Sunday, December 23, 2018

सुगरण ©

आजच्या स्पेशल संडेची सुरूवात चिघळच्या भाजीची भाकरी, ठेसा, आंब्याच्या कैरीची चटणी आणि दही अशा पौष्टिक व रूचकर जेवणाने झाली. अर्थात विराच्या आधी आमच्या मातोश्री जर कधी भाकरी थापत बसल्या तर गरम-गरम पापुडा आलेल्या भाकरीचे चार घास पोटात घातल्याशिवाय कुठे जाऊ देत नव्हत्या. आता लग्नानंतर मातोश्रींसोबत विराचीही भर पडली. मास्टर ऑफ काॅमर्स असलेली विरा चुलीवर भाकऱ्या करण्यात सुद्धा मास्टरच आहे. माझ्या घरात किचन आहे, त्यात गॅस, ईलेक्ट्रिक इंडक्शन वगैरे आहेच पण आईला मात्र चुलीवरच भाकरी करायला आवडते त्यामुळे आमच्या वाड्याच्या मागे चुलीवरच्या स्वयंपाकासाठी विशेष सोय केली आहे. लग्नाआधी आईसमोर असंच बसुन जेवायचो आज विराने तिची जागा घेऊन 'हम भी कुछ कम नही' हे सिद्ध केलंय.

मुलीला सुगरण करण्यासाठी आईची भुमिका महत्वाची असते. माझी विरा 'सुशिक्षित सुगरण' आहे याचे श्रेय आमच्या सासुबाईंना जाते. शिक्षणात मास्टर डिग्री घेऊन स्वयंपाकात सुद्धा मास्टरी केलेली विरा जेव्हा चुलीवर भाकरी करते तेव्हा काटवटीवर फिरणाऱ्या पिठाच्या भाकरीवर तिच्या हातांची पडणारी प्रत्येक थाप प्रेमाचा धपाटा वाटू लागते आणि हातातल्या पिठाच्या गोळ्याला आकार देता देता आपसुकच ती संसारालाही आकार देत असल्याची प्रचिती होते. मुळात चुलीवर स्वयंपाक करणे मोठे जिकिरीचे काम. गॅस बटनावर कमी जास्त करता येतो पण चुलीवर मात्र एक भाकर काटवटीवर थापता-थापता दुसरी भाकर तव्यावर भाजत असते या दोन्हीकडे लक्ष देत-देत गरजेनुसार जळतं सरपन चुलीतुन आतबाहेर करणे व फुकारीने जाळ फुंकणे ही क्रिया समांतर सुरू ठेवावी लागते. त्यातुनही भाकरी तव्यावर टाकताना हाताला चटका लागणार नाही याचीही विशेष खबरदारी घ्यावी लागते. तेव्हा कुठं दुरडीत भाकर पडते. त्याच भाकरीचा पापुडा काढल्यावर त्यातुन सुगरणीच्या कष्टाचा सुगंध दरवळतो.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ डिसेंबर २०१८


Wednesday, December 19, 2018

सुखी संसाराचे १२३ दिवस ©

घरात आलेली नवी नवरी जेव्हा घरात रूळून जाते तेव्हा ती खऱ्या अर्थाने मालकिन होते. नवरी, बायको, मालकिन आणि आई असा तीचा प्रवास प्रचंड कष्टाचा आणि तडजोडीचा असतो. रोजचा स्वयंपाक, स्वच्छता, धुणे, भांडी हे सगळं करत करत कुटुंबातील सर्व व्यक्तिंच्या मर्जी सांभाळत तीचं जगणं सरू असतं. सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळण्याच्या नादात तीचे स्वतःच्याच आवडी निवडीकडे दुर्लक्ष होते. आपल्या धनसंपत्तीची आणि शरिर संपत्तीची योग्य काळजी घेणारं बायको नावाचं व्यक्तिमत्व स्वतःची काळजी घ्यायचं मात्र विसरून जातं. अशावेळी दैनंदिन संसारिक गोष्टींच्या पलिकडच्या सुखाची तिची अपेक्षा पुर्ण करण्यासाठी नवरा म्हणुन आपणही आपली रोजची कामे बाजुला ठेऊन तिच्यासाठी वेळ द्यायला हवा.

एक, दोन, तीन म्हणता-म्हणता आज विराच्या आणि माझ्या लग्नाला १२३ दिवस पुर्ण झाले. त्याबद्धल मी तीला १९ तारखेच्या पुर्वसंध्येला शाॅपिंग, फिल्म आणि डिनरची ट्रिट दिली. आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांच्या खुप मोठ्या अपेक्षा नसतातच मुळी बस्स एवढंसं रिचार्ज महिनाभर पुरतं. राहिली गोष्ट वेळेची तरं ती आपोआप कुणालाच मिळत नसते निदान महिनाभरात एकदा तरी बायकोसाठी एवढासा वेळ काढायला हवा. अहो, ती आपल्यासाठी तिच्या आयुष्यातला एवढा मोठा वेळ राखीव ठेवते मग "बिझी शेड्युल" हा अवजडर शब्द खुंटीला टांगुन आपणही चार दोन तास तरी तिच्यासाठी राखिव ठेवायलाच हवे कारण लग्न म्हणजे दोन शरिरांसोबत दोन मनांचं मिलन असतं हे सगळं एकरूप झालं की संसाराची गाडी रस्ता सोडत नाही.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १९ डिसेंबर २०१८



Tuesday, December 18, 2018

आहेर ©

आज आमच्या गल्लीतल्या एका शेतकरीकन्येच्या विवाहाप्रसंगी आवर्जुन उपस्थित होतो. त्यांच्या घरासमोरच मंडप टाकला होता. एका गरिब शेतकरी कुटुंबातल्या या मुलीच्या विवाहासाठी मी काॅलेजहून खास वेळ काढून आलो.
शेवटची मंगळअष्टिका झाली की वऱ्हाडाची लगबग जेवणासाठी सुरू झाली आणि काही मंडळी त्याच मंडपात आहेर देण्यासाठी झुंबड करू लागली. कांतीलाल आबा आणि दिपक; आहेर घेण्यासाठी हापश्याजवळच बसले होते. गोरगरिबांच्या लग्नात आहेर स्विकारण्याची तत्परता दाखवणे ही सुद्धा एक सेवाच असते.

काही श्रीमंत मंडळी 'आहेर देणे घेणे नाही' असे अभिमानाने पत्रिकेवर छापतात ते योग्यही आहे परंतु गरिब शेतकरी कुटुंबाच्या अशा लग्नात मात्र आपण आवर्जुन आहेर करायलाच हवा. मुलीच्या बापाने अतिशय काबाडकष्ट करून पै पै गोळा केलेली असते. पोरीच्या सुखासाठी हा शेतकरी बाप त्याच्या आयुष्यातली बहुतांशी मुद्दल खर्च करित असतो अशावेळी आहेर संस्कृतीमुळे त्यांना वऱ्हाडी मंडळींचा थोडाफार आर्थीक हातभार लाभतो.

आजही ग्रामिण भागात लग्नानंतर आहेराची यादी वाचून दाखवण्याची पद्धत असते. कधीकाळी अकरा रूपयाचा आहेर आता महागाईच्या काळात एक्कावन्न रूपयापर्यंत येऊन ठेपलाय अशातही आपला शंभर रूपयाचा आहेर एखाद्याचा संसार उभा करण्यासाठी कारणीभुत ठरू शकतो. म्हणुनच ज्या लग्नात लाखो करोडोंची उधळपट्टी होते अशा लग्नात आहेर देणे आवर्जुन टाळा पण गोर गरिब शेतकरी जर त्याच्या मुलीचे लग्न करत असेल तर त्या लग्नात आवर्जुन आहेर करा.

