राजेंद्र विठ्ठल राऊत. एका सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार झालेला माणूस. या माणसाने राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी कधी ठरवले नव्हते की मला आमदार व्हायचंय. सन १९९५ च्या कालखंडात राजाभाऊंनी मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून प्रवास सुरु केला त्यावेळी तत्कालीन आमदारांच्या प्रचार यंत्रणेत राजाभाऊ असायचे. शेती करणारा राजा राऊत नावाचा हा युवक सन १९९७ साली बार्शी नगरपालिकेचा नगराध्यक्ष होवून राजाभाऊ राऊत झाला. इथून पुढे या नेत्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. १९९९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात राजाभाऊंनी तगडी लढत दिली. त्यावेळी त्यांचा अवघ्या ३२७ मतांनी पराभव झाला. पांढरी सुमो गाडी, गालावर दाढी, पांढरी शर्ट पॅंट, पायात बाटा चप्पल, कपाळी आडवी भगवी रेष, गळ्यात काळा दोरा अशा पेहरावातल्या या युवा नेत्याने सगळा तालुका पिंजून काढला. ग्रामीण भागातील गावातल्या घरांचा उंबरा ना उंबरा शिवला. सुरुवातीला त्यांच्या दिमतीला राऊत चाळीतली फौज होतीच पण लोकांच्या स्थानिक प्रश्नांना वाचा फोडल्याने राजाभाऊ ग्रामीण बार्शीच्या ह्रदयातील ताईत झाले. याच जोरावर २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजाभाऊ पहिल्यांदा आमदार झाले. पुढे सलगदोन वेळा त्यांचा पराभव झाला तरी जनतेने त्यांना कधी तुम्ही आमदार नाहीत असे जाणवू दिले नाही. राऊत चाळीतल्या त्यांच्या संपर्क कार्यालयाची गर्दी उलट वरचे वर वाढतच गेली. त्यांनीही आमदारकी नसताना सुद्धा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेची अविरत सेवा केली.
वेळोवेळी बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीमुळे राजाभाऊंनी पक्षांतरे केली त्याचा त्यांना कधी फटकाही बसला आणि कधी फायदाही झाला. पण २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी अपक्ष निवडून येवून अख्ख्या महाराष्ट्राला त्यांच्या वैयक्तिक ताकदीची धमक दाखवून दिली. आज घडीला बार्शी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती, पंचायत समिती , जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, मार्केट कमिटी आणि विविध कार्यकारी सोसायट्यांवर राऊत गटाने वर्चस्व प्रस्थापित केलंय. फक्त चहा पाण्यावर निवडणुका पार पडण्याचा काळ आता नामशेष झाला. हल्लीच्या निवडणुका या प्रचंड खर्चिक असतात. राजकारण म्हणलं की फक्त धनदांडग्यांचे काम असा पायंडा पडत असताना राजाभाऊंनी मात्र जनतेची सेवा करण्याची धमक असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पंचायत समितीसदस्य, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती सदस्य, नगरसेवक, उपसभापती, सभापती, नगराध्यक्ष केले.
राजभाऊंचे एकत्र कुटुंब हे त्यांच्या राजकीय वाटचालीतील एक बलस्थान राहिले आहे. जवळपास १४० गावांचा असलेल्या बार्शी तालुक्यात प्रचार यंत्रणा राबवणे खायची गोष्ट नाही अशात जर रक्ताची माणसे दिमतीला असली की भार आपसूक हलका होवून जातअसतो. भाऊ एवढ्या बाबतीत नशीबवान ठरले कारण त्यांना त्यांचा राजकीय आणि व्यावसायिक भार लवकर खांद्यावर उचलणारे पुत्ररणवीर राऊत आणि रणजित राऊत, पुतण्या अभिजीत राऊत, आणि भाऊ विजयनाना राऊत व संजय राऊत मिळाले. एखाद्या नेत्यासाठी जेव्हा त्याच्या घरातील माणसं जीव तोडून झटत असतात तेव्हा कार्यकर्तेही मग जिवाचे रान करायला लागतात. म्हणूनच याआधीच्या सर्व निवडणुकीत त्यांनी सिंहाचा वाटा उचलला आता यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाऊंना प्रचार यंत्रणेची काळजी असणार नाही उसके लिये तो अब अकेला रणवीर ही काफी है.
बार्शी नगरपालिकेच्या नगरसेवक पदापासून सुरु झालेला राजाभाऊंचा प्रवास लोकांच्या आग्रहास्तव आमदारकीपर्यंत येवून ठेपला. राजकारणात लागणारी सगळी आयुधं या माणसाने लिलया मिळवली. हे करत असताना आपण ज्या संघर्षातून आलोय तो संघर्ष राजाभाऊ कधीच विसरले नाहीत. पदे येतात जातात पण ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला तळहाताच्या फोडासारखं संभाळलेलं असतं त्यांना सत्ता असो वा नसो आपण सांभाळलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आधी स्वतः ताकदवान बनलं पाहिजे म्हणूनच राजकारणात प्रवेश करताच त्यांनी उद्योगधंद्यातही प्रवेश केला. लक्ष्मी दूध संघ, भाग्यलक्ष्मी पतसंस्था, सोनू रिच मिनरल वॉटर, खडीक्रशर, लक्ष्मी सोपान कृषी उत्पन्न बाजार समिती, दाल मिल, आडत व्यापार, या त्यांच्या उद्योगातल्या पाऊलखुणा आहेत ज्या माध्यमातून त्यांनी वैयक्तिकरित्या हजारो हातांना रोजगार उपलब्ध करुन दिला. सुरुवातीच्या कालखंडात आक्रमक भाषणे करणारे राजाभाऊ आमदार झाल्यावर मात्र आता गावखेड्यातील युवकांना उद्योगाकडे वळण्याचे मार्गदर्शन करताना दिसतात. मतदार संघातील युवकांनी मिळेल ते काम करुन, लाज न बाळगता उद्योग व्यवसाय करुन यश मिळवले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो.
