Wednesday, December 30, 2020

मातीचे शत्रू

बूट आणि सूट मातीपेक्षा कसा काय बरं मोठा असू शकतो पण या असल्या मूर्ख मस्तवाल अधिकाऱ्यांसाठी तो तसा असेलही. जोपर्यंत हे असले कृषीशास्त्रज्ञ रेड कार्पेट टाकलेल्या  वातानुकूलित ऑफिस मध्ये बसून शोध लावत आहेत तोपर्यंत शेतकऱ्यांची वाट लागणे स्वाभाविक आहे. जे शास्त्रज्ञ मातीची ऍलर्जी न ठेवता प्रामाणिक काम करतात त्यांचा सदैव अभिमानच राहील पण या असल्या मस्तवाल अधिकाऱ्यांचा निषेधच.

अरे ये मातीची लाज वाटणाऱ्या साहेबांनो ! अरे तुम्ही अंगावर घातलेली कापडं ज्या सुतापासून तयार होतात तो कापूस याच मातीत उगवतो रे, तुम्ही जरी बुटाला घाण लागू नये म्हणून तिच्यावर तळवट अंथरला असेल तरी खरी घाण तर तुम्हीच आहात हे सिद्ध केलेत. अरे, तुमच्यासाठी ती फक्त चिखल होणारी 'माती' असेल पण आमच्यासाठी मात्र चिखल झालेल्या आयुष्यातून जगण्याचा कोंब उगवणारी ती 'माता' आहे.

अबे, आमच्या टॅक्स मधून तुम्हाला लाख दिड लाख पगार काय हे असले संशोधन करायला दिला जातोय काय ? अर तुमचे आईबाप याच चिखलात राबले असतील तेव्हा तुमचे शिक्षण पूर्ण झाले असावे. ही फक्त माती नाही तर माता आहे जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटून काम करत जा. मला मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार हे येडपाट अधिकारी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील शास्त्रज्ञ आहेत. कृषीमंत्री साहेब, घ्या जरा यांची एखादी बैठक आणि विचारा जाब मातीच्या अपमानाचा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३० डिसेंबर २०२०


Monday, December 28, 2020

दिशादर्शक दिग्दर्शक

लक्ष्यात राहतील अशा काही भेटी असतात, दिग्दर्शक अक्षय इंडीकरच्या निवासस्थानी झालेली आजची भेट त्यापैकीच एक. अक्षयला युनिस्को , ग्रिफिथ फिल्म स्कुल, एशिया पॅसिफिक अकॅडमीचा यंग सिनेमा अवॉर्ड मिळालाय. आशिया खंडातील ७० देशातून आलेल्या तब्बल ३००० हून अधिक चित्रपटातून अक्षयच्या 'स्थलपुराण' या वैशिष्टयपूर्ण चित्रपटाची निवड करण्यात आली.

प्रचंड डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्रात चित्रपट तयार करून जर्मनीतले थेटर हाऊसफुल्ल करणारा. सिनेमाची पारंपारिक चौकट मोडून नव्या चौकटी उभारून त्याला वर्ल्ड सिनेमाची दरवाजे बसवणारा हरहुन्नरी दिग्दर्शक म्हणजे अक्षय इंडीकर होय. जगावर आपल्या कलेची छाप सोडलेल्या अक्षयच्या हातचा स्पेशल चहा गळ्यात उतरवत उतरवत कानातून त्याने सांगितलेल्या चित्रपट क्षेत्राशी निगडित अनेक गोष्टीही उतरवल्या.

जेव्हा केव्हा उदाहरणार्थ नेमाडे, त्रिज्या आणि स्थलपुराण हे मराठी चित्रपट रिलिज होतील तेव्हा ते नक्की पाहा. अक्षयचा उधो उधो जागतिक दर्जाच्या फिल्म फेस्टिव्हल मध्ये नेमका का होतो ? याची उत्तरे त्याने लिहून दिग्दर्शित केलेले हे सिनेमे पाहिले की लक्ष्यात येते. दोस्ता तु आजवर केलेले तीन आणि लिहिलेले तीन अशा एकूण सहा चित्रपटांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आता भेटत राहू पुन्हा पुन्हा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २८ डिसेंबर २०२०

Saturday, December 26, 2020

विरोध-बिनविरोध

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत कधी नाही तेवढी बिनविरोधची चर्चा होत आहे, गावोगावी मिटिंगा सुरू आहेत. गावपातळीवरच्या निवडणुका म्हणजे वैरत्व निर्माण होण्याच्या खानी असतात पण बिनविरोध निवडणुकीमुळे असे वैरत्व कमी होण्यास मदत होते. लहान गाव असेल तर दहा लाख, मोठे गाव असेल तर पंचवीस लाख असा एकंदरीत खर्च प्रत्येक पॅनलला करावा लागतो पण जर हाच पैसा निवडणुकांऐवजी गावातील विकास कामासाठी वापरला गेला तर नक्कीच गावचा विकास होण्यास मदत होईल यात दुमत नाही. पण,

ग्रामपंचायत अधिनियम माहित असलेला, सर्व योजनांची बऱ्यापैकी माहिती असलेला, गावासाठी वेळ देऊ शकणारा, उच्च शिक्षितच असावा असेही काही नाही पण किमान त्याला मराठी इंग्रजी वाचता व लिहिता यावे असा. धर्मनिरपेक्ष भावनेने काम करणारा, गावासाठी मुलभूत सुविधांसह शिक्षण आणि आरोग्य सुविधांना प्राधान्य देणारा. गावची पाणीपट्टी, घरपट्टी वसूल करू शकणारा, तेवढ्यापुरते राजकारण आणि दिर्घकाळ समाजकारण करणारा उमेदवार असेल तरच बिनविरोध करा

आणि जर बिनविरोधच्या नावाखाली गावकऱ्यांना वेगवेगळी आमिष दाखवून सिमेंट काँक्रीट रोडमध्ये कमी सिमेंट वापरणारे, पदाचा वापर फक्त स्टार्चची कपडे घालून रुबाब मारायला करणारे, गावठाण जमीन जमीनदारांना वाटणारे, घरकुल मंजूर करून बंगला बांधणारे, ग्रामसेवकाला हाताशी धरून घफळा करणारे, फक्त ग्रामसभेदीवशीच ग्रामपंचायतीचे तोंड पाहणारे, गावातल्या युवकांचा वापर त्यांना दारू पाजून, पार्ट्या देऊन, गुटखा मावा खाऊ घालून स्वतःचा उधोउधो करून घेणारे उमेदवार लादले जाणार असतील तर त्याचा विरोध करा.

बिनविरोध निवडणूक लोकशाहीला जेवढी पूरक तेवढीच ती मारकही असते. निवडणुकीची ताकद फार मोठी असते, ती लढून जिंकण्यातही तितकीच मजा असते. बिनविरोध निवडणुकीमुळे गावातील तंटे कमी होतील, प्रशासनाचा खर्च वाचेल, भाव भावकितली खुन्नस कमी होईल पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर गावातील दोन मुख्य विरोधक एकत्र येऊन संघंमताने विकासकामातून स्वतःचा विकास साधण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सरकारने ग्रामपंचायतीत सुद्धा विरोधी पक्षनेता हे पद निर्माण करायला हवे. निवडणूक बिनविरोध झाली तरी वाईट गोष्टींचा आपण विरोध करायलाच हवा कारण विरोधक नसला की लोकशाही लंगडी होते.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ डिसेंबर २०२०


Sunday, December 20, 2020

खंडोबाचा नंगर

खंडेनवमी दिवशी आमच्या श्रीराम पेठेत हनुमान मंदिरासमोर खंडोबाचा नंगर (लोखंडाची जाड साखळी) तोडला जातो, ही खूप जुनी परंपरा आजतागायत सुरू आहे. मी लहान असताना 'ढंगटाक ढढडांग ढंगटाक' असा आवाज आला की आम्ही घरातून धूम ठोकून थेट भराड्याच्या घरासमोर जायचो, ढोलाच्या निनादात वारू वाले हातातील वारू (घुंगरू लावलेला चाबूक) गोल फिरवून हातावर मारीत नृत्य करायचे, उजव्या हातात वारू घेऊन तो हात उंच पकडायचा आणि डाव्या हातात वारूचा शेंडा ताणून धरायचा मग 'ढंग टाक ढढडांग ढंगटाक' ह्या ठेक्यावर डोळे बंद करून वारूचे गुंगरू खळखळ वाजवायचे आणि पुढच्या क्षणातच तो वारू गोल फिरवून डाव्या हातावर जोरात मारायचा त्यानंतर येणारा 'फाट्ट़' हा आवाज ऐकून अंगावर काटा यायचा.

काहीजण हातात खंडोबाची उंच काठी पकडून आभाळाकडे पाहत ढोलक्याच्या ठेक्यावरच तोल सांभाळायचे. मग सर्व वारूवाले लोखंडाचा नंगर घट्ट बांधून त्यावर बसायचे, विठ्ठल भराडे उर्फ आबा कपाळावर हळदीचा भंडारा लावून तो नंगर हातात धरून तोडण्यासाठी सज्ज व्हायचे, उपस्थित सर्व भक्त 'येळकोट येळकोट घे' असा मोठा निनाद करायचे आणि त्याच त्वेषात आबा जोराचा हाबाडा देऊन नंगर तोडायचे. नंगर तुटला की ग्लानी येऊन पडायचे मग त्यांना पुन्हा भंडारा लावला जायचा, टॉवेल टोपी चढवली जायची आम्ही सर्वजण नंगराच्या पाया पडायचो. हा सगळा सोहळा बघण्यासाठी सर्व पेठकरी आणि गावातले लोक मोठी गर्दी करायचे.

आज आबा हयात नाहीत पण प्रत्येक खंडेनवमीला त्यांची आठवण येते. आता नंगर तोडायचा त्यांचा वारसा त्यांचा धाकटा मुलगा मोहन भराडे उर्फ आप्पा पुढे चालवत आहेत. आजच्या दिवशी आमच्या गावातले भराडे कुटुंबीय मोठ्या भक्ती भावाने नंगरची पूजा करून हा खंडेनवमीचा उत्सव साजरा करतात. आमच्या पांगरीत पाहिले पाच ठिकाणी नंगर तोडला जायचा आता कालांतराने तीन ठिकाणी तोडला जातो. आधुनिक युगातही नंगर तोडण्याची परंपरा जपणारे मोहन भराडे, आप्पा पुकळे आणि हनुमंत गाढवे तसेच वारू खेळण्याची परंपरा जपलेले सुनील कदम, बबन घोडके, रामचंद्र घोडके , सदाशिव जगदाळे, खंडू जगदाळे, बाबा बाराते, मोहन बगाडे यांना सलाम.

आपल्या प्रत्येक सण आणि उत्सवामागे समाजाच्या हिताचे कारण असते शस्त्र असले की शास्त्र पण असतंच. खंडे नवमीला सुद्धा मराठा, ब्राम्हण, धनगर, वाणी, सुतार, मांग या सर्व जातीतील माणसं हा उत्सव साजरा करायला एकत्र येतात. आजच्या वर्गीकरणाच्या जमान्यात सर्व जातीपातीला पिवळ्या भांडाऱ्यात बांधून एकोप्याची भावना रुजवणारे असे उत्सव आणि परंपरा काळजीपूर्वक जोपासले जाणे काळाची गरज वाटते. आपल्या पुढच्या पिढीला अभिमानाने दाखवण्याची ही गोष्ट जपली गेल्याचे समाधान आहे.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २० डिसेंबर २०२०

Monday, December 14, 2020

बेताल वक्तव्याचा निषेध

तुमच्या बापाने जेव्हा तुमचे नाव प्रताप ठेवले असेल तेव्हा त्याला संदर्भ नक्कीच प्रतापगडाचा असेल. पण तुमच्या आडनावात 'नाईक' कसे आले हा संशोधनाचा भाग आहे. आता नुसती माफी मागून तोंडाची वाफ घालवू नका, गपगुमान सिंहगडावर जाऊन नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीसमोर नाक घासा. अर्थात हे तुम्ही कराल का नाही याची शंका आहे, कारण तुमच्यासारख्यांना छत्रपती बद्दलचे प्रेम, आदर, जिव्हाळा हे फक्त निवडून येईपर्यंत महत्वाचे असते, नंतर करोडपतीचा अब्जोपती बनण्याचा धंदा सुरू असतो. तुम्ही किती टर्म निवडून आलात यापेक्षा तुम्ही काय कर्म केले हे जास्त महत्वाचे आहे.

जेव्हा नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले तेव्हा राजाधिराज शिवछत्रपतींच्या डोळ्यात अश्रू आले होते. स्वराज्यासाठी बलिदान दिलेला प्रत्येक मावळा हा वेगळा नसून तो छत्रपतींच्या रक्ताचा थेंब आहे. तुमच्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी जरा दुसरी उदाहरणे वापरात जावा आणि इतिहासातील उदाहरणे द्यायची असल्यास जरा अभ्यास करून देत जावा. आज तुमच्या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि तो यासाठी महत्वाचा आहे; की उद्या दुसऱ्या कुणीतरी इतिहासातील अज्ञानामुळे असे बेताल वक्तव्य करू नये. बाकी नाईक या शब्दाचे जरी पाईक झालात तरी ती आमदारकी पेक्षा मोठी गोष्ट असेल.

वक्ता तथा लेखक :  विशाल गरड
दिनांक : १४ डिसेंबर २०२०


Wednesday, December 9, 2020

आशिया खंडातला 'अक्षय' दिग्दर्शक

आपल्या अक्षयने त्याच्या नावाप्रमाणे काम केलंय, उदाहरणार्थ नेमाडे आणि त्रिज्या या दर्जेदार कलाकृती नंतर त्याला 'स्थलपुराण' या चित्रपटासाठी आशिया खंडातील सर्वोत्तम युवा दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला दिग्दर्शक आहे. आशिया खंडातील ७० देशातून आलेल्या तब्बल ३००० हून अधिक चित्रपटातून अक्षयच्या 'स्थलपुराण' या चित्रपटाला 'यंग सिनेमा अवॉर्ड'  मिळालाय. युनिस्को , ग्रिफिथ फिल्म स्कुल, एशिया पॅसिफिक अकॅडमी यांच्याकडून हा पुरस्कार दिला गेलाय. 

