Sunday, December 17, 2017

| येळवस ©

मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काळ्या आई प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा एक महत्वाचा सण म्हणजेच येळवस होय. वेळ अमावस्येच्या निमित्ताने सर्व कुटुंब शेतात पुजा वगैरे करून रानजेवन करतात. आजवर पोटाची भूक भागवीलेल्या काळ्या मातीची व शेताची पुजा करून भुकेल्या माणसांना पोटभर जेऊ घालण्याची हि परंपरा लातुरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबात आजही सुरू आहे. आज आमचे सहकारी प्राध्यापक श्री. व्हि.आर. उतके सरांनी येळवस चे आमंत्रण धाडलं. औसा तालुक्यातील तांबरवाडीच्या शिवारात मी डिजे देशमुखसह सकाळी लवकरच पोहचलो. पाहुणा म्हणुन व्हि.आय.पी पेक्षा दर्जा पाहुणचार उतके सरांनी ठेवला. लातूर ते तांबरवाडी या प्रवासादरम्यान हरएक टु व्हिलर आणि फोर व्हिलर शहराकडुन शेताकडे जाताना दिसल्या. लातूरचा तर दर्श वेळा अमावस्या हा वर्षातला प्रमुख सण म्हणुनच आजचे लातूर जर हेलिकाॅप्टर मधुन पाहीले तर वारूळातुन मुंग्या निघाल्यासारख्या गाड्या व माणसं गावाकडे जाताना दिसतील. ईथला प्रत्येक माणुस येळवसचे महत्व विलासरावांचा किस्सा सागूनच पुर्ण करतो. लातूरच्या जडणघडणीमध्ये अजरामर स्थान असलेल्या स्व.विलासराव देशमुख साहेब देशाचा कारभार हाकत असतानाही वेळात वेळ काढुन येळवसला बाभळगावात यायचेच.
कुणी बैलगाडीत तर कुणी डोक्यावर मडक्यात रानवाटेवरून आंबील घेऊन जाताना पाहूण मातीशी माणुसकी जोडणारी एक जुनी संस्कृती पाहुण धन्य झालो. ठिकाण्यावर पोहचल्यानंतर एका कोपीमध्ये आणलेले सर्व नैवैद्या ठेवुन पुजा केली आणि नंतर संपुर्ण शेतात आंबील शिंपडत "वलघे वलघे सालम पलघे", "हर हर महादेव" असं म्हणत म्हणत कोपीला प्रदक्षिणा मारून मग जेवणासाठी एका झाडाखाली बसलोत. गप्पा टप्पा मारत आंबील, आंबट भात, भजी, खिर, कोंदीची भाकर, बाजरीच्या भाकरी, पिठाच्या वड्या, वांग्याचे भरीत आणि उंडे असा दशपक्वानी आहार खाऊन तृप्त झालो. जेवनानंतर शिवारात फिरायला गेल्यावर ओढयाच्या आळवनात दोन मधाचे पोळे सापडले. रानातला शुद्ध मध खाऊन झाडाच्या गार सावलीत एक वामकुक्षी घेतली. यथेच्छ आहार, विहार आणि आरामानंतर उतके सरांच्या सर्व कुटुंब सदस्यांचा जिव्हाळा व प्रेम सोबत घेऊन सायंकाळी उशीरा पांगरीकडे प्रयान केले.
पोटात भरलेल्या येळवसच्या जेवणाने मेंदुला शब्दांचा भंडारा लावलाय तेव्हाच हे शब्द इथे अवतरलेत. शहरात बसुन या लोकसंस्कृतीचा ठेवा अनुभवता यावा याचसाठी हा शब्दप्रपंच. आपल्या मराठवाड्याची हि परंपरा अशीच तेजोमय होत जावो हिच लातूरच्या सिद्धेश्वरचरणी प्रार्थना.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १७ डिसेंबर २०१७ 