एकिकडे अंबानीच्या मुलीच्या लग्नाची एक पत्रिका तीन लाख रूपयाची असते. तर दुसरीकडे पोरीचं लग्न उरकण्यासाठी एक शेतमजूर तीस हजार रूपयावर सालगडी म्हणून वर्षभर काम करत असतो. हेच आपल्या भारताचे खरे वास्तव आहे. गरिबी आणि श्रीमंतीतली ही दरी आपण बदलू शकत नाही फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळी केलेली आपली छोटीशी मदत एखाद्याचे आयुष्य उभा करू शकते हे नक्की.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ डिसेंबर २०१८



Monday, December 17, 2018

शिवरायांचे दैवतीकरण थांबवा ©

शिवाजी महाराज हे छत्रपती होते त्यासोबतच ते एक सर्वसामान्य माणूसही होते. या पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक माणूस दोन हात आणि दोन पाय घेऊनच जन्माला येतो. यापेक्षा जास्त हात असणारा व्यक्ती आपण माणूस म्हणुन संबोधित नाही तर देव म्हणुन संबोधतो. महापुरूषांना देव करणं वेगळं आणि त्यांना देवासारखं मानणं वेगळं. जर आपण महापुरूषांना देव केलं तर त्यांनी उभारलेले सर्व कार्य चमत्कार होईल. कर्तुत्वाची जागा जेव्हा चमत्कार घेतो तेव्हा महापुरूषांच्या समकालिन पराक्रमाला फक्त उदबत्त्या लावून पुजलं जातं त्याचे अनुकरण वगैरेतर दुरचं राहतं; कारण माणुस माणसाचे अनुकरण करिन देवांचे थोडी करणार.

फेसबुकवर जेव्हा मी सचिन जुवाटकर या चित्रकाराने रेखाटलेले शिवरायांचे चार हात दाखवलेले व देवत्व ग्लोरीफाय केलेले चित्र पाहिले तेव्हा एक चित्रकार म्हणुन त्यांच्या कलेचे कौतुक वाटले पण ते चित्र रेखाटण्यामागचा हेतू मात्र विघातक वाटला. अहो, जुवाटकर शिवरायांनी बुद्धी आणि मनगटाच्या जोरावर उभा केलेल्या स्वराज्याला उगांच चमत्काराचे ठिगळं लावू नका. देवाला देव राहूद्या माणसांना माणूस राहू द्या. चित्रातुन देव रेखाटण्याची एवढीच ईच्छा असेल तर तेहत्तीस कोटी देवांपैकी काहीच देवांची चित्र आपल्याला ठाऊक आहेत. तुमची कलाकारी त्या अज्ञात देवांना चित्र स्वरूपात आणण्यासाठी वापरा त्याचे स्वागतच होईल.

बाकी चित्र हि ठरवूनच काढली जातात. डोळे बंद करून स्वप्नात आलेली एखादी कलाकृती अशी कागदावर उमटली वगैरे वगैरे भंपक असतं. तुमचा मेंदु ज्या विचारांनी पोसला जातो त्याचेच प्रतिबिंब कलेतुन उतरत असते. महापुरूषांची मान्यताप्राप्त चित्रे ही काय नवनवीन प्रयोग करायची साधने नसतात याचे भान असावे. अरे जे आहे ते दाखवा की, तुमची सृजनशिलता दाखवण्यासाठी महापुरूषच बरे सापडतात तुम्हाला. सरतेशेवटी कुणी कोणते चित्र आपल्या घरात लावावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आपल्या भिंतीवर आधीपासुनच खुपसाऱ्या देवीदेवतांची चित्रे आहेत त्यातच एक माणसातल्या देवाचे चित्र आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या माणसातल्या देवाला आता देव करून त्याचे माणुसपण मारू नका एवढीच विनंती.

माणसांच्या चित्रांना देव करू नका
जिवंत ईतिहासाला आख्याईका म्हणू नका,
गड कोट किल्ले आहेत साक्षीला
शिवरायांच्या कर्तुत्वाला चमत्कार म्हणू नका.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १७ डिसेंबर २०१८


Monday, December 10, 2018

एक नाही हजारो छिंदम जन्मलेत ©

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडून आलाय हि बातमी समजली आणि लोकशाहीत असलं पण काही घडू शकतं याचे आश्चर्य वाटलं. मतदान माणसाच्या शरिराला बघून नाही त्याच्या डोक्यातल्या विचारांना पाहून करायचं असतं. छिंदम कोणत्याही पक्षाकडुन उभा नव्हता तरी त्याच्या वार्डातील लोकांनी त्याला समर्थन दिलंय. आजवर आपल्याला एकच छिंदम माहित होता आज मात्र महाराष्ट्राला हजारो छिंदम पाहायला मिळाले. काय राव लोकशाही आहे आपली तडीपार माणूस सुद्धा प्रचाराला न येता निवडून येतो. ही लोकशाही ज्यांच्या विचारांतुन निर्माण झाली त्या सर्व महापुरुषांच्या महान विचारांना निवडणूक नामक लोकशाहीचे सर्वोच्च शस्त्र वापरून हरवलं गेलंय. ही हरवणारी माणसं आणि छिंदमला समर्थन देणारी माणसं मला त्या छिंदमपेक्षाही विषारी वाटायली आहेत.

एक छिंदम प्रवृत्ती ठेचली असती ओ; पण आतल्या गाठीच्या या हजारो सुप्त छिंदमांचं करायचं तरी काय ? खरं तर आपण काहीच करू शकत नाही कारण मतदाराने कुणाला मतदान करायचं हा त्याला घटनेने दिलेला वैयक्तिक अधिकार आहे परंतु घटनापती भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेऊन राज्यघटना लिहिली. सबंध राज्यघटनेत शाहू,फुले, आंबेडकरांच्या न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधूता या विचारांना अग्रनी स्थान दिलं. समाजातील वाईट राजकिय प्रवृत्तींचा नायनाट करता यावा म्हणुन घटनेने आपल्याला मतदानासारखा श्रेष्ठ अधिकार बहाल केला परंतु आज निवडणूकी सारख्या त्याच पवित्र प्रणालीतुन छिंदमसारखा स्वराज्यद्रोही निवडून देऊन त्या मतदारांनी नेमकं काय साध्य केलंय ? हे सांगायची आणि समजुन घ्यायची गरज आहे.

शिवरायांच्या काळात लोकं स्वराज्यासाठी मरायला तयार होती. स्वराज्यद्रोह्याला टकमक टोकवरून ढकलून दिले जायचे आज मात्र बटनं दाबून अशा नालायकांना निवडून दिलं जातंय हे दुर्दैव. अरे हे फक्त प्रतिस्पर्ध्याला नव्हे तर महापुरूषांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच आव्हान आहे. आज जे दुसऱ्याच्या उंबरठ्यावर घडलंय उद्या हेच आपल्या उंबरठयावर घडलं तर नवल वाटू नये. बाकी तुम्ही निषेध करत राहा आम्ही निवडून देत राहतो. छिंदम मुडदाबाद !

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १० डिसेंबर २०१८


Wednesday, December 5, 2018

श्रीमंती ©

काॅलेजातुन घरी येताना रानात गेल्तो. लय दिवसापसुन त्या आवडीच्या बोरीची बोरं खायची व्हती. लहानपणी वड्यातल्या बोरीची गावरान बोरं खायला दिसं दिसं भटकायचोत. नदीला मासं पकडायला जायचं, हिरीत पवायला जायचं, आळवनात म्हवळं झाडायला जायचं आन् मग बोरं खायला जायचं असा एका दिवसाचा गावठी मिनिस्टरी प्लॅन असायचा आमचा. आता मातर नौकरी, छंद, संसार या त्रिमुर्तीतुन येळंच नाय भेटत. आसंच कधी बोरंबीरं बगीतली की जन्या आठवणींचं म्हवाळ उठतंय डोस्क्यात. तरी बरं तोडकं मोडकं ल्ह्यायला येतंय म्हणुनशान बरंय; नायतर हे आस्लं जब्राट आनुभव तसंच डोस्क्यात कुजत राहिलं आस्तं.

आज येळात येळ काढून रानात गेलो. तिथं गेल्यावर तासभर त्या बोरीखाली हावऱ्यावनी बोरं ईचित बसलो व्हतो. बोरीचं काटं आडकुन शर्टाचं धागं आन् हाताला वरकांडं निघालं. पण पॅन्टीचं आन् शर्टाचं खिसं जवर भरत न्हायतं तवर माझा कार्यक्रम सुरूच व्हता. ताजी बोरं खिशात भरायची आन् वाळल्याली येचत येचत खायची. साखरंवाणी गोड आन् एकबी बोरं किडकं नाय या गुणामुळं उगं डोळं झाकुन वडायचं काम चालू व्हतं. दोन तीन ढेकरा आल्यावरच खादाडखाई बंद झाली.