मराठी चित्रपटाला हॉलीवूड टच देणारा दिग्दर्शक, सहज सोप्या गोष्टीचे कॅमेऱ्यातुन अद्भुत दर्शन घडवणारा दिग्दर्शक म्हणजे अक्षय इंडिकर होय. आपल्या सभोवताली घडणारी प्रत्येक गोष्ट हा एक चित्रपटच असतो फक्त त्या दिसलेल्या किंवा सुचलेल्या  गोष्टीला पुन्हा चित्रबद्ध करून दृकश्राव्य माध्यमाच्या अलंकारांनी मढवले की एक दर्जा कलाकृती निर्माण होते. आपल्या मराठी इंडस्ट्रीत अनेक दिग्दर्शक आहेत त्या प्रत्येकांनी त्यांची त्यांची टेस्ट जोपासली तसंच अक्षयने देखील त्याच्या चित्रपटातून प्रेक्षकांना एक वेगळी टेस्ट चाखायला लावली.

अक्षयने वर्ल्ड सिनेमाचा खूप अभ्यास केलाय आणि त्याचा परिणाम त्याच्या चित्रपटांच्या प्रत्येक फ्रेम मधून उमटतो. कथा, पटकथा, चित्रीकरण, अभिनय, संगीत या सर्व गोष्टीवर खूप बारीक लक्ष देऊन तो काम करत असतो. त्याचे चित्रपट डोळ्यांसोबत मनाला आनंद देणारे आणि  मेंदूला विचार करायला लावणारे असतात. जे सहज कुठे दिसत नाही ते दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याच्या फिल्ममेकिंगची ही युनिक फ्लेवर परदेशी ज्युरींना सुद्धा आवडला म्हणूनच सोलापूरसह भारताच्या शिरपेचात यंग सिनेमा अवॉर्ड या मानाच्या पुरस्काराचा तुरा रोवला गेला.

प्रिय अक्षय, तुझ्या डोक्यावरच्या केसांपेक्षाही जलद गतीने त्या डोक्यातल्या जबरदस्त कल्पना वाढत आहेत. दोन्ही असेच वाढू दे, भारी दिसतंय. आता ज्या चित्रपटाची वाट अख्ख जग पाहतंय त्या स्थलपुराणच्या प्रीमिअरची मी वाट पाहतोय. एक जागा ऍडव्हान्स बुक करून ठेव ही विनंती. बाकी 'इंडिकर' या नावातच 'इंडिया' आहे, तू आपल्या चित्रपट सृष्टीला जगात 'अक्षय' करशील याचा विश्वास आहे आणि फक्त सोलापूर, महाराष्ट्रच नाही तर आपल्या भारत देशाला अभिमान वाटेल असे काम करशील याची खात्री आहे. पुनश्च खूप खूप शुभेच्छा भावा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ९ डिसेंबर २०२०

Monday, December 7, 2020

Global Guruji

He proved that if our work is consistent & creative then whole world appreciate it. He proved that whether you teach in small village & in small school but If you do friendship with Digital gadget, Internet & English language then similarly you will teach thousands of student from more than 140 countries over the world. He proved that money is just an amount but when it share with right peoples at the right time then this amount is converted in to unforgettable history & also He proved that a real teacher works for outcome not for income. Global teacher award winner Mr.Ranjitsinh Disale got 7 Crore ₹ as a prize but  he decided to share 50 % amount with his another nominated teachers. Winning award is great thing but sharing huge amount for noble work is the greatest thing. Proud of you my friend Disale Guruji. Yes, you won the world.

Orator & Writer : Vishal Garad
Date : 7 December 2020

Friday, December 4, 2020

जग जिंकलेला गुरुजी

त्यांना सात कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले यापेक्षा कितीतरी अब्ज मोठी गोष्ट ही आहे की त्यांनी मिळालेल्या बक्षिसातली अर्धी रक्कम सोबतच्या स्पर्धकांना दिली. ही माणसे अशीच जग जिंकत नाहीत त्याच्या मुळाशी माणुसकीचा झरा वाहत असतो. शिक्षणाची तहान भागवण्यासाठी रणजितसिंह डिसले गेली कित्येक वर्ष मेहनत घेत होते अखेर युनेस्कोचा ग्लोबल टिचर्स अवॉर्ड मिळाल्यामुळे हा आमच्या बार्शीचा सिंह जगाला दिसला. याच्या डरकाळीने जगभरासह अख्या भारताची शिक्षण व्यवस्था खडबडून जागी झाली. वाड्या वस्त्याच्या शाळेवर ज्ञानदान करता करता कल्पकतेच्या जोरावर जग जिंकता येते हे गुरुजींनी सिद्ध करून दाखवलंय. 

जगातल्या सर्वोत्तम शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला माणूस आपला मित्र असावा, त्याला असे सहज भेटता यावे, मार्गदर्शन घेता यावे हा सुध्दा आपल्या माणूसपणाचा पुरस्कारंच आहे. प्रिय रणजितदादा आज तुम्ही गुरुजी, मास्तर, सर, अध्यापक, टिचर या शब्दांना सर्वोच्च सन्मान प्राप्त करून दिला. ही पृथ्वी तुम्हाला विसरणार नाही. तुमचे अभिनंदन करताना एक शिक्षक म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून आलाय. पुरस्कार दरवर्षी कुणाला तरी मिळतो पण पुरस्काराची अर्धी रक्कम सहयोगी स्पर्धकांना देण्याची दानत फक्त एका रणजितसिंहातच असते. सर तुमच्या या दातृत्वाने तुम्ही पुरस्काराबरोबर प्रत्येकाच्या मनातला

"शिक्षक हा इन्कमसाठी नाही तर आऊटकम साठी काम करत असतो. मला पुरस्कार मिळाला म्हणून माझी तुलना इतर शिक्षकांशी केली जाऊ नये कारण प्रत्येक शिक्षक करत असलेले काम त्यांच्या त्यांच्या पातळीवर श्रेष्ठ आहे. जगभरातील इनोवेटीव्ही शिक्षकांना चालना देण्यासाठी यापुढे काम करायचे आहे. जगभरातील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणूनच माझ्या पुरस्कारातली  रक्कम मी उरलेल्या नऊ स्पर्धकांना देऊ केली आहे." सरांशी गप्पा मारताना त्यांचे वैश्विक विचार ऐकून, एकदा जिंकलेले मन त्यांनी पुन्हा जिंकले.

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार देऊन विश्वातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव झाला. जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुन अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम निवडीसाठी १० फायनालिस्ट निवडले गेले आणि त्यातून विजेता म्हणून रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातला हा सर्वोच्च सन्मान मिळवलेले डिसले सर पाहिले भारतीय शिक्षक ठरलेत. अतिशयोक्ती नाही पण देशाचे शैक्षणिक धोरण ठरवण्यासाठी आणि शिक्षण मंत्री म्हणून देशाला अशा टॅलेंट व्यक्तीची गरज आहे. अभिनंदन गुरुजी !

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ४ डिसेंबर २०२०

Friday, November 27, 2020

बटाटावड्याची फिलॉसॉफी

उकडलेल्या बटाट्यात कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कडीपत्ता,तिखट,मीठ मिसळून तयार केलेल्या गोलाकार गोळ्यांना 'वडा' म्हणत नाहीत. त्या गोळ्यांना जेव्हा बेसन पिठाच्या आवरणात गुंडाळून उकळत्या तेलात सोडले जाते तेव्हाच त्याला 'बटाटा वडा' हे नाव प्राप्त होते. आपल्याही आयुष्यात जरी सगळे रंग आणि चवी मिसळल्या गेल्या असल्या तरी संघर्षरुपी तेलात आयुष्य तळल्याशिवाय स्वतंत्र ओळख निर्माण होत नाही आणि जर त्याच तेलातून वेळीच बाहेर आलो नाही तर आयुष्य करपल्याशिवायही राहत नाही.

परिस्थितीच्या तेलात स्वतःला झोकून दिले की तुमची किंमत आपोआप वाढते. नुसतं कढईच्या जवळ बसून राहिलात तर कालांतराने तारुण्याचा वास सुटेल म्हणूनच सगळ्या गोष्टी जुळून आल्या की संघर्षरुपी तेलात उडी घेण्याचे सामर्थ्य ठेवा. हे जग तुम्हाला वेगळ्या नावाने ओळखायला लागेल. अहो सभोवताल आपल्याला खूप काही शिकवत असतो फक्त डोळ्याला दिसलेल्या गोष्टीवर मेंदूला विचार करायला भाग पाडले की असे तत्वज्ञान निर्माण होते. बाकी पुन्हा कधी वडा खाताना हा माझा लेख जरूर आठवा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२०

निलावती

उकडलेल्या बटाट्यात कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कडीपत्ता,तिखट,मीठ मिसळून तयार केलेल्या गोलाकार गोळ्यांना 'वडा' म्हणत नाहीत. त्या गोळ्यांना जेव्हा बेसन पिठाच्या आवरणात गुंडाळून उकळत्या तेलात सोडले जाते तेव्हाच त्याला 'बटाटा वडा' हे नाव प्राप्त होते. आपल्याही आयुष्यात जरी सगळे रंग आणि चवी मिसळल्या गेल्या असल्या तरी संघर्षरुपी तेलात आयुष्य तळल्याशिवाय स्वतंत्र ओळख निर्माण होत नाही आणि जर त्याच तेलातून वेळीच बाहेर आलो नाही तर आयुष्य करपल्याशिवायही राहत नाही.

परिस्थितीच्या तेलात स्वतःला झोकून दिले की तुमची किंमत आपोआप वाढते. नुसतं कढईच्या जवळ बसून राहिलात तर कालांतराने तारुण्याचा वास सुटेल म्हणूनच सगळ्या गोष्टी जुळून आल्या की संघर्षरुपी तेलात उडी घेण्याचे सामर्थ्य ठेवा. हे जग तुम्हाला वेगळ्या नावाने ओळखायला लागेल. अहो सभोवताल आपल्याला खूप काही शिकवत असतो फक्त डोळ्याला दिसलेल्या गोष्टीवर मेंदूला विचार करायला भाग पाडले की असे तत्वज्ञान निर्माण होते. बाकी पुन्हा कधी वडा खाताना हा माझा लेख जरूर आठवा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२०

Sunday, November 22, 2020

आयर्न गर्ल पूजा मोरे

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण, संघर्ष करण्याची शक्ती, नडला तर भिडण्याची ताकद आणि कष्ट करण्याची दुर्दम्य इच्छा असणारी युवती म्हणजेच पूजा मोरे. हिच्या आईवडिलांनी काळ्या आईची खूप मनोभावे 'पूजा' केली असावी म्हणून त्याच काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी 'पूजा' त्यांच्या पोटी जन्माला आली. ती जरी मराठा क्रांती मोर्चामुळे प्रकाशझोतात आली असली तरी सामाजिक प्रश्नावर ती खूप आधीपासून काम करत होती म्हणूनच सर्वात कमी वयात ती पंचायत समितीची सदस्य झाली आणि आज स्वाभिमानी पक्षाची युवती प्रदेशाध्यक्ष आहे.

भविष्यात ती आमदार होईल का खासदार होईल यापेक्षा एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आजघडीस तिने लाखो शेतकऱ्यांच्या हृदयात त्याहीपेक्षा मोठी जागा निर्माण केली आहे हे विशेष. पद मिळावे म्हणून नाही तर चळवळीच्या माध्यमातून आपल्याकडून अजरामार काम घडावे जे लोकांच्या पिढ्यान पिढ्या लक्ष्यात राहील यासाठी ती प्रयत्नशील असते. शेतकरी हितासाठी तिचा निःपक्षपाती विरोध तिच्या राजकारणाची उंची स्पष्ट करतो. या पोरीवर लिहायचं म्हणलं तर एक पुस्तक तयार होईल पण तूर्तास अभिष्टचिंतनपर इतकंच.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २२ नोव्हेंबर २०२०

Thursday, November 5, 2020

लेकीचे प्रयत्न

आज माझ्या मुलीला सात महिने पूर्ण झालेत, सध्या दिसेल त्या वस्तूला धरून उभे राहण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. विरा जेवायला जाताना 'ओ, लक्ष द्या जरा तिच्याकडे असे सांगून गेली. मी देखील दोन तीन खेळणी तिच्यापुढे टाकून तिच्या हालचालींचे निरीक्षण करत बसलो. आपण म्हणतो मोठ्यांचे संस्कार लहानांवर होत असतात पण लहानांचे बारिक निरीक्षण केले तर ते सुद्धा अपल्यावर संस्कार करू शकतात. मी कॉटवर झोपलो होतो आणि ती शेजारी खेळत बसली होती. खेळता-खेळता ती माझ्या जवळ आली, कॉटवरून खाली पडू नये म्हणून मी तिला माझा पाय आडवा लावला; मग ती त्या पायाला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करू लागली. मला उत्सुकता होती की नेमकं ती केव्हा उभारते.

कित्येक वेळा ती पडली पण मी तिला हाताचा आधार दिला नाही. धरायची, पडायची पण न रडता पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करायची. मी फक्त तिच्याकडे पाहत होतो पण अखेर तब्बल १६ वेळेस पडल्यानंतर ती तिच्या पायावर उभा राहिली आणि माझ्याकडे पाहून हसली. आपली लेकरं दोनदा पायावर उभी राहतात, एकदा पायाने आणि दुसऱ्यांदा कर्तृत्वाने. उभे राहण्याच्या या दोन्ही वेळा प्रत्येक बापासाठी अभिमानास्पद असतात. प्रयत्न करण्याची कला निसर्ग जन्मजात देत असतो उलट आपणच तुला हे जमत नाही, जमणार नाही वगैरे भंपक गोष्टी लेकरांच्या डोक्यावर बिंबवतो. लेकरं सगळ्यांनाच असतात ओ पण त्यांच्याकडून शिकण्याचा दृष्टीकोन सगळ्यांनाच असेल असे नाही. हा दृष्टीकोन वृद्धिंगत व्हावा याचसाठी हा शब्दप्रपंच.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ५ नोव्हेंबर २०२०

Tuesday, November 3, 2020

लॉकडाऊन - ज्ञानेश्वर जाधवर

माझे मित्र ज्ञानेश्वर जाधवर लिखित लॉक डाऊन ही कादंबरी आज वाचून पूर्ण झाली. गेल्या नऊ महिन्यांपासून आपण सर्वजण या कोरोनाच्या वातावरणात जगत आहोत या दरम्यान प्रत्येकानेच अनेक बऱ्या वाईट गोष्टी अनुभवल्या असतील पण ज्ञानेश्वर जाधवर यांनी त्या गोष्टीना पुस्तकात कैद करून त्या आठवणी अजरामर केल्या त्याबद्दल प्रारंभीला त्यांचे आभार. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा लॉकडाऊन मधील अनेक घटनांची साक्षीदार आहे. कोरोनाशी संबंधित सर्व माहितीचा खजिना लेखकाने अतिशय कल्पकतेने कथेत गुंफला आहे. जरी सध्या 'कोरोना' हा शब्द उच्चारला तरी इरिटेट होत असले तरी लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांनी मात्र तीच माहिती खूप रंजक पद्धतीने पुस्तकात मांडल्याने ती वाचताना कंटाळवाणी वाटत नाही.

