Wednesday, August 17, 2016

| पाऊलवाट ©

रस्ता या शब्दाची जननी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी पाऊलवाट. या सृष्टीवर जेव्हा मानवाचा पहिला पाय चालायला लागला असेल, तेव्हाच पाऊलवाटेचाही जन्म झाला असावा. वाटसरूला त्याच्या ध्येयापर्यंत पोहचवणारी हि पाऊलवाट प्रत्येकाच्या आयुष्यात असते. कोणी निर्माण करतो तर कोणी रूळलेल्या वाटेवरूनच चालतो पण पाऊलवाटेवरचा प्रवास करतोच. तसे तर पाऊलवाटेचे बरेचशे प्रकार आहेत. डोंगरातली, बर्फातली, शेतातली, रस्त्यालगतची, नांगरटीतली, खडकावरची, नदीतली, वड्यातली, हागणदारीतली, चिखलातली आणि माझ्या काॅलेजला जाणारी; यापैकी डोंगरातली पाऊलवाट सध्या श्रावणामुळे हिरव्या शालुला सोनेरी किनार लावल्यासारखी उठुन दिसत आहे. अशा अनेक प्रकारच्या पाऊलवाटेवरून आपली पाऊले चाललेली असतात. प्रत्येक पाऊलवाट आपल्याला खुप काही शिकवते. त्या पाऊलवाटेवर चाललेल्या हजारो-लाखो पाऊलांची व्यक्तीमत्व जणु गुरूत्वाकर्षन शक्तीमुळे त्या पाऊलवाटेमध्ये झिरपलेली असावीत असाच भास होतो. विज्ञानवादी दृष्टीकोनातुन जरी हे चुक असले तरी कल्पनावादी दृष्टीकोणातुन हे खरंच वाटतंय.
आयुष्यातल्या सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा प्राथमिक परिचय याच वाटेवरून चालताना उमगतो. वितभर जाडी आणि अनंत लांबी असलेल्या वाटेवरून चालताना; आपल्या आधी चाललेल्या पाऊलखुणा पुसुन स्वतःच्या पाऊलखुणा उमटवत आपला प्रवास सुरू असतो. रूळलेल्या वाटेवरून प्रवास करणे सोपे परंतु काट्याकुट्यातुन नवीन वाट तयार करणे कठीन असतं. नवीन वाट तयार करणाऱ्याच्या पायाला असंख्य काटे आणि दगडं टोचतात परंतु त्याच्या रक्ताळलेल्या पायामुळेच पाऊलवाटा अधोरेखीत होतात.
पाऊलांच्या सोबतीशिवाय या वाटा लुप्त होतात. तर सततच्या चालण्याने या अधिकाधीक अधोरेखीत होत जातात. आदिवाशी, गुराखी, शेतकरी आणि ग्रामिण माणसांचा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पाऊलवाटेला कधीच खड्डे पडत नाहीत. जमिन अधिग्रहन लागत नाही, किंवा याच्या डागडुजीसाठी स्वतंत्र निधीही लागत नाही, यावर गतीरोधक नसतात, जर कधी हि वाट बंद करायची झालं तर फक्त वाळलेल्या येड्या बाभळीच्या दोन तीन फंजारी आडव्या टाकायच्या; बस्स, वाट लगेच बंद. स्वतःच्या पायावर चालणाऱ्या प्रत्येक प्राण्याला व मानवाला हि पाऊलवाट पथदर्शी असते. अशाच वाटेवरून आपणही प्रवास करत असताना फक्त खाली पाहुण चालत राहण्यापेक्षा; या वाटेवरून पहील्यांदा चाललेल्या पायांचे स्मरण करावे, ती वाट अधोरेखीत केलेल्या प्रत्येक पाऊलाचे स्मरण करावे, नक्कीच आपल्याला एक नवीन पाऊलवाट निर्माण करण्याचे सामर्थ्य मिळेल ज्या सामर्थ्यातुन तुमची एक स्वतंत्र पाऊलवाट तयार होईल ज्यावरून भविष्यात लाखो पाऊले चालतील.

लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : 17 ऑगस्ट 2016
वेळ : सायं 6 ते 7

No comments:

Post a Comment

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...