Wednesday, November 29, 2017

| कोयतं ©

आज डोंगरातल्या वाटेने एकटाच गाडीवर घराकडे निघालो होतो. सुर्य लवकरच मावळल्याने अंधार पडला होता. गाडीची लाईट पडताच दुरवर काहीतरी चमकलं. गाडी जस जसी जवळ गेली तस तशी पांढऱ्या पोशाखाची अंधुक प्रतिमा स्पस्ट दिसु लागली. एक वृद्ध माणुस हातात धारदार कोयतं घेऊन पाऊलवाटेवर दगडं चुकवत आणि झुडपं हुकवत चालत होता. पांढरं मळकं धोतर त्यावर तिन गुंड्यांचा शर्ट आणि डोक्याला एक गमजा बांधलेला. डोळ्याला फारसं दिसत नसल्याने अंदाजे पावलं टाकत चाललेल्या त्या माणसा मागे; त्याला वाट दिसण्यासाठी मी गाडी हळू-हळू चालवू लाजलो. थोडं पुढे गेल्यानंतर मात्र मी हाक मारून त्यांना थांबवलं.
ओऽऽऽ बाबा, हिकडं कुठं निघालांव आंधारात? बाबा बोलले "ऊस टुळीतला हाय म्या, टॅक्टर आल्तं भरायला म्हणुनशा उशीर झाला. आंधार पडल्यानं डोळ्यास्नी दिसनाय नीट." मग मी म्हणलं "बसा गाडीवर सोडतो राहुट्यांजवळ"
एका क्षणात काष्टा खवुन ते बाबा गाडीवर बसले. तसं पाहीलं तर हातात कोयतं बघुन त्यांना कुणी लिफ्त देण्याचा विषयच नव्हता परंतु हातातल्या हत्याराला घाबरण्यापेक्षा चेहऱ्यावरचा भाव पाहुण त्यांना मदत करणं मला जास्त महत्वाचे वाटले.
गाडीवर बसुन खुप गप्पा टप्पा झाल्या. बाबांचे नांव रामा चव्हाण वय वर्ष ९५, गांव यवतमाळ जिल्ह्यातले पण सध्या उसतोडीसाठी मुक्कामी उक्कडगांवात आलेत. स्वतःच्या गावापासुन शेकडो किलोमिटर दुरवर दिवसाकाठी २०० रूपये मिळवण्यासाठी त्यांनी आज दिवसभर ऊस तोडलाय.
एव्हाणा गाडी उक्कडगांवच्या वड्याजवळ पोहोचली, वड्याच्या काठावर वसलेल्या त्यांच्या झोपड्यातुन धुर निघत होता. गाडीवरून उतरताना बाबांसोबत एक सेल्फी घेतला. अचानक फ्लॅश चमकल्याने बाबांनी मला विचारलं "काय चमकलं ?" मी एका क्षणात उत्तरलो "तुमचं कष्ट चमकलं"
अखेर माझ्या डोक्यावर हात फिरवुन हा ९५ वर्षीय युवक त्याच्या राहुटीकडं निघाला. मी खुप वेळ त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत तसाच उभा राहीलो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की "वयाच्या ९५ व्या वर्षी काम करणाऱ्या या बाबांच्या कष्टाच्या श्रीमंतीपुढं आपण युवा अवस्थेत करत असलेलं काम खुपच गरिब आहे"

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २९ नोव्हेंबर २०१७



| मंजुताई ©

अमेरिकेतील कॅलिफोर्नीया येथे तब्बल एकोणीस वर्ष वास्तव्य केलेल्या अनिवासी भारतीय मंजुताई यांनी काल आमच्या महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. राजकारण, अर्थकारण, शिक्षण, तंत्रज्ञान, संरक्षण, आहार-विहार, लाईफस्टाईल, अशा अनेक विषयांवर मंजुताईंचा अभ्यास तगडा आहे. ताईंशी थोडावेळ चर्चा करणे म्हणजे शेकडो पुस्तकांची काही मिनिटांत उजळणी केल्यासारखेच आहे. 
कधी फ्लुएन्ट अमेरीकन इंग्रजी तर कधी असख्खलित मराठीत 
मंजुताई सोबत मारलेल्या गप्पांमधुन मला एका जागेवर बसुन आख्खी कॅलीफोर्नीया फिरून आल्याचा अनुभव आला. 
परदेशी माणसांची लाईफ स्टाईल आणि विचार स्टाईल जाणुन घेताना खुप काही नवीन शिकायला मिळते. प्रत्येक देशाकडे काही ना काही शिकण्यासारखं असतं. आपल्या राज्यघटनेवर जसा अनेक देशांचा प्रभाव आहे तसाच तो आपल्या जगण्यात आणि वागण्यातही असायलाच हवा. चांगल्या गोष्टी आत्मसाथ करून आणि वाईट गोष्टींना बाजुला सारून आपली वाटचाल अनेक देशातुन जायला हवी कारण त्यानंतर मिळणाऱ्या यशाला जागतिक किर्तीची चव येते.
परदेशातुन आलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आपण मनसोक्त संवाद साधायलाच हवा. जर भविष्यात कधी गेलोच बाहेरदेशात तर जगणं आणि फिरणं एकदम सोप्प जातंय. अमेरिकेतली मोठ्या पगाराची नोकरी आणि स्वतःचे अपार्टमेंट सोडुन आईच्या वृद्धापकाळात तिच्या सोबत राहण्यासाठी ताई सध्या भारतात आल्या आहेत. तसं पाहिलं तर समाजात अशा कृती फारच कमी दिसतात. खुप सारं कमवुन सुद्धा आई वडीलांना वृद्धाश्रमात टाकणाऱ्यांसाठी मंजुताईंची हि कृती आदर्शवत आहे.
प्रखर देशभक्ती, स्वयंशिस्त आणि स्वच्छता या तीन गोष्टी प्रत्येक अमेरिकन्सडुन शिकण्यासारख्या असतात. आठवड्यातील पाच दिवस जीव तोडुन काम करायचे आणि शनिवार रविवार मनसोक्त मजा करायची हे सुत्र जसे भारतातही आता हळु हळु रूढ होत आहे तसेच देशभक्ती, स्वयंशिस्त आणि स्वच्छता या गोष्टीही रूळायलाच हव्या.
ताईंचे आणि माझ्या आईचे वय जवळ-जवळ सारखेच असावे पण त्यांच्याशी बोलत असताना हा वयातला फरक निव्वळ आकडे मोजण्यापुरताच उरतो. कारण समोरच्या व्यक्तीचे वय पाहुन ज्याला त्याच्यासोबत सिंदपाकी होऊन बोलता येते ती व्यक्ती सर्वांना जिंकते. मंजुताईंनी देखील आमच्या कॅम्पसच्या सर्व विद्यार्थ्यांशी असाच संवाद साधुन सर्वांची मने जिंकुण गेल्या. Thanks Manjutai for sharing your valuable time & thoughts with us.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २९ नोव्हेंबर २०१७