घराकडं येताना शर्टाचा फुगल्याला खिसा बगुन उगंच लय श्रीमंत आसल्यागत वाटलं. लहाणपणी शेंगदानं, सिताफळं, कणसाचं दाणं, बोरं, उसाच्या बुटकांड्या आसल्या गुष्टींनी भरल्यालं खिस घिऊन फिरणारा पोरगा आमच्यामते श्रीमंत आसायचा. लय हेवा वाटायचा त्येचा, मग उगंच लंडावनी त्याच्या म्हागं म्हागं फिरायचं तवा कुठं त्यातला थोडासा माल हातावर मिळायचं. काय साला लहानपण असतं नाय; आज बोराचा कॅन्टर ईकत घिऊन खायचं म्हणलं तरी शक्य हाय पण ईचुन खायचा त्यो रूबाब मातर त्यात नाय. तवा आसलं काय दिसलं की आपुनबी लहान हुन जायचं. आपली ईज्जत, मोठेपण, आब, रूबाब, पैशांची श्रीमंती हे आस्लं समदं त्या झाडाच्या एका फांदीला टांगायचं आन् जगायचं बिनधास्त बारक्यावानी...

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ डिसेंबर २०१८


Saturday, November 10, 2018

| चप्पल बुट ©

घरात पाहुणे रावळे आले की त्यांच्या चपला घालायची धावपळ चिल्ल्या पिल्ल्यांची सुरू असते. मापात बसत नाहीत हे माहित असतानाही त्या चपला घालायची त्यांची धरपड प्रत्येकाने पाहिली असेल. मोठ्यांच्या चपलात पाय घालून फिरणे हा सुद्धा एक खेळ होता लहाणपणी. दाराबाहेरच्या चपला ईकडे तिकडे गेल्या की पहिले चिल्ले पिल्ले मंडळींना विचारणा होते. आज माझ्या बहिणीची लेकरे स्वरः आणि गौरांग असाच खेळ खेळत होती त्यांच्या पायातल्या चपला पाहुण मी सुद्धा सर्रकन भुतकाळात गेलो. आमच्या आजोबाचा कातडी बुट असायचा तो माझ्या बालपणीचा ट्रॅक्टर होता. त्या बुटात वाळू भरून ब्रीईऽऽमम, ब्रीईऽऽमम करत ईकडुन तिकडे फिरवत बसायचो. घरात कुणी पाहुणे मंडळी आली की पहिल्यांदा त्यांच्या चपला हुडकायच्या त्यात एखादे नवरा नवरी आले असले की त्यांच्या चपला घालण्यात वेगळाच आनंद वाटायचा. वडाखाली चप्पल बुट खेळता खेळता; चहा पाणी करून पाहुणे मंडळी निघाले की आई मोठ्ठ्याने हाक मारायची "अयं..लेकरांनो हिकडं आणा चपला" मग लगेच लगबगीने त्या काढून द्यायचा.

एकदा वडीलांनी आणलेला नवीन सॅण्डल मी दुसऱ्याच दिवशी हरवला तेव्हा आईच्या भेनं भेनं दिवसभर घरी नव्हतो गेलो. रविवारच्या बाजारातुन घरच्यांनी पंचेचाळीस रूपयाची पॅरागाॅन आणली की चटा चटा करत चालताना लय राजेशाही थाट वाटायचा पण पावसाळ्यात मात्र तीच स्लिपर जेव्हा पॅन्टींवर चिखलाच्या कारंज्या उडवायची तेव्हा रागही यायचा.
अख्या बालपणात आपल्याला कधीच महागड्या खेळण्याची गरजच नाही पडली. सायकलीचे आणि दुचाकीचे जुने टायर, सरपणातले गाडवान, कुया, आणि मोठ्या माणसांच्या चपला व बुटा सोबत खेळण्यात आपलं बालपण गेलं परंतु काळानुसार खेळण्यांच्या वस्तू जरी बदलल्या असल्या तर बालपण मात्र तसंच असते. बालपन गाडीचा दर्जा असणारी चप्पल बुट मोठे झाल्यावर मात्र खेटरं वाटायला लागतात. आज आपण लहाण होऊन तोच आनंद पुन्हा नाही घेऊ शकत पण लहाणग्यांमध्येच आपले बालपण शोधू शकतो. या सुट्ट्यात ते खेळत असताना फक्त त्यांचे थोडेसे निरिक्षण करा आणि स्वतःचे बालपण जगुण घ्या.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १० नोव्हेंबर २०१८



Tuesday, October 30, 2018

माझं सरकार ©

पर्वा आमच्या सरकार (बायको) सोबत रामलिंगला रपेट मारली. त्यांच्यासोबत सेल्फी घ्यायचा मोह आवरला नाही. आता त्याला साजेसं विचार मंथनही व्हायला हवे म्हणून हा लेखप्रपंच. खरं म्हणजे या सरकारला एकदा निवडलं की पुन्हा याची कधीच निवडणूक लागत नाही. कुणाचं सरकार आयुष्यभर लोकशाही पाळतं तर कुणाचं सरकार हुकुमशहा होऊन जातं आमचं सरकार मात्र अजुनतरी लोकशाहीची सर्व मुल्य जपणारं आहे याचा आनंद आहे.

"एका यशस्वी पुरूष्यामागे एक स्त्री असते" असं म्हणतात परंतु माझ्या मते त्या दोन असतात; म्हणजे लग्नाआधीपर्यंत आई आणि लग्नानंतर बायको. आपल्या प्रत्येक यशामध्ये या दोन स्त्रीयांचा हात असतो. त्या फक्त आपल्या पाठीशी उभ्या नसतात तर बरोबर असतात. काळजी घेणे आणि लक्ष ठेवणे हा तर त्यांचा गुणधर्मच असतो. आईची माया आणि बहिणीचा जिव्हाळा एकटी बायको देऊ शकते. जसा एक एक धागा जोडून साडीचा सुंदर पदर तयार होतो तसेच लग्नानंतरही असे अनेक क्षण एकमेकात गुंफूण संसाराचा पदर तयार होत असतो. तो पदर अधिक खुलून दिसण्यासाठी धाग्यांची विण जिथल्या तिथं बसायला हवी नाहीतर उसवलेला पदर शोभा देत नाही.

संसार म्हणजे साडी विणण्यासारखंच असते. सुख दुःखाचे अगणित धागे आपण जगत राहतो ते मनाच्या सुईत ओवून जोडत राहायचे शेवटी नवरा बायकोच्या नात्याचा एक सुंदर पदर तयार होतो त्यालाच संसार असे म्हणतात. आई आयुष्याला पुरत नाही आणि बहीण माहेरी राहू शकत नाही तेव्हा या दोघींची कमतरता बायको पुर्ण करत असते. अखेरच्या श्वासापर्यंत तीची मिळणारी सोबत तीला आपलं सर्वस्व बहाल करायला भाग पाडते. ती जरी आपल्या अर्ध्या संपत्तीची मालकीन असली तरी आपल्या स्वतःची संपुर्ण मालकी मात्र तिच्याकडेच असते.

