हवे. बाहेरच्यांपेक्षा आपलीच माणसे जात, वर्ण, धर्म, कुळ, व्यवसाय पाहून आपल्यावर अन्याय करीत असतात. आपली संधी क्षमता असतानाही चोरून घेत असतात. म्हणूनच आशा सोबतच्या एका संवादात गोमतर आबा म्हणतात`गणतंत्रचं गोमतर करुन टाकलंय माणसांनी’ पुढे पायातला काटा काढतानाच्या संवादामधूनही`आयुष्यात कितीतरी काटे पायात मोडतात. काही निघतात काहींचे कुरूप होवून बसते पण कुरूपातला काटा टोकरून टोकरून काढायला हवा’ हा संदेश मिळतो.
गणतंत्र आबा सारखी जुनी खोडं आपले जीवंत राष्ट्रध्वज आहेत. अडाणी वेडी माणसं सुद्धा या देशाचे नागरिक असतात, निस्वार्थ देशभक्त असतात. इथल्या समाज व्यवस्थेने त्यांना दगडं मारुन वेडं केलंय. संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर शेवटी मुक्या आईच्या पोटचंपोर जेव्हा पुर्ण क्षमतेने परेडची कमांड देतो तेव्हा आपसूकच अंगावर काटा उभारतो आणि डोळ्यात पाणी तरळते.
`जी म्होर नेतो त्योच म्होरक्या’,
`येड्याला काय भ्यायचंय, आरं याड पांघरलेल्याला भ्याव माणसांनी’
`दुश्मन आतच आहे’
म्होरक्या मधली ही वाक्य चित्रपटाचे सार सांगायला पुरेशी आहेत त्यावर अधिक काय लिहावे. म्होरक्यातील पडद्यावरील व पडद्यामागील माझ्या सर्व दोस्तांचे खूप सारं कौतुक आणि अमर सरांना त्यांच्या पुढील चित्रपटांसाठी आम्रसा इतक्या गोड शुभेच्छा.
विशाल गरड
१ मे २०२३, पांगरी
No comments:
Post a Comment