Wednesday, November 15, 2017

| सोन्या ©

सोन्या हा आमच्या पांगरीतला एक निरव्यसणी कष्टाळु पोरगा, याने अकरावी पर्यंत शिक्षण घेतलं आणि बारावीत इंग्रजी विषयात नापास झाला. पुन्हा तीनदा प्रयत्न करूनही विषय न निघाल्याने शिक्षणाला कायमचा राम राम ठोकून शेतीवाडी आणि कष्टाची कामे करू लागला. आसपासच्या खेड्यातल्या आठवडीबाजारात माळवं विकणे व प्रचंड ताकदीची कामे करणे  हे त्याच्या रोजच्या वेळापत्रकाचा भाग आहे. आज जेवन आटोपुन गावची हालहवा जाणून घ्यायला राहूलच्या टपरीवर गेलो होतो. गावपातळीवर या सारखं माहिती केंद्र दुसरं कोणतंच नसतं. टपरीच्या काऊंटरवर हात ठेऊन आरशात बघत थोडे केस सावरत होतो तेवढ्यात संतोष बाराते उर्फ सोन्या तिथे आला. दिवसभराची कामे आटोपुन गावातले अनेक मित्र विरंगुळा म्हणुन राहुलच्या टपरीवर जमत असतात त्यापैकीच आम्ही एक.
आरं सोन्या ! तु बारावी काढायला पायजेल लका, यावर सोन्या म्हटला " आवं पाॅटापुरतं शिक्षाण बासं झालं की. सर, ती इंग्रजी माझ्या डोक्यातच जात नाय बगा ! आन् घरच्यांलाबी सारखं सारखं पैसं मागू वाटतं न्हायतं. एकदा फाॅर्म भराया सातशे रूपये लागत्यात. आत्तापतुर तिनदा झालंय. वडील शेतकरी हैतं. ईनबीन ईसएक शेरडं आन् एक म्हैस यवढ्यावरच काय ते चालतंय बगा, पण म्या बी काय कच्चा नाय, दिसाकाठी माळवं टाळवं ईकुन आनं हमाली टमाली करून सातशेचा तरी मेळ घालतोच. बाजार नसल्यावर खताची पुती उचलायला, मिस्त्रीच्या हाताखाली सिमेंटची पुती उतरायला, कंचबी काम आसुद्या आपुन ढिला नसतोच. वडलांचं लय लक्ष हाय माज्यावर; आजुनबी मला सुडुन जेवत न्हायतं. यीलच बगा आता त्यंचा फोन. ह्यवढं पोरात फिरतो पण सुपारीच्या खंडाचं सुद्धा यसन न्हाय लागलं मला"
सोन्याचे हे बोलणं ऐकुण त्याचा अभिमान वाटला. याआधी खुपदा राहुलकडुन मी सोन्याबद्दल ऐकलं होतं. "आरं विशाल ! हि सोन्या कामाला लई निब्बर पोरगं हाय लका, त्यादिवशी मला ती पंच्याहत्तर किलोचा कट्टा हालतबी नव्हता पण सोन्यानं एका झटक्यात उचलुन डोस्क्यावर न्हेला लका", ह्यवढंच नाय, एकदा त्या खतांच्या पोत्यानं भरलेला पिकअप पठ्ठ्यानं एकट्यानच खाली केला व्हता रांव" राहुलकडुन ऐकलेली हि माहिती सोन्याची धष्टपुष्ट शरिरयष्टी पाहुन विश्वास बसला. प्रत्येक व्यक्तीकडुन काहिना काही शिकण्याचा भाग असतोच तो शिक्षित आहे का अशिक्षित यावर ते अजिबात अवलंबुन नसतं. सोन्याच्या वयातली ईतर पोरं आजही पारंपारीक शिक्षण घेऊन बेरोजगारीचे कारण सांगुण वडीलांच्या जीवावर जगत आहेत. परंतु पडेल ती कामे प्रामाणिकपणे करून घराला हातभार लावणारा सोन्या मला त्या शिकलेल्या पोरांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ वाटतो. बोर्डात पहिला आलेल्या, एम्पीएस्सीतुन साहेब झालेल्या, डाक्टर इंजिनीअर झालेल्यांचं तर समदीच कौतुक करत्याती पण समाज नावाच्या व्यवस्थेत सोन्या सारख्या पोरांचे सुद्धा कौतुक व्हायलाच हवे म्हणुन हा अट्टाहास.
"हि पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे" होय, आण्णाभाऊंचे हे वाक्य खरंच हाय !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १५ नोव्हेबर २०१७