लग्नाआधी मी बहुतांशी लेखात "आईच्या मदतीला आता दोन हात आणावे म्हणतोय" अशी ईच्छा व्यक्त केली होती पण आता लग्नानंतर मात्र अष्टभुजाधारी विराई अवतरल्याची अनुभुती होतेय. पहाटे लवकर उठण्याची सवय, घरातली सर्व कामे लगबगीने करण्याची हतोटी, माझी खातरदारी, सर्व कुटुंबियांची योग्य काळजी आणि हे करता करताच मास्टर डिग्रीचा अभ्यास, हे सगळं विरा लिलया पेलतेय. देवीला अष्ठभुजाधारी का म्हणतात हे बायकोचा अभ्यास केला की समजते.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० ऑक्टोबर २०१८



Thursday, October 18, 2018

© शब्दांचीच शस्त्रे

आज विजयादशमी दसऱ्या निमित्त आमच्या घरी पेन, पुस्तक आणि माईकचे पुजन करण्यात आले. पारंपारिक शस्त्रांचे पुजन आजच्या दिवशी सगळीकडे केले जाते परंतु मी मात्र माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने शस्त्र म्हणून काम करणाऱ्या या गोष्टींचे पुजन केले. आजच्या आधुनिक युगात या तीन गोष्टींवर प्रभुत्व असलं की कोणत्याही शत्रूशी दोन हात करता येतात. विचारांच्या लढाया खेळणाऱ्यांसाठी तर यापेक्षा भारी शस्त्रास्त्र दुसरं असुच शकत नाही. या शस्त्रास्त्रांचे वार अजरामर राहतात. पारंपारीक शस्त्र फक्त शरिराला जखमा करतात परंतु मनाला जखमा करण्याचे आणि वेळप्रसंगी ते भरून काढण्याचे सामर्थ्य मात्र शब्द आणि लेखणीमध्येच असते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत जेवढा उपयोग ढाली, तलवारी आणि तोफांचा केला असेल तेवढाच शब्द आणि लेखणीचा सुद्धा केला. वेळानुरूप ही शस्त्रास्त्रे वापरण्याचे कसब त्यांना जगातला एक महान राजा बनवण्यास कारणीभूत ठरलं. शिवरायांनी अनेक लढाया तलवारीवर जिंकल्या परंतु कधी कधी जे काम तलवार करू शकली नाही ते काम फक्त त्यांच्या एका पत्राने केले हे ध्यानात असावे. आज आपल्या राज्यघटनेनुसार विनापरवाना शस्त्र बाळगणे कायद्याने गुन्हा ठरतो परंतु मी वापरत असलेल्या शस्त्रांस्त्रांना मात्र घटनेने स्वातंत्र्य बहाल केलंय; त्यांचा योग्य वापर समाजमने बदलू शकतो आणि अयोग्य वापर रक्तांचे सडे सुद्धा पाडू शकतो. अर्थात एवढे सामर्थ्य यात आहे.

मित्रहो, भविष्यातल्या लढाया जर ढाली, तलवारी आणि बंदुकांनी लढल्या तर आपली कैद निश्चित आहे परंतु जर याच लढाया आपण ही आधुनिक शस्त्रांस्त्रे वापरून लढल्या तर आपला विजय निश्चित आहे. चला तर मग एका नव्या युगात पदार्पन करत असताना आपणही या शस्त्रांची कास धरूयात आणि स्वतःला व समाजाला विचाराने सक्षम बनवण्याचा प्रयत्न करूयात. ईतिहासात तलवारीचा वापर करून स्वराज्याला स्वातंत्र्य बहाल केलेल्या शिवरायांना, घटनेत कलम १९ (१) नुसार आपल्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य बहाल केलेल्या भिमरायांना आणि शब्दनिर्मितीचे स्वातंत्र्य दिलेल्या जगतगुरू तुकोबारायांना माझा शतशः प्रणाम.

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने l
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ll१ll
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन l
शब्द वाटू धन जन लोका ll२ll
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव l
शब्देंचि गौरव पूजा करू ll३ll

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १८ ऑक्टोंबर २०१८ (विजयादशमी दसरा)


Monday, October 15, 2018

वाचाल तर वाचाल

वाचाल तर वाचाल.
माझ्या मेंदुतील ८६ अब्ज मज्जातंतूंना विचारांचा खुराक वाचनातून मिळतो. उपाशी पोटी असताना जसं मेंदु काम करत नाही तसं वाचनाअभावी तो प्रभावी ठरत नाही. फक्त जेवन करून ईतिहास घडत नसतो पण वाचन करून मात्र नक्की घडतो. चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिला, सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि जगातली सर्वात मोठी राज्यघटना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली या तिन्ही ऐतिहासिक घटनांचा पाया 'वाचन' आहे.

मी असेल नसेल उद्याच्या जगात पण लोक माझे शरिर नाही तर मेंदु लक्षात ठेवतील; नव्हे तो त्यांना ठेवावाच लागेल एवढे सामर्थ्य त्यामध्ये मी निर्माण करीन. होय, हे सर्वांनाच शक्य आहे पण वाचनाचं व्यसन जडलं तर. एका पुस्तकाची नशा हजारो लिटर दारू पेक्षाही कैकपटीने जास्त असू शकते. मेंदुला झिंगवणाऱ्या नशेपेक्षा मेंदुला विचार करायला लावणारी वाचनाची नशा सर्वांनीच करायला हवी. माणसाने किती वाचायला हवे याचे विशिष्ठ असे काही मानक नाही परंतु मला मात्र निदान माझ्या मेंदुत असलेल्या न्युराॅन्स एवढे तरी शब्द वाचायचे आहेत. हे स्वप्न भयंकर मोठ्ठं आहे पण डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी सांगीतल्याप्रमाणे स्वप्न पाहणे गुन्हा नसतो पण लहान स्वप्न पाहणे गुन्हा आहे म्हणुन माझी प्रत्येक स्वप्न सुद्धा लार्जर दॅन लाइफ असतात.

साधारणतः अठरा मिनिटात एक पान हा माझा वाचनाचा वेग आहे. लेखणीच्या दर्जाप्रमाणे तो थोडासा कमीजास्त होत असतो. परंतु आपण जेवन जितक्या चवीने करतो तितकेच वाचनही करायला हवे. प्रत्येक शब्द मेंदुमध्ये फिक्स डिपाॅझीट करण्यासाठी फार मोठी प्रक्रिया नाही फक्त वाचताना नुसतं डोकं पुस्तकात घालण्यापेक्षा डोळे आणि मेंदुमधली झापड उघडी ठेवनं गरजेचे असते. पण ही झापड एकाग्रतेची असते तीच्या सहीशिवाय एकही शब्द मेंदुत रूतुन बसू शकत नाही. डोळे उघडल्यानंतर तर सर्वांनाच दिसत ओ पण त्या दिसण्यातली दृष्टी मात्र वाचनामुळेच बदलते तेव्हा उघडा डोळे आणि वाचा नीट.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनाक : १५ ऑक्टोंबर २०१८ (वाचन प्रेरणा दिन)


Saturday, October 13, 2018

खबरदार ! युवराजांचं राजेपण जपा

छत्रपती संभाजी महाराजांनी अजरामर ईतिहास घडवला ही प्रकृती होती, त्यांचा जाज्वल्य ईतिहास ईमाने ईतबारे जतन करणे ही आपली संस्कृती आहे. परंतु स्वतः संशोधन न करता दुसऱ्यांच्या उष्ट्या वादग्रस्त लिखानाचा आधार घेऊन महापुरूषांबद्दल चुकीचे लिखान करणे ही विकृती आहे जी विकृती डाॅ.शोभा साठे नामक लेखिकेने "समर्थ श्री रामदास स्वामी" या पुस्तकातुन केली आहे. सर्वप्रथम याचा मी तीव्र निषेध करतो. त्या लेखिकेने तथाकथित पुस्तकात नेमके काय लिहिले आहे तो मजकुर इथे शेअर करणे मी मुद्दाम टाळला आहे; कारण त्यांनी लिहिलेले ते शब्द उगांच हजारो लोकांपर्यंत पोहचवून पुन्हा त्यांचाच हेतू साध्य होईल म्हणुन. पण हल्ली अशा विकृतींना जरा जास्तच जोर चढलाय. सुपिक मेंदुमध्ये असे नासके विचार जन्माला घालण्यामागे कारणेपण तशीच असावीत बहुधा. आज सोशल मिडियामुळे अशा विकृत गोष्टी लगेच समोर येत आहेत पण विचार करा व्हाॅट्स अॅप आणि फेसबुकच्या आधी असे विकृत लिखान असलेली कितीतरी पुस्तके आमच्याच माणसांच्या उबऱ्यापर्यंत पोहचली असावीत. ज्यांनी महापुरूषांबद्दल एक अवाक्षरही वाचले नसेल अशांनी जर असे विकृत लिखान वाचले तर तेच खरे समजून ते वागतील, जगतिल. त्यांच्या डोक्यावर छापलेली हि विषारी शाई पुसायला पुन्हा आपली किती वर्ष जातील ?

