Sunday, September 17, 2017

| पिपाणीवाला ©

हे आहेत आमच्या पांगरीचे गोरख गायकवाड. आज रविवार असल्याने आमच्या पांगरी पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक व माझे मित्र धनंजयराव ढोणे साहेबांसोबत निवांत गप्पा मारत बसलो होतो. गायकवाड मामा काही कामासंदर्भात तिथे आले होते. भाया दुमडलेला एक जुनाट रेगाळा शर्ट, काळसर पॅन्ट, हातात बाजारातलं साधं घड्याळ, डोक्यावर घामाने भिजलेली गांधी टोपी आणि पायात खालुन ईगरलेली व फक्त पन्न शिल्लक राहिलेली काळी चप्पल. लहाणपणापासुन आमच्या गावात कुणाचेही लग्न असुद्या बॅण्डमध्ये ट्राम्पीट वाजवायला गायकवाड मामा फिक्स असायचे. पिपानीवाले मामा म्हणुनच मला ते जास्त माहित होते. लग्नाच्या वरातीत डान्स करण्याऐवजी मी या पिपाणीवाल्या मामांना आणि ढोल वाजवणाऱ्या सुधाकर मामांलाच बघत बसायचो. लोकांना आनंद साजरा करता यावा यासाठी यांनी तब्बल पन्नास वर्ष पिपाणी वाजवण्याचे काम केलंय. फक्त सव्वा रूपया दिवसाला रोजगार असल्यापासुन ते बॅण्ड कंपनीत काम करत होते. आज खुप दिवसांनी गायकवाड मामांना पाहुन भुतकाळ ताजा झाला.
हललीच्या युवा पिढीला मात्र कान तृप्त होण्यापेक्षा शरिर हालणारं संगीत लागतंय त्यामुळे आपसुकच गायकवाड मामांसारख्या कित्येक कलाकारांचा पारंपारिक रोजगार बुडाला आहे. आमच्या गावात डाॅल्बी आणि पियानोचा वापर व्हायच्या आधीपासुन गायकवाड मामा व सुधाकर जानराव मामा आमिन साहेबांच्या बॅण्ड कंपनीत कार्यरत होते. अंगावर चढवलेल्या लाल गणवेशात बॅण्ड वाजवतानाचा त्यांचा आवेश तर बघण्यासारखा असायचा. संगीतात एका पिपाणीचे महत्व किती असते हे सैराट चित्रपटाचे संगीत ऐकले की समजते. परंतु आमच्या गावात गेली पन्नास वर्ष बॅण्ड वाजवुन उदरनिर्वाह करणारा हा माणुस; आज वयाच्या 84 वर्षानंतरही कष्टाची कामे करून पोट भरत आहे हे समजल्यानंतर अक्षरशः पोटात कालवले. त्यांची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे असे नाही परंतु कष्ट करण्याची सवय बसुन खाऊ देत नाही. "शरिर कामात गुंतलं की बरं असतंय; न्हायतर एकदा का हाथरून धरलं कि थेट मसनवाटाच गाठावं लागतंय" म्हणुनच या वयातही ते मिळेल ते काम करतात.
कमवण्याचे वय झाल्यानंतरही दुसऱ्यांच्या जिवावर रेघोट्या मारणाऱ्या, बेरोजगारीच्या नावाखाली फक्त व्यवस्थेला शिव्या घालत बसणाऱ्या, ताटली बाटलीसाठी गांवभर बोंबलत फिरणाऱ्या, आणि अर्ध्यातुन शिक्षण सोडुन दोन नंबर करणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच गायकवाड मामांकडे पाहुन स्वतःच्या तारूण्याची लाज वाटेल.
ईतकी वर्ष ज्या बोटांनी ती पिपाणी धरली ते थरथरते हात आज मी हातात घेऊन गायकवाड मामांना धन्यवाद बोललो आणि ज्या ओठांनी त्या पिपाणीमध्ये स्वर फुंकले त्या ओठांनी गायकवाड मामा मला धन्यवाद म्हणले. आपुलकी आणि माणुसकी अजुन काय असावी. इथुन पुढे ते जिथे कुठे भेटतील तिथे थांबुन नमस्कार करीन. दोन वेळच्या जेवणाची सोय करायची हिम्मत अजुनही त्यांच्यात खच्चुन भरलेली आहे. प्रेरणा घेण्यासाठी समाजात खुप मोठी उंची गाठलेलीच माणसे हवीत असे काही नसते ती गायकवाड मामांसारख्या ग्रामिण कलाकाराकडुनही घेता येते. अशा व्यक्तींचे भुतकाळातले योगदान स्मरण करून त्यांना वर्तमानात सन्मान देणे हेच आपले कर्तव्य आहे; जे पार पाडुन मी आज कृतार्थ झालो.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १७ सप्टेंबर २०१७