वाईट प्रसंग आला की आपल्या गावाकडच्या मातीची आणि तिथल्या माणसांची आठवण प्रकर्षाने येते. या पुस्तकात देखील पुणे शहर व परिसरात घडणारी कथा आठवणींच्या स्वरूपात अधून मधून गावाकडे आणि गावच्या टेकडीवर फेरफटका मारत राहते. आजवर जे जे काही आपण न्युज चॅनेलवर पाहिलंय, सोशल मिडियावर वाचलंय त्या सर्व गोष्टींची या कादंबरीत रिविजन होते. कादंबरीतील पात्रांच्या परस्पर संवादातून कोरोना आजाराविषयी खूप सखोल माहिती देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. ही कादंबरी जरा लवकर प्रकाशित व्हायला हवी होती असे वाचताना वाटते. कोविड वार्डातील रुग्णांनी सांगितलेल्या पारधी, सफाई कामगार, वेश्या, भाजीवाले, बिगारी कामगार यांच्या गोष्टी भयानक वाटतात. लेखकाने लॉक डाऊन मधील असंख्य उदाहरणांना एका साखळी मध्ये गुंतवून व्यवस्थेला खुबीने प्रश्न विचारले आहेत. 

उत्तरार्धात कादंबरीच्या नायकाचा त्याच्या बायकोशी झालेला आभासी संवाद कोरोनाकाळात घडलेल्या आणि घडवलेल्या कृष्णकृत्याचा आरसा आहे. शेवटच्या भागात धर्माबद्दल टोकाची कट्टरता बाळगणाऱ्या व्यक्तींना उदाहरणासह स्पष्टीकरण देऊन कथेचा शेवट केला आहे. भविष्यात 'लॉकडाऊन' हे पुस्तक कोरोना काळातला एक दस्तावेज असेल ज्यात पुढच्या पिढीला कोरोनाच्या भयंकर संकटाच्या पाऊलखुणा या पुस्तकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहेत त्यामुळे जेव्हा केव्हा ही कादंबरी उपलब्ध होईल तेव्हा विकत घेऊन नक्की संग्रही ठेवा. प्रिय वाचकहो, ज्याप्रमाणे आपण ज्ञानेश्वर जाधवर यांच्या 'यसन'वर प्रेम केलंत तसंच 'लॉकडाऊन' वरही कराल हिच अपेक्षा.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३ नोव्हेंबर २०२०

Sunday, November 1, 2020

द आंत्रप्रन्योर

पुस्तकाची सुरुवात 'आंत्रप्रन्योर' या शब्दाने होते आणि शेवट 'Larger than Life' या शब्दाने होतो. संपुर्ण पुस्तक वाचल्यावर हाच विचार मनावर ठसतो. लेखक ओळखीचा असल्याने वाचताना पुस्तकातला नायक म्हणून त्याचाच चेहरा सतत आठवत होता. शरदराव माझ्यासाठी एक मित्र म्हणून जेवढे मोठे आहेत त्याहून हे पुस्तक वाचल्यानंतर ते माणूस म्हणून मोठे वाटतात कारण स्वतःची जिंदगी त्यांनी कसलाही फिल्टर न लावता या पुस्तकात मांडली आहे. जे घडलं, जे अनुभवलं ते जसेच्या तसे इथे वाचता येते.
 
'रॅट रेस' सदरात सगळ्या नोकऱ्यांचा आणि स्पर्धा परीक्षांचा पंचनामा केलाय. कलेक्टर या पदाला हुशारी चे सर्वोच्च शिखर समजणाऱ्या युवकांनी आपला आदर्श कोण असावं, कोण नसावं आणि का असावं याचे उत्तर लेखकाने पहिल्याच सदरात किमान शब्दात समजून सांगितलंय. "जो सतत काम करत असतो त्याला भूतकाळ सांगण्यासाठी वेळ नसतो" हे वाक्य जाम आवडलं आपल्याला. 'मेंटर' या सदरात लेखकाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या  नवोदित युवकांना स्वानुभव सांगता सांगता ज्या कानपिचक्या दिल्यात त्या वास्तव सांगून जातात.

मुलगा आणि बापाच्या नात्यातला उलगडा लेखकाने खूप सुंदर मांडला आहे. बहुतांशी बाप-लेकातला संवाद असाच असतो त्यामुळे प्रत्येक मध्यमवर्गीय युवकाला ही गोष्ट स्वतःची वाटते आणि तो स्वतःला त्यात शोधातही बसतो. पृष्ठ क्रमांक एकशे बावीस वर महाराजांचा उल्लेख आहे तो अतिशय समर्पक आणि पुस्तकाच्या विषयाला अनुसरून मांडला आहे तसेच पृष्ठ क्रमांक एकशे एकोणऐंशी वर टायटॅनिक चित्रपटातील हिमनगाचे उदाहरण देऊन मांडलेला विचार जबरदस्त वाटला

"सॅप कोर्स करून ज्या कंपनीत जॉबची अपेक्षा करत होतो त्याच कंपनीच्या सीईओ सोबत लंडन मध्ये डिनर केलं".
व्हिजन या सदरात पृष्ठ क्रमांक एकशे सदूसष्ठ वरचे हे वाक्य वाचताना अंगावर शहारा येतो. "यंग आंत्रप्रन्योर अवार्ड गोज टू मि.शरद तांदळे फ्रॉम इंडिया" हे वाचताना अभिमान वाटतो आणि "हे सगळं बघायला बाप हवा होता", "बघा पप्पा आज मी कुठे उभा आहे" ही वाक्य डोळ्यातले पाणी उपसून बाहेर काढतात.

हे पुस्तक शरद तांदळे यांची सक्सेस स्टोरी आहे पण इतर सक्सेस स्टोऱ्यांपेक्षा वेगळी, ज्यात उद्योजक होण्यासाठी गरजेच्या अतिशय लहान लहान गोष्टी सांगितल्या आहेत, नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या युवकांना शरदरावांनी सोप्या भाषेत महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. स्वतःच्या चुका ठळकपणे सांगताना त्यांनी हातचा ठेवला नाही. या पुस्तकातला त्यांचा खरेपणा मनाला भावतो. संघर्ष काळातली प्रत्येक ठेच त्यांनी पुस्तकात मांडली आहे. 'द आंत्रप्रन्योर' हे पुस्तक ऍमेझॉन, फ्लिपकार्टवर सहज उपलब्ध आहे, विकत घेऊन नक्की वाचा.

वक्ता तथा लेखक : प्रा. विशाल गरड
दिनांक : १ नोव्हेंबर २०२०

Thursday, October 22, 2020

पेंटिंग भेट

काही महिन्यांपूर्वी माझे जिवलग मित्र पिंपरी चिंचवडचे ACP श्रीकांत डिसले यांनी IPS विश्वास नांगरे पाटलांचे बॉलपेन चित्र रेखाटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी देखील मिळालेल्या वेळात ती पूर्ण करून ठेवली. हे चित्र रेखाटतानाचा लाईव्ह डेमो सोशल मिडियावर या आधीच वायरल झाला होता. नांगरे पाटलांना देखील त्याबद्दल उत्सुकता होती पण लॉकडाऊनच्या मालिकेमुळे ते चित्र डिसले साहेबांपर्यंत पोहोचवता आले नाही परंतु काही दिवसांपूर्वी साहेबांनी हे चित्र घेण्यासाठी खास माणूस पाठवला, मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पेंटिंगला सुंदर फ्रेम केली आणि विश्वास नांगरे पाटील साहेबांच्या वाढदिवसा निमित्त ही अमूल्य कलाकृती त्यांनी त्यांना भेट दिली. नांगरे पाटील साहेबांनी देखील त्या वैशिष्टपूर्ण कलाकृतीचे कौतुक करून सदर फ्रेम त्यांच्या मुंबई येथील ऑफिसमध्ये लावण्यास सांगितली. बॉलपेन पेंटिंग सुपूर्द केल्यानंतर डिसले साहेबांनी लगेच हा फोटो आणि साहेबांची प्रतिक्रिया व्हाट्सअपवर मला पाठवली होती. ACP श्रीकांत डिसले हे नांगरे पाटील साहेबांचे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्या फॅमिली ग्रुपवर देखील या चित्राबद्दल खूप चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रिय डिसले साहेब, मित्राच्या कलाकृतीचे कौतुक करून ती सर्वदूर पोहोचवण्याच्या तुमच्या प्रयत्नास धन्यवाद. तुम्हालाही हे चित्र रेखातलेला लाईव्ह डेमो पाहायचा असेल तर खालील यू ट्यूबलिंकवर पाहू शकता 👇🏾

लेखक तथा चित्रकार : विशाल गरड
दिनांक : २२ ऑक्टोबर २०२०


Thursday, October 15, 2020

वरुणराजा, माती तरी शिल्लक ठेव !

आजवर तू शेतात साचलास, नदीतून वाहिलास, तुझ्या या वागण्याने पिकांचे नुकसान व्हायचे, कधी घुसलास शहरात तर दुकाने आणि घरांचे नुकसान व्हायचे हे कमी की काय म्हणून आज मात्र तू शेतातून वाहिलास आणि ज्या उदरातून एका दाण्याचे आम्ही शंभर दाणे करायचो ते उदरच वाहून नेलेस की रे. गेलेलं पीक पुन्हा आणता येईल, पडलेले घर पुन्हा बांधता येईल पण वाहून गेलेली आमची काळी माती आता कुठं शोधायची रे. तू ज्या रस्त्यांवरून बेदरकारपणे वाहिलास ते रस्ते उद्या पुन्हा कोरडे होतील, तुझ्या चिखलाच्या पाऊलखुणाही काही दिवसात फुफुटा होऊन उडून जातील पण शेतकरी राजाच्या शेतातली तू वाहून नेलेली काळी माती कशी परत देशील ?

तू निसर्गाचे एक अपत्य आहेस तरीही तुला सांगतो मातीचा एक इंच थर तयार व्हायला पाचशे वर्ष लागतात आणि तू मात्र तो थर काही क्षणात वाहून नेतोस. अरे आजपर्यंत आमची पीके अशी कितींदा तरी वाया गेलीत पण जर तू पिकांसोबत आमची माती सुद्धा वाहून नेणार असशील तर शेती करायची कशी ? सततचा कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी, निकृष्ठ बियाणे, किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव, खते औषधांच्या वाढत्या किंमती, बँकांची कर्ज, पडलेले बाजारभाव, आयात निर्यात धोरण, मजुरांचा तुटवडा ही संकटे पाचवीला पुजलेली असताना ज्या मातीने आम्हाला सदैव साथ दिली ती सुद्धा तू वाहून नेलीस.

"चार महिने काबाड कष्ट करून काढलेल्या सोयाबीनची शेज उद्या मळायची आहे, पाच पन्नास पोती तरी होतीलच. पैसे आले की देणी पाणी फेडायची, लॉकडाऊनमुळे झालेल्या दैनेवर याचीच आशा आहे. यंदा दिवाळी चांगली करायची लेकरांसाठी" हे सगळं रात्री स्वप्नात पाहत होता शेतकरी आणि दुसऱ्या दिवशी रानात जाताना खळ्यावर रिचवलेल्या सोयाबीनची ढिगारा ताडपत्रीसह नदीच्या पाण्यावर वाहून जाताना पाहून त्या शेतकऱ्यांची स्वप्न सुद्धा वाहून गेली. फक्त गळ्याला फास लावणे म्हणजेच मरण नसतं; हे असे दृश्य पाहताना पाहिलेली स्वप्न डोळ्यातील अश्रूंसोबत वाहू देणं मरणापेक्षा  भयंकर असतं.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १४ ऑक्टोबर २०२०


Friday, September 18, 2020

संसार एक सिनेमा

बायको म्हणजे संस्कार रुपी सिनेमातले हे एक असे पात्र आहे जिला आई, बहीण, प्रेयसी, मैत्रीण, मुलगी, वहिनी, जाऊ, नणंद आणि पत्नी असे वेगवेगळे रोल प्ले करावे लागत असतात. या सगळ्या पात्रांना जी न्याय देते तिचा संसार सुपरहिट होतो. दोस्तांनो तुमचा हा सिनेमा लो बजेट आहे का हाय बजेट याचा फारसा संबंध नसतो फक्त संसारातल्या अभिनेत्रीची निवड मात्र महत्वाची ठरते. तसेही ही निवड आता आपल्या हातात म्हणावी तेवढी नाही राहिली, सद्य परिस्थितीत तर 'त्याच' ठरवतात कोणत्या सिनेमात काम करायचे आणि कोणत्या नाही.

या सिनेमातली काही पात्र जन्मजात कंपल्सरी असतात तर काही मात्र निवडावी लागतात. तसेही आयुष्य नावाचा अर्धा सिनेमा आईबापाच्या डिरेक्शन मध्ये आपण आधीच पूर्ण केलेला असतो त्यातच हा संसार नावाचा नवीन सिनेमा आपल्या डिरेक्शनमध्ये सुरू करायचा असतो. (काही काही सिनेमात कालांतराने ऍक्टरच डिरेक्टर होतात तो भाग वेगळा) सरतेशेवटी सांगायचं एवढंच की संसाररूपी या सिनेमात प्रत्येकाची डिरेक्शन ठरलेली असते. ज्याचा त्याचा रोल स्क्रिप्ट प्रमाणे प्ले केला की शुटिंग वेळेत पूर्ण होते. लव्ह, ड्रामा, ऍक्शन, इमोशन, सस्पेन्स, थ्रिल, कॉमेडी, इन्स्पिरेशन हे सगळं अनुभवायला लावणारा एकमेव चित्रपट म्हणजेच 'संसार' होय.
प्रिय विरा, तू आपला संसार सुपरहिट केल्याबद्दल धन्यवाद.

