Sunday, May 28, 2017

| गावरान कोंबडा ©

ह्यजं नुसतं नांव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतंय, व्हय, गावाकडं दहा बारा कोंबड्या सोबत घिऊन उकिरडं हुंगणारा आशील बेण्याचा गावरान कोबडा खायची मजाच ईगळी हाय राव.
प्युवर नाॅनव्हेज माणसांचा हा खेडेगावातला एकदम आवडीचा खाद्यपदार्थ, गावरान कोंबड्याच्या चिकनपुढं तर मटान आन् मच्छी; दुनीबी फिक्कच. सध्या रोजची धावपळ काल शांत झाली तवा माझा नेहमीचा आड्डा म्हंजी धनगरवाडीला कालच्या राती उशीराच बेत आकला, आगळगांवचा माझा आवडता मास्टर शेफ अमोल बावकरनं आवतान धाडलं आन् गावरान कोंबडा खायला म्या पांगरीहुन निघुन धनगरवाडी गाटली. कापा कापी आन् कांडा कुटा करायला रातीच्या साडे दहा वाजल्या, कोंबडा शिजायला लई झार आसतंय तवा सरपान जरा जास्तच गोळा केलतं. पण रातीला वारं जणु ताशी ऐंशीच्या स्पीडनं चालू व्हतं. जाळ लागता लागीना आन् लागल्यावर भगुण्याच्या बुडाखाली राहिना. आमोल आन् मावली जाळ लावता-लावता कटाळुन गिली. शिवटी तिन दगडाच्या चुलीच्या कडंनी मोटरीवर झाकायचा पत्रा लावला आणि चुलीला घेरा करून उगं कोंबडा शिजायची वाट बघत बसलाव. शिजोस्तोर सुद्धा दम नव्हता. मध्येच पळी घालुन एकांदा पिस भाहीर काढायचा आन् शिजला का नाही बगतो म्हणत फस्त करायचा. पावकिलो कोंबडा तर आम्ही भगुण्यातच खाल्ला.
शेरवा आटरून गेल्यानं तिखट झाला आन् अचानक पाणी बी कमी पडलं; मग म्या अन् मावलीनं जाऊन बंड्या बावकराच्या हिरीवरून मडक्याची घागर भरून आणली. काळ्याकुट्ट अंधारात हातात माॅबाईलची बॅटरी धरत नांगरटितनं रस्ता काढत-काढत बंड्याबापुच्या हिरीत उतरून पाणी आनुस्तोर आमोलरावनी हिकडं कांदा, लिंबु, आन् टंबाट्याचं सॅलड तयार करून ठिवलं. ज्या चिचंखाली आमची तिन दगडाची चुल व्हती तीलाच लागुन कलींगडाचा फड व्हता. घरचं तिखटं असल्यानं शेरवा जरा जास्तच झंकार झाला व्हता. म्हणुन जेवना आधीच लालभडक दोन टरबुज खाऊन पोटात लागलेली आग ईजिवली. पाणी प्यालाच न्हाऊ, नुसती टरबुजं खाऊनच तहान भागीवली.
कायबी मना पण फाईव्ह स्टार हाटेलातल्या पेक्षा भारी मजा तिन दगडाच्या चुलीवर शिजीवल्याला गावरान कोंबडा खायला यीती. मम्बई मदल्या सचिन तिंडुलकरच्या फाईव्ह स्टार हाटेलात बी म्या जिवलुय तरिबी आम्ल्याच्या हातची चवच न्यारी हाय राव. माझं बरंच लहाणपणं धनगरवाडीवर आम्ल्या सोबत पार्ट्या करण्यात गेलंय. आता जरा बीजी झालोय पण तेवढ्यातुनबी कधीतरी असा गावरान कोंबडा खायला म्या जातोच.
पिण्यासाठी बाजुला काढलेल्या सुपाच्या वाटीचा फुर्रर्रकाऽऽ मारित-मारित शेरव्यात चुरल्याली जवारीची भाकर खाऊन तृप्त झालाव. पुन्हा थोड्या येळानं आजुन एक टरबुज चिरलं आन् त्येजा बी फडशा पाडत राच्च्या बारा वाजता एका तळवटावर मोठ्ठ चवाळं पांघरून तिघंबी घुमटुन घिऊन झोपलाव.
सु.....ऽ॥ऽऽ, सु.....ऽ॥ऽऽ
 
