Friday, August 12, 2016

| निवांत ©

| निवांत ©

आज कालेजातुन रोजच्याऊनी निघालो. मस्त केसागत श्रावणी सरी बरसुन गेलत्या. साऱ्या गवतावर पाण्याचं थेब चिटाकलं व्हतं. म्या आपलं माझ्या गाडीवर पायवाटेवरची दगडं चुकवीत-चुकवीत निघालु व्हतु. तेवढ्यात माझी नजर मानिकराव वर पडली. जवळच्याच टिकडीवर मानिकराव मुंढे हे शेतकरी त्यांच्या दोन म्हशी आन दोन शेरडं राखत निवांत गवताच्या गालीच्यावर झोपलं व्हतं. त्यंची समदी प्राॅपर्टी डोळ्यादेखतच चरत व्हती. कसलं टेंन्शन नकु ना ताण; लईच निवांत बेत व्हता एकदम. दिवसभराची ड्युटी संपुन म्या बी नेटकाच कालेजातुन निघालु व्हतो  मग म्हनलं जरा मानिकरावच्या निवांतपणात आपणबी निवांत व्हावं. बसलुकी मग गप्पा हानीत.
चार दोन शब्द बोलतुय ना बोलतुय तुच शेरडं फारीष्टात निघाली. माणिकराव उठायची गडबड करायलं म्या मनलं "आवं झोपा निवांत; यीतु मी वळती करून". एक छकाटी हातात घिऊन फारीष्टाकडं ग्याल्याल्यी ती दोन शेरडं हर्र..हर्र...करत हाकीत आणली, तेवढ्यात एक रीडी शेरडावरं तुंबायली. तिला "आ हाल्या...हा...ईऽऽऽक" मनलं की गप्प चरायली. माणिकराव मनलं "सर, चांगलं जमतंय की राव तुमालाबी" एक मैंदाळ हास्यकल्लुळ झाला. तसं तर माणिकरावची आन् माझी रोजच गाठ पडती कारण दोघांचाबी ड्युटीवर जायचा आणि ड्युटीऊन ययचा टायम सेमच हाय.
सकाळ-सकाळ निहीरीची भाकरं फडक्यात गुंडाळुन, पायात कातडी बुट, खिशात पान-सुपारी, चुना डबीचा बटवा, आन् खंद्याला छत्रीचा दांडा आडकुन दोन म्हसरं आन् दोन शेरडं घिऊन माळावर निघायचं. दिवसभर वळत्या करायच्या आन् कटाळा आला की उघड्या आभाळाखाली हिरव्या गादीवर उशाला मोठा दगड घिऊन निजायचं. दिवस मावळता पुन्हा हि जित्राबं हाकीत डोंगर उतरायचा आन् कोट्यावर वैरण पाणी करूण आन् धारा काढायच्या. दुधाची कॅण्ड सायकलला आडकुन ठरल्यालं रतीबं आण खव्याच्या भट्टीवर दुधु वाढायचं. ह्यवडं समदं केल्यावर आठवड्याला हजार रूपये पगार हातात पडतंय. पण माणिकराव ह्यवढ्या पगारीतंच सुखी आन् समाधानी हायतं हे ईशेष. ह्यंन्ला कधी सातवा वित्त आयुग लागला नाय, ना दरवर्षी कसली इंक्रीमेंट झाली नाय तरी ह्यंचं जगणं सुखी आन् समाधानी हाय. तर दुसरीकडं पिओपी केल्याल्या हाफीसात, मऊ मऊ खुडचीवर, गार-गार यीसीत बसुन महीना लाखभर पगार आसुनबी कायम टेंन्शनमदी राहणारी माणसं हायती.
तसं बगायचं झालं तरं जगणं समद्यांच सारखंच हाय, फकस्त वागण्यात फरक हाय. दोन येळच्या भाकरीची सोय करण्यासाठी हि समदी भटकंती सुरू हाय पण ह्यवढ्यातुन सुदा काय निवांत क्षण आपुन जगायलाच पायजेल तरंच जिंदगीचा खरा आर्थ समजल नायतर आपुन समदी पैशे कमीवनाऱ्या मशनी हुन बसु.
आज एका नामांकीत कालेजात प्राध्यापक असणारा मी; पाच वाजल्यापसुन दिस ढळुस्तोर चक्क एका शेतकऱ्याची गुरं राखीत व्हतो. दोन्ही कामात मला सुखचं मिळालं कारणं म्या माझी पगार आन् प्रतिष्ठा पैशात नाय आनंदात मोजतो.

| लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
| दिनांक : 12 ऑगस्ट 2016
| वेळ : सायंकाळी 6 ते 7

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...