आता तुम्ही म्हणाल की विशाल गरड बायकोच्या वाढदिवसाला हे असे सिनेमॅटिक का बरं लिहायलाय. तर त्याचं असं आहे की; गेल्या काही महिन्यांपासून माझ्या डोक्यात सिनेमाचे फॅड घुसलंय, जोवर ते एकदा पूर्ण होत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यात तयार होणाऱ्या प्रत्येक विचाराला त्या सिनेमाचा फ्लेवर आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा बायकोला वाढदिवसानिमित्त द्यायच्या शुभेच्छा तरी त्याला कसा बरं अपवाद ठरतील म्हणून हा लेखप्रपंच. बाकी या सिनेमातली सर्व पात्र वास्तव असतात यांचा जीवनाशी घनिष्ट संबंध असतो. योगायोग वगैरे क्वचित असतो बहुतांशी तर ठरवूनच असतं. तेव्हा रिल लाईफ मध्ये कुणी करो अथवा ना करो पण रिअल लाईफ मध्ये मात्र हा सिनेमा प्रत्येकाला (लग्न करण्याची इच्छा असलेल्यांना) करावाच लागतो.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १८ सप्टेंबर २०२०

Thursday, September 17, 2020

प्रतापगड संवर्धन मोहीम

दुर्ग रक्षणाचे अविरत श्रम जणू यांच्या पाचवीलाच पुजले  आहे म्हणूनच की काय यांना श्रमिक हे नाव शोभून दिसते. माझे प्रिय मित्र श्रमिक गोजमगुंडे यांचा दुर्ग अभ्यास म्हणजे आजच्या पिढीला मिळालेला एक ऐतिहासिक ठेवा आहे. तंजावर पासून अटक पर्यंत असलेल्या शिवरायांच्या शेकडो किल्ल्यांची पदभ्रमंती केलेला हा माणूस जणू शिवाजी राजांनी आज्ञा देऊन पृथ्वीवर धाडला असावा असेच वाटते. श्रमिक सरांनी स्थापन केलेल्या सह्याद्री प्रतिष्ठाणचे काम फक्त उल्लेखनीय नसून ते अभिमानास्पद आहे. या स्वराज्यातील प्रत्येक मावळ्याला त्यांच्या कार्याचा अभिमान आहे.

ज्या किल्ल्यांना शिवरायांचा सहवास लाभला, ज्या बुरुजावर शिवराय उभे ठाकले ते बुरुज ढासळल्यावर, तटबंदी तुटल्यावर त्या पुन्हा उभ्या करण्याची जबाबदारी कुणाची ? याचे उत्तरे अनेक आहेत पण सध्या तरी याचे उत्तर सह्याद्री प्रतिष्ठाण महाराष्ट्र हेच आहे. कारण त्यांनी आजवर केलेली दुर्गसेवा आणि किल्यांना लावलेली स्वराज्याची प्रवेशद्वारे पाहता हे काम ते लोकवर्गणीतून अतिशय प्रामाणिकपणे करू शकतील याची खात्री आहे. परवानगीच्या बाबतीत अत्यंत क्लिष्ट अशा पुरातत्व खात्याला सुद्धा सह्याद्री प्रतिष्ठाणवर विश्वास असल्याने त्यांनी गडावरील बांधकामास व प्रवेशद्वार बसवण्यास परवानगी दिली आहे.

पाण्यासंबंधी जे काम महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनने केले तसेच दुर्गरक्षणाचे काम आज महाराष्ट्रात सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. या दुर्गरक्षणाचे रूपांतर लोकचळवळीत करण्यात श्रमिक गोजमगुंडेसह प्रतिष्ठाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आहे. जेव्हा भविष्यात प्रतापगडाच्या तटबंदीचे बांधकाम पूर्ण होईल तेव्हा ते पाहताना हि तटबंदी बांधण्यात मी सुद्धा खारीचा वाटा उचललाय ही भावनाच प्रचंड समाधान देऊन जाईन.

एका माणसाने केलेल्या लाखो रुपयाच्या मदतीपेक्षा लाखो माणसांनी एकत्र येऊन गोळा केलेला एक एक रुपया केव्हाही मोठा असतो कारण त्या निधीत लाखो लोकांच्या भावना जोडल्या जातात. प्रतापगडावरच्या बुरुजाखालची ढासळलेली तटबंदी बांधण्यासाठी जो निधी लागणार आहे तो उभा करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठाणने आवाहन केले आहे. मीही फुल न फुलाची पाकळी म्हणून ₹ १००१ एवढी समिधा अर्पण करूनच हा लेख लिहिला आहे. मदत छोटी का मोठी ते महत्वाचे नसते जेव्हा छोटी छोटी मदत खूप जण करतात तेव्हा आपोआप ती मोठी होते. तेव्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या या स्वराज्य कार्यात आपणही स्वेच्छेने योगदान द्यावे ही विनंती.

सह्याद्री दुर्गसेवक 👇🏾
निधी संकलन : गुगल पे / फोन पे उपलब्ध
श्री.हरिश्चंद्र गेनबा बागडे 9869341992
श्री.सुरज सतिश नाळे 9561096421
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र - घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १७ सप्टेंबर २०२०


Monday, September 7, 2020

द फ्रेम

आजपर्यंत व्याख्यानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरलोय. गावोगावी जाऊन विचार पेरता पेरता प्रवासादरम्यान कितीतरी लोकेशन्स डोळ्यात कैद होत गेल्या. निसर्गाकडे आणि समाजाकडे पाहण्याची आणि पाहिलेलं मांडण्याची शक्ती माझ्यात का बरं निर्माण झाली असावी असा विचार सतत मनात यायचा पण आज 'इंगित' मुळे मला त्याचे प्रयोजन लक्ष्यात आलंय. खालील फोटोत दिसणारी माझ्या बोटांची फ्रेम इंगितच्या माध्यमातून तुमचे डोळे सुखावण्यासाठी आणि मेंदूला विचार करायला भाग पाडण्यासाठी सज्ज असेल. बस्स हसणाऱ्यांनी हसून घ्या आणि साथ देणाऱ्यांनी साथ द्या वेळ नाही सांगत पण तुम्हा सर्वांनाच अभिमान वाटेल अशी कलाकृती एक दिवस नक्की निर्माण करेन, तोपर्यंत छोटे मोठे प्रयत्न तुमच्यासमोर मांडत राहीलच. 'इंगित' हे पेज आत्ताच ताजं ताजं काढलंय अवश्य फॉलो करा आणि दाद देत राहा दोस्तांनो..

विशाल विजय गरड
निर्माता : इंगित प्रॉडक्शन

Saturday, September 5, 2020

बेड शिल्लक नाही

कुणी बेड देता का बेड, कोरोनामुळे श्वास घ्यायला अडचण येत असलेल्या रुग्णाला कुणी ऑक्सिजनचा बेड देता का बेड. होय, सद्यस्थितीला हेच सत्य आहे आणि अशी कितीही आर्त हाक मारली तरी बेड मिळेल याची अजिबात शाश्वती नाही. अक्षरशः माणसे घरीच मरायला सोडून द्यावी लागतील एवढी भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता ही स्थिती वरचेवर अजून भयानक होणार आहे हे सांगायला कुण्या शास्त्रज्ञाची गरज नाही. ज्या इटलीची आरोग्य व्यवस्था जगात भारी म्हणून लैकीक होता तिथे काय परिस्थिती निर्माण झाली हे आपण डोळ्यांनी पाहिले आहे मग आपली आरोग्य व्यवस्था कशी आहे हे माहीत असतानाही आपण कुणाच्या जिवावर आपला जीव बाहेर हिंडायला सोडतोय ? याचा विचार व्हावा.

फक्त लॉकडाऊन करणे हा पर्याय नाहीच तर योग्य काळजी घेऊन आपण जगणे हाच एक पर्याय आहे. पन्नाशी ओलांडलेल्यांनी तर किमान लस येईपर्यंततरी घर सोडू नये. इ पास रद्द झालेत, दळणवळण चालू झालंय, हॉटेल लॉज सुरू झालेत या सगळ्या गोष्टींचा उपयोग गरज पडेल तेव्हाच करा मौज म्हणून नको. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या स्वास्थापेक्षा सध्या कोणताच मुद्दा महत्वाचा नाही आणि असूही नये. आज जे दुसऱ्याच्या उंबरठ्यावर घडतंय तेच जेव्हा आपल्या उंबऱ्याजळ येऊन उभे राहिल तेव्हाच या लिखाणाचे महत्व पटेल तोपर्यंत हाही लेख शे पाचशे लाईक आणि पाच पन्नास कमेंटचा मोहताज असेल. आता माणसे वाचवणे हाच एक अजेंडा असायला हवा एवढेच वाटते. हे वर्ष फक्त जिवंत राहण्याचे आहे. शरीरातील अवयवांना माहीत नाही तुम्ही लखपती आहात, करोडपती आहात का गरीब आहात त्यांचे कार्य सर्वांसाठी सारखेच आहे तेव्हा त्यांची काळजी घ्या ते तंदुरुस्त तर आपण तंदुरुस्त नाहीतर स्मशान वाटच बघतंय.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०५ सप्टेंबर २०२०

Thursday, September 3, 2020

हॅप्पीबर्थडे सोनवणे सर

संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आपुलकीने विचारपूस करणारा संस्थापक, कर्मचाऱ्यांवर पुत्रवत प्रेम करणारा संस्थापक, गुणवत्ताधारक गरीब लेकरांना दत्तक घेऊन शिकवणारा संस्थापक, निट आणि जेईई सारख्या परीक्षांना न्याय देणारी तीन दर्जेदार संकुले उभी करणारा संस्थापक, पैशापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देणारा संस्थापक, एका विद्यार्थ्यांपासून सुरुवात करून हजारो विद्यार्थ्यांचे पालन करणारा संस्थापक,  स्वतःचे विद्यार्थी आज आमदार, खासदार आणि मंत्री असूनही कधीच मोठेपणा न मिरवणारा संस्थापक, विद्यार्थी आणि पालकांशी थेट संपर्क ठेवणारा संस्थापक, प्राध्यापकांकडून एकही रुपया न घेता फक्त बुद्धिमत्ता आणि विद्वत्तेच्या जोरावर त्यांना नोकरी देणारा संस्थापक, संस्थेला परिवार मानणारा संस्थापक आणि डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करून माझ्यासारख्या शेकडो कुटुंबांची भाकरी बनलेला संस्थापक संजीव सोनवणे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
डॉ.चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगांव.

Monday, August 31, 2020

कोरोना अंगावर काढू नका

१) ताप, खोकला अंगावर काढू नका. जर तसे केले तर विषाणूचा संसर्ग थेट फुफ्फुसापर्यंत जाईल आणि श्वास घ्यायला त्रास होईल. ग्रामीण भागातील लोक नेहमीचा सर्दी खोकला आहे म्हणून दुर्लक्ष करित आहेत.

२) खोकला सुरू झाला की विलगिकरण पाळा, तोंडाला मास्क आणि हातावर सॅनिटायझरची सक्ती करून घ्या ज्यामुळे इतरांना संसर्ग होणार नाही.

३) तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ऑक्सिजन बेड उपलब्ध असणार नाही. सध्या सगळीकडेच भयानक परिस्थिती आहे. सर्व कोविड सेंटर हाऊसफुल्ल आहेत. ही वेळ येऊच नये म्हणून खबरदारी घ्या.

४) तुम्हाला कृत्रिम ऑक्सिजनची गरज पडेल इथपर्यंत परिस्थिती बिघडू देऊ नका. नेहमीचा खोकला आणि फुफ्फुसाला संसर्ग झाल्यामुळे येणारा खोकला यात फरक असतो तो वेळीच समजून घ्या.

५) तुमची रॅपिड कोरोना चाचणी निगेटीव्ह अली आहे पण तरीही श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तीन दिवस क्वारँटाइन होऊन RT-PCR स्व्याबच्या रिपोर्टची वाट बघत न बसता तात्काळ डॉक्टरच्या सल्ल्याने HRCT Of Lungs हा एक्सरे काढा या द्वारे अचूक निदान होते.

६) HRCT मध्ये जर निमोनिया किंवा कोविड संसर्ग आहे असे समजले तर तात्काळ ऍडमिट होऊन उपचार सुरू करा तुम्ही दहा दिवसात बरे व्हाल. अन्यथा दिर्घकाळ व्हेंटिलेटरवर राहावे लागेल.

७) आत्ताच्या परिस्थितीत प्रत्येक गावात किमान दोन ऑक्सिजन बेडची गरज आहे. हिवाळी अधिवेशनात असा एखादा ठराव होणे अत्यंत महत्वाचे आहे.

८) जर योग्य वेळी उपचार मिळाला नाही तर जगातली सगळी संपत्ती सुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही. आणि जर वेळेत खबरदारी घेतली तर अवघ्या दहा दिवसांच्या कोविड ट्रिटमेंटने तुम्ही ठणठणीत बरे व्हाल.

९) वेळेत खबरदारी घेतली तर स्वतःला वाचवू शकता जर का वेळ घालवली तर मृत्यूशी भेट होईल. विचार करा, काळजी घेऊनच बाहेर पडा, लक्षणे दिसताच डॉक्टरशी संपर्क साधा. जान है तो जहान है 

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३१ ऑगस्ट २०२०

Saturday, August 29, 2020

इंगित प्राॅडक्शन

माझा जन्म अनेक गोष्टी करण्यासाठी झाला आहे. आजवर मी जे जे काही केले त्या सर्व कालाप्रकारांना तुम्ही प्रेम दिलंय. व्याख्याने, बॉलपेन चित्र, पुस्तके, कविता, कॅलिग्राफीज या माध्यमातून मी व्यक्त होत आलोय. हे सगळे करत असताना माझ्याकडून आणखीन एक अपेक्षा तुम्ही सतत ठेवत आलात. तीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आज मी इंगित प्राॅडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. या बॅनरची प्रत्येक कलाकृती तुमचे मनोरंजन करण्यास सज्ज असेल. आजपर्यंत माझ्या डोक्यातल्या कल्पना माईकवर बोललोय, कागदावर लिहिल्यात, चित्रात उतरवल्यात पण आता सज्ज झालोय त्या पडद्यावर साकारण्यासाठी. तूर्तास 'इंगित' लक्ष्यात ठेवा, बाकी काळजावर कोरले जाईल याची गॅरंटी देतो.

काही गोष्टी आपण स्वतः ठरवून करत असतो तर काही गोष्टी समाज आपल्यातला हुनर ओळखून करायला भाग पाडत असतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य युवकाला चित्रपट निर्मितीत पाऊल टाकायला प्रवृत्त करणारे तुम्हीच आहात. पुस्तकांच्या प्रोमोशनसाठी व्हिडीओच्या माध्यमातून भन्नाट संकल्पना राबवत राबवत हा प्रवास चित्रपट निर्मितीपर्यंत येईल असे कधी वाटले नव्हते पण कदाचित नियतीला माझ्या डोक्यातून काहीतरी उपसून मोठ्या पडद्यावर उमटवायची खुमखुमी आली असावी म्हणूनच इंगितच्या निर्मितीचा विचार माझ्या डोक्यात घातला असावा पण ते काहीही असो आता इंगित एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ठिणगी तर पडलीच आहे यावर फक्त तुमच्या प्रेमाची फुंकर टाकत राहा. हा पेटलेला निखारा कधीच विझणार नाही.