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २७ मे २०१७

Thursday, May 18, 2017

| माझा वाढदिवस ©

आज मी माझा वाढदिवस माझ्या आई वडीलांसह आळणी येथील स्वआधार संस्थेतील मतिमंद व अनाथ मुलींसोबत साजरा केला. सामाजिक जाणिवा जिवंत ठेवण्याचे बळ जिच्या उदरात मिळाले आणि तसा संस्कार ज्या वडिलांनी माझ्यावर केला त्या दादा आणि आई सोबत आज सायंकाळी या अनाथालयात माझा वाढदिवस साजरा झाला. मी जाण्याआधीच तेथील शिक्षक वृंदांनी सर्व मुलींना शाळेसमोरील एका सुंदर लाॅनवर बसवलं होतं. आईसमवेत त्यांच्यापुढं जाताच; माझ्या आईला त्यांनी "नमस्ते आई" अशी हाक मारली. आम्ही सगळेच गहिवरून गेलो आणि आजचा वाढदिवस सार्थकी लागल्यासारखं वाटलं. या हरवलेल्या दुनियेच्या कुठल्यातरी कोपऱ्यात सापडलेल्या अनाथ आणि मतिमंद मुलींना सांभाळण्याचे थोर कार्य स्वआधार हि संस्था गेल्या कित्येक वर्षापासुन करत आहे. त्यांना शिकण्यासोबतच जगणं शिकवणारं हे संकुल मला स्वर्ग वाटतं म्हणुनच माझा दरवर्षीचा वाढदिवस मी ईथेच साजरा करतो. मागच्या रक्षाबंधनाला येथील मुलींनी स्वतः तयार केलेल्या राख्या मला पोस्टाने पाठवल्या होत्या म्हणुन रक्षाबंधनाची राहीलेली ओवाळणी छोटीशी आर्थीक मदत म्हणुन आज त्यांना देताना माझ्या घासातला एक घास त्यांना दिल्याचे समाधान वाटले. सध्या या अनाथ मुली ईकोफ्रेन्डली गणपती तयार करत आहेत. गणोशोत्सव मंडळांनी देखील इथुनच मुर्त्या नेऊन त्यांना हातभार लावायला हवा.
ज्यांचे कोणी नाही त्यांना आपलेसे करण्यासारखा आनंद दुसरा क्वचितच असावा. मतिमंदता असतानाही माझ्या भाषणातील प्रत्येक वाक्याला दाद देण्याइतपत ज्ञान त्यांच्याकडे असल्याची जाणिव त्यांच्या टाळ्यांच्या आवाजातुन मला समजली. या जगात कोणीच मतिमंद किंवा गतिमंद नसतं फक्त त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी मंद नसायला हवी. आपलं स्थान समाजात किती मोठे आहे याहिपेक्षा आपण आपल्या आई वडीलांच्या नजरेत किती मोठे आहोत याला अग्रक्रम असायला हवा. माझ्या आजच्या उपक्रमामुळे आई वडीलांच्या नजरेतली आपली किंमत थोडीशी आणखीन वाढल्याचा मनस्वी आनंद होतोय.
वाढदिवसानंतर मुलींना वाटण्यासाठी मी खाऊ आणला होता; तो वाटताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निव्वळ शब्दात न सांगण्यासारखाच होता, मी सोबत आणलेला खाऊ येथील मुलींनी आवडीने खाल्ला परंतु पोट मात्र माझं भरलं होतं बस्स याचसाठी ही बांधीलकी जपायला हवी. दुसऱ्याचे पोट भलल्यानंतर जेव्हा आपले मन भरते तेव्हा समजायचं कि आपण सुख नावाच्या वास्तुत प्रवेश केला आहे.
आजचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मदत केल्याबद्दल अधिक्षक थोडसरे सर व त्यांच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनापासुन आभार. हा जिव्हाळा, प्रेम आणि आपुलकी अशीच निरंतर राहील. धन्यवाद !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ मे २०१७