Thursday, September 14, 2017

| बैल ©

कसा हाय ह्यो आमच्या शिवारातला खिल्लार राजा, हिरव्यागार शालुवर कुणीतरी पांढरा गंध लावावा तसा ऊठुन दिसतोय. काल रात्रीच्या पावसामुळे नद्यांना पुर आला होता; म्हणुन हिरो होंडा घरीच ठेऊन आज माझ्या फोर्ड मध्ये काॅलेजला निघालो. बोनादेवीजवळ येताच हा खिल्लार बैल चरताना दिसला. 'व्होल वावर ईज आवर' या अविर्भावात तो गवतावर यथेच्छ ताव मारत होता. जेवणाच्या ताटात बसुन जेवण सुरू असल्याचा त्याचा आनंद मी गाडी थांबवुन मोबाईल मध्ये कैद केला. पावसाळ्यात गुरा ढोरांना खायला काही कमी नसतंय. अगदी तोंड फिरल तिकडं चरायला बक्कळ असतंय पण उन्हाळ्यात चार काड्या खायला कित्येक मैल फिरावं लागतंय. निसर्ग त्यांच्या आहाराची काळजी घेत असतो तोवर ठिक परंतु उन्हाळ्यातले शेवटचे दोन महिने याच गाई बैलांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. कुणी वैरण विकत आणुन जगवतो, कुणी छावणीत लावतो तर कुणी खाटकाला विकतो. कारण पोटच्या लेकरासारखे सांभाळलेली जनावरं आपल्या डोळ्या देखत दावणीला मरणं कुणालाच आवडत नसतं.
फिरस्ती जनावरं कधीच उपाशी मरत नाहीत पण पाळलेली जनावरं चारा पाण्याअभावी मरतात. स्वतःला एकदा का दावणीला बांधुन घेतलं की जीवन मरणाचा कासरा मालकाच्या हातात द्यावा लागतो. आपल्याला सकाळची भाकर संध्याकाळी खायची म्हणले तरी जिवावर येते पण हि बैलं पावसाळ्यातले गवत आणि सुगीतला कडबा वाळवुन वर्षभर खातात; कसलीही तक्रार न करता. लई भेटलं म्हणुन माजत नाहीत आणि नाही भेटलं म्हणुन रडत नाहीत.
खालील फोटोत दिसणाऱ्या खिल्लारी बैलाचा रूबाब त्याच्या सभोवताली असलेल्या हिरव्यागार शिवारामुळं वाढलाय. त्यालाही माहिती आहे हे दिवस बदलनार आहेत. हिरवे डोंगर सोनेरी होतील, लुसलुशीत गवत पिवळे होईल, ओला चारा सुका होईल, पण सरतेशेवटी जिंदगीच्या सारीपाटावर टिकुन राहण्यासाठी मिळेल ते दोन घास खाऊन; पडेल ते काम करणे एवढंच त्याच्या नशिबात आहे. हा बैल जरी एकटाच दिसत असला तरी याच्या वेसणीला बांधलेला कासरा मात्र जवळच झोपलेल्या त्याच्या मालकाच्या हातात आहे. शिवारात वाटेल तिकडे फिरण्याचे स्वातंत्र्य नसले तरी आहे या परिस्थितीत रूबाबात जगण्याचे स्वातंत्र्य मात्र त्याच्याकडे नक्कीच आहे. माणुस असो वा बैल शिवार चांगला दिसला कि रूबाब तर मारणारंच !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १४ सप्टेंबर २०१७

