Saturday, August 20, 2016

| वैजियंताबाई ©

नाव ऐतिहासिक वाटतंय ना ? असंच माझ्या घरातल एक ऐतिहासिक व्यक्तीमत्व म्हणजे आमची आज्जी वजाबाई होय. तिला लाडाने जरी सर्व 'वजा' म्हणत असले तरी प्रेम व जिव्हाळा तिने 'बेरजेत' दिलाय. अवघ्या दुसरीत असतानाच तिच्या बापानं तिचे लग्न आमचा आज्जा म्हणजेच तुकाराम गरड यांच्याशी लावलं. ईनबीन अक्षरं समजु लागली होती तोवरच नवरा पदरात पडला आणि शिकायची इच्छा असतानाही संसार उभारला. तिच्या सासर आणि माहेरात फक्त पंन्नास फुटाचे अंतर आहे. सासरच्या उंबऱ्यातुन माहेर दिसतंय एवढंच काय ते सुख म्हणायचं. बाकी आजोबा फक्त नावानेच तुकाराम स्वभाव मात्र रागीट. त्यांचा बाप बाबुराव गरड तर याहुन करारी. वजाबाईची सासु तानुबाई आशील सासु होती. उंबऱ्याच्या बाहेर पडायचं म्हणलं तरी पंचायीत. कष्ट, माया आणि भक्ती या तिन्हीचा सुरेल संगम म्हणजेच वैजियंताबाई होय.
तोडकं मोडकं वाचत वाचत वजाबाई आज पुस्तक वाचत बसली होती. हो पण तिच्या सोईनुसार बरंका. जोडशब्द आणि मोठे शब्द वगळुन तिचे वाचन सुरू होते. अस्खलित जरी वाचता येत नसले तरी वाचन साहित्य हातात पकडण्याचेच तिला भारी कौतुक वाटते. वार्धक्यामुळे आता तिची मान व हात थरथर कापत आहेत तरी त्याच थरथरत्या हातांनी ती पुस्तक पकडते आणि जमेल तेवढं वाचण्याचा प्रयत्न करते. "शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असतो" असे ती आम्हाला लहाणपणापासुन सांगते. माझी बातमी जर कधी पेपरात आली तर ती एक बातमी दिवसभरात वाचुन काढते. तिच्या या जिद्दीमुळंच तिने आजवर सोळा अभंग आणि सात गवळणी तोंडपाठ केल्यात. आजही प्रत्येक भजनात तिच्या सुंदर आवाजात हे अभंग ऐकले की धन्य वाटते.
मी कुठेही बाहेर चांगल्या कामाला निघालो की साखर आणि तुळशीपान हातात दिल्याशिवाय ती मला उंबरा ओलांडु देत नाही. पांगरीच्या निलकंठेश्वरावर तिची प्रचंड श्रद्धा आहे. श्रावणातले चार सोमवार तर ती फक्त दुधावरच धरते. एवढंच नाही रमजान मधले काही रोजे पण करते. तिला आम्ही कोणतीही आनंदाची बातमी सांगीतली की "निळोबारायानं चांगलं कंलं" हे तिचे ठरलेले वाक्य. तिचा मराठी महिण्यांचा अभ्यास छान आहे. इंग्रजी महिण्यातला फरक तिला अजुनही समजत नाही. आषाढ, श्रावण, भाद्रपद, आईतवार, निहीरी, एकादशी, अमावस्या, भजन, किर्तन, सांच्याला, अशा शब्दांच्याच माळा ती विणते. आजारपणावरचे काही गावठी ईलाज पण तिला बऱ्यापैकी माहीत आहेत. एरव्ही तर तिचा हात लागलाकीच आमचा अर्धा आजार बरा होतो कारण तेवढे प्रेम आणि सामर्थ्यच त्या स्पर्शात असते.
आमचं लाड शेत घेताना तिच्या सासऱ्याने पाच तोळ्याच्या पाटल्या मोडल्या होत्या; त्याची खंत ती अजुनही बोलुन दाखवते. तिने तिच्या लेकरांवर व नातवांवर खुप चांगले संस्कार केलेत पण आई हा शब्द लेकरांकडुन तिला कधीच ऐकायला मिळाला नाही कारण घरात तिच्या लेकरांपेक्षा ननंदाच जास्त होत्या, त्या सगळे तिला वहिणी म्हणायच्या, पुढे लेकरांनीही तोच वारसा चालवला. तिच्या लेकरांना आता नातवंड पावलीत तरी सर्व तिला वहीणेच म्हणतात. आईचे नावं बदललं तरी तिचे प्रेम आणि जिव्हाळा मात्र तोच आहे.
खरंतरं "आज्जी नावाचं विद्यापीठं ज्या घरात असतं त्या घरातील लेकरांना संस्काराची टिव्हीशन लावायची गरजच पडतं नाही." आणि असं विद्यापीठ अजुनही आमच्या घरात सर्वांना मार्गदर्शन करत उभा आहे हे आमचे भाग्यच; कारण हे विद्यापीठं बांधता येत नाही ते स्वयंभुच असावं लागतं. मला सुद्धा एक लेखक म्हणुन सुचणाऱ्या सगळ्या तत्वज्ञानाचं मुळ याच वैजियंताबाईमध्ये दडलं आहे. म्हणुनच हा लेखप्रपंच.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : 20 ऑगस्ट 2016
वेळ : सायं 7 ते 7:30

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...