Friday, May 12, 2017

| आंबेराणी ©

हि आहे मामाच्या गावाला येऊन शेतातल्या आंब्यावर यथेच्छ ताव मारणारी "स्वरा" म्हणजेच माझी भाच्ची. हि दिसायला जितकी गोड आहे त्याहुन जास्त बोलायला मधुर आहे. म्हणुनच अशी फळे खाताना तिला पाहिलं कि एक गोड फळ दुसऱ्या एका फळाला खात असल्याची जाणिव होते. सई, स्वरा आणि गौरांग या माझ्या भांजे कंपनीने सध्या घरात धुमाकुळ घातला आहे. आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे त्यामुळे उन्हाळा सुट्टीत सगळ्या बहिणींची आणि आत्यांची लेकरं आली कि घर हाऊसफुल्ल होऊन जातं. मुदपाकखाण्यातली लगबग जरा जास्तच वाढते. त्यात शेतातले आंबे घरी आणुन जुन्या वाड्यात पिकु घातलेले असतात त्याच्या दरवाज्याला कुलुप लावुन चावी आमच्या आबांकडे असते. आंब्याच्या सिझनमध्ये आबांकडे वशीला लावावा लागतो तेव्हाच मनसोक्त आंबे खाता येतात. आबांच्या गैरहजेरीत जर चुकुन चावी हाती लागली कि हेच आंबे चोरून खाण्यासाठी पाहुणेमंडळींसोबत मी लहाणपणी त्या वाड्यावर दरोडा टाकायचो. एक जणाला दरवाज्याजवळं बसवायचं अन् दुसऱ्याला घरातला अंदाज घ्यायला घरी थाबवायचं. एक बॅटरी घेऊन अंधारलेल्या खोलित प्रवेश व्हायचा, त्या खोलितला पिकलेल्या आंब्याचा वास घेऊन तोंडाला पाणी सुटायचं. उसाच्या वाळलेल्या पाचटाखाली ठेवलेले आंबे अलगद दाबुन बघायचे.
शेंद्र्या, साखरगोटी, आंबडगोटी, लालगोटी, शेप्या, खसखशा, केळ्या, आणि कलमी हे आमच्या शेतातलं गाजलेले आंबे याच खोलित वेगवेळ्या खुत्त्यात पिकु घातलेले असायचे. सगळ्या खुत्त्यातलं चार-दोन, चार-दोन आंबे उचलुन पुन्हा पाचट जैसे थे स्थितीत ठेऊन. कुलुपाची चावी जिथे सापडली तिथेच अडकवुन आम्ही घरासमोरील वडाच्या झाडावर चढुन आंबे खायचो. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या कुया सुद्धा उकिरड्यात पुरून टाकायच्या कारण आंबेचोरांनी चोरी केली हे आबाला कळलं कि आमची खैर नसायची, परंतु आता मात्र आबा स्वतःहुनच त्या आंब्याची टोपली समोर आणुन ठेवतात आणि म्हणतात "खावा काय खायचंय ती" तेव्हा आंबे चोरून खाता येत नसल्याची खंत मनात वाटते.
आज स्वराला पाहुण मला माझे लहाणपण आठवले. परंतु शहरीकरणाच्या नादात आणि जाहिरातींच्या विळख्यात अडकलेली सध्याची लहान लेकरं कॅडबरी खाण्यात व्यस्त असताना. मामाच्या गावाला जाऊन शेतातलं आशिल आंबे खाण्याची परंपरा काहीअंशी अजुनही टिकुन असल्याचे समाधान वाटते.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ मे २०१७