Wednesday, September 13, 2017

| सहारा ©

सहारा बालगृहाच्या वतीने आयोजित केलेल्या अंजली व सुजितकुमार या एड्सग्रस्त अनाथ दांपत्याच्या विवाह सोहळ्यास आज आवर्जुन उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. कळंब जि.उस्मानाबाद येथील बालगृहाचे संस्थापक श्री.शहाजीराव चव्हाण आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या लग्नसोहळ्यासाठी जे कष्ट घेतले त्याला सलाम. आजवर मी खुप लग्न पाहिली परंतु पोटच्या मुलीपेक्षाही सुंदर लग्न सोहळा करणाऱ्या सहारा बालगृहास भेट देऊन अनाथांसाठी व एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या या संस्थेबद्दलचा अभिमान आणखीनच वाढला. गेल्या दोन वर्षापासुन या संस्थेशी मी जोडलो गेलो आहे परंतु त्यांचा आजचा उपक्रम म्हणजे ते आजवर करत आलेल्या सेवेचा मानबिंदू ठरला आहे.
अनाथांना ते अनाथ असल्याची जाणिव न होऊ देणे हिच खरी आपुलकी असते जी सहारा बालगृहाने सांभाळली. अंजली नावाच्या मुलीला या बालगृहाने बालपणापासुन सांभाळलं, मातृप्रेम दिलं आज तिथली एक लेक सासुरवाशीन होत असताना माहेरचे जे काही रितीरिवाज असतात ते सर्व पुर्ण करून सहाराने एक आदर्श निर्माण केला आहे. एकीकडे आईवडील आणि सर्व जनगोत असतानाही काही मुलींची होणारी फरपट आणि एका अनाथ मुलीला सहाराने दिलेली माया हिच आजच्या समाजातली सर्वात मोठी दरी आहे.
एका उदात्त सामाजिक भावनेतुन हा विवाह सोहळा नोंदनी पद्धतीने संपन्न झाला. नवदांम्पत्यांवर फुलांचा वर्षाव करून सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
नवरा नवरीच्या पत्रिकेत ना आज्याचे नाव; ना पंज्याचे ना वडीलांचे. ज्या नावाने हाक मारतो तीच त्यांची ओळख. सामाजिक जाणिवा जिवंत ठेवलेल्या आपल्यातीलच काही भल्या माणसांनी मामा आणि आई वडीलांचे कर्तव्य बजावुन त्यांचे कन्यादान केले. आजवरचे पांढरे शुभ्र आयुष्य जगलेल्या अंजलीच्या आयुष्यात विवाहानंतर मात्र सप्तरंग भरले जातील.
या लग्नसोहळ्यासाठी आमदार, खासदार आणि एस.पी, कलेक्टरसह वऱ्हाड म्हणुन सहारा एच.आय.व्हि गृहातील ४५ सवंगडी तर स्वआधार मतिमंद निवासी प्रकल्पातील ५७ मुली उपस्थित होत्या.
वधु आणि वर दोघेही एड्सग्रस्त आहेत. देवाने त्यांच्या नशिबात अजुन किती दिवस शिल्लक ठेवलेत माहित नाही पण आपल्यापेक्षा नक्कीच कमी असतील, अणि अशा परिस्थितीतही हे दांम्पत्य त्यांच्या लग्नाचा क्षण अतिशय आनंदाने जगत आहेत. खरंच मरायला ठेपलेल्या माणसाला सुद्धा जगण्याचा अंकुर फुटावा असाच हा सोहळा अनुभवण्याचे भाग्य मला लाभले त्याबद्दल सहारा बालगृहाचे मनस्वी आभार व शुभेच्छा !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ सप्टेंबर २०१७