Friday, November 10, 2017

| पायतान ©

उद्या सकाळी लवकर व्याख्यानासाठी पंढरपूरकडे जायचंय. आज दिवसभराचे काॅलेज आटोपुन घरी येऊन उद्या व्याख्यानात मांडायच्या मुद्द्यांचे वाचन, चिंतन आणि मनन पुर्ण केले. वैचारीक मांड पक्की करण्यासोबत मी पेहरावाला सुद्धा तितकच महत्व देतो. त्याचाच एक भाग म्हणुन माझं आवडीचं पायतान असलेल्या कोल्हापुरी चप्पलला तेलपाणी करत बसलो होतो. कोणतेही काम निटनिटके आणि आवडीने करायची सवय असल्याने. घरातली तेलाची बाटली घेऊन पंधरा मिनिटे मन लावुन चप्पलीला तेल लावत बसलेलो. कोल्हापुरी चप्पल तेलात मुरवली की मऊ पडते. पायांना आणि डोळ्यांनाही आराम पडतो. चप्पलची काळजी फक्त चांभारानेच घ्यायची असते का ? त्यांची काळजी मी आजही आवडीने घेतो आणि यात मला काही कमीपणा वाटत नाही, लहाणपणी घरात कोणी पाहुणे माणसं आली की त्यांच्या चप्पला आणि बुटात पाय घालुन चालायची मला भारी हौस असायची. रानात गेल्यावर तर आमच्या सालगड्याच्या बुटात माती भरून गाडी-गाडी खेळायचो. आमच्या दादांनी बाजारातुन नवीन चप्पल आणल्यावर त्या दिवशी शाळेत लई शायनिंग मारीत जायचो. पंचेचाळीस रूपयाची पॅरागाॅन टाचेखाली भोक पडुस्तर वापरायचो. पळता-पळता कधी पन्ना निघाला तर थुका लावुन लगीच बसवायचो. रूळलेल्या चप्पलवर रेनाॅल्ड्स पेनने विशाल गरड लिहायचो, या सगळ्या आठवणी आज माझ्या कोल्हापुरी चप्पलला तेल लावताना जाग्या झाल्या. खरंच लहाणपणीची पायतानाची खेळणी मोठेपणी खेटरं कशी बरं होतात हेच नाही राव कळत. खेटरांना आपल्या संस्कृतीत नेहमीच हिन दर्जा दिला जातो. परंतु आपल्या अंगावरच्या सगळ्या पेहरावाला पायतानाशिवाय शोभा नसते. पायात चप्पल, बुट, सॅडल घालायला सगळ्यांनाच आवडतं. डोळ्याचा आणि पायांचा थेट संबंध असतो असे म्हणतात, त्यामुळेच पायात काय घातलंय यावर डोळ्याचं आरोग्य अवलंबुन असतं. माझे तर कलाकाराचे डोळे असल्याने त्यांची काळजी सुद्धा जरा जास्तच घ्यावी लागते. याच डोळ्यांच्या गरूडासारख्या नजरेतुन 'रिंदगुड' साकार झालंय. तेव्हा पायतान मऊ ठेवण्यासाठी चप्पल तेलात मुरवण्याचे काम आठवड्यात एकदा तरी मी आवडीने करतोच कारण यानिमित्तानेच का होईना मला लहाणपण जगता येते. आपली ऐप्पत कितीजरी मोठी झाली तरी आपल्या आयुष्यातली आपल्या पायतानाची किंमत मात्र कधीच कमी होत नसते. सरतेशेवटी आपली काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि वस्तुची आपणही काळजी घ्यायलाच हवी मग ती वस्तू वा माणूस कुणीका असेना !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १० नोव्हेबर २०१७