आजच्या काळात नुसतं आमदार होवून संघर्ष संपत नाही तर शासन दरबारी आपले वजन निर्माण करायला सुद्धा कौशल्य विकसित करावं लागतं जे आमदार राजाभाऊंनी सध्याच्या मंत्रिमंडळात केलंय. महाराष्ट्रातला एक मास लिडर आमदार म्हणून ओळख असलेल्या भाऊंनी अवघ्या वर्ष भराच्या कालखंडात बार्शी शहर आणि तालुक्यासाठी १८०० कोटीहून अधिक निधी मंजूर करून आणलाय. यापैकी बार्शी नगरपरिषदेसाठी जवळपास ३०० कोटी. तालुक्यातील साठवण तलावांसाठी ५० कोटी. कोर्टाच्या इमारतीसाठी ९० कोटी. ग्रामीण रुग्णालयासाठी २० कोटी, बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी ३०० कोटी. यांसह शहर व तालुक्यातील ग्रामीण रस्ते, पूल व विविध शासकीय योजनांसाठी जवळपास १००० कोटी रुपयांचा निधी त्यांनी खेचून आणलाय.
बार्शी तालुक्यात अशी कित्येक गरीब कुटुंब सापडतील की भाऊंच्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या मुलीचे लग्न झाले, कुणाचे आई वडील, लेकरू दवाखान्यात नीट झाले, त्यांच्या मध्यस्तीमुळे भावा भावाची भांडणे संपली, भावकीचे वाद मिटले. राजकीय वैर संपले, मुलगीनांदायला आली, कोर्टाचे वाद निकाली निघाले, विद्यार्थ्यांचे कॉलेजात प्रवेश झाले. पोलिसांनी पकडलेली गाडी सोडल्याचे तर हजारोसापडतील. अर्थात ही कामे आमदाराच्या कार्यकक्षेत येत नाहीत पण राजाभाऊ राऊत या व्यक्तीने स्वतःभोवती तशी कक्षाच टाकून न ठेवल्यामुळे आजही ते स्वतःच स्वतःचा पी.ए म्हणून काम करतात. म्हणूनच तालुक्यात `हॅलो, राजाभाऊ बोलतोय’ या एका वाक्यावर कामे निकालात निघतात. प्रवासाने शरीर थकतं, बोलून बोलून घसा दुखतो, जागरणाने डोळे जळजळतात पण लोकसेवेचा वसा घेतलेला हा राजा प्रजेसाठी भोसले चौकात अहोरात्र उपलब्ध असतोच.
हा लेख मी केवळ एक लेखक आहे म्हणून एका आमदारावर लिहिलेला नसून लहानपणापासून ज्यांची कारकीर्द मी माझे वडील विजय गरड सरांमुळे जवळून अनुभवू शकलो त्या कारकिर्दीचा सन्मान म्हणून लिहिलाय. माझ्या वडिलांना ज्या माणसाने राजकारणात कुटुंबातला माणूस मानलं, एका निष्ठावान कार्यकर्त्याला भूतकाळात दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी पंचायत समितीला उभं करून जणू स्वतःचा भाऊच उभा आहे असे समजून प्रचार यंत्रणा राबवली. दुर्दैवाने ते पराभूत झाले तरी शेवटी जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती करुन त्यांच्या २५ वर्षाच्या निष्ठेचा सन्मान केला. हे तर फक्त एक उदाहरण झाले पण तालुक्यातील शेकडो गरीब कार्यकर्त्यांचे पदाधिकारी होण्याचे स्वप्न राजाभाऊंनी स्वखर्चाने पूर्ण केलंय हे या नेत्याचे असामान्य मोठेपण आहे. खुर्च्या येतात जातात, पदे मिळतात संपतात पण राजकारणात जो दिलेला शब्द पाळतो तो नेता म्हणून आजन्म सत्ता गाजवत राहतो आणि जे शब्द फिरवतात त्यांची कारकीर्द संपते.
राजाभाऊंनी तालुक्याला कधी सांगितलेही नव्हते की मी इतका निधी आणेल पण त्यांनी जे सांगितले त्याहीपेक्षा तिप्पट चौपट निधी अवघ्या वर्षभरात आणून बार्शीच्या इतिहासातला एकमेव आमदार म्हणून अढळ स्थान निर्माण केले. भारताचे पंतप्रधान मा.ना. नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार राजेंद्र राऊत बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी करीत असलेली भव्य विकासकामे पुढील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समाविष्ठ होवून आणखीन अतिभव्य होवोत हेच आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्ठचिंतन. प्रिय भाऊ खूप खूप शुभेच्छा !
लेखक : प्रा.विशाल गरड, पांगरी
(सदर लेख दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी दैनिक लोकमत मधे प्रसिद्ध झाला आहे)
No comments:
Post a Comment