Tuesday, September 12, 2017

| बालाघाटचं कासपठार ©

निसर्गाची चित्रकला बघायला एका ठरावीक ठिकाणीच जावे लागते असे काही नाही. ते सौदर्य शोधण्याची दृष्टी असली की अशी चित्रकाला आपल्या सभोवतालीही पाहता येते. या लेखासोबत जोडलेला फोटो सातारच्या कास पठारचा नसुन तो आमच्या उक्कडगांवच्या माळावरचा आहे. आज सकाळी काॅलेजला जाताना हे सौदर्य माझ्या डोळ्यांसह खास आपल्यासाठी मोबाईलमध्येही टिपलं. पावसाच्या सततच्या अभिषेकाने काळ्या पाषानावर सुद्धा तृण उगवली आहेत. गवताच्या शेकडो प्रजाती ईथेही फुलल्या आहेत. हिरव्यागार गालिचावर गुलाबी, पिवळ्या आणि निळ्या फुलांनी नक्षीकाम केलंय. पाऊलवाटांवर घानेरीच्या फुलांचा सडा पडलाय, इवल्याश्या वाटेवरून चालताना झाडांच्या पानावर थांबलेल्या दवबिंदुंनी कपडे ओलेचिंब होतात. केसाहुन बारीक पडणाऱ्या पावसाच्या सरी शरिरात झिरपुन जातात. पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचा व किटकांचा आवाज, झऱ्यांचा खळखळाट, या मिश्रणातुन तयार झालेलं मधुर संगीत मनाला मनस्वी आनंद देते.
एखादे विशिष्ठ ठिकाण जागतिक वारसा यादित आहे म्हणनुनच त्याची काळजी घेण्यापेक्षा ज्या गोष्टी निसर्गाने खास आपल्या आनंदासाठी निर्माण केल्या त्याचे संगोपन व संरक्षण स्वयंप्रेरणेनेच व्हायला हवे. पर्यावरणाला नेस्तनाभुत करणारा एकच घटक निसर्गाने तयार केला आहे आणि तो म्हणजे 'माणुस' याच्याशिवाय उरलेल्या त्र्याऐंशी लक्ष, नव्व्यान्नव हजार, नऊशे नव्व्यान्नव जिव निसर्गाशी युद्ध खेळत नाहीत. पण माणुस मात्र विकासाच्या नावाखाली अनेक डोंगर, नद्या, पठार, जलाशय यावर अतिक्रमन करतोय, झाडे तोडतोय, हवेत विषारी वायु सोडतोय, आणि हे सगळं करत असताना स्वतःच स्वतःला मारतोय.
उन्हाळ्यात जळलेल्या स्मशानासारखे दिसणारे डोंगर पावसाळ्यात स्वर्ग बनतात. मातीच्या उदरात झोपलेली हराळी श्रावणात बहरून येते आणि भाद्रपदात फुलांची उधळण करते. त्यांच्या या निसर्गचक्रात आपण तर फक्त एक ठिपका असतो. तरी सुद्धा यांचे संरक्षण आपण करतोय असा आव आणतो, खरंतर यांचे संरक्षण आपण नाही तर उलट हेच आपले संरक्षण करत आहेत अनाधीकालापासुन. आपण आहोत म्हणुन ते आहेत; असे नसुन ते आहेत म्हणुन आपण आहोत एवढं जरी प्रत्येकाने ध्यानात ठेवले तरी पर्यावरण संवर्धनास मदत होईल.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ सप्टेंबर २०१७

Monday, September 11, 2017

| हमसफर ©

आधुनिक काळातली खरी हमसफर म्हणजे आपली टु व्हिलरच असते. धावपळीतले अनेक क्षण फक्त हिच्यामुळेच सोपे होतात. गर्दीच्या शहरात आणि वाडी वस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी तर ही दुचाकी गाडी म्हणजे वरदानच आहे. जवळचे अंतर सहज आणि झटपट पार करण्याची सवय हिनेच आपल्याला लावली. कितीही गर्दी असुद्या हि रस्ता काढतेच. पाऊलवाटेवरून तर ही चिंगाट पळते. माझ्या काॅलेजची पाच वर्षाची सर्व्हिस हिच्याच जिवावर झाली. आजवर या गाडीने आणि तिच्या चाकाने माझ्यासाठी ज्या कष्ता खाल्यात त्या शब्दात मांडणे कठीण आहेत. ती गाडी निर्जीव असली म्हणुन काय झालं आपण तरी सजिव आहोत त्यामुळेच तिच्यावर दोन शब्द शिंपडणे आपले कर्तव्यच आहे. आजवर तीने आपली किती साथ दिली आहे हे एकदा आपला भुतकाळ आठवला की समजते. कसलीही कानकुन न करता ही गाडी आपल्यासाठी अहो रात्र झटत राहते. कित्येकांचे प्राण वाचवण्यात हिचा सिंहाचा वाटा आहे. आणि ड्रायव्हिंगमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांना यमसदनात पाठवायला सुद्धा ही मागे पुढे बघत नाही.
रस्ता कसलाही असुद्या त्यावरून चालण्यास हि सदैव तयार असते. पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या तरी अधिकच्या मायलेजमुळे या टु व्हिलर नेहमीच सर्वसामान्यांची गरज भागवण्यास तत्पर राहिल्या आहेत. दुर्गम भागात तर हिच टु व्हिलर गरिबांची अॅम्बुलन्स म्हणुन काम करते. आजवर हजारो शेतकऱ्यांचे प्राण हिने वाचवले आहेत. सायकल असणाऱ्यांचे पहिलं स्वप्न हे टु व्हिलरच असते. आज फोर व्हिलरमध्ये फिरणारी माणसे सुद्धा कधी ना कधी टु व्हिलरवर फिरलेलीच असतात. हल्लीतर फोरव्हिलरचे नवनवे ब्रॅण्ड बाजारात येत असताना; या गाड्यांच्या सवारीपेक्षा बुलेटची सवारी अजुनही मानाचे स्थान टिकवून आहे. काही वर्षापुर्वी सर्वसामान्यांच्या घरापुढे हमखास एक सायकल असायची परंतु आता तिची जागा या टु व्हिलरने घेतली आहे. कित्येक शिक्षकांची आणि तृतीय व चतुर्थ श्रेणीची नोकरी करणाऱ्यांची हि राणी आहे. हिच्या टाकीवर बसुन आरशाच्या दांड्याला धरण्याचा लहाणपणीचा आनंद हरएकाने अनुभवलेला असतोच. जेव्हा गाडी येत नसते तेव्हा उगाच गाडीची मुठ पिळत बर्रीईऽऽमम, बर्रीईऽऽमम करण्याचा प्रकार सुद्धा कसा बरे विसरता येईल.
काॅलेज जिवनात तर गाडीला खुपच महत्व असते. सध्याच्या युवापिढीची बहुतांशी काॅलेजलाईफ हिच्याच जिवावर जाते.
मला सुद्धा माझ्या नोकरीसाठी आणि गावात फिरण्यासाठी माझी हिरो होंडा खुप मदत करते. सर्व्हिसींग नाही वेळेवर झाली तरी तक्रार नाही, आहे या परिस्थितीत मला ईच्छित स्थळी पोहचवण्यात ती सतत प्ररत्नशिल असते. एका निर्जीव वस्तुचे आपल्या आयुष्यातील योगदान अधोरेखीत व्हावे याचसाठी हा अट्टाहास. आपल्या भटकंतीच्या आयुष्यातल्या या खऱ्या हमसफरला कोटी कोटी धन्यवाद !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ सप्टेंबर २०१७