Wednesday, November 1, 2017

| पाचशे ©

आज सकाळी उठुन आंघुळ बिंगुळ ऊरकुन कापडं घालायला खुलीत गेलो तर काॅलेजचा गणवेश दिसलाच नाय, म्या लगीच हाक मारली " अय आयं, माझा हितला शर्ट कुठाय" आई चुलीवर भाकरी थापत बसली व्हती ती तिथुनच वरडली "आरं काकु आत्ताच कापडं घिऊन गीली नदीला ध्वायला" तिजं हे उत्तर ऐकुण मी पळतच तिज्या जवळ गेलो. "आगं त्या शर्टाच्या खिशात माझी पाचशेची नोट व्हती की" माझं हे शब्द ऐकताच शेजारी दात घासत बसल्याल्या माझ्या लहान बहीणीला आई वरडुन बोलली "अयं रूपाले पळ लवकर जा नदीवर, न्हायतर नोट जाईल बग नदीला वाहून" बहीणीने जरा कटाळाच केला तेवढ्यात आईनं चुली म्होरच्या चरवीत हात धुतलं आन धुमाट नदीवर गिली, यवढ्या गडबडीत पायात पायतान सुद्धा नाही घातलं तिनं, आन् मी म्हागुन वरडत राहीलो फक्त "अयं आयं, राहुदे काकु यील की घिऊन, माझं हे शब्द कदाचित तिला ऐकु सुद्धा आलं नसत्याल एवढ्या गडबडीत ती निघुन गिलती. म्या आपलं चुलीम्होरं बसुन तीची वाट बघत तापत बसलो.
काही येळानं ती भिजलेली पाचशेची नोट घिऊन आई घरी आली. आन् मोठ्यानं म्हणली सापडलं रे ऽऽ, तिज्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुन त्या पाचशेच्या नोटंचं मोल तिच्यासाठी किती व्हतं ते समजलं. भाकरी करपीवली म्हणुन पुन्ह्यांदा रूपालीला दोन शिव्या हासडुन लगीच चुलीम्होरं जाऊन तव्यावरची करपल्याली भाकरी काढुन पाचशेची नोट शेकत बसली. एवढं समदं झाल्यावर ती नोट मागायची हिम्मत माझ्याकडं नव्हती तवा गपगुमान गाडीची किक मारली आन् काॅलेजला गेलो. पैशाचं मोल आईच्या या कृतीतुन आसं काय समजलंय की उभ्या आयुष्यात वाह्यात पैसं घालवायची ईच्छा व्हनार नाय.

टिप : सोबतचा फोटो आईच्याच मागं मागं पळत गेलेल्या रूपालीनं काढलाय.

Sunday, October 1, 2017

| पेपरात नांव ©

पेपरमध्ये आपलं नांव यावं असं मला लहाणपणी खुप वाटायचं. पण ते केव्हा व कसे येते हेच माहित नसायचे. वडील राजकारणात असल्याने त्यांचे नांव नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन पेपरात यायचे. साधारणतः सहा सात वर्षापुर्वीची हि गोष्ट एकदा जि.प. च्या निवडणुकीची आढावा बैठक आमच्या पांगरीच्या निलकंठेश्वर दुध डेअरीत ठेवली होती. तालुक्याच्या माजी आमदारांसह अनेक नेतेमंडळी व गांवपुढारी उपस्थित होते. मी पण वडीलांसोबत उपस्थित होतो. लहाणपणापासुन मला भाषणं ऐकायची फार आवड होती. त्यावेळेस व्याख्यानांचे वगैरे कार्यक्रम फार कमी असायचे तेव्हा राजकीय नेतेमंडळींचीच भाषणे ऐकुन हौस भागवायचो.
त्यादिवशी सर्वांनी भाषणे केली. मग मी पण स्वयंप्रेरणेने बोलायला उभा राहिलो. जसं जमलं तसं तोडक्या मोडक्या भाषेत पण निर्भिडपणे बोललो उपस्थितांनी टाळ्या वाजवुन दाद दिली. वडीलांनी आणि नेतेमंडळींनीही कौतुक केलं. त्या दिवशी मी खुप खुश होतो. खरंतर त्या दिवशी मला कोणी बोलवलं नव्हतं व कोणी बोल पण म्हणलं नव्हतं परंतु ज्यावेळेस मी उभा राहुन बोलाय लागलो तेव्हा कुणीच बस म्हणलं नाही. संधी सहजासहजी मिळत नसते ती मिळवावी लागते याची पहिल्यांदा प्रचिती आली. ईथुनच एक नवी प्रेरणा मिळाली वक्तृत्वाची.
अशा कार्यक्रमात बोलले की पेपर मध्ये नांव येत असतंय हे माहिती झालतं म्हणुन दुसऱ्या दिवशी स्टॅण्डवर जाऊन सगळं पेपर घेऊन आलो. मी आणलेल्या कोणत्याच पेपरमध्ये नांव नव्हतं आलं पण आमचं आण्णा "पुढारी" पेपर घेऊन आलं त्यातली बातमी वाचली आणि पेपरात माझं नाव बघुन खुप आनंद झाला. "विशाल गरड यांनी मनोगत व्यक्त केले" हिच ती माझ्या आयुष्यातली पहिली लाईन जी पेपरात छापुन आली होती. आणि माझं नांव पेपरात छापणारा पहिला पत्रकार म्हणजेच गणेश गोडसे. आज त्यांचा वाढदिवस म्हणुनच जुन्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटल्याने हा शब्दप्रपंच.
आजतागायत पेपरात छापलेल्या माझ्या बातम्यांच्या कात्रणांनी तीन फाईली भरल्या आहेत परंतु आजही पहिल्याच पानावर गणेश गोडसेंनी लावलेली ती बातमी पाहिली कि हि आठवन ताजी होते. हॅप्पी बर्थडे अॅण्ड थँक्स गणेशराव.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक  : ०१ ऑक्टोबर २०१७