विशाल विजय गरड
निर्माता : इंगित प्राॅडक्शन

Ingit Films
Ingit Production
Ingit Entertainment

Thursday, August 27, 2020

अखेरचा हा तुला दंडवत

दिनांक २० ऑगस्ट रोजी माझे आजोबा तुकाराम गरड उर्फ बापू यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. बापूचे असे आमच्यातून निघून जाणे प्रचंड वेदनादायी होते. नातवाचा पहिला दोस्त आजोबा असतो. लहानपणी आमच्या लाडशेतातून घरी येताना बापू मला खांद्यावर बसवायचे. मी त्यांच्या डोक्याला घट्ट पकडून खांद्यावर दोन्ही पाय सोडून ऐटीत बसायचो. माझे ओझे खांद्यावर घेतलेल्या बापूंच्या पार्थिवास खांदा देताना त्या ओझ्याची आठवण झाली. बापूसोबतच्या माझ्या गेल्या ३२ वर्षाच्या आठवणी काही शब्दात व्यक्त करणे कठीणच. बाहेरून कुठूनही आलो की ढळजेत बसलेले बापू लगेच विचारपूस करायचे पण आता घराच्या उंबऱ्यात पाऊल टाकताच समोर दिसणारी बापुची रिकामी जागा सदैव त्यांची आठवण करून देत राहील.

आमच्या वाड्यातिल ढाळजेत तक्क्याला रेलून बसून खलबत्त्यात पान कुटतानाचे बापू आता पुन्हा दिसणार नाहीत, मी दूर व्याख्यानास गेलो की "अरे बघ की फोन लावून कुठवर आलाय" असे आमच्या दादांना म्हणणारे बापू पुन्हा दिसणार नाहीत, सकाळी लवकर उठून अंघोळ अष्टमी आटोपून पाणी पिऊन ढाळजेकडे जाताना दमदार आवाज टाकून "ए चहा आण रे" असे म्हणणारा आवाज पुन्हा ऐकायला मिळणार नाही, गावातील कोणत्याही लग्नातली त्यांच्या वरच्या पट्टीतली मंगलअष्टका पुन्हा कानावर पडणार नाही, श्रीराम नवमीच्या सप्ताहचे नियोजन करताना, भजन म्हणताना बापू दिसणार नाहीत. बहिणीच्या लेकरांसोबत लहानात लहान होऊन खेळणारे बापू पुन्हा दिसणार नाहीत आणि आम्हा कुटुंबियांची प्रचंड काळजी करणारे बापू आमच्यात इथून पुढे असणार नाहीत   हा विचार डोळ्यातील पाणी बाहेर पडायला प्रवृत्त करतोय.

आमच्या खांदानात सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी हातात माईक पकडला असेल तर तो बापूंनी. हजारो लग्नात मंगलाष्टके गायले त्यांनी. भजनात  किर्तनात त्यांचा आवाज वरच्या पट्टीत लागायचा. मला पकवाज शिकवला बापूंनी. बापू म्हणजे जुन्या नातेवाईकांची एक डिक्शनरी होते. खूप खूप जुन्या आठवणी, गावाबद्दलच्या त्यांच्या काळातीळ राजकीय आणि सामाजिक ठळक गोष्टी, संत तुकारामांची गाथा, भारताच्या १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्याची सकाळ, फाळणीचा काळ हे सगळं मला बापूंच्या तोंडून अनुभवायला मिळाले. बापू अतिशय समृद्ध आयुष्य जगले. पोराची राजकीय कारकिर्द आणि नातवाची प्रबोधनाची कारकीर्द ते पाहू शकले. माझ्या पोरीचे तोंड पाहून तिच्या चेहऱ्यावरून फिरवलेला त्यांचा मायेचा हात सदैव स्मरणात राहील.

माणूस जन्म घेतो तेव्हाच त्याचा मृत्यू लिहिलेला असतो फक्त तो केव्हा असतो हे माहीत नसते म्हणूनच आपण आनंदात जगत असतो. माणूस किती वर्षे जगला यापेक्षा मृत्यूपासून तो किती वर्षे वाचला हेच खरे वास्तव असते. म्हातारपणाच्या कसल्याही वेदना बापूंना झाल्या नाहीत, अखेरच्या दिवसापर्यंत त्यांना हाताला धरून न्यावे लागले नाही, काठी असायची हातात पण ती सुद्धा जमिनीवर न टेकवता रुबाबात हातात धरून चालायचे आमचे बापू. त्यांच्या आवाजातला करारीपणा, चालण्यातला ताठपणा नाहीच कधी विसरणार. "बापू, तुमचा पान कुटायचा खलबत्ता, गळ्यातली तुळशीमाळ, हातातली अंगठी, पेपर वाचायचा चष्मा, तुमचं छाटन आणि सदरा हे सगळं साहित्य तुमच्या स्मृती म्हणून जपलं जाईल जेव्हा कधी तुमची आठवण येईल तेव्हा या वस्तूत तुम्ही दिसाल. बापू, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम केलं त्याही पेक्षा जास्त प्रेम तुम्ही आम्हाला दिलंय. तुम्ही सदैव आमच्या हृदयात जिवंत राहाल जब तक है जान".

बापूंचा नातू : विशाल गरड
दिनांक : २० ऑगस्ट २०२०

Monday, August 10, 2020

धामनं

बारक्यापाणीचा ह्यो सगळ्यात आवडीचा डोंगरी मेवा. शाळेत जाताना मधल्या सुट्टीत धामनं खायची म्हणून कायबी करून आईच्या डब्यातून सुट्टे दोन रुपये घेऊन जायचो. मधल्या सुट्टीचा टोल पडला रे पडला म्हणलं की लिंबाच्या झाडांकडं चिंगाट पळत सुटायचो, तिथे घोळवेवाडी किंवा ढेंबरेवाडीच्या एखाद्या मावशी न्हायतर तर मामा एका पितळी पाटीत धामनं घिऊन बसल्यालं असायचं. वर्गात श्रीमंतांची पोरं जवा पाच रुपयाचं माप हातावर घ्ययची तवा त्यांचा लंय हेवा वाटायचा. आम्ही आपलं एक एक रुपयांची दोन मापं खिश्यात टाकून एक एक तोंडात टाकत कडा कडा फोडीत बसायचांव.

कधी कधी आमच्या शाळेतल्या 'क' तुकडीतली पोरं शाळेला येताना खिसे भरून धामनं आणायची मग त्यादिवशी त्येंला मॉनिटरचा दर्जा असायचा. हावऱ्यासारखं त्याच्या फुगलेल्या खिशाकडं बघत बसायचो असे लैमटी खिदमत झाल्यावर मग त्यो बी खिशात हात घालून 'खाओ रे गरिबो' असे म्हणून तो वाटायचा. अशा वेळी वर्गातला सर्वात ढ वगैरे असणारा तो पण डोंगरात जाऊन वेचून ताजी ताजी धामनं आणायचा म्हणून पहिल्या बेंच वरची पोरं सुद्धा त्याच्या लास्ट बेंचवर तश्रीफ ठेवायची.

चार पाच हुशार टाळकी सोडली तर आम्ही सगळे टुकार, फिरस्ती, मध्यम 'ढ' वगैरे या कॅटेगरीतले विद्यार्थी होतो पण या हातावर गुटखा, तंबाखू, मावा असलं कधी पडलं नाही म्हणून स्वास्थ आणि शरिर मजबूत ठेवू शकलो. बाकी आजच्या पोरांनी सुद्धा त्यांच्या सुंदर तळहातावर हे असले पदार्थ घ्यायला हवे. चालू वर्गात चॉकलेट खायच्या जमान्यात ही असली धामनं खायची परंपरा सुद्धा जोपासायलाच हवी फक्त ती चावताना त्याच्या बिया कडा कडा फुटत असतात आणि जर का त्यो आवाज सरला कळला तर मग ओल्या छडीचे दोन फटके खायची सुद्धा तयारी ठेवलीच पाहिजे.

आज कॉलेजवर गेल्यावर सहज डोंगरात फेरफटका मारला आणि ह्यो श्रावण महिन्यातला डोंगरी गावरान मेवा झाडाचा एक एक तोडून खाल्ला. शाळेतल्या सगळ्या आठवणी पुन्हा  वारुळातून निघणाऱ्या मुंग्यांसारखा जाग्या झाल्या म्हणून तुमच्याशी शेअर कराव्या वाटल्या. मेट्रो शिटीतल्या सुमारे नव्वद टक्के पोरांना कदाचित याचे नावही नाही सांगता येणार पण गावातल्या शाळेत आम्हाला मात्र हा मेवा नुसतं बघायला नाही तर चाखायला सुद्धा मिळाला याचे श्रेय त्या ग्रामिण संस्कृतीलाच द्यावे लागेल ज्यात मी शिकलो, वाढलो आणि आजही तिथेच राहून जग जिंकण्याची धडपड करतोय.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १० ऑगस्ट २०२०

Saturday, August 8, 2020

एम्पीयस्सी MPSC

जानेवारी २००९ साली फॉर्म भरला होता. त्याचे हे ब्राउचर मी जपून ठेवले होते आज अचानक ते या स्वरूपात दिसले. कधीकाळी पाहिलेले स्वप्न आज या अवस्थेत दिसल्यावर वाईट वगैरे अजिबात नाही वाटले, खंत तर नाहीच नाही. कारण हे माझे सर्वस्व नाही जगात खूप साऱ्या गोष्टी आहेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी. हुकून चुकून जर या स्वप्नात यशस्वी झालो असतो तर कदाचित आज विशाल गरड या नावाला जग ज्या गोष्टींसाठी ओळखते ती गोष्ट घडवू शकलो नसतो. बाकी आईने यावर मिरच्या का ठेवल्या हे माहीत नाही मीही तिला विचारले नाही पण एम्पीयस्सी वाले मात्र याचे खूप भारी अर्थ काढू शकतील.

एम्पीयस्सी हे स्वप्न आहे असायलाही हवे त्यासाठी जीवतोड जिजान मेहनत पण करायला हवी मी सुद्धा काहीकाळ केली पण हे सगळे करत असताना प्रारब्धाने आपल्यासाठी काय नियोजन करून ठेवलंय याकडेही लक्ष असायला हवे. कोणती गोष्ट का करावी यापेक्षा ती कुठपर्यंत करावी हे ज्याला समजते तो आयुष्यात कशात ना कशात नक्कीच यशस्वी होतो. एम्पीयस्सीचा नाद अवश्य करा पण तो नाद कुठं थांबवायचा हेही निश्चित करा. एखादे स्वप्न थांबवणे लगेच दुसरे पाहणे आणि ते पूर्ण करणे हे सुद्धा जमायला पाहिजे कारण स्वप्न तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाहू शकतो पण ती पूर्ण करण्याची वेळ मात्र सर्वांना सारखीच असते.

वयाच्या २१ ते ३० वर्षाचा वेळ आपण कुठे, कशासाठी आणि कसा घालवतो यावरच आपला भविष्यकाळ ठरत असतो. 'पेशन्स' नावाच्या शब्दाला सुद्धा व्हॅलीडीटी असायलाच पाहिजे नाहीतर हा तारुण्याचा सुवर्ण काळ फक्त एक नोकरी मिळवायची म्हणून खितपत पडेल. तेव्हा या चक्रव्यूहात जाताना परतीचा मार्ग सुद्धा तयार ठेवा. दोस्तांनो जगात आणखीनही लै काय करण्यासारखे आहे. या एम्पीयस्सी नामक चक्रव्यूहात घुसून पुन्हा सहीसलामत माघारी येऊन दुसरा एखादा चक्रव्यूव्ह भेदून तिथे झेंडा फडकवणारा सुद्धा एक अभिमन्यू असतोच.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०८ ऑगस्ट २०२०

Thursday, August 6, 2020

तुंबलेल्या गटारी

मुंबईच्या गटारातून पाणी कमी कचरा आणि प्लॅस्टिक जास्त वाहत आहे. त्यातला कचरा काढणारे किती आणि त्यात कचरा टाकणारे किती आहेत याचा विचार केला की उत्तर मिळते. मुंबईत माती शोधून सापडत नाही मग या गटारी गुटख्याच्या पुड्या, पाण्याच्या बाटल्या, कॅरीबॅग आणि इतर तत्सम टाकाऊ पदार्थांनीच तुंबतात. ही घाण करणारे आपणच आहोत आणि अशी परिस्थिती झाल्यावर शिव्या घालणारेही आपणच आहोत. पाणी तुंबण्याची इतरही अनेक कारणे आहेत हे मला माहित आहे पण त्यापैकी गटारी तुंबने हे ही एक महत्वाचे आहेच.

कोण म्हणतंय गटार घाण असते उलट आपली घाण वाहून नेणाऱ्या त्या स्वच्छतेच्या दूत असतात. घाण तर माणूस आहे पण बिचाऱ्या गटारी बदनाम होतात. शहरात जेवढी महत्वाची तुमची घरे आणि दुकाने आहेत तेवढ्याच महत्वाच्या गटारी आहेत. हिवाळा आणि उन्हाळा त्यात कोंबत राहायचं आणि पावसाळ्यात मग बोंबलत राहायचं हे चालायचंच. खरंतर प्लॅस्टिक बॉटल मधले पाणी पिल्यावर जेव्हा आपण ती बाटली बेदरकार पणे रस्त्यावर फेकून देत असतो तेव्हाच मुंबईची तुंबई करण्यास हातभार लागलेला असतो. या पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्या एकदिवस माणसाला पाण्यात बुडवून मारतील.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ०६ ऑगस्ट २०२०

Monday, July 27, 2020

माझी पहिली डॉलर कमाई

मागच्या महिन्यात अमेरिकेतील शार्लट मराठी मंडळासाठी मी ऑनलाईन व्याख्यान दिले होते. आज त्यांनी त्या व्याख्यानाचे स्वेच्छा मानधन पाठवले. हे माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा डॉलर मध्ये मिळालेलं बक्षीस आहे. लहानपणी अमेरिकेची नोट जरी कुणाकडे असली तरी ती बघायची प्रचंड उत्सुकता असायची. मी शाळेत असताना आमच्या एका नातेवाईकांकडून मिळालेली ती नोट मी कुतूहल म्हणून पाकिटाच्या आत जपून ठेवली होती. ती आजही तशीच आहे. फक्त वक्तृत्वाच्या जोरावर कधी डॉलर मिळतील अशी अपेक्षा केली नव्हती. भविष्यात अजून डॉलर कमवेल पण आज मिळालेल्या या पहिल्या डॉलर्सचा आनंद आयुष्यभर स्मरणात राहील. तसेच या डॉलरपेक्षा पांगरी सारख्या खेडेगावात बसून हे डॉलर देणारी माणसे कमवू शकलो याचा अभिमान वाटतोय.

