पिच्चरला जेवढी गर्दी जास्त तेवढा थिएटरला नफा सुद्धा जास्तच असतो. आता यात कोण डिस्ट्रीबुटर कोणत्या थिएटर किंवा मल्टिप्लेक्सला किती टक्के नफा देतो यावरही शोचे स्क्रिनिंग अवलंबून असावे. कधी कधी थेटरमधे जर एक दोन जण असतील तर शो रद्द होतो. तसे करणे साहजिकच आहे पण प्रेक्षक असताना शो रद्द होत असेल तर ते थेटर चालक आणि निर्माते दोघांनाही तोट्याचेच असते मग हे असे का बरे होत असावे ?
यू ट्यूब वर अगदीच टुकार व्हिडीओला बिलियन लाईक असतात पण आपल्या आणि काही प्रेक्षकांच्या दृष्टीने खूप चांगला केंटेंट असलेल्या व्हिडिओला सुद्धा काही हजार किंवा फार तर फार लाखभर लाईक्स मिळतात. समय समय की बात अलग होती है. आमिरखान सारख्या बड्या अभिनेता आणि निर्मात्याला सुद्धा हजारो स्क्रिन मिळवून देखील फ्लॉपचा सामना करावा लागला तर ऋषभशेट्टीच्या कांताराने हळूहळू पडदा व्यापत इतिहास घडवला. दिवसभरात आपला मूड जसा वेगवेगळा असतो तसाच आपल्या कलाकृती पाहण्याचा त्याला प्रतिसाद देण्याचा प्रेक्षकांचा मूडसुद्धा वेगवेगळा असू शकतो असे मला वाटते. म्हणूनच सैराट पाहिलेल्या सर्वांनीच झुंड आणि जीबीबी नाही पाहिला.
थिएटर किंवा मल्टिप्लेक्स चालक चित्रपट व्यवसायातले रिटेलर आहेत. त्यांना धंदा हवाच असतो. त्यांच्याच जिवावर चित्रपट कोटीची उड्डाणे घेतात. आपल्या देशात आज घडीला चित्रपट निर्माते जरी ढिगभर झाले असले तरी डिस्ट्रीबुटर मात्र मोजकेच आहेत त्यातही अनेक छूपे पदर असतात जे सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत हेही खरंय. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात किमान एक मल्टिप्लेक्स असायला हवे आणि प्रत्येक तालुक्यात एक दोन सिंगल स्क्रिन थेटर हवेत असे झाले तर भविष्यातील चित्र वेगळे असेल. आजही कित्येक सिंगल स्क्रिन थिएटर मधे फक्त गुटख्याच्या वासामुळे फॅमिलीसोबत चित्रपट पाहणे निव्वळ अशक्य होते. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म आणि रिल्समुळे घरबसल्या ग्लोबल कंटेंट खूप स्वस्तात उपलब्ध झाल्याने घरीच मोठ्या स्क्रिनवर फिल्म बाघण्याचा टक्का वाढत चाललाय. याचाही परिणाम थोडा का होईना चित्रपट व्यवसायावर झालाय हे मान्य करावे लागेल.
सध्या गाणी आणि ट्रेलर म्हणजे भाताचे शित झाले आहेत. कलाकृती चांगली शिजली का नाही हे त्यावरुनच ठरवले जातेय. मग प्रेक्षकही गाण्याला किंवा ट्रेलरला किती दिवसात किती मिलियन व्हिव्ज आले यावरुन कोणती फिल्म बघायची हे ठरवतात. हे होणे स्वाभाविकही आहे. ही झाली एक बाजू दुसऱ्या बाजूने पाहायचे झाले तर काही फिल्म्स पडद्यावर झळकत नाहीत पण ओटीटीवर येवून फक्त माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सुपरहित होतात याचे`जय भीम’ हे उत्तम उदाहरण आहे.