Sunday, September 10, 2017

| मित्रत्व ©

आज बार्शीत एका कार्यक्रमासाठी उपस्थित होतो. कार्यक्रम सुरू असतानाच एक फोन आला " हॅलो ! सर मी वालवडहुन अजिम तांबोळी बोलतोय, तुम्हाला भेटायचंय. मी म्हटले "तु आत्ता कुठे आहेस", तो म्हणला गाताचीवाडी. मग मी म्हटले की "इथलं सगळं संपलं की निघताना फोन करतो, तो पर्यंत बार्शीत येऊन थांब". कार्यक्रम संपल्या संपल्या आठवणीने मी तांबोळीला फोन केला. तोपर्यंत तो त्याच्या सचिन धुमाळ आणि ज्ञानेश्वर पाटील या दोन मित्रांसह युवराज ढगे आणि दिनेश गात यांच्याजवळ थांबला होता. मी नगरपालिकेजवळ गाडी लावुन शिवाई मेडीकलवर त्यांची वाट पाहत थांबलो. पाच दहा मिनिटांनी ते आले. या आधी कधीच आम्ही समोरा समोर भेटलो नव्हतो. फेसबुकच्या फाॅलोअर्स मधलाच तो एक; एवढीच काय ती ओळख.
त्यांनी आल्या आल्या अलिंगन देऊन भेटीचे कारण सांगीतले. "सर, आम्ही दरवर्षी शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातुन दिनदर्शिका प्रकाशित करत असतो. आजवर तिन वेगवेगळ्या थिम्सवर त्या प्रकाशित केल्या परंतु पुढील दिनदर्शिकेसाठी तुमचं मार्गदर्शन हवं" त्याच्या या माहितीवर प्रथम मी त्यांचे कौतुक केले. ऐन पंचविशीच्या आतली पोरं परंतु सामाजिक भावनेने पेटुन उठलेली. समाजात दिनदर्शिके सोबतच महत्वपुर्ण माहिती पोहचली पाहिजे यासाठी प्रयत्नशिल. शिवरायांच्या किल्ल्यांची, मावळ्यांची माहिती तसेच सर्व महापुरूषांची माहिती त्यांनी आजवर या माध्यमातुन घराघरात पोहचवली आहे. दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा घेऊन गोर गरिबांचे संसार थाटण्याचे कार्यही शिवसंकल्प प्रतिष्ठान करत आहे.
मला पुढील महत्वाच्या कामानिमित्त जायचे असल्याने पोरांना जास्त वेळ देऊ शकलो नाही परंतु जेवढा दिला तेवढ्याच वेळात झालेल्या वैचारिक गप्पा गोष्टीने दोघांचे पोट भरले. निघताना ही पोरं मला गाडीपर्यंत सोडायला आली. मी गाडीत बसल्यावर तेवढ्या गडबडीत आजच्या कार्यक्रमात मला जी शाल मिळाली ती अजिम तांबोळीच्या पाठीवर पांघरली आणि पुष्पगुच्छ हातात देऊन धन्यवाद दिले. आजवर अशा शेकडो शालींचे ओझे माझ्या खांद्याने पेलले आहे आणि जर असे प्रेम करणारे दोस्त कमावले तर पुढे हजारो शाली या खांद्यावर असतील.
जिंदगी पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फुटलं याचा नेम नाही. तेव्हा आहे तो पर्यंत मित्र कमावणे व त्यांच्या आठवणीत कायमचे राहणे एवढंच आपल्या हातात आहे. सरतेशेवटी आपल्या सन्मानातला वाटा मित्रांना देणे हिच खरी मैत्री असते. आपण नसतानाही जिवंत राहण्याचं हेच तर सर्वोत्तम माध्यम आहे.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १० सप्टेंबर २०१७