Sunday, May 7, 2017

| सुखद ©

काल सुखदेवचा फोन आला "विशाल माझ्या मुलीचे बारसे आहे उद्या तुझी उपस्थिती हवी आहे मला" सुखदेव नारायणकर हा माझा लहाणपणीचा दोस्त. आमच्या वयात फारसं अंतर नाही फक्त मी शाळेत असताना तो काॅलेजला होता एवढंच. पत्रकारीता पेशा असणारा सुखदेव आता मुंबई मंत्रालयात नोकरीला लागलाय यापुर्वी तो लोकमतच्या गोवा आवृत्तीचा उपसंपादक होता. काही दिवसांपुर्वीच नारायणकर दांम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झालंय. तिच्याच बारशासाठी आज तिच्या आईबापानं आख्खी गल्ली सजवली होती. मी देखील आज दिवसभराचे कार्यक्रम आटोपुन संध्याकाळी आमच्या पांगरीच्या या ढोर गल्लीत सुखदेवच्या घरी आवर्जुन हजेरी लावली. पाळण्याशेजारीच टेबल मांडुन मस्त स्नेहभोजनाची तयारी केलेली. जेवताना ताट वाट्या पाहुण मी जरा आश्चर्यच व्यक्त केले कारण अशा समारंभांना सगळीकडेच थर्माकाॅलच्या पत्रवळ्यांचा सुळसुळाट असताना सुखदेवने मात्र ताट वाट्याचा बेत का बरे आखला असावा; त्याला विचारल्यावर तो म्हणला. कि "माझ्या पोरीच्या कार्यक्रमामुळे कुठेतरी घाण झालेली मला नाही आवडणार म्हणुनच हा अट्टाहास". एवढंच नाही जेवणानंतर ताटात शिल्लक राहिलेले अन्न मुतारीत वाया जाऊ नये म्हणुन खरखटं एकत्र करण्यासाठी एक भगुणं ठेवलेलं. ताटं धुण्यासाठी एक, पुसण्यासाठी एक, आणि वाढण्यासाठी स्वतः सुखदेव व त्याच्या गल्लीतली दोस्त मंडळी.
पुरी,भात-वरण,बैंगन,बटाटा,जिलेबी,गुलाबजामुन, आणि कोशिंबीर असा पंच पक्वानी मेनु खाऊन तृप्त झालो. पंक्तिला सोबत प्रविण डोके आणि अमोल लोहार होतेच. खरंतर सुखदेव आणि अनुराधाने त्यांच्या मुलीचे नांव #सांची ठेवलंय. बारसं वगैरे तर मित्रांना व आप्तेष्टांना जथेच्छ जेऊ घालायचे निमित्त होते. परंतु या जोडप्याने स्वच्छतेच्या बाबतीत पाळलेली आचारसंहीता जर सर्वांनी पाळली तर नक्कीच कुणाच्याही मुतारीत अन्नाचे कण दिसणार नाहीत आणि रोडच्या कडेला व नदीत युझ अॅण्ड थ्रोचे ढिग दिसणार नाहीत. थोडे जास्त कष्ट करू पण जेवण ताट वाटीतच देऊ या सुखदेवच्या विचारांस माझा सलाम.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०७ मे २०१७

| बाहुबली २ ©

मला बाहुबली दोन वर शिवचरित्राचा प्रभाव दिसतोय
होय ! जसा जसा मी हा चित्रपट पाहत गेलो यातल्या बहुतांशी प्रसंगाचे साम्य शिवचरित्रातल्या प्रसंगाशी असल्याची जाणिव झाली. महाराजांच्या गणिमीकाव्याचा तंत्रशुद्ध उपयोग मोठ्या खुबीने या चित्रपटात करण्यात आला आहे. जर शिवरायांच्या चरित्रातले काही प्रसंग घेऊन एवढा भव्य दिव्य चित्रपट उभा राहु शकतो तर साक्षात शिवछत्रपतींवर निघणारा चित्रपट किती भव्य दिव्य असायला हवा. चित्रपट हे खुप प्रभावी माध्यम आहे. शिवरायांचा गणिमीकावा (शिवनिती) आज पुन्हा एकदा  बाहुबलीमुळे सबंध जगाला कळल्याचे समाधान वाटत आहे.