Sunday, September 17, 2017

| पिपाणीवाला ©

हे आहेत आमच्या पांगरीचे गोरख गायकवाड. आज रविवार असल्याने आमच्या पांगरी पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक व माझे मित्र धनंजयराव ढोणे साहेबांसोबत निवांत गप्पा मारत बसलो होतो. गायकवाड मामा काही कामासंदर्भात तिथे आले होते. भाया दुमडलेला एक जुनाट रेगाळा शर्ट, काळसर पॅन्ट, हातात बाजारातलं साधं घड्याळ, डोक्यावर घामाने भिजलेली गांधी टोपी आणि पायात खालुन ईगरलेली व फक्त पन्न शिल्लक राहिलेली काळी चप्पल. लहाणपणापासुन आमच्या गावात कुणाचेही लग्न असुद्या बॅण्डमध्ये ट्राम्पीट वाजवायला गायकवाड मामा फिक्स असायचे. पिपानीवाले मामा म्हणुनच मला ते जास्त माहित होते. लग्नाच्या वरातीत डान्स करण्याऐवजी मी या पिपाणीवाल्या मामांना आणि ढोल वाजवणाऱ्या सुधाकर मामांलाच बघत बसायचो. लोकांना आनंद साजरा करता यावा यासाठी यांनी तब्बल पन्नास वर्ष पिपाणी वाजवण्याचे काम केलंय. फक्त सव्वा रूपया दिवसाला रोजगार असल्यापासुन ते बॅण्ड कंपनीत काम करत होते. आज खुप दिवसांनी गायकवाड मामांना पाहुन भुतकाळ ताजा झाला.
हललीच्या युवा पिढीला मात्र कान तृप्त होण्यापेक्षा शरिर हालणारं संगीत लागतंय त्यामुळे आपसुकच गायकवाड मामांसारख्या कित्येक कलाकारांचा पारंपारिक रोजगार बुडाला आहे. आमच्या गावात डाॅल्बी आणि पियानोचा वापर व्हायच्या आधीपासुन गायकवाड मामा व सुधाकर जानराव मामा आमिन साहेबांच्या बॅण्ड कंपनीत कार्यरत होते. अंगावर चढवलेल्या लाल गणवेशात बॅण्ड वाजवतानाचा त्यांचा आवेश तर बघण्यासारखा असायचा. संगीतात एका पिपाणीचे महत्व किती असते हे सैराट चित्रपटाचे संगीत ऐकले की समजते. परंतु आमच्या गावात गेली पन्नास वर्ष बॅण्ड वाजवुन उदरनिर्वाह करणारा हा माणुस; आज वयाच्या 84 वर्षानंतरही कष्टाची कामे करून पोट भरत आहे हे समजल्यानंतर अक्षरशः पोटात कालवले. त्यांची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे असे नाही परंतु कष्ट करण्याची सवय बसुन खाऊ देत नाही. "शरिर कामात गुंतलं की बरं असतंय; न्हायतर एकदा का हाथरून धरलं कि थेट मसनवाटाच गाठावं लागतंय" म्हणुनच या वयातही ते मिळेल ते काम करतात.
कमवण्याचे वय झाल्यानंतरही दुसऱ्यांच्या जिवावर रेघोट्या मारणाऱ्या, बेरोजगारीच्या नावाखाली फक्त व्यवस्थेला शिव्या घालत बसणाऱ्या, ताटली बाटलीसाठी गांवभर बोंबलत फिरणाऱ्या, आणि अर्ध्यातुन शिक्षण सोडुन दोन नंबर करणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच गायकवाड मामांकडे पाहुन स्वतःच्या तारूण्याची लाज वाटेल.
ईतकी वर्ष ज्या बोटांनी ती पिपाणी धरली ते थरथरते हात आज मी हातात घेऊन गायकवाड मामांना धन्यवाद बोललो आणि ज्या ओठांनी त्या पिपाणीमध्ये स्वर फुंकले त्या ओठांनी गायकवाड मामा मला धन्यवाद म्हणले. आपुलकी आणि माणुसकी अजुन काय असावी. इथुन पुढे ते जिथे कुठे भेटतील तिथे थांबुन नमस्कार करीन. दोन वेळच्या जेवणाची सोय करायची हिम्मत अजुनही त्यांच्यात खच्चुन भरलेली आहे. प्रेरणा घेण्यासाठी समाजात खुप मोठी उंची गाठलेलीच माणसे हवीत असे काही नसते ती गायकवाड मामांसारख्या ग्रामिण कलाकाराकडुनही घेता येते. अशा व्यक्तींचे भुतकाळातले योगदान स्मरण करून त्यांना वर्तमानात सन्मान देणे हेच आपले कर्तव्य आहे; जे पार पाडुन मी आज कृतार्थ झालो.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १७ सप्टेंबर २०१७