आर्थिक विवंचना कुणाला नसते. या लॉकडाऊनमध्ये मलाही ती भासली. आमचे संस्थाध्यक्ष सोनवणे सर आणि काही मित्रांच्या मदतीमुळे अशा लॉकडाऊनच्या काळातही "व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय" हे पुस्तक छापू शकलो अन्यथा ही खर्चिक गोष्ट अशक्य होती. आपले काम प्रामाणिक आणि लोकहिताचे असेल तर नियती मदत आपोआप पोहोचवते म्हणतात ते खरे आहे. डॉलर स्वरूपात मिळालेली मानधनाची रक्कम आता मला पुस्तकाची दुसरी आवृत्ती छापायला उपयोगी पडेल. भविष्यात जेव्हा माझ्या पुस्तकाच्या सर्व प्रति विकतील तेव्हा त्यातून मिळालेली नफ्याची संपुर्ण रक्कम विविध उपक्रमांतर्गत पुन्हा समाजालाच द्यायची आहे ही मी स्वतःच स्वतःशी केलेली कमिटमेंट आहे जी आजवर पाळत आलोय आणि पुढेही पाळली राहील.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ जुलै २०२०

Sunday, July 26, 2020

गोष्ट एका लॉकडाऊनची

शहरातील एका झोपडीवजा घरात राहणारा एक माणूस, घरात खाणारी सात तोंडं त्याच्या स्वतःसह बायको, म्हातारे आई वडील आणि दोन मुली व एक मुलगा. घरात कामावणारा हा एकटाच माणूस. रोज सकाळी एखाद्या भाकरीत मोकळी भाजी बांधून रोजगाराच्या शोधात चौकात उभा राहायचे. मिळेल त्या कामावर रोजंदारी करून दिवसाकाठी ३०० रुपये कमवायचे. मागच्या लॉकडाऊनमध्ये घरात होते ते सगळे संपले. आई वडिलांच्या औषधांच्या खर्चासह रोज किमान ५०० रुपये लागतात त्याला घर चालवायला पण सध्या वजाबाकीत सुरू आहे त्याचा संसार. कसे बसे दिवस काढून तो सोमवारपासून पुन्हा कुठेतरी काम करून तोंडाची आणि पोटाची भेट घालू इच्छित होता. दहा दिवसांच्या लॉक डाऊन आजच संपला होता म्हणून सकाळी लवकर उठून तो डब्बा घेऊन बाहेर पडला. तेवढ्यात शेजारच्या बंगल्यातील एका पोराने सोशल मिडियावर स्थानिक पत्रकारांनी टाकलेला प्रशासनाचा आजचा निर्णय वाचला आणि लगेच एका मित्राला कॉल करून बोलू लागला "काय यार, अजून पाच दिवस लॉकडाऊन वाढवला राव" सगळ्या वेबसिरिझ बघून झाल्या, साऊथचे आणि हॉलिवूडचे तीन चार डझन पिक्चर बघून झाले, रोज नवनवीन पदार्थ ट्राय करून पण आता कंटाळा आलाय बाबा, आता नवीन काय बघावे याचे टेन्शन आलंय राव. लंय बोरिंग जाणार यार अजून पाच दिवस" कामाच्या आशेने हातात डबा घेऊन चाललेला तो माणूस त्या पोराचे बोलणे ऐकून तसाच माघारी घरी जातो. लेकरं विचारत होती पप्पा माघारी का आलाव ? मोकळ्या सिलेंडरवर रचलेल्या सरपणातली दोन लाकडं चुलीत घालत बायकोने शेवटचे तांदूळ शिजायला टाकले. म्हातारे वडील पाकिटातली शेवटची गोळी थर थरत्या हाताने बाहेर काढत होते. हातातला डबा खाली ठेवून डेऱ्यातले घोटभर पाणी पिऊन तो उत्तरला "अजून पाच दिवस लॉकडाऊन वाढलाय" हे ऐकून पुढचे पाच दहा मिनिटे कुणीच कुणाला बोलले नाही. बायको डब्याकडे, लेकरं चुलीकडे आणि वडील गोळ्याच्या पाकिटाकडे एकटक बघत राहिले. त्या भयाण शांततेत शेजारच्या घरातील टीव्हीचा आवाज येत होता. "लॉकडाऊन मध्ये सेलिब्रिटी त्यांचा वेळ घरी कसा घालवत आहेत ते बघा." खरंतर मला एक सुंदर शॉर्ट फिल्म तयार करता आली असती या गोष्टीवर पण मी काय दाखवतो यापेक्षा हा लेख वाचताना तुमच्या डोळ्यासमोर जे उभा राहते ते मला जास्त महत्वाचे वाटते म्हणून हे लिखाण तुमच्यासोबत शेअर केले.

लेखक : विशाल गरड
दिनांक : २६ जुलै २०२०

Friday, July 24, 2020

पुस्तक प्रकाशनाची संकल्पना

आजपर्यंत माझ्या प्रत्येक पुस्तक प्रकाशन सोहळ्यातून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत आलोय. सर्वसामान्यांना प्रकाशनाचा मान देत आलोय, माझ्या मेंदूत शिजलेल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देत आलोय; त्याला हा प्रकाशन सोहळा तरी कसा अपवाद ठरेल. "व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय" या नवीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय खूपच भन्नाट, प्रेरणादायी आणि तितकाच आल्हाददायी सुद्धा. लॉकडाऊनमुळे इच्छा असतानाही तुम्हाला आमंत्रित करू शकत नाही. हो पण २५ जुलैला सकाळी झालेला हा प्रकाशनाचा सोहळा मी दृकश्राव्य माध्यमात कैद करून त्याचदिवशी संध्याकाळी तुम्हाला पाहण्यासाठी उपलब्ध करेल. माझ्या यू ट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर तुम्ही या प्रकाशनाची चित्रफीत अवश्य पाहा. 

#व्हय_मलाबी_लेखक_व्हायचंय
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २४ जुलै २०२०

Wednesday, July 22, 2020

पाण्याचं सोनं करणारी 'सोनाली'

फोटोतल्या मागच्या ब्याकग्राऊंडवर जाऊ नका माझ्या सोबत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव कोरणारी महाराष्ट्राची सुकन्या आणि माझी मैत्रीण सोनाली पाटील. ही एक जागतिक दर्जाची 'जलतज्ञ' आहे. तिने जल संवादक म्हणून जलसाक्षरता मोहीम सुरू केली. प्रवास शाश्वत विकासासाठी या प्रकल्पांतर्गत गेल्या दहा वर्षांपासून ती महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा खात्यात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. डेन्मार्क येथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल टॅलेंट म्हणुन जगभरातून तिची निवड करण्यात आली. तिला युनायटेड नेशनचे पाणी आणि दुष्काळ निवारणासाठी प्रशस्तीपत्रक मिळाले असून आजवर तिने इस्राएल मध्ये पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलंय तर सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मध्ये धरण आणि पाणी पुनर्वापर प्रकल्पावर काम केले आहे. युरोप, नेपाळ, सिंगापूर येथे 'पाणी' या विषयावर  तिचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. ती सध्या पाणी आणि जागतिक हवामान बदल यावर पी.एच.डी करत आहे.

सध्या लॉकडाऊनच्या काळात ती त्यांच्या टेंभुर्णी नजिकच्या शेतात राहतेय हे समजताच अरविंद आणि हनुमंतसह फोर्डमध्ये थेट तिचे शेत गाठले. जाण्याआधी अपॉइंटमेंट मागितली कारण आमची याआधीची भेट होऊन जवळ जवळ पाच वर्षे उलटली होती पण कर्तृत्वाचे उंच शिखर गाठूनही ती मात्र तशीच होती. म्हणाली "अरे ये रे केव्हाही अल्वेस वेलकम" देश विदेशात फिरलेल्या, अनेक पुरस्कार मिळवलेल्या, अशा प्रचंड हुशार मैत्रिणीला आपण केव्हाही भेटू शकतो हा मैत्रीला लाभलेला आपुलकीचा पुरस्कारच असतो. आयुर्वेदावरही तिचा अभ्यास तगडा आहे. तिच्या सोबत आपण जेवढा वेळ घालवू तेवढा वेळ आपणही शाश्वत विचार करायला लागतो हे माझ्या अनुभवातून सांगतो. बाकी आम्ही घरी गेल्यावर सोनूच्या माँ ने केलेल्या आदरातिथ्याने भारावून गेलो.

बऱ्याच वर्षांनी आज तिची भेट झाली. आम्ही बोलताना वारुळातून मुंग्यांची झुंड निघावी तशा नवनवीन कल्पना सोनूच्या मेंदूतून निघत होत्या. अशा व्यक्तिमत्वासोबतच तास दोन तासांची भेट म्हणजे संबंधित विषयातल्या पाच पन्नास पुस्तकांची उजळणी असते. सोनालीचे वडील भारत पाटील हे निवृत्त डि.वाय.एस.पी असून रिटायरमेंट नंतर त्यांनी गावाकडे सेंद्रिय शेतीवर मोठे काम उभारले आहे. सोनाली सुद्धा वडिलांकडून शेतीचे धडे घेता घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन सस्टेनेबल इंडिया या प्रोजेक्टवर काम करत आहे. ती करोडोची मालकीण आहे पण करोडो रुपये देऊनही मिळवता येणार नाही एवढा डाऊन टू अर्थ तिचा स्वभाव आहे. तिचे विचार गावकुसात जन्म घेऊन चंद्रावर जाणाऱ्या मुलीचे प्रतिनिधित्व करतात. भारतातल्या एक टक्के पोरींनी जरी सोनालीला फॉलो केले तरी प्रचंड मोठे कार्य घडू शकते. 

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : २२ जुलै २०२०

पुस्तकाला आहे यांची प्रस्तावना

प्रस्तावना म्हणजे जणू पुस्तकाचा आरसा, व्यक्तिमत्व विकासावर आधारित पुस्तक लिहिलंय म्हणल्यावर त्याला प्रस्तावना सुद्धा तितक्याच ताकदीच्या व्यक्तिमत्वाची हवी. पुस्तक लिहितानाच एक नाव डोळ्यासमोर होते ते म्हणजे सचिन अतकरे. आजवर सोशल मिडियावर या माझ्या दोस्ताचे थेट काळजातून पाझरलेले लिखाण मी वाचत आलोय. पाणी फौंडेशन, कोल्हापूरचा पूर आणि आता कोरोना कालखंडात त्याने त्याच्या लेखणीतून समाजाला सकारात्मकतेचे सलाईन लावण्याचे काम केले. 

मी हट्ट धरल्यावर तो मला नाही म्हणूच शकत नव्हता याची खात्री होती मला. वुई विल हेल्प च्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मदत करण्याच्या आणि त्याच्या ऑफिसच्या व्यस्त कामातून वेळ काढून सचिनने पुस्तकाचा अर्क काढलेली सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. सच्या, याबद्दल तुझे आभार वगैरे काही नाही बरं कारण अजून सोबत राहून खूप काम करायचंय आपल्याला. हम्म बाकी पुस्तकात छापलेल्या तुझ्या शब्दांना मात्र मनापासून धन्यवाद. तुझ्या प्रस्तावनेने 'व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय' या पुस्तकाचे वजन वाढले. या आमच्या सचिनची पुस्तकाच्या पीचवरची अकरापानी खेळी अवश्य वाचा.

#व्हय_मलाबी_लेखक _व्हायचंय
लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २२ जुलै २०२०


Monday, July 20, 2020

माझं नवीन पुस्तक

खरं तर हे पुस्तक लिहिणे म्हणजे एक दिव्यच होते. लिहायला बसल्यावर पहिले दहा बारा दिवस तर नेमकी सुरवात कशी करावी आणि शेवट कसा करावा हाच विचार करण्यात गेले. मग स्वतःच्या अनुभवात जरा डोकावून पाहिले तेव्हा खरी मेख इथेच सापडली, पेन उचलला आणि लिहीत गेलो. हजारो लाखो जनांचे हे स्वप्न साकार होईल असं काहीतरी शाश्वत, अभ्यासपूर्ण तरीही तितकंच सहज,सोपे आणि थोडक्यात लिहायचे; असे गेली खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात होते. अखेर लॉकडाऊनचा सदुपयोग करून मिळालेला वेळ पुस्तक लेखनात सार्थकी लावला आणि माझेही ते स्वप्न पूर्ण झाले.

हे पुस्तक वाचण्याची तुमची इच्छा आणि पुस्तकाचे प्रकाशन यात जास्त अंतर न ठेवता या जुलै महिना अखेरपर्यंत ते तुमच्यापर्यंत 'सुरक्षित' पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. आजवर जो प्रतिसाद तुम्ही माझ्या ह्रदयांकित, रिंदगुड आणि मुलूखगिरी या पुस्तकांना दिला त्यापेक्षा जास्त प्रतिसाद "व्हय ! मलाबी लेखक व्हायचंय" या पुस्तकाला द्याल याची खात्री आहे. अतिशयोक्ती नाही पण तितकं दर्जेदार झालंय म्हणून म्हणतोय. बाकी पुस्तकाला प्रस्तावना कुणाची ? त्याचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ कसे ? त्याची किंमत किती ? प्रकाशन केव्हा ? कुठे ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरेही लवकरच देईन तूर्तास माझ्या कुंचल्यातून साकारलेली ही पुस्तकाच्या शिर्षकाची कॅलिग्राफी; डोस्क्यात फिट्ट करून ठेवा !

लेखक : प्रा.विशाल गरड

Wednesday, July 15, 2020

वडाची कत्तल

४०० वर्ष जुने झाड जर रस्ता करण्यासाठी आडवे येत असेल तर आपली झक दुसरीकडून मारावी ना. झाड तोडणे हाच एक पर्याय असतो का ? नका राव एवढे निष्ठुर होऊ, लॉकडाऊनमुळे आम्हा पर्यावरण प्रेमींना आंदोलन उभा करता येणार नसल्याचा असा फायदा घेऊ नका. मला मिळालेल्या माहितीनुसार वन्य जीव कायद्याने सदर झाडाला राष्ट्रीय संपती जाहीर केली आहे तरीही एका महामार्गासाठी आता या झाडाचा खून होणार आहे किंवा केलाही असेल कदाचित.

प्रशासनाला त्यांची रस्ते बांधणी कला एवढीच दाखवायची असेल तर उड्डाणपूल बांधा त्या झाडावरून, जगात नाव होईल तुमचे. असेही सर्वसामान्य जनतेकडून कर स्वरूपात आलेल्या पैशातूनच होतात ही विकासकामे. मग टेंडर काढल्यापासून ते रोड होईपर्यंत कुणाला किती पैसे मिळतात हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. हे रस्ते बनवण्यात सर्व्हिस कमी अर्थकारणच जास्त असते. तेव्हा काय पोटभर खायचे ते खावा बाबांनो, पण त्या झाडाला तेवढं जीवदान द्या. काय आहे ना; त्याला बिचाऱ्याला ४०० वर्षापूर्वी माहीत नव्हते ओ की पुढे चालून आपण रस्ता करायला अडचण करणार म्हणून नाहीतर ते उगवलंच नसतं की.