| चित्रपटात दाखवलेले शिवचरित्रातले क्षण 👇

●देवसेनेच्या राज्यावर जेव्हा शत्रुंचे आक्रमन होते तेव्हा बैलांच्या शिंगांना आगीचे टेंभे लावण्याचा प्रसंग
●शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होऊ नये म्हणुन वन्य प्राण्यांचा केलेला बंदोबस्त
●स्रीवर हात टाकला तर सेना नायकाचे मुंडके उडवण्याचा प्रसंग
●राजाची रयतेशी असलेली जवळीक
●अष्टप्रधान मंडळ
● शिवरायांप्रमाणेच महादेवावर असलेली बाहुबलीची श्रद्धा
●देवीच्या नावाची घोषणा (माहिष्मती=भवानी)
●सिंहासनावर बसुन चालवलेली राजसदर
●कमी सैन्यबळावर केवळ गणिमीकाव्याने जिंकलेल्या लढाया.
●अखेरच्या युद्धात झाडांचा गोफणीसारखा केलेला उपयोग
●आईचा शब्द प्रमाण माणण्याची परंपरा
●आग्रा ते रायगड शिवाजी महाराजांचे देशाटन तसेच बाहुबलीचेही देशाटन
●मेघडंबरीवरील शिवगामी देवीच्या बैठकीची अदब
●स्वकियांकडुनच झालेला घात

या चित्रपटावर जर शिवचरित्राचा प्रभाव नसता तर सदर चित्रपटाचे समिक्षण मी फक्त "काका पुतण्याची लढाई आणि सासु सुनेची भांडणे" एवढंच केलं असतं.
काही का असेना पण शिवरायांचे विचार आणि त्यांची शिवनीती जबरदस्त पद्धतीने मांडल्याबद्दल लेखक के. प्रसाद आणि दिग्दर्शक राजमौली यांचे विशेष आभार.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०७ मे २०१७

Friday, May 5, 2017

| पाईपलाईन ©

प्रत्येक शेतकऱ्याच्या जिवनातला हा एक अविभाज्य घटक असतो. माझ्या काॅलेजसमोर मोठं तळं आहे या तळ्यातुन शेतात पाईपलाईन नेण्यासाठी हरएक शेतकरी प्रयत्न करतो. आज सकाळी सकाळी काॅलेजला जाताना हि पाईपलाईन पाहुन मनात एक छान विचार आला. मग काय बसलो कि तिथंच लिहित. तळ्यातल्या पाण्यावर शेतातली पिकं फुलवुन उत्पन्न काढण्याचा विचार प्रत्येकजण करतो किंवा विहीरीचे पाणी सगळ्या शेतात फिरवण्यासाठी पाईपलाईन महत्वाचीच असते. मोकाट पाणी पद्धतीपेक्षा हि कितीतरी पटीने उपयुक्त असते. माणसाच्या आयुष्यातही अशा पाईपलाईनी असतात काही जन्मजात असतात तर काही आपल्याला तयार कराव्या लागतात. जन्मजात पाईपलाईनी ह्रदयातलं रक्त आपल्या शरिररूपी शिवारात फिरवतात परंतु विचार फिरवणारी पाईपलाईन मात्र आपणाला स्वतःलाच तयार करावी लागते. हि पाईपलाईन करताना विचारांचा मुख्य स्त्रोतही तितकाच महत्वाचा असतो तो स्त्रोत किती मोठा, किती खोल आणि किती सामर्थ्यवान आहे यावरच आपलं वैचारिक उत्पन्न अवलंबुन असते; नाहीतर दुष्काळात कोरड काय उपयोगाची. मी सुद्धा असंच करतो, कुठेतरी एखादे चांगल्या विचारांचे तळे साचलेले दिसले कि विचारांची पाईपलाईन मी माझ्यापर्यंत टाकुन घेतो. आजवर वेगवेगळ्या विचारांच्या अनेक पाईपलाईनी मी माझ्या मेंदुशी जोडल्या आहेत. ती पाईपलाईन फुटु नये म्हणुन मध्ये-मध्ये एअर वाॅल पण टाकले आहेत. जेणेकरून आयुष्याच्या या फिरस्तीत अनेक वाटसरूंना देखील त्यातुन तृप्ती मिळावी. माझ्या विचारांच्या कोरड्या विहिरीत आता बऱ्यापैकी पाणीसाठा साचलाय; भर दुष्काळातही हा पाणीसाठा मला जिवंत ठेवील यात शंका नाही. मी इकडुन तिकडुन जमवलेल्या या पाणीसाठ्यात आता ईतरांनीही पाईपलाईनी टाकल्या आहेत. शब्दांच्या आणि विचारांच्या पाईपलाईनींचे हे अखंड जाळे असेच वाढत जावो.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनाक : ०५ मे २०१७