Thursday, September 14, 2017

| बैल ©

कसा हाय ह्यो आमच्या शिवारातला खिल्लार राजा, हिरव्यागार शालुवर कुणीतरी पांढरा गंध लावावा तसा ऊठुन दिसतोय. काल रात्रीच्या पावसामुळे नद्यांना पुर आला होता; म्हणुन हिरो होंडा घरीच ठेऊन आज माझ्या फोर्ड मध्ये काॅलेजला निघालो. बोनादेवीजवळ येताच हा खिल्लार बैल चरताना दिसला. 'व्होल वावर ईज आवर' या अविर्भावात तो गवतावर यथेच्छ ताव मारत होता. जेवणाच्या ताटात बसुन जेवण सुरू असल्याचा त्याचा आनंद मी गाडी थांबवुन मोबाईल मध्ये कैद केला. पावसाळ्यात गुरा ढोरांना खायला काही कमी नसतंय. अगदी तोंड फिरल तिकडं चरायला बक्कळ असतंय पण उन्हाळ्यात चार काड्या खायला कित्येक मैल फिरावं लागतंय. निसर्ग त्यांच्या आहाराची काळजी घेत असतो तोवर ठिक परंतु उन्हाळ्यातले शेवटचे दोन महिने याच गाई बैलांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. कुणी वैरण विकत आणुन जगवतो, कुणी छावणीत लावतो तर कुणी खाटकाला विकतो. कारण पोटच्या लेकरासारखे सांभाळलेली जनावरं आपल्या डोळ्या देखत दावणीला मरणं कुणालाच आवडत नसतं.
फिरस्ती जनावरं कधीच उपाशी मरत नाहीत पण पाळलेली जनावरं चारा पाण्याअभावी मरतात. स्वतःला एकदा का दावणीला बांधुन घेतलं की जीवन मरणाचा कासरा मालकाच्या हातात द्यावा लागतो. आपल्याला सकाळची भाकर संध्याकाळी खायची म्हणले तरी जिवावर येते पण हि बैलं पावसाळ्यातले गवत आणि सुगीतला कडबा वाळवुन वर्षभर खातात; कसलीही तक्रार न करता. लई भेटलं म्हणुन माजत नाहीत आणि नाही भेटलं म्हणुन रडत नाहीत.
खालील फोटोत दिसणाऱ्या खिल्लारी बैलाचा रूबाब त्याच्या सभोवताली असलेल्या हिरव्यागार शिवारामुळं वाढलाय. त्यालाही माहिती आहे हे दिवस बदलनार आहेत. हिरवे डोंगर सोनेरी होतील, लुसलुशीत गवत पिवळे होईल, ओला चारा सुका होईल, पण सरतेशेवटी जिंदगीच्या सारीपाटावर टिकुन राहण्यासाठी मिळेल ते दोन घास खाऊन; पडेल ते काम करणे एवढंच त्याच्या नशिबात आहे. हा बैल जरी एकटाच दिसत असला तरी याच्या वेसणीला बांधलेला कासरा मात्र जवळच झोपलेल्या त्याच्या मालकाच्या हातात आहे. शिवारात वाटेल तिकडे फिरण्याचे स्वातंत्र्य नसले तरी आहे या परिस्थितीत रूबाबात जगण्याचे स्वातंत्र्य मात्र त्याच्याकडे नक्कीच आहे. माणुस असो वा बैल शिवार चांगला दिसला कि रूबाब तर मारणारंच !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १४ सप्टेंबर २०१७

Wednesday, September 13, 2017

| सहारा ©

सहारा बालगृहाच्या वतीने आयोजित केलेल्या अंजली व सुजितकुमार या एड्सग्रस्त अनाथ दांपत्याच्या विवाह सोहळ्यास आज आवर्जुन उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. कळंब जि.उस्मानाबाद येथील बालगृहाचे संस्थापक श्री.शहाजीराव चव्हाण आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या लग्नसोहळ्यासाठी जे कष्ट घेतले त्याला सलाम. आजवर मी खुप लग्न पाहिली परंतु पोटच्या मुलीपेक्षाही सुंदर लग्न सोहळा करणाऱ्या सहारा बालगृहास भेट देऊन अनाथांसाठी व एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणाऱ्या या संस्थेबद्दलचा अभिमान आणखीनच वाढला. गेल्या दोन वर्षापासुन या संस्थेशी मी जोडलो गेलो आहे परंतु त्यांचा आजचा उपक्रम म्हणजे ते आजवर करत आलेल्या सेवेचा मानबिंदू ठरला आहे.
अनाथांना ते अनाथ असल्याची जाणिव न होऊ देणे हिच खरी आपुलकी असते जी सहारा बालगृहाने सांभाळली. अंजली नावाच्या मुलीला या बालगृहाने बालपणापासुन सांभाळलं, मातृप्रेम दिलं आज तिथली एक लेक सासुरवाशीन होत असताना माहेरचे जे काही रितीरिवाज असतात ते सर्व पुर्ण करून सहाराने एक आदर्श निर्माण केला आहे. एकीकडे आईवडील आणि सर्व जनगोत असतानाही काही मुलींची होणारी फरपट आणि एका अनाथ मुलीला सहाराने दिलेली माया हिच आजच्या समाजातली सर्वात मोठी दरी आहे.
एका उदात्त सामाजिक भावनेतुन हा विवाह सोहळा नोंदनी पद्धतीने संपन्न झाला. नवदांम्पत्यांवर फुलांचा वर्षाव करून सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
नवरा नवरीच्या पत्रिकेत ना आज्याचे नाव; ना पंज्याचे ना वडीलांचे. ज्या नावाने हाक मारतो तीच त्यांची ओळख. सामाजिक जाणिवा जिवंत ठेवलेल्या आपल्यातीलच काही भल्या माणसांनी मामा आणि आई वडीलांचे कर्तव्य बजावुन त्यांचे कन्यादान केले. आजवरचे पांढरे शुभ्र आयुष्य जगलेल्या अंजलीच्या आयुष्यात विवाहानंतर मात्र सप्तरंग भरले जातील.
या लग्नसोहळ्यासाठी आमदार, खासदार आणि एस.पी, कलेक्टरसह वऱ्हाड म्हणुन सहारा एच.आय.व्हि गृहातील ४५ सवंगडी तर स्वआधार मतिमंद निवासी प्रकल्पातील ५७ मुली उपस्थित होत्या.
वधु आणि वर दोघेही एड्सग्रस्त आहेत. देवाने त्यांच्या नशिबात अजुन किती दिवस शिल्लक ठेवलेत माहित नाही पण आपल्यापेक्षा नक्कीच कमी असतील, अणि अशा परिस्थितीतही हे दांम्पत्य त्यांच्या लग्नाचा क्षण अतिशय आनंदाने जगत आहेत. खरंच मरायला ठेपलेल्या माणसाला सुद्धा जगण्याचा अंकुर फुटावा असाच हा सोहळा अनुभवण्याचे भाग्य मला लाभले त्याबद्दल सहारा बालगृहाचे मनस्वी आभार व शुभेच्छा !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ सप्टेंबर २०१७