विकृती करणाऱ्याचे लिंग न पाहता त्याची मानसिकता ठेचायला हवी. गाबुळा अभ्यास करून महापुरूषांबद्दल भलतं सलतं लिहिणाऱ्यांना लाज वगैरे नसतेच मुळी म्हणुनच तर ते बदनामी करू शकतात. महापुरूषांच्या विचारांचा प्रभाव असलेली माणसं चुकीचा ईतिहास लिहित नाहीत आणि सांगतही नाहीत. परंतु हेतुपुरस्पर एखाद्या व्यक्तिमत्वाला संशयाच्या भोवऱ्यात उभा करून बदनाम करण्याचे षडयंत्र जर कोणी रचत असेल तर त्यांना नक्कीच धडा शिकवायला हवा आणि वाचनातुन हे विष लहान लेकरांना पाजण्याचा हा डाव वेळीच हाणुन पाडायला हवा. या ज्या कोणी बाईं राजांबद्दल चुकीच्या गोष्टी वकल्या आहेत त्यांची डाॅक्टरकी गटारीत भिजवायला हवी. त्यांनी जे काही संदर्भ यासाठी वाचले असतील ते देखील बदनामीचे झरेच असावेत. मी कुणी ईतिहासकार नाही आणि शास्रज्ञही नाही परंतु एक शंभूभक्त म्हणुन आजवर संभाजी महाराजांचा जेवढा केवढा ईतिहास वाचला असेल त्यातुन मला प्रचंड प्रेरणाच मिळाली आहे. कायद्याचे राज्य असल्याने न्यायिक मार्गाने निषेध नोंदवत आहोत अन्यथा अशी विकृती करण्याऱ्यांची बोटेच छाटायला हवीत. सत्य असेल तर जरूर मांडा पण असत्याला आपल्या सोयीने सत्य करून जर कोणी आमच्या अस्मिता दुखावत असेल तर त्याची गय केली जाणार नाही हे लक्षात ठेवा.

पाण्यावर तरंगता तोफखाना तयार करणारे छत्रपती संभाजी महाराज पहिले राजे होते. आता तोफखाना चालवायचा म्हणल्यावर त्यासाठी दारूगोळा तर अत्यावश्यकच असतो की. मग असा दारूगोळा खरेदी करण्यासंदर्भातली समकालिन पत्रे व तत्सम साहित्य काही गिण्यान मातीत गेलेल्या आणि हेतुपुरस्पर शंभुराजांना बदनाम करणाऱ्या व्यक्तींनी संदर्भ म्हणुन घेतले आणि त्यातला 'गोळा' काढुन फक्त 'दारू' याच शब्दाला अधोरेखित केले आणि नासवला आपल्या पराक्रमी, चारित्रवान युवराजांचा ईतिहास. लिहायची एवढीच खुमखुमी आली असेल तर जिवंत असलेल्या माणसांबद्दल लिहा की. हयात नसलेल्या व्यक्तींना बदनामीचा हार कशाला घालता. आणि तसंही छत्रपतींबद्दलच हे सगळं का घडतंय याचे एकमेव कारण म्हणजे प्रत्येकाच्या ह्रदयात असलेले त्यांचे अढळ स्थान. समाजाचे लक्ष जलद गतीने विचलित करण्याचे विखारी माध्यम कोणते असेल तर ते म्हणजे महापुरूषांची बदनामी; आणि समाजकंटक नेमकं हेच करत आले आहेत, बस्स झालं आता, खबरदार ! युवराजांचं राजेपण जपा.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ ऑक्टोंबर २०१८


Sunday, September 9, 2018

आमचा बैलपोळा ©

सकाळी लवकर उठून आण्णांनी (चुलते) आणून ठेवलेले बेगड कागद वारनेस वापरून गाई म्हशींच्या शिंगांना चिकटवायचे, आबा (चुलते) सोबत आदल्या दिवशी खांदे मळणी करायची. दादा (वडील) आपल्या बैलालापण ढाल घ्या की असा आग्रह करायचा आणि पोळ्यादिवशी पांगरीच्या कारी चौकातुन घरापर्यंत गाई आणि बैलं वाजवीत आणायचो. मग बापू (आजोबा) त्यांच्या पहाडी आवाजात मंगळअष्टीका म्हणायचे; मी परात हातात घेऊन चौर चौर चांगभले...पौस आला चांगभले असे म्हणत वाजवायचो. हे सगळं उरकलं की मारूतीच्या देवळाजवळ जाऊन नारळ खायला थांबायचो आणि ईथून पुढंच आमचा खरा पोळा सुरू व्हायचा.

गल्लीतली पाच पंचवीस लेकरं त्या देवळाच्या कडेला शड्डू ठोकून उभा राहायचो. कोण किती नारळ घेतो याची जणु स्पर्धाच लागायची. वाद्यांचा आवाज कानावर पडला की भाया सारून तयारच रहायचोत. नारळ फोडणारा शेतकरी त्याच्या बैलांवरून ओवाळून थेट देवळाच्या भिंतीवर भिंगारायचा. नारळाचे असंख्य तुकडे ईतरत्र पडायचे त्यातल्या एका तुकड्यासाठी एकाच्या बोकांडी एक पडुन वेचण्याचा प्रयत्न करायचो. कधी कधी कोपरं आणि गुडघं फुटायचं पण नारळाचा एक तुकडा सापडला की ते दुःख विझून जायचं. त्यावेळेस जास्त नारळ फोडणारा, धष्टपुष्ट बैलं असलेला, त्यांच्या शिंगावर ढाल लावलेला शेतकरी आम्हाला अंबानी एवढा श्रीमंत वाटायचा.

रात्रीच्या वेळी काही हौशी शेतकरी बैलांपुढं नाचायला बायका आणायची तर कुणी बार्शीहुन मोठ्ठं बॅण्ड आणायची. कुणी एका वासरापुढंच वाजंत्री लावायची तर कुणी बैलांना ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत घालुन मिरवणूक काढायची. शेतकऱ्याची ही हौस बघून खुप अभिमान वाटायचा. "आपुणबी मोठ्ठ झाल्यावर श्रीमंत शेतकरी होऊन लय नारळ फोडायचं असं वाटायचं" पण मोठ्ठ झाल्यावर शेतकऱ्याच्या जगण्याचं वास्तव समजलं आणि उगांच मोठं झाल्याची खंत वाटली. आज खतांचे भाव आभाळाला भिडले, शेतमालाला भाव नाही, दुधाची किंमत पाण्याहून कमी, पेंड,कळणा,सुग्रास जणु काजू बदाम वाटायले आणि शेण काढू काढूच त्यांचे कोपरं फुटायले अशा परिस्थितीतही आपला शेतकरी बैल पोळा साजरा करतोय स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गुराढोरांला घास भरवतोय.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०९ सप्टेंबर २०१८



Thursday, September 6, 2018

डोंगरातला संसार

रोजच्यागत काॅलेज सुटल्यावर घरी निघालो. डोंगरवाटच्या कडंला खडकावर बसुन निवांत गप्पा मारताना नाना आन् काकी दिसल्या. रस्त्यानं जाताना रामराम घालत जायच्या सवयीमुळं समदी शेतकरी वळखत्यात मला. सकाळ संध्याकाळ नानाच्या कोट्यापसुनच माझ्या काॅलेजचा रस्ता जातुय त्यज्यामुळं कोट्यावर न्हायतर मग गुरं राखताना डोंगरात नानाची भेट हामखास आस्ती. पण आज सांच्यापारी नानाला काकीसोबत गप्पा मारताना बगून जरा लांबूनच ह्यो फोटू काडला.