Thursday, May 4, 2017

| साधी माणसं ©

शेळके बापु गरड बापुंना म्हणत आहेत, "च्यायला ह्ये आवकाळ गाबणं कधी संपतंय कुणास्ठाव, किर्तीका, रोहिण्या कधी सुरू व्यत्यान्या आसं झालंय".
बापु, यंदा जवारी जरा निवांत पेरावी म्हणतुय "आगात धाऊन, रबी पडुन" म्हंत्यात तसं; पण औदांची लेकरं पार सटी सक्रातीपतोर पेरत्याती राव. च्यायला ह्या प्रिरतीमीनी समदं चकीरच बदलुन टाकलंय बगा...मग थोडासा पाॅझ घेऊन आमच्या घराच्या दारातल्या वडाच्या झाडाकडं बघुन "औंदा नाय काय फटं हाणायचं?"
शेळके बापुंकडे मळणी यंत्र आहे त्यांचा तो पारंपारीक व्यवसाय आहे म्हटलं तरी चालेल. आयुष्यात जवारीची पहिली मळणी मी यांच्याच मशनीवर बघीतली. त्यांनी सुरू केलेल्या या व्यवसायावर त्यांच्या मुलासह नातवानेही पकड बसवली आहे. हा सर्व प्रपंच शेतकरी, पाऊस आणि पिकांवर अवलंबुन असल्याने त्यासंदर्भातला त्यांचा अभ्यास तगडा आहे.
हि दोन जिगरी दोस्त मंडळी सांच्यापारी रोज आमच्या दारात गप्पा हाणत बसतात. यात त्यांच्या काळातल्या आठवणींना रोजच उजाळा दिला जातो. काही झालं तरी हरिणाम सप्त्याचा, भजनी मंडळाचा आणि ह.भ.प महाराजांचा विषय चर्चील्या शिवाय यांच्या गप्पा पुर्णच होत नाहीत. आज नुकताच अवकाळी पाऊस पडुन गेलता म्हणुन वरिल विषय ऐकायला मिळाला. अधुन मधुनही  मला वेळ मिळेल तसा त्यांचे जुनात साहित्य मी अनुभवत असतो. जे कोणत्याच पुस्तकात वाचायला मिळत नाही ते मला या दोन बापुंच्या गप्पांत मिळते. हल्लीच्या माॅडर्न घरांच्या रचनेत म्हाताऱ्या माणसांचे स्थान गायब झालंय. बहुतांशी जणांना त्यांचा सहवास आवडेनासा झालाय म्हणुनच वृद्धाश्रमे हाऊसफुल्ल झालीत.
घरातल्या वृद्धांनी खुप दिवस बघीतलेले असतात म्हणुनच घराचा बंगला झाला आणि दारात गाडी आली तरी त्यांच्यातला  साधेपणा तसाचं जिवंत राहतो. अशी साधी माणसं घरात असली कि लहान मुलांना संस्काराची टिव्हिशन लावायची गरज पडत नाही, हे काम आजी आणि आजोबा खुप मस्त करतात. सरतेशेवटी एवढंच वाटतं कि, घरात संस्कार शिकवणारी चार पुस्तके कमी असली तरी चालतील पण संस्कार सांगणारी एक दोन तरी बुजुर्ग माणसे असायलाच हवीत.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०४ मे २०१७