Saturday, September 9, 2017

| थेंब ©

आजचं वातावरण जरा निवळल्यासारखे वाटल्याने नेहमीच्या डोंगरी वाटेने माझ्या हिरो होंडावर काॅलेजला गेलो होतो. पांगरीकडे येताना मात्र उक्कडगांवचा माळ उतरतानाच मला पावसाने गाठले. भाग दौड की जिंदगी मै आजारी पडना मना है, म्हणुनच जवळच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये पटकन आसरा घेतला. आमच्या शेताजवळ असलेल्या रघु बप्पाच्या कोट्यात त्यांचे तात्या आणि नात नंदिनी पावसाच्या थेंबांचा आनंद घेत होते. पत्र्याच्या पन्हाळीतुन पडलेले थेंब हातावर घेत आणि हातावरच्या ईवल्याशा तळ्यात पडलेल्या थेंबामुळे तोंडावर उडणारे तुषार झेलत नंदिनी रानटी पावसाची माया अनुभवत होती. परंतु तात्यांच्या चेहऱ्यावर मात्र यंदा पाऊसपाणी चांगले झाल्याने एकीकडे पडणाऱ्या पावसाने सुखावलेले तर दुसरीकडे काढायला आलेल्या सोयाबीनची चिंता वाटणारे संमिश्र भाव दिसत होते.
तात्यांची आख्खी हयात शेती करण्यात गेली. प्रचंड काबाडकष्ट करून आजही या वयात ते त्यांच्या शेती धर्माचे पालन करत आहेत. रघु बप्पांची नातवंडे शेतातच राहत असल्याने निसर्गाच्या खुप जवळ आहेत. कोंबड्या, शेरडं, गाई, म्हशी, कुत्री हि त्यांच्या रोजच्या सहवासातली आहेत. गावरान संस्काराच्या कुशीत जोपासलेली हि लेकरं आणि या निसर्गाचा जिवनदाता पाऊस यांचा संयोग पाहुन मी सुखावलो.
लहान लेकारांच्या आयुष्यातला हा आनंद फक्त शेत शिवारातच घेता येतो. परंतु चार पैसे कमवण्यासाठी शहरात स्थायिक झालेल्या कुटुंबांना अशा आनंदापासुन मुकावं लागतं.
पावासाचा थेंब काळ्या मातीत पडण्याची आणि झिरपण्याची प्रक्रिया व नंतर त्यातुन निर्माण होणारा सुगंध डिओड्रंट पेक्षा भारी असतो. नजर जाईल तिथवर डोळ्याला दिसणारी हिरवळ गालीच्यापेक्षा मऊ असते, थेट ढगातुन पडणारे पावसाचे पाणी बिसलेरीहुन स्वच्छ असते, वडाच्या झाडाखालची सावली एसी पेक्षा आल्हाददायी असते, उसाचे पाचट व तुराट्यांनी बांधलेलं घर टु बीएचके पेक्षा हवेशीर असते, आणि म्हणुनच अशा वातावरणात जगणाऱ्या लेकरांचे निसर्गज्ञान सुद्धा ईतरांपेक्षा सरस असते.
आज मात्र ग्रामिण जिवणाची हि नाळ अनेक अपरिहार्य कारणांमुळे तुटत चालली आहे. परंतु नव्या पिढीला या संस्कृतीचा वारसा सांगणे हे आपलं कर्तव्य आहे. लेकरांनो खुप खुप शिका, मोठे व्हा फक्त जिच्या जिवावर हे सारं उभारलं त्या शेतीला आणि मातीला कधीच विसरू नका; तीने साथ दिलीय जन्मापासुन आणि देईल मरणानंतरही.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०९ सप्टेंबर २०१७