जेव्हा एकाच दिवशी चार पाच चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा थिएटर चालकांना सुद्धा प्रश्न पडत असेल की नेमकं कोणत्या पिच्चरचे किती शो लावायचे. मग बिग बजेट, बिग स्टार कास्ट, बिग पब्लिसिटी, बिग कॉन्ट्राव्हर्सी असलेल्या चित्रपटांना आपसूक प्राधान्य दिले जाते. आपण कितीही मराठी मराठी म्हणलोत तरी हॉलिवुड, बॉलीवुड आणि साऊथवरचे प्रेम कमी करू शकत नाहीत. याआधी करोडो लोक केजीएफ २ ची वेड्यासारखी वाट पाहून होते आणि आजही करोडो लोक पुष्पा २ ची वाट पाहत आहेत. उद्या समजा पुष्पा २ सोबत जर कोणता मराठी वा हिंदी सिनेमा रिलीज होणार असेल तर साहजिकच सर्वात जास्त स्क्रिनवर पुष्पा लागलेला असू शकतो किंवा सुरुवातीला जरी कमी स्क्रिनवर लागला तरी कांतारा सारखा जास्त स्क्रिन व्यापू शकतो.
सध्या बदलत्या काळानुसार प्री प्रॉडक्शन, प्रॉडक्शन आणि पोस्ट प्रॉडक्शनसह प्रोमोशन आणि वितरणावरही पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतोय तेव्हाच एका रात्रीत गल्ला भरण्याची शाश्वती मिळू शकते त्यात पुन्हा नशिबाचा भाग आलाच. लास्ट फ्रायडेला जर महाराष्ट्र शाहीर किंवा टीडीएम पैकी एकच मराठी सिनेमा रिलीज झाला असता तर आज चित्र वेगळे दिसले असते. सलग तीन दिवस सुट्टीचे मिळतात या आशेने निर्मात्यांनी त्या तारखा निवडल्या असतील कदाचित पण आठवड्यात दोन सिनेमे बघणारे किती लोक आहेत आपल्याकडे ? रिलीज डेटच्या आधीच्या आठवड्यात आलेली फिल्म आणि पुढील आठवड्यात येणारी फिल्म याचाही विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.
असे कितीतरी मराठी चित्रपट आहेत जे मेट्रो सिटीमधील ठराविक स्क्रिनवर प्रसिद्ध होतात. ते कधी येतात आणि जातात कळतही नाही. यात काही बडे प्रोड्युसर असतात जे आवड म्हणून दोन तीन खोके खर्चुन टाकतात. जरी तोटा झाला तरी तो त्यांच्या फारसा जिव्हारी लागत नाही पण नव्याने पाऊल टाकणारे निर्माते, दिग्दर्शक अक्षरशः शेती विकून, घर दागिने घाण ठेवून चित्रपट करतात मग अशांना जर तोटा झाला तर सगळं कोलमडून जातं.
बाकी राहिला विषय मराठी चित्रपट सृष्टीचा. तर दर्जेदार चित्रपट बनवण्यासोबतच फक्त अनुदान मिळवण्यापुरते चित्रपट बनवणारी मंडळी सुद्धा आपल्याकडे आहेत. जेवढी उदाहरणे फ्लॉपची असतील तेवढीच हिट आणि सुपर डुपर हिटची पण आहेत. वर्तमान आणि भविष्यातही चित्रपटांचा चढ उतार सुरूच राहिल पण एक दिवस नक्की येयील मराठी सिनेमाचा जेव्हा सगळ्या जगाला दखल घ्यावी लागेल. अहो जास्त नाही फक्त दहा पंधरा वर्षापूर्वी ज्या साउथच्या फायटींग सिनची आपण टिंगल करायचो आज त्याच साउथने ऑस्करवर आपले नाव कोरलंय. समय बडा पेहलवान होता है. मराठी चित्रपटसृष्टी जिंदाबाद थी और आगे भी जिंदाबाद रहेगी बस थोडा दौर गुजर जाने दो. हिम्मत रखो दोस्तो.
विशाल गरड
४ मे २०२३, पांगरी
अभ्यासपूर्ण लेखन विशाल..अभिनंदन
ReplyDelete