आम्ही म्हणत नाहीत एकही झाड तोडू नका. शेवटी विकासकामे करताना ते शक्यही नाही पण निदान महाकाय वृक्ष तरी वाचवत चला. हल्ली रस्ते सुद्धा खरच लोकांच्या सोयीसाठी की नेते व अधिकाऱ्यांनी त्या रोडच्या कडेला घेतलेल्या जमिनीचे भाव वाढवण्यासाठी होतात ? याचीच शंका वाटते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या माननीय पर्यावरण मंत्र्यांनी 'जनता गॅरेज' चित्रपटातील तामिळ हिरो एन.टी.आर सारखी एन्ट्री मारून हे झाड वाचवायला हवे असे मला वाटते. खुर्ची चार दिवसाची पाहुनी असते पण जर तेवढ्यात सुद्धा अशी काही धाडसी कामे केली की लोक तुम्हाला खुर्ची गेल्यावरही लक्ष्यात ठेवतात. 

गेल्या ४०० वर्षात त्या गावातल्या दहा बारा पिढ्या या झाडाखाली खेळल्या असतील. करोडो आठवणींचे हे जिवंत दैवत असेल. करोडो रुपयांचा ऑक्सिजन फुकटात दिला असेल तसेच करोडो पक्ष्यांनी जन्म घेतला असेल याचा फांद्यांवर पण अरे माणसा ! तुला तुझ्या गाड्या प्रदूषण करीत करीत न्यायच्यात ना मोठ्या रस्त्यावरून मग त्यापुढे हे झाड किस खेत की मुली. "हे वटवृक्षा आम्हाला माफ कर, सध्यातरी तुझ्यासाठी हे चार शब्द लिहिण्याशिवाय दुसरं काहीच काही करू शकत नाहीत आम्ही, पण या शब्दांना जर भाले फुटले तर मात्र तू नक्कीच वाचशील याची खात्री आहे. वाचलास तर एक दिवस नक्की येईल तुझ्या सावलीतला धन्यवाद स्विकारायला नाहीतर इथूनच जड अंत:करणाने तुला भावपुर्ण श्रद्धांजली.

झाडाचा पत्ता.
मु.पो.भोसे, ता. मिरज, जि.सांगली.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १५ जुलै २०२०

Saturday, July 11, 2020

वडाचं पिल्लू

माझ्या घराम्होरं एक मोठ्ठ वडाचं झाड हाय, तवा डोस्क्यात ईच्चार आला की आपुण तर आपलं वंश तयार करतुय पण ईतकी वरीस झालं आजुन ह्यजा वंश तयार नाय म्हणूनच मग या झाडाचं पिल्लू रानात न्हिऊन लावायसाठी त्या मोठ्ठ्या झाडाची ही फांदी तुडुन आणलीया. माझा धाकला भाऊ युवराज आन् म्या सकाळच्यापारीच ह्यो खेळ मांडलाय. चांगला दोनफुट खोल खड्डा खांदुन त्यात शेण आणि पालापाचोळा टाकुन ही फांदी लावून टाकली. आळं करून त्यात पाणी वत्ताना जणू रडणारं लिकरू आईचं दुध तोंडाला लागलं की जसं गप पडतंय तसंच आमच्या वडाचं ही पिल्लूबी खड्ड्यात गेलं की गप झालं. बाळाला जसं टकुचं आस्तय नव तसंच ह्या फांदीच्या डोक्यावर शेणाचं टकुचं बशिवलंय. लय आनंद झालाय आज आमचं झाड डिलीवरी झालंय.

आईबरूबर लेकराचं रक्ताचं नातं आस्तंय जणू, या लेकराला त्येज्या आईच्या पोटातुन बाहीर काढताना म्या पाहिलंय ते रगात. आरं कोण म्हणतंय झाडांला रगात नसतंय आवं अस्तंय की, वडाच्या झाडातुन निघणारं पांढरं चिकाट रगात हाताला लागल्यावर निघता निघत नाय. हेच रगात या फांदीला मातीसंग लवकर चिटकीवतंय. लका आपला वंश वाढावा, नांव चालावं, खांदान टिकावं म्हणुन किती जिवाचं रान करताव आपुण मंग या झाडांलाबी त्यो आधिकार हायच की, नुसतं फांद्या लावून येणारी झाडं आशी वांझ ठिऊ नगासा. तुमच्याबी घराजवळ, पटांगणात न्हायतर रानात जर आसंल एकांदं वडाचं न्हायतर पिपळाचं झाड तर त्या झाडाचा वंश नक्की वाढवा.

जगात ह्येज्यापेक्षा भारी ईकान कोण्चंच नाय, आवं कुठल्या आणल्यात्या बंदुकी आन बाॅम्ब. ही एक वडाची फांदी हजारो वरीस जगण्याचं सामर्थ्य ठिवती फकस्त तीला चिटाकणं गरजेचं हाय. जगातली समदी क्षेपणास्र माणसं मारायसाठी बनिवल्याती पण हे माझ्या हातातलं ईकान मातुर माणसं जगिवण्यासाठी तयार केलंय निसर्गानं. लहानपणी खोट्या बंदुकी हातात घिऊन लयंदा ढिश्क्यांव - ढिश्क्यांव खेळलोय पर आता समजतंय त्येज्यापरिस ह्ये अशा फांद्या तुडुन जर मातीत लावायचा खेळ खेळला आस्ता तर आतापतुर एक बारंकं जंगल तयार झालं आस्तं. जाऊंद्या आता माझ्या पुरीला म्या झाडं लावायचा खेळ शिकवीन. जे आपल्याला नाय जमलं ते आपल्या लेकरांकडून जमवून घ्येयचं ह्यालाच तर संस्कार म्हणत्यात ना. बरं ह्यो फुटू काय मज्जा म्हणुन नाय काढला ह्ये वरी ल्हिवल्यालं समदं सांगायचं व्हतं तुम्हास्नी म्हणुन केला हा अट्टाहास. वडाच्या पिल्ल्यासोबतचा ह्यो फुटू आन् त्या फुटू मागचा ईच्चार जर तुम्हास्नीबी आवडला तर जाऊंद्याकी ही पोस्ट लांबपतूर. होऊंद्या एक शेअर पिल्लू के नाम.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ जुलै २०२०


Wednesday, July 8, 2020

राजगृह

पुस्तके नाही वाचली की दगडं हातात येतात. आपल्या हातात दगडे उचलण्याची वेळ येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी पुस्तकाचे घर उभा केले. बाहेरून दगडे मारणार्यांनी आत जाऊन त्या राजगृहातले एखादे पुस्तक जरी वाचले असते तरी जगण्याची दिशा सापडली असती पण साला तुमचा मेंदूच सडका होता त्याला कोण काय करणार. आज बाबासाहेब असते तर म्हणले असते "अरे एवढ्याशा दगडांनी काय होणार आहे, जावा आणखीन मोठं मोठी दगडे घेऊन या त्या सगळ्यांना एकत्र करून मी अजून एक पुस्तकांचे घर बांधीन तुमच्या लेकरांसाठी, जे वाचून ते शिक्षित आणि सुसंस्कृत होतील आणि मग तुमच्यासारखे हे असे हल्ले करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही" अरे माथेफिरूंनो दगडांनी पुस्तके फुटत नसतात रे. राजगृहवरील हल्ल्याचा निषेध.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड

सॅनिटरी पॅड

औरंगाबादची माझी मैत्रीण ऍड. निकिता गोरे ही नेहमीच सामाजिक संवेदनशील विषय हाताळत असते. समाजातील वंचित आणि दुर्लभ घटकांबद्दल, त्यांच्या प्रश्नांबद्दल तिला विशेष आकर्षण आहे. अनाथ मुले आणि वृद्धाश्रमातील आजी आजोबांना ती नेहमीच भेटत असते आणि त्यांना आनंद देण्याचा तिच्यापरीने प्रयत्न करत असते. आजचा हा लेख तिने घेतलेल्या निर्णयास पाठबळ म्हणून लिहित आहे. तिने उचललेला हा मुद्दा आईचा मुलगा म्हणून, बायकोचा नवरा म्हणून, बहिणीचा भाऊ म्हणून, मुलीचा बाप म्हणून, प्रेयसीचा प्रियकर म्हणून सर्वांनीच पुढे न्यायला हवा. अर्थात तो आहेच तितका महत्वाचा. वरवर सहज दिसणाऱ्या या गोष्टी खोलवर खूप मोठी जखम होऊन बसल्यात. स्त्रियांच्या या अडचणीसाठी फक्त काही स्त्रियांनीच नाही तर तिच्या पोटी जन्माला आलेल्या प्रत्येकानेच सोडवायला हव्यात.

लॉक डाऊन ४.० मध्ये शहराकडून खेड्याकडे जाणाऱ्या मोलमजुरी करून खाणाऱ्या स्त्रिया जेव्हा पायपीट करत होत्या तेव्हा जिथे दोन घासांची सोय व्हायची पंचाईत तिथे मासिक पाळीसाठीचे नॅपकीन मिळणे तर मुश्किल होते. "मासिक पाळीच्या रक्ताचे थेंब पायावरून जमिनीवर ओघळत असतानाही कडेवर लेकरू आणि डोक्यावर बिऱ्हाड घेऊन चालणारी स्त्री पाहिली की काळजात धस्स होतं." ज्यांच्या खिशात दहा रुपये असतील त्यांनी वीस रुपयांचे पॅड घ्यायचे का दहा रुपयांची थाळी घ्यायची ? पोटाचे भागेलही पण पोटाखालच्या गोष्टींचे काय ? त्यातही कुणी फडके सोबत घेऊन निघाले असतील तरी रस्त्यावर आडोसा मिळणेही मुश्किल होते, स्वच्छतेसाठी तांब्याभर पाणी तरी कुठे होते ?

हे विदारक दृष्य पाहिल्यानेच निकिता मधली एक सृजनशील स्त्री जागी झाली आणि तिने याबद्दल कायमस्वरूपाचा उपाय शोधायचं ठरवलं. खरंतर मध्यंतरी या विषयावर ती नेहमीच माझ्याशी बोलायची मी देखील शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तिच्या विचारांचे खूप कौतुक वाटले. स्त्रियांबद्दल आपल्याला आस्था वाटणे हे फक्त बोलण्यापूरतेच मर्यादित न ठेवता तिने त्यासाठी संविधानाची शक्ती वापरून कायदाच करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. ऍड. निकिता गोरे आणि ऍड. वैष्णवी घोळवे या आपल्या भगिनींनी ऍड. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे.

"सॅनिटरी नॅपकिन्सना अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या सेक्शन २(अ) मध्ये समाविष्ट करून रेशनिंग दुकानांमध्ये अत्यावश्यक वस्तूंसोबत पुरवठा करण्याचे आदेश मिळावेत" 
अशा स्वरूपाची ही याचिका सत्तर टक्के गरिब लोक राहत असलेल्या देशात अत्यंत गरजेची वाटते. आपल्या देशात दरवर्षी १,२२,८४४ स्त्रियांना गर्भ पिशवीचा कॅन्सर होतो. यातल्या बहुतांशी स्त्रियांना कॅन्सर होण्याचे मुख्य कारण हे पाळीच्या वेळेस झालेला संसर्गामुळे आहे. सॅनिटरी नॅपकिन्स बनवणाऱ्या कंपन्यांनी बाजार मांडलाय. टिव्हीवर जाहिरातींचा भडिमार सुरू आहे पण त्या पॅड वापरूनही इन्फेक्शन झाल्याच्या घटना भरपूर आहेत. यासंबंधीत चित्रपट देखील करोडोची कमाई करून गेले पण जोपर्यंत सामान्यातील सामान्य स्त्रीपर्यंत 'मेन्स्ट्रुअल हायजिन' बाबत जनजागृती होत नाही तोपर्यंत आपण जिंकणार नाहीत.

आपण प्रत्येकजण स्त्रीच्या गर्भात निर्माण झालो आहोत. आईच्या दुधाचे पांग फेडण्याच्या गोष्टी आपण खूपवेळा ऐकल्या असतील पण या बिलाला समर्थन देऊन फक्त आईच्या दुधाचेच नाही तर आईच्या उदराचे सुद्धा पांग फिटतील. चला तर मग तिच्या आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी आपण लढूया आणि तिला जिंकवूया. ऍड. निकिता गोरे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेचे मी समर्थन करतो.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ८ जुलै २०२०

Friday, July 3, 2020

घुंगरं शांत झाली

आत्ताच सरोज खान यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि डोळ्यासमोर त्यांच्या हजारो गाण्यांच्या छबी उमटायला लागल्या. चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत सरोज खान यांनी सुमारे दोन हजारहून जास्त गाण्यांची नृत्य बसवली. नव्वदच्या दशकातील सर्व गाजलेल्या गाण्यांचे नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांचेच. माधुरी दिक्षित, श्रीदेवी, ऐश्वर्या राय ते दिपीका पादुकोण पर्यंतच्या जवळ जवळ सर्वच अभेनेत्रींना सरोजजीनी नृत्य शिकवले. आपल्याला फक्त पडद्यावर नाचणाऱ्या हिरोईन दिसायच्या पण त्यांना नृत्य शिकवणारी खरी हिरोईन आज आपल्यातून निघून गेली. सरोज दिदींनी भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अमूल्य आहे. जसे क्रिकेट म्हणले की सचिन, अभिनय म्हणले की अमिताभ, आणि संगीत म्हणले की लता तसंच नृत्य दिग्दर्शन म्हणलं की सरोज हे नाव अधोरेखित होत होते.

एक दो तीन (तेजाब), हवा हवा ई (मी.इंडिया), हमको आज कल है इंतजार (सैलाब), डोला रे डोला (देवदास), तम्मा तम्मा लोगे (थाणेदार), धक धक करने लगा (बेटा), चोली के पिछे (खलनायक), ये ईश्क हाये (जब वुई मेट), बरसो रे (गुरू), ताल से ताल मिला (ताल), राधा कैसे ने जले (लगान) मेरा पिया घर आया (याराना) ही सर्व गाणी आणि यातली नृत्य एक इतिहास आहे आणि तो घडवलेली नृत्य विरांगना म्हणजेच सरोज खान होय. कधी कधी पडद्यामागच्या काही कलाकारांची फक्त नावे घेतली की फारसे लक्ष्यात येत नाही पण त्यांच्या कलाकृती दाखवल्या की त्यांचे डोंगराएवढे कार्य समोर उभा राहते म्हणूनच वरील गाणी मी मुद्दाम इथे नमूद केली.