Tuesday, May 2, 2017

| पंक्चर ©

प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी असं टायर वर्कसच्या दुकानात बसुन आपल्या गाडीची पंक्चर काढताना पाहिलेलीच असते. खरं म्हणजे अत्यंत कष्टाच्या जिवावर उभारलेला हा धंदा जितका गरजेचा तितकाच तो दुर्लक्षीत सुद्धा. आज तर कोणालाही उद्योग उभा करायचा असेल तर सायकल दुकान किंवा पंक्चर काढायचं दुकान हा ऑप्शन जरा लांबच असतो. याला कारणही तसंच आहे.
चाकाच्या छोट्याश्या छिद्रातुन बाहेर पडणारी हवा थांबवण्यासाठी १२-१३ चा पाना, १४-१५ चा पाना, १६-१७ चा पाना, १८-१९ चा पाना, ३ टामी, एक हातोडी, वाल डाय, कानस, सुलोचन, कात्री, कच्च रबर, आणि हवा. यांच्या योग्य क्रमाच्या वापरातुन पंक्चर झालेलं ट्युब हवाबंद करण्याचा आटापीटा एका पंक्चरवाल्याला करावा लागतो. अतिशय कष्टाचे काम आहे हे. हात चालवल्याशिवाय हातात पैसे येत नाहीत. मला सायकलची पंक्चर दोन रूपयापासुन तर दुचाकीची पंक्चर दहा रूपयापासुन असतानाची आठवते. महागाईमुळे हेच दर आता सुधारित झाले आहेत परंतु तरिही टायर वर्क करणाऱ्या दुकानदारांना त्यातुन म्हणावा तसा नफा मिळत नाही. त्यात अजुन आता ट्युबलेस टायरमुळे तर पंक्चर धंद्याला पार बुच्चनच बसल्यासारखं झालंय.
आज काॅलेजहुन पांगरीला येताना माझी दुचाकी अचानक पंक्चर झाल्याने येडशीच्या हरिभाऊच्या ढाब्याजवळील विनोदकडे पंक्चर काढण्यासाठी थांबलो होतो. तो त्याचे काम करत होता आणि मी माझे. समोर दिसणाऱ्या प्रत्येक कृतीकडे निरखुन पाहण्याची माझी सवय इथेही शांत बसली तर नवलंच. एवढ्याशा प्रसंगातुनही मी एक गोष्ट शिकलो; कि संकटांना तोंड देत पुढे चालत असताना मनात भरलेली प्रचंड आत्मविश्वासरूपी हवा कधी-कधी पंक्चर होऊन बाहेर पडु लागते तेव्हा वेळीच पंक्चर काढुन ध्येयाचे अंतर लवकरात लवकर पार करायला हवे. तसेच नुसती पंक्चर काढुन न थांबता तो काटा अजुनही तसाच टायर मध्ये रूतलेला असेल तर पुन्हा पंक्चर होण्याची शक्यता असते. तेव्हा असल्या गोष्टीही टायरच्या आत हात फिरवुन तपासुन पहायला हव्यात. टायर तपासणे सोप्पे पण अशी माणसे तपासणे महाकठीन असते. टायर मध्ये अति आणि कमी हवा असणे दोन्हीही चांगले नसते तसेच माणसातही अति आणि कमी आत्मविश्वास दोन्हीही चांगली नसते. म्हणुनच आपली सुद्धा हवा आपण वेळोवेळी चेक करायलाच हवी अन्यथा जिंदगीचे टायर खराब व्हायला वेळ लागणार नाही.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०२ मे २०१७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...