Tuesday, September 12, 2017

| बालाघाटचं कासपठार ©

निसर्गाची चित्रकला बघायला एका ठरावीक ठिकाणीच जावे लागते असे काही नाही. ते सौदर्य शोधण्याची दृष्टी असली की अशी चित्रकाला आपल्या सभोवतालीही पाहता येते. या लेखासोबत जोडलेला फोटो सातारच्या कास पठारचा नसुन तो आमच्या उक्कडगांवच्या माळावरचा आहे. आज सकाळी काॅलेजला जाताना हे सौदर्य माझ्या डोळ्यांसह खास आपल्यासाठी मोबाईलमध्येही टिपलं. पावसाच्या सततच्या अभिषेकाने काळ्या पाषानावर सुद्धा तृण उगवली आहेत. गवताच्या शेकडो प्रजाती ईथेही फुलल्या आहेत. हिरव्यागार गालिचावर गुलाबी, पिवळ्या आणि निळ्या फुलांनी नक्षीकाम केलंय. पाऊलवाटांवर घानेरीच्या फुलांचा सडा पडलाय, इवल्याश्या वाटेवरून चालताना झाडांच्या पानावर थांबलेल्या दवबिंदुंनी कपडे ओलेचिंब होतात. केसाहुन बारीक पडणाऱ्या पावसाच्या सरी शरिरात झिरपुन जातात. पक्षांचा किलबिलाट, प्राण्यांचा व किटकांचा आवाज, झऱ्यांचा खळखळाट, या मिश्रणातुन तयार झालेलं मधुर संगीत मनाला मनस्वी आनंद देते.
एखादे विशिष्ठ ठिकाण जागतिक वारसा यादित आहे म्हणनुनच त्याची काळजी घेण्यापेक्षा ज्या गोष्टी निसर्गाने खास आपल्या आनंदासाठी निर्माण केल्या त्याचे संगोपन व संरक्षण स्वयंप्रेरणेनेच व्हायला हवे. पर्यावरणाला नेस्तनाभुत करणारा एकच घटक निसर्गाने तयार केला आहे आणि तो म्हणजे 'माणुस' याच्याशिवाय उरलेल्या त्र्याऐंशी लक्ष, नव्व्यान्नव हजार, नऊशे नव्व्यान्नव जिव निसर्गाशी युद्ध खेळत नाहीत. पण माणुस मात्र विकासाच्या नावाखाली अनेक डोंगर, नद्या, पठार, जलाशय यावर अतिक्रमन करतोय, झाडे तोडतोय, हवेत विषारी वायु सोडतोय, आणि हे सगळं करत असताना स्वतःच स्वतःला मारतोय.
उन्हाळ्यात जळलेल्या स्मशानासारखे दिसणारे डोंगर पावसाळ्यात स्वर्ग बनतात. मातीच्या उदरात झोपलेली हराळी श्रावणात बहरून येते आणि भाद्रपदात फुलांची उधळण करते. त्यांच्या या निसर्गचक्रात आपण तर फक्त एक ठिपका असतो. तरी सुद्धा यांचे संरक्षण आपण करतोय असा आव आणतो, खरंतर यांचे संरक्षण आपण नाही तर उलट हेच आपले संरक्षण करत आहेत अनाधीकालापासुन. आपण आहोत म्हणुन ते आहेत; असे नसुन ते आहेत म्हणुन आपण आहोत एवढं जरी प्रत्येकाने ध्यानात ठेवले तरी पर्यावरण संवर्धनास मदत होईल.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ सप्टेंबर २०१७

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...