ह्या वयातही संसाराचा आनंद घेत पिरतमीच्या हिरव्यागार गालीचावर बसुन बायकुसोबत निवांत येळ घालिवताना बघून भारी वाटलं. माजा संसार सुरू हुन ईन बीन दहा पंदरा दिस झाल्यात पण संसाराची चाळीशी पुर्ण हुनबी नाना आन् काकीच्या संसारातला गोडवा कनभरबी कमी नाय झाला हे शिकण्यासारखं वाटलं. बायकु साथ देणारी मिळाली तर माणसाच्या कर्तृत्वाचा येग दुप्पटच व्हतो मग ते नौकरीत आसु, धंद्यात आसु न्हायतर शेतात. संसारातला आनंद घ्यायला लय मोठ्ठा बंगला, ईम्पोर्टेड गाडी, फाईव्ह स्टार रेस्टाॅरंटच असाव असं काय बी नस्तय. गवताचा गालीचा, स्वच्छ खडक, आभाळाचा छत आणि मंद वाहणारा रानवारा आसला की डोंगरातल्या रोमॅन्सला सुद्धा सेवन स्टारचा दर्जा मिळतुय.

फोटो काढल्यानंतर त्यंच्याजवळ जाऊन म्या ईच्चारलं "काय नाना काय चाल्यात गप्पा मालकीनीसोबत" तेवढ्यात नाना म्हणलं "आवं काय नाय, हि आपलं रोजचंच शेतातलं आमचं काय नवीन आस्नाराय, तेवढ्यात काकी म्हणल्या "आवं ती आज कडबा न्ह्याल्ता ईकायला बाजारात चांगला भाव मिळाला म्हणून सांगत व्हतं". काकीचं हे बोलनं ऐकुन खरंच शेतकरी केवढ्याशा गोष्टीचा किती मोठा आनंद घेत आस्तो ह्यची जाणिव झाली. पोटच्या लेकरागत संबाळलेल्या धानाला जवा बाजारात चांगला भाव मिळतो तवा हरएक शेतकरी आसाच आनंदी व्हतो.

नानाला कडबा ईकुन मिळाल्यालं पैसं एकांद्या नोकरदाराच्या फक्त एका दिसाच्या पगारी हितकंच आस्त्यालं पण त्यातुन मिळाल्यालं समाधान महिण्याभराच्या पगारी एवढं मोठ्ठ हाय. कारण सुख मिळिवण्यासाठी लय पैसं आसावं लागत्यात आसं नाय; तर मिळाल्याल्या पैशात समाधानी आसनं जास्त महत्वाचं आस्तंय हे जरी खरी आसलं तरी पण दुःख ह्यजंच जास्त हाय की बाजारात शेतमालाला कवडीमोल भाव मिळूनबी तिवढुशा भावातच बळजब्रीनं समाधानी राहायची जणु सवयच शेतकऱ्याला लागली हाय. त्याच्यामागचं हे ईगीन कधी संपायचं कुणास्ठाव ?

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०६ सप्टेंबर २०१८



Thursday, August 30, 2018

पारिजातक

आज माझ्या कुंचल्यातुन साकारलेलं पवित्र आणि सुगंधी पारिजातकाचे फूल; खास श्रावण महिन्यात माझ्या प्रिय कलारसिकांसाठी शेअर करत आहे. कशाला उगाच झाडाचं फुल तोडायचं डोळ्यांनी पहायचं आणि हाताने काढायचं कलेचा सुगंध आपोआप दरवळतो. हर हर महादेव !

Name-  Parijatak ©
Artist- Vishal Garad
Material- Ball pen & wax crayons
Time required- 2 hrs
Size - 25 × 28 cm

चित्रकार : प्रा.विशाल गरड
दिनांक : ३० ऑगस्ट २०१८



Friday, August 24, 2018

बातमी कर्नाटकातल्या पेपरातली

कर्नाटक राज्यातील नंबरवन दैनिक असलेल्या दैनिक विजयवाणी मधील लग्नाचा खर्च टाळून पुरग्रस्तांना केलेल्या मदतीची बातमी आज प्रसिद्ध झाली. पेपरात नुसतं नांव जरी आलं तरी लय भारी वाटतंय पण जवा आपली भाषा सोडून कन्नड पेपरात आपली एवढी मोठ्ठी बातमी लागते तेव्हा तर आभिमानानं ऊर भरून येतंय राव. समाजात जे काही चांगलं घडतंय त्याची स्वतःहून दखल घेऊन लाखो लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सच्चे पत्रकार नेहमीच तत्पर आसतात. विचार पेरणीच्या या उपक्रमात महाराष्ट्रासह परराज्यातील दैनिकही साथ देत आहेत याचे विशेष कौतुक वाटतंय. मित्रानो मी मदत म्हणून दिलेल्या छोट्याशा हातभाराला अशा बातम्यांमुळे हजारो हात जोडले जात आहेत हाच खरा विचारांचा विजय आहे. या उपक्रमासंदर्भात विविध वृत्तपत्रात निस्वार्थ भावनेने बातमी लावलेल्या तमाम पत्रकार मित्रांस माझं शतशः नमन.

साभार : ಶರಣಪ್ಪ ಫುಲಾರಿ (पत्रकार शरणप्पा फुलारी सर)

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनाक : २४ ऑगस्ट २०१८




Thursday, August 23, 2018

पुस्तकांनी भरली ओटी

बायकोची ओटी पुस्तकाने भरण्यामागचा माझा उद्देश वाचन संस्कृतीला बळ देणे व पुस्तकांची संगत जुळावी हा आहे. असा नाविण्यपुर्ण उपक्रम प्रत्येकानेच राबवायला हवा. माणसाच्या मेंदुला खऱ्या अर्थाने विचारशील बनवण्याचे सामर्थ्य पुस्तकांत असते. मी जेवढं साडेतीन शक्तीपीठांना मानतो. तेवढंच साडेतीन अक्षरांच्या 'पुस्तक' या शब्दालाही मानतो कारण माझ्या आजवरच्या जडणघडणीत यांनी खुप मोठा वाटा उचलला आहे. इथुन पुढील आमच्या संसारात जेवढं महत्व चुल, भाकर आणि लेकरांचं असेल तेवढंच पुस्तकांचेही असेल. संसार फक्त पोट भरण्यासाठी आणि अपत्यप्राप्तीपुरता मर्यादित नसुन त्याला जर चांगल्या विचारांची सांगड मिळाली तर येणारी पिढी समृद्ध करण्याची क्षमता त्यात असते म्हणुनच हा अट्टाहास. आता दैनंदिन वाचनाने माझ्या विराचे विचार आणखीन विशाल होवोत हिच प्रार्थना.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ ऑगस्ट २०१८


Tuesday, August 21, 2018

पुरग्रस्तांना मदत

बॅण्ड बाजा बारातीला फाटा देऊन साखरपुड्यातच लग्न केल्याने त्यासाठीची रक्कम केरळ येथील पुरग्रस्थांना मदत म्हणून पाठवतोय. स्वतःच्या क्षणिक आनंदापेक्षा गरजवंतांचे आणि पुरग्रस्तांचे अश्रू पुसणे मला जास्त महत्वाचे वाटतंय. माझा संसार सुरू होत असताना दुसऱ्यांचा संसार उभा करण्याचा विचार मला जास्त आनंद देणारा आहे.

तिथेही माझ्यासारखंच नवीन लग्न झालेलं दाम्पत्य असेल अशा पुर परस्थितीत त्यांचा सगळा संसार पाण्यात बुडाला असेल. त्यांच्यावर काय बीतली असले याची जाणिव असल्यानेच मी हा मदतीचा निर्णय घेतला. खरंतर हे लग्नादिवशीच ठरवलेलं परंतु लग्नानंतरच्या कार्यक्रमांमुळे शक्य झालं नाही आज मात्र हातातलं काकण सोडल्या सोडल्या गावातल्या पोस्टात जाऊन मदतीचा चेक केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयात पाठवला.

जे कमावण्यासाठी सगळं आयुष्या खर्ची पडलेलं असतं ते एका क्षणात पाण्यात बुडुन गेल्यावर काय यातना होत असतील याची कल्पनाच करवत नाही. आपली दहा रूपयाची नोट जरी चुकुन पाण्यात भिजली तर तीला वाळवण्यासाठीचा आपला आटापिटा त्या दहा रूपयाची किंमत दर्शवतो पण ईथे तर अख्खे संसारच पाण्यात गेलेत तेव्हा अशांना सावरण्यासाठी आमच्या संसारातला एक घास पुरग्रस्तांसाठी द्यावासा वाटला. ईतरांच्या संसाराचं हित चिंतलं की आपला संसार आपोआपच सुखी होऊन जातो अशी माझी भावना आहे म्हणूनच हा अट्टाहास.
निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या केरळवासीयांना या दुःखातुन सावरण्याचे बळ मिळो एवढीच प्रार्थना.