त्यांनी बसवलेली एक गाण्याची स्टेप भारतातील करोडो मुले मुली स्नेहसंमेलनात सादर करायचे, सहज सुंदर आणि सोपा पण तितकाच काळजाला भिडणारा नृत्य प्रकार सरोजजीनी उदयास आणला. अंगा पिंडाने जाड असतानाही नृत्य शिकवताना त्यांच्या शरीराची होणारी हालचाल गवताच्या पात्यासारखी असायची. सरोज दिदींची आणि माझी काही ओळख नव्हती पण त्यांच्या नृत्याची नक्कीच होती. आज या रंगभूमीवरील त्यांची घुंगरे जरी शांत झाली असतील तरी त्या घुंगरातून निर्माण झालेला आवाज प्रत्येकाच्या कानात सदैव गुंजत राहील. सरोज दिदींना भावपुर्ण श्रद्धांजली.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३ जुलै २०२०


Wednesday, July 1, 2020

चालतफिरत

आज लय दिसातून काॅलेजहून उक्कडगांवपस्तोर चालत आलो. म्हागटलं चार दोन पौस निब्बार झाल्यामुळं नद्या उगं खळखळा वाह्य लागल्यात्या. काल माझी फोर्डची सर्व्हिशींग करायला लातूरला गेल्तो. गाडीला रानडुक्कराची धडक झाल्यामुळं ते येशीचा चेंबर का काय म्हणत्यात ते फुटला व्हता. लाॅकडाऊनमुळं शोरूममदीबी ते पार्ट नव्हतं; मंग काय पुन्ह्यांदा हेल्पाटा मारन्यापेक्षा जवा येत्याल तवा बसवा म्हणून मी बाहीर पडलो पण गावाकडं ययची पंचायत झाली. मग प्रा.उतके सरांकडं मुक्काम करून आज सकाळी आमचं संस्थाध्यक्ष सोनवणे सरांच्या इंपोर्टेड  स्कोडा गाडीत उक्कडगांवच्या काॅलेजपर्यंत आलो. आता काॅलेजपसुन घरापर्यंतचं आंतर आठ एक किलुमिटर हाय तवा म्हणलं कुठं कणाला बुलवीत बसा जाऊ चालत बीगी बीगी. पाटील सर सोडायला येतो म्हणत व्हतं पण त्यंलाबी म्हणलं जातो चलत. तसंबी रोज चार किलोमिटर चलायची सवय हायचं म्हणा. सर लैच अट्टाहास  करायलं म्हणुनशान मग माझा भाऊ रूपेशला फोन केला आन् म्हणलं "ये उक्कडगांवपस्तोर, तवर मी येतो तिथपर्यंत चालत. आल्यावर नदीच्या पल्याडंच थांब."

माझ्या घरापसुन ती काॅलेजपर्यंतचा रस्ता म्हंजी निसर्गानं ऊगं लय मन लावून तयार केलेली एक भारी कलाकृतीच जणू. आख्खं 'रिंदगुड' हे पुस्तक ह्या रोडवरून गाडीवर जाता येता दिसलेल्या, अनुभवलेल्या गोष्टींवर लिव्हलंय म्या. ह्यज्या आदीबी म्या लैंदा आस्लं आनुभव लिव्हल्यातं पण आज चालत येताना निसर्गाच्या कुशीत फिरता फिरता डोळ्याचं पारणं फिटावं एवढं भारी वाटलं. गर्द हिरव्या झाडीतुन सावलीच्या आंधारात झाकल्याल्या पाऊल वाटंवरून चलताना पक्षी, प्राणी, किटक बघत बघतच पावलं टाकत व्हतो. हातात एक पिशवी व्हती पण पुस्तकाच्या वझ्यानं तेचाबी मदीच बंद तुटला. मंग काय हातातच पस्तकं घिऊन माझी आपली पायपीट चालू झाली. रस्त्यानं येणारं जाणारं वळकीचं समदं शेतकरी लय आपुलकीनं ईचारायचं "आवं सर, आज चलत का गाडी कुठं हाय ? यिऊ का सोडायला न्हायतर ह्योका घिऊन जावा ही गाडी". "न्हाय ! मुद्दामंच चाललोय चालत, घरून बुलीवलंय भावाला यिलच ह्येवढ्यात."

गावाजवळच्या नदीवर आल्यावर मातर म्या पॅन्ट वर सारली, चप्पला एका हातात आन् पुस्तकं दुसऱ्या  हातात घिऊन शेवाळल्याल्या दगडावर दबकत दबकत पाय ठिवत खळखळा वाहणाऱ्या पाण्यातुन चालू लागलो. खरंच आस्ला आनुभंव शेवटचा कधी घेतला हे आठवत सुदा नव्हतं. लहानपणी ही कसरंत रोजची वाटायची पण आता गाड्या घोड्यामुळं ही आसली जिंदगी जगायलाच मिळत नाही. समदी आपली त्या येळंसोबत शिवनापाणी खेळत्याती आन् त्येज्याच नादात निसर्गाच्या हातात हात घालून जगण्याला मुकत्याती. म्या मातर हे आस्लं जिनं सारखं जगण्याचा प्रयत्न करत आस्तोय. मनाला निसर्गाच्या सानिध्यात राहायचा चटका लावला की ते आपोआप आसल्या गोष्टी आपल्याकडुन करून घेतंय.

जगातली सगळी सुखं निसर्खानं आपल्याउशाला ठिवल्याती पण साला आपुन सुख कशात हुडकतांव हिच समजत नाही. अनवानी पायानं वाहत्या वड्यात चालताना त्या गुळगीळीत दगडांचा तळपायाला झाल्याला स्पर्श पार मेंदुला ताजातवाना करत व्हता. खरंतर चालतानाच आज काहीतरी ल्ह्ययचंय हे ठरीवलं व्हतं पण सोबत फुटूबी तेवढाच जिवंत पायजे व्हता मग काय नदीच्या पल्याड यीऊन थांबलेल्या रूपड्याला ह्यो फुटी टिपाया लावला त्यंनंबी नेमका टिपला म्हणुनंच माझं लिखाण ह्या फुटूला डिक्टो मॅच झालं. पुढं गाडीवर बसायच्या आधी जवळंच आसल्याल्या कोरड्या दगडांवर बसुन दुनी पाय पाण्यात सुडुन, डोळे मिटुन वाहत्या पाण्याचा खळखळ आवाज ऐकत तल्लीन झालो. दिवसभरातला सगळा तान तनाव वाहूण गेला. मन स्वच्छ आणि शद्ध झालं त्याच वाहत्या पाण्यासारखं. अंतरंग तर धुतलंच व्हतं, घरी आल्यावर हात पाय तोंड धुवून बाह्यअंग पण धुतलं. चहाचा फुरका घेत घेत आजचा हा अनुभव टायपीत बसलो. सरतेशेवटी निसर्गासाठी जशा किड्या, मुंग्या, पशु, पक्षी तसाच माणुससुद्धा तेव्हा आपण लावलेले सगळे शोध एकदा खुटीला टांगुण त्या मातीला पायाचा स्पर्श करून बघा लय जब्राट ताकद हाय यात.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १ जुलै २०२०

Tuesday, June 30, 2020

टिक टॉक

आज टिक टॉक बंद झाले. माझे तर टिक टॉकवर अकाउंटच नव्हते पण कधी तरी विरंगुळा म्हणून मीही ते व्हिडिओ पाहायचो. तळागाळातील अनेक कलाकारांना टिक टॉक मुळे व्यासपीठ मिळाले ज्यांची कोणी दखल घेत नव्हते ती लोकं याच माध्यमातून स्टार झाली. तुमच्या रूपाने नाही तर तुमच्या मध्ये असलेल्या वेगळेपणामुळे जग तुम्हाला ओळखू शकते हे टिक टॉकमुळे शक्य झाले. भारतात जेवढे काही या अॅचे युजर्स होते त्यापैकी कित्येकांना तर माहीत सुद्धा नसेल की हे अॅप चायनीज होते म्हणून. एकाचं बगून एक ही अशी शृंखला वाढत गेली आणि हे अॅप पॉप्युलर होत गेले. स्वदेशी मुद्द्यावर ते आज बंद झाले हे एका दृष्टीने चांगलेच झाले. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तशा टिक टॉकलाही होत्याच फक्त त्याचा वापर कोण कसा आणि कशासाठी करतो यावर त्या अवलंबून होत्या.

स्वतःमधील वेगळेपणा दाखवण्यासाठी सहज आणि सोपी प्रणाली टिक टॉक मध्ये होती. जन्माला आलेल्या प्रत्येकाला वाटत असते आपण सुंदर दिसावे या अॅप मध्ये असे काही फिल्टर होते की सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा सेलिब्रिटी लुक यायचा. व्हिडिओला संगीत द्यायचे हा तर काही सेकंदाचाच खेळ होता म्हणूनच जास्तीत जास्त लोकं ती वापरायला लागली. टिक टॉक पाहून पाहून त्या माध्यमातून अनेक नवनवीन कल्पना मिळायच्या. टिकटॉक पाहणे निवळच रिकामटेकडेपणाचे काम होते असे नाही तर त्यावर कमी वेळात आपल्याला हवी असलेली अनेक विषयांची माहिती सहज उपलब्ध व्हायची. अनेक क्षेत्राबद्दल छोटे छोटे व्हिडिओ खूप ज्ञान देऊन जायचे. गावगाड्यातील कलाकारांमधील सुप्त गुण या माध्यमातून बाहेर आले. कित्येक जण स्टार झाले. काहींना तर यातून रोजगार सुद्धा उपलब्ध झाला.

अवघ्या पंधरा सेकंदात उपयुक्त माहिती टिक टॉक व्हिडिओ मध्ये आपल्याला मिळायची. त्यातही काही एकदम फालतू रिकामटेकडे व्हिडिओ असायचे नाही असे नाही पण आपल्याला जे आवडते ते आपण पाहू शकत होतो. ज्ञान, आरोग्य, आहार, शेती, मनोरंजन, सौंदर्य, पाककला, चित्रकला, देशीजुगाड, संगीत अशा अनेक विषयांवरील व्हिडिओ अर्थपूर्ण असायचे. टिक टॉकने युवा वर्गातली सृजनशीलता बाहेर आणली. अल्पावधीतच ती गरिबांची एक इंडस्ट्री म्हणून उभा राहिली. टिक टॉकच्या क्रेझ पासून सेलेब्रिटी सुद्धा वंचित राहिले नाहीत त्यांनीदेखील या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले. एवढेच काय, युवा वर्गाचा यावरील राबता पाहता सी.एम.ओ ऑफीसला सुद्धा यावर अकाउंट काढावे लागले.

माणूस मेला की वैर संपते असे म्हणतात तसेच टिक टॉक सुद्धा आज वारले. जग सोडून जाणारा जसा आठवणी मागे सोडून जातो तशाच आठवणी या टिक टॉकने सुद्धा सोडल्यात. वैयक्तिक मनोरंजनाच्या दुनियेत या अॅपने सामान्य भारतीयांना जी ओळख निर्माण करून दिली ती नाकारता येणार नाही. तसेच यामाध्यमातून निर्माण होणारा पैसा जर आपल्याच देशाच्या विरोधात वापरला जाणार असेल तर त्याचेही समर्थन कदापी शक्य नाही. या अॅपवरचे अनेक व्हिडिओ पाहून मी हसलो आहे पोटभर पण गलवान खोऱ्यात शाहिद झालेल्या जवानांच्या लेकरांच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याच पोटात गोळाही आला होता. एक अॅप अनइन्स्टॉल करून दुसरे डाउनलोड करताही येईल हो कदाचित पण आयुष्यातून गेलेला बाप पुन्हा परत मिळवता येत नाही. अलविदा टिकटॉक जय हिंद.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० जून २०२०



Sunday, June 28, 2020

राज रोज मारी माझा शेतकरी

संपला निवडणुकीचे निकाल पण लागले आता नविन सरकार सत्तारूढ होईल. चारपाच आदल्या उडवून गुलाल उधळून जल्लोष होईल. घरी आल्यावर घरचे म्हणतील रानात जाऊन ये तेव्हा रानात मात्र झाडालाच उगवलेले सोयाबीन, मका, ज्वारी दिसेल तेव्हा प्रचार सभे एवढी गर्दी करून सरकारवर दबाव आणण्यासाठी एकी नाही होणार. शेतात भिजलेल्या सोयाबीनचे पुढे काय होणार यापेक्षा मुख्यमंत्री कोण किंवा कुणाचा होणार हे जास्त महत्वाचे वाटणारे कार्यकर्ते देशाचे भविष्य आहेत.


सध्या बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. शिकलेली पोरं शेतात राबायला तयार नाहीत. नेते कुठंतरी चिटकवतील या आश्याने अख्खं तारुण्य खितपत घालवत आहेत. काही जण जागा निघतील या आशेने अभ्यास करत आहेत. म्हातारे आईवडील मात्र मोठ्या आशेने पोरगं कायतरी करील म्हणून आस लावून बसले आहेत. अशा परिस्थितीत लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आणि नोकर भरती करणे सरकारचा अग्रक्रम असायला हवा. प्रत्येक आमदारांनी सुद्धा आपापल्या मतदार संघात युवकांना रोजगार मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

अशिक्षित बेरोजगार पडेल ते काम करून उदरनिर्वाह करत आहेत. लहान सहान काम करण्याचा त्यांना अजिबात कमीपणा वाटत नाही पण सुशिक्षित बेरोजगार मात्र नोकरी साठीच झटत आहेत. जोपर्यंत त्यांना नोकरी लागत नाही तोपर्यंत त्यांना पोसण्याची जबाबदारी त्यांचा बाप शेती करून पार पडतोय. त्यातच जर शेती तोट्यात गेली तर संपूर्ण कुटुंबाचाच उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होतोय. टोकाची श्रीमंती आणि टोकाच्या गरिबीत राहणारा आपला महाराष्ट्र सुवर्णमध्य साधून कधी सुजलाम सुफलाम होणार ?

आज शेतकऱ्यांनी प्रचंड कष्ट करून उभारलेली पिके पावसात झोडपली. जे दाने वाळवून विकायला न्यायचे होते ते पाणी पिऊन फुटले आहेत. त्यातून उगवलेला कोंब इथल्या शेतकऱ्याचे कष्ट मातीत पुरून इथल्या व्यवस्थेच्या छाताडावर उभा आहे. पहिले पाऊस नसल्याने मातीत पेरलेल्या दाण्याला कोंब फुटेना म्हणून शेतकरी रडत होता आणि आता उगवलेले दाने पाऊसात भिजल्याने कोंब फुटले म्हणूनही तो रडतोय. एकूण मतदानाच्या टक्केवारीत सर्वात जास्त मतदान करणारा हा घटक स्वतः मात्र वर्षानुवर्ष उपेक्षितच राहतोय हे दुर्दैव.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : ३१ ऑक्टोंबर २०१९


गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...