Friday, September 8, 2017

| दैना (बार्शी कुर्डुवाडी रोड विशेष) ©

आवं ह्यो काय रोड हाय का पडल्यालं भित्ताड ? म्हागल्या काय वर्षातच आर्ध्याऊन जास्त महाराष्ट्र फिरलुय पण रस्त्याला लागलेली आसली साडेसती न्हाय बाबा बघीतली. कुठं बुठं खड्डं आसल्यालं लई रोड आजवर बघितल्यात पण थेट तेहत्तीस किलुमिटरचा नुस्ता खड्ड्यांचा रस्ता कुठं नाय बा बघीतला.
गुगल मामाच्या नियमानुसार ह्येवढं आंतर पार कराया आठ्ठावन्न मिनिटं लागत्यात पण आता मातुर कुठं नाय पडला तर दोन तास लागायल्यात. तुमच्या गाडीला कितीबी गिअर आसुद्या बार्शी कुर्डुवाडी रोडवर दुसरा गिअर म्हंजीच टाॅप आसतंय. गाड्यांच्या टायरांना जर जिव आसता तर त्यंनी म्हागंच सामुईक आत्महत्या केल्या आसत्या. इंजिनला जिव आस्ता तर त्यंनी काम बंद आंदुलन केलं आस्तं. एखाद्याची नवी कुरू गाडी जर खालुन घासली तर त्यजा वरबाडा गाडीबरूबर ह्रदयावर सुद्धा पडत आसतंय. ह्ये "ज्यंजं जळतं त्यालाच कळतं" यीस्टीच्या कंडक्टर आन् डायवर वाल्यांला तर तोंड दाबुन बुक्या हायत्या रांव. बिचारी ईवढुशा पगारीवर यमदेवाच्या रस्त्यावरून गाडी चालिवत्यात.
आमच्या बार्शीची समदी पोरं, वकिलं, प्राध्यापकं, समाजसेवकं, पुढारी, पत्रकारं, मास्तरं, डाक्टरं, इंजिनिअरं, कलाकारं आजुन राहिली साह्यली समदी रोड दुरूस्तीसाठी आता पिटुन उठल्याती. बांधकाम ईभागाला ह्यो रोड पौस संपला कि करावाच लागनाराय नायतर रोड पेक्षा डेंजर त्येंची आवस्था व्हईल ह्यात काय वाद नाय. ह्या रोडवर जाताना नेमकं गाडी थांबवावी कुठं आन् चालवावी कुठं ह्येच कळत नाय. ह्या रोडवर पडल्याल्या खड्ड्यांचं वर्णन कराया माझ्या डिक्शीनीरीत शब्दच नाय. आजपतुर शेकडो जनांचं हातपाय तुटल्यातं, शे पाचशे जणांचं मनकं गेल्यातं आन् निष्पाप जिव सुद्धा हितंच मेल्यातं. आरं ह्येंचा तळतळाट लागल लका, आडाणी माणसाला परवास करताना शिव्या देण्याशिवाय पर्याय नाय. त्येंला बिचाऱ्यांना तर हे रस्तं कोण करतंय ह्ये बी नसतंय माहित. गपगुमान रोडचं हाबाडं खात-खात "चलो या मरो" करत परवास करवा लगतंय.
ह्यो रस्ता या आधी कोणत्या कंत्राट्यानं केल्ता ह्ये जर जाहीर झालं तर शप्पथ सांगतुय त्येजं चलनं मुश्किल व्हईल. आन् तसं बी टक्केवारी काढण्याच्या नादात डांबरात आईल मिसळुन रोड तयार केल्यावर आशीच काशी व्हणार. डांबरीकरनात डांबराला आन् कांक्रिटीकरनात सिमेंटला कट मारून-मारून गावांसह आख्या राज्याच्या रस्त्यांना घोडा लागलांय (खराब झालेत या अर्थाने).
आवं, सार्वजनिक बांधकाम ईभाग तुमास्नी रोड कराया येणारा पैसा आमच्याच खिशातुन येतंय राव, आमच्या समद्या गाड्या ईकत घेतानाच त्येचा समदा टॅक्स आम्ही भरलाय आन् ईस्टीची तिकीटं कढताना, गाडीत पिट्रुल भरताना, नव्या गाड्या घेताना आजपतुर रोड टॅक्स भरत आलाव आमी; तवा तुमी आता आज्याबात हायगय न करता. व्हईल तेवढ्या लवकर ह्ये काम पुर्ण करा, नायतर आमाला आमचं काम तुमाला दाखवावं लागंल. बाकी तुमची मर्जी.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ सप्टेंबर २०१७