वक्ता तथा लेखक - विशाल गरड
दिनांक - २१ ऑगस्ट २०१८




Thursday, August 9, 2018

विशाल & विरा

ती येतेय; विशाल गरडची बायको म्हणुन माझ्यासमवेत माझ्या कलागुणांचीही स्वामिनी बनून. लिहिता लिहिता राहिलेल्या रेषा पुर्ण करायला. विसरलेला एखादा शब्द आठवण करून द्यायला. थकलो तर बहरवायला, थांबलो तर चालवायला, रूसलो तर मनवायला, रागावलो तर शांत करायला, बावरलो तर सावरायला. ती येतेय; चित्रकाराचे चित्र बनून रंगायला, लेखकाचे अक्षर बनून उमटायला आणि वक्त्याचे शब्द बनून घुमायला.

ती येतेय; एकांताचा यमदूत म्हणून तर सोबतीचे अमृत पिऊन. ती येतेय; अहोरात्र कला उपसण्यात गुंग असलेल्या हातावर मायेचे आणि प्रेमाचे पांघरूण घेऊन. दाहीदिशांत फिरणाऱ्या माझ्या मनाला स्वतःकडे केंद्रीत करायला. देहाच्या आणि मनाच्या सुखांचा दुष्काळ मिटवायला. ती येतेय; तुळशीला पाणी घालायला, घास भरवायला आणि विस्कटलेल्या जिंदगीला संसारात गुंफायला. होय माझी विरा येतीय माझ्या नावाचं कुंकू लावायला.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०९ ऑगस्ट २०१८


Monday, July 23, 2018

तुम्ही मरू नका, अन्यायाला मारा

शिवरायांच्या काळात युद्ध जिंकण्यासाठी एकाही मावळ्याने आत्महत्या केली नाही. रणांगणावर लढता लढताच प्राणांची बाजी लावली. स्वतःचा जिव देऊन प्रश्न सुटत नाही उलट जगुन लढण्याची जिद्द कमावता येते.

आरक्षण हे माणसांनी तयार केलंय ते बंद करायचे वा चालू ठेवायचे. कुणास द्यायचे वा कुणास नाही. हे सगळं माणसांच्याच हातात असतं तेव्हा देव आणि निसर्गाच्या हातात असणाऱ्या जन्म आणि मृत्युचा फैसला तुम्ही करू नका.

आपल्या घराचे जेवढं नुकसान आरक्षण नसल्याने होत आहे त्याहुन कैकपटीचे मोठे नुकसान तुमचा जीव गेल्याने होईल. तेव्हा मिळणाऱ्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आधी आपण हयात असणं महत्वाचं आहे.

जलसमाधी, आत्मदहन, फाशी असली आंदोलने मराठा समाजाला न परवडणारी आहेत. बांधहो तुमच्या जिवावरून अशी पन्नास आरक्षण ओवाळून फेकू फक्त तुम्ही जीव देऊ नका.

आझादी बलिदान माँगती है I ही म्हण स्वातंत्र्यपुर्व काळात लागू पडत होती परंतू आता स्वतंत्र भारतात आरक्षणासाठी बलिदान द्यावे लागने हे दुर्देव आहे. स्व.काकासाहेब शिंदे यांस भावपुर्ण श्रद्धांजली !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ जुलै २०१८

Friday, April 13, 2018

| रेप ©

काल काश्मिरमध्ये असिफा या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी मिळून केलेल्या बलात्काराची बातमी समजली आणि माणूस जातीत जन्म घेतल्याचीच लाज वाटू लागली. हा प्रकार जानेवारी महिण्यात घडला असुन अद्याप त्या नराधमांना शिक्षा झाली नाही उलट काही लोक त्याचे समर्थन करत आहेत. त्या अत्याचार करणाऱ्यांचा निषेध नोंदवायला बस्स माझ्याकडे एवढेच शब्द आहेत कारण अशा माणसावर थुंकणे म्हणजे थुंकण्याचा अपमान आहे, त्यांच्या अंगावर विष्ठा टाकणे हा त्या विष्ठेचा अपमान आहे, अशांना जनावरांची उपमा देणे हा जनावरांचा अपमान आहे. जनावरं माणसापेक्षा हजार पटीने संयमी असतात कारण मादीने माज केल्यावरच ती उडतात पण मानवाने मात्र या बाबतीत जनावराला केव्हाच मागे टाकलंय. असिफासारख्या चिमुकल्या जिवाकडे बघताना या लिंगपिसाट नराधमांची लिंग उठतातच कशी ? चांगलं चुंगलं खाऊनही या मानवी शरिरात हे नासकं वीर्य उत्पन्न होतेच कसे ? अशा लोकांच्या अंडाशयातल्या गोट्या ठेचुन काढायला हव्यात. अशा प्रकारच्या अत्याचाराचा विकार डोक्यात येणाऱ्या मेंदुचा खिमा करून गिधाडांना खायला टाकायला हवा. जिवंतपणीच यांच्या अंगावरची चामडी काढुन हे नागडे देह तळपत्या उन्ह्यात पशु पक्षांना खाण्यासाठी रस्त्यावर टाकायला हवेत. अशा लोकांचे मांस खाताना त्या पशुपक्षांनाही उल्टी येईल एवढा वाईट विचारांचा वास त्या नरदेहातुन सुटलेला असेल.

निसर्गाने असिफाला दिलेलं निरागस सौदर्य या नराधमांनी झाडाची कोवळी कळी हुंगुन, तिच्या कोवळ्या पाकळ्या कुस्करून चिरडुन टाकाव्या तसं तोडुन टाकलंय. अशा कित्येक असिफा रोज चिरडल्या मुरडल्या जात आहेत. कोपर्डीच्या घटनेतल्या आरोपींनाही फक्त फाशी करार दिलेला आहे पण अजुनही ते श्वास घेत आहेत. जेव्हा मदतीचे सर्व रस्ते संपतात तेव्हा हात जोडुन आपण देवाकडे न्याय मागतो पण ईथेतर देवासमोरच अत्याचार झालाय आता न्याय मागायचा कुणाला. अत्याचारी बलात्कारी नरधमांना या वाईट कृत्यानंतरही श्वास घेण्याची परवाणगी देणाऱ्या मंद न्यायव्यवस्थेचा विजय असो.

कोणाचे गं कोणाचे सुंदर डोळे कोणाचे
त्या पाण्यातील माशाचे कि माझ्या बाळाचे ?

या शेवटच्या दोन ओळी लिहिताना हुंदका आलाय मोठा. अश्रूंचे दोन थेंब मोबाईलच्या स्क्रिनवर पडलेत ते पुसत पुसत लिहितोय, कारण पुन्हा अशी गोंडस असिफा कुण्या लांडग्यांची शिकार होऊ नये म्हणून.

