फक्त समाजाच्या कल्याणकारी भविष्यासाठी स्वतःच्या घरादारावर, कुटुंबीयांवर तुळशीपत्र ठेवणाऱ्या अशा विश्वासू, निडर, लढवैया, संघर्षवादी, संयमी, दृढनिश्चयी, मराठा अभिमानी योद्ध्याला कुणी मरायला सोडून देतं का ? ज्याने लढा उभारला, सर्वांची एकी केली, लढायला बळ दिले तोच धारातीर्थी पडलेला आपल्याला पाहवेल का ? माणसांच्या वेदना वाचायला आणि त्या मांडायला येणारा, मराठ्यांच्या विद्यापीठातल्या लोकज्ञानाचा हा ज्ञानसुर्य डोळ्यादेखत विझताना पाहायचाय का ?
नाही नाही नाही, कदापी नाही !
हा लढा जरी आरक्षण मिळवण्याचा असला तरी यात जरांगे पाटलांना गमवायचे नाही हीच भावना माझ्यासह तमाम मराठ्यांची आहे. जर त्यांच्या हट्टापायी त्यांचाच जीव धोक्यात जाणार असेल तर एवढ्या बाबतीत पाटलांचे ऐकायचे नाही. काहीही करुन ताबडतोब त्यांच्यावर उपचार सुरु होणे खूप गरजेचे आहे. वेळप्रसंगी त्यांच्यावर बळजबरीने सलाईन लावायची वेळ आली तरी अंतरवालीतील ग्रामस्थ, त्यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या मुलीने ही जबाबदारी घ्यावी पण जरांगेंना जित्ता ठेवा कारण त्यांना भल्या भल्यांचा कित्ता पुरा करायचाय.
पाटील,
“ज्यावेळी माणूस लोकांचा होतो तेव्हा त्याच्या जीवावर सुद्धा लोकांचा अधिकार प्राप्त होतो. याच अधिकाराने या देशातील कोटी कोटी मराठ्यांच्या वतीने मी विशाल गरड तुम्हाला जाहीर विनंती करतो की तुम्ही तत्काळ उपचारास परवानगी द्यावी अन्यथा तुमच्या पश्च्यात उगवलेला सूर्य बघण्याची आमची हिंमत नाही. दया करा पाटील. जर तेच तुमच्या मरणाची वाट पाहत असतील तर त्यांना जिंकू देवू नका. अजून लढाया उभा करु आणि जिंकूही फक्त तुमचं बलिदान देवू नका.”
मराठा विशाल गरड
३१ ऑक्टोबर २०२३, पांगरी