Thursday, September 7, 2017

| Dear Mark zuckerberg ©

These are words for Mark zuckerberg to show my affecton about him. Dear Mark you don't know me. I am one of your friend amoung your billons of friends all over the world. You don't belong to my cast, Religion, country, continent & colour; all the same you gave me huge stage to express my self in front of the world. Who I am? What I do ? What I told? How I live ? To share all this You gave me right place.
I searched & connected again my all childhood friends only because of you. I expreseed my all life as it is on facebook. I have only hundreds of friends before I joined facebook but now I have thousands of followers & its credit goes to you Mark. If you have not invented facebook, now a days I would be doing my writing, painting, oratory in the small corner of world. It may be expressed after many years. You are responsible to increase my social status in community & you charged zero Rupees for that.
Now you are satisfied with all your needs. You are multi billionaire & whatever you have earned, you have donated all for the well being of society. Now the billions of loving friends like me & your followers is your greatest asset. We never forget your contribution in our life.
Dear Mark, I am not too rich to give you something but I definitely give you some thankful words which you rightfully deserved. You hold such a great position in my heart that I had not given to the greatest administrators of this universe. We all appreciate the gift of facebook that you have given us.Though these words come from the bottom of my heart but the feelings of all your friends about you are the same. Hearty thanks for the work done for whole human being.

Author : Vishal Garad
Date : 07 Sept 2017

प्रिय मार्क झुकरबर्ग, ( मराठी अनुवाद )
ज्याच्यामुळे मी जगाला माहित झालो त्या माझ्या जिगरी मित्राबद्दल थोडेसे प्रेम व्यक्त करावेसे वाटले म्हणुन हा अट्टाहास. तु मला ओळखतही नाही, तुझ्या अब्जावधी मित्रांच्या यादितला मी एक दोस्त. तु ना माझ्या जातीचा, ना पंताचा, ना धर्माचा, ना देशाचा, ना खंडाचा, ना रंगाचा तरी सुद्धा तु माझ्यासाठी एवढे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मी जो आहे, जसा आहे, जे बोलतो, जे करतो आणि जे जगतो ते सर्व व्यक्त करण्यासाठी एक हक्काची जागा दिली. लहाणपणीचे अनेक मित्र फक्त तुझ्यामुळेच पुन्हा मैत्रीच्या प्रवाहात आलेत. आजवर याच फेसबुकवर मी जस्सान तस्सा व्यक्त होत आलोय. फेसबुकवर येण्याआधी फक्त शे पाचशे दोस्त होते मला; आज ती संख्या हजारोंवर गेली. याचं सारं श्रेय मार्क तुलाच आहे. जर तु फेसबुक काढलंच नसतं तर मी आज या जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असंच लिहित बसलो असतो, चित्र काढत बसलो असतो, बोलत बसलो असतो; जे जगासमोर यायला अजुन कितीतरी वर्ष लागली असती. सोशल लाईफ मधले माझे मार्क वाढवण्याचे काम मार्क झुकरबर्ग तुच केलेस. या बदल्यात थेट माझ्याकडुन शुन्य रूपयाचा मोबदला घेतलास. तुला आता कशाचीच कमी नाही, तु तुझ्या आयुष्यात जे काय कमवलेस ते सगळे दान करून टाकले आता तुझ्याकडे उरलेत माझ्या सारखे अब्जावधी मित्र जे तुझं त्यांच्या आयुष्यातले योगदान कधीच विसरणार नाहीत. परंतु तु आजवर माझ्यावर केलेल्या उपकारापोटी दोन कृतज्ञतेचे शब्द लिहिणे माझे कर्तव्यच आहे. माझ्या ह्रदयातलं तुझं स्थान जगातल्या सर्व पंतप्रधानांपेक्षाही मोठं आहे. तु जन्मास घातलेल्या या फेसबुक नावाच्या अपत्यावर आम्ही खुप खुप प्रेम करतोय. हे सर्व शब्द जरी माझ्या ह्रदयातुन उतरले असले तरी या मागची भावना प्रत्येक फेसबुकप्रेमीची सारखी आहे. आजवर तु तमाम मानवजातीसाठी केलेल्या कार्याबद्दल तुला मनापासुन धन्यवाद !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०७ सप्टेंबर २०१७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...