#JusticeForAsifa #HangTheRapist #Asifa_bano

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ एप्रिल २०१८



Thursday, April 5, 2018

| माझी आय ©

आवं म्या कुठला बीजी माझ्यापरीस तर माझी आय जास्त बीजी हाय. घरातली समदी काम करता-करता पार झाक पडती पण हिजी कामं काय उरकत न्हायती. हिला निवांत बोलायचं म्हणलं की एकतर भाकऱ्या थापताना न्हायतर भांडी घासताना. आजबी आमच्या हौदापशी आय भांडी घासत व्हती आन् म्या आपलं गप्पा मारीत व्हतो त्येज्यातच फुटू काढायल्यालं बघून आयनं दोन खमंग डायलाॅग मारलं. "आरंय ! तस्लं काय फुटू काढतोच रं, बाप शिव्याच घालीन तुला", "चांगली साडी चुळी घातल्यावर कुठं जातुस रं" तरीबी म्या तसंच दोन फ्लॅश मारलं. आव मी कुठला आलोय साहित्यिक माझी आय आसल्या पाच पन्नास पुस्तकांचा आर्क एका वाक्यात सांगत अस्तीया. मी तर सायन्स ग्रॅज्युएट माणुस है पण आर्टची डिग्री म्या ह्याच चुलीम्होरच्या ईद्यापीठातुन घेतल्याली हाय. कामाला लईच खंबीर खट्ट हाय माझी आय. तीज्या पोटातुन आल्याचा मईंदाळ आभिमान वाटतंय मला म्हणुनच तर एकाच टायमात बहुआघाड्यावर काम करायची हिम्मत ठिवतो म्या. ती तसलं प्रेरणा, ईन्सिपीरीशन वगैरे घ्ययला लईमटी पुस्तकं नाय मी वाचत बसत फकस्त आईकडं काम करताना बघीतलं की दहा हात्तीच बळ येतंय आपसुक.
लई लई लई मजी लईच काम केलंय माझ्या आय ना आजवर आन् आजुनबी करतीया. तीला माझ्यापाठी आजुन एक दोन पोरं पायजे व्हती पण पोरीच झाल्या; तरी नाय काय वाईट वाटून घेतलं तीनं उलट सारखं म्हणायची "आसुंदे ! ईकुलता एकच हाय माझा ईस्ल्या; तरीबी चार पाच पोरांच्या बरूबरीचं नांव कमवील". खरंच हाय की तीचं, म्या हाय ईकुलता एक पण आता माजी आय सांगत आस्ती समद्यास्नी की; माझं एक पोरगं माईकवर बोलतंय, दुसरं चित्र काढतंय, तिसरं लेखक हाय आन् चौथं कवीता करतंय. बास की आजुन काय पायजेल. पोरं किती हायती ह्ये नाय महत्वाचं ती काय हायती आन् काय करत्याती हे जास्त महत्वाचं हाय, आसं मी नाय माझी आय म्हणतीया.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ एप्रिल २०१८

| दूध ©

आज सकाळी लवकर काॅलेजला निघालो होतो. उक्कडगांवचा ओढा ओलांडला तोच एका गाईच्या गोठ्याशेजारी दोन लहान मुलं गाडीला टेकून कुत्र्याच्या पिलाजवळ थांबलेली दिसली. रस्त्यानी धावणारी गाडी बघून चवताळून मागे लागणारी कुत्री त्या लेकरांपाशी मात्र शेपटी हलवत उभी होती. मी गाडी थांबवून त्यांचा फोटो घेतला. कुत्रीची पिल्ली दूध पिण्यासाठी तिच्या सडावर तुटून पडली होती. हे दृष्य पाहत उभी असलेली ती लहान पोरं कुत्रीच्या अंगावरून हात फिरवत उभी होती. गावरान लेकरं असल्याने ते धाडस आपसुकच असतं त्यांच्यात. मी पोरांना त्यांची नावे विचारल्यावर जरा लाजत आळुखे पिळुखे घेत त्यातला एक जण बोलला "मी बप्प्या हाय आन् हि सार्थक, पप्पासोबत दूध प्ययला आलाव लानात" अशा बोबड्या स्वरात त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले. तेवढ्यात धार काढून त्या मुलांचे वडील गाडीजवळ आले. मग मी त्यांना विचारले. का हो रोज आणता का यांना शेतात ? तेव्हा ते म्हणाले "येत्याती रोज म्हागं लागून निरसं दूध प्यायला" एकिकडे गाईचं निरसं दूध पिण्यासाठी ही ईवलीशी पोरं रोज वडीलांच्या मागे लागून शेतात येतात तर दुसरीकडे काही लेकरं दिवसाची सुरूवात कोल्ड्रींक्स आणि मॅगी खाऊन करतात. युवा पिढी तंदुरूस्त करायची असेल तर आजमितीला दूधासारखं दुसरं टाॅनिक नाही. लेकरांमध्ये आईचे दूध पितानाची सवय कालांतराने गाईचे दूध पिण्यात बदलते आणि मग नंतर तीही तुटुन जाते. लहानपणी दूध पिण्यासाठी आईमागे धावणारी लेकरं मोठी झाल्यानंतर मात्र यांनाच दूध पाजण्यासाठी आईलाच दूधाचा ग्लास हातात घेऊन यांच्या मागे पळावं लागतं हे दुर्देवच म्हणावे लागेल. एकिकडे शीतपेय कंपण्यांनी भंपक जाहिराती दाखवून युवापिढीला ताबडं विष पाजण्यासाठी शर्तीचे प्रयत्न लावले आहेत. अशातच ग्रामिण संस्कृतित मात्र दुधाचा संस्कार अजुनही टिकून असल्याचे पाहून समाधान वाटले.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०५ एप्रिल २०१८

Wednesday, April 4, 2018

| रामभऊ ©

आज घरी निवांत वाचत बसलो होतो. तेवढ्यात आमच्या वाड्यातल्या दरवाजाजवळ उभा राहुन कुणीतरी आवाज दिला. वहिनी दादा हायतं का ? मी उठुन पाहिलं तर आमच्या पेठेतलं रामभाऊ कदम उर्फ भऊ व्हतं. घरात आल्या आल्या आमच्या आईला म्हणलं "लई दिसं झालं दादाला भिटुन तवा मनलं कसं हायतं ती बगावं म्हणुनशीन आलुया". एवढ्या आपुलकीने ख्याली खुशाली बघायला आलेल्या भऊला पाहुण मला खुप कौतुक वाटलं. आमचे दादा घरी नसल्याने भऊ लगेच निघाले होते पण मीच थांबवून घेतले व चहाचा आग्रह केला. काही वेळात दादापण आले मग ढाळजत निवांत तक्क्याला टेकुन भऊ, आमचं दादा आणि मी जुन्या आठवणीत बुडून गेलो. भऊंनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली आहे. अंगावर मळकं धोतर, सदरा आणि टोपी परंतु मन अगदी स्पटीकासारखं स्वच्छ आणि निर्मळ. भऊला मी लहान असल्यापासुन बघतोय. हा माणूस मला कधीच निवांत बसलेला दिसला नाही सतत काही ना काही काम. परंतु आज या वयातही हाताची आणि पोटाची गाठ घालण्यासाठी दुसऱ्याच्यात साल काढत आहेत. त्यांच्या आजवरच्या आयुष्यातली दोन वर्ष त्यांनी आमच्यातही पन्नास पैसे रोजाने काढलीत. त्याची जाणिव ते विसरले नाहीत. आज सुद्धा घरी आल्यावर मालक असं, मालक तसं असे माझ्याशी बोलत होते. त्यांच्याकडुन मालक हा शब्द ऐकताना खुप कसनुसं वाटत होतं मला. "भऊ, मला मालक नका म्हणू मी तुमच्या नातवासारखा आहे" असे कित्येकदा विनवूनही भऊचं आपलं बोलणं चालूच होतं. माझे वडील लहान असताना आमच्या शेतात काम केलेले भऊ आजही जर आम्हाला ईतका आदर देऊन बोलत असतील तर या जाणिवेला काय म्हणावे समजत नाही. म्हणूनच या अशा माणसांच्या नावाअधी प्रामाणिक, जिव्हाळ्याची, प्रेमळ, आपुलकीची हि असली सगळी विशेषणं मातीमोलं वाटावी एवढ्या उच्च प्रतीचे प्रेम ती व्यक्त करतात.
भऊला एकुण तेरा मुलंबाळं झाली त्यापैकी आज फक्त दोन मुली हयात आहेत. मुलगा नसल्याने नवरा बायको दोघेही रोजंदारी करून जगत आहेत. जुन्या सर्वेत त्यांचे दारिद्र्य रेषेत नाव नसल्याने घरकुलाचे खरे हक्कदार असतानाही शासनाच्या भंपक सर्वेमुळे ते वंचित आहेत. "मालक, आमास्नी शीती नाय, शिक्षाण नाय आन् कुणाचा आधारबी नाय पण पांडुरंग रोज चतकोर भाकरीची सोयं करतोय", "हात पाय चालतंय तवर राबायचं मेल्यावर कोल्हं न्हिऊ नायतर लांडगं कुणी बगीतलंय" अक्षरशः काळजात धस्स व्हावं असे त्यांचे शब्द काळजात खोलवर रूतत होते. वंशाला दिवा का पाहिजे याचे उत्तर भऊंच्या बोलण्यातून सतत अधोरेखीत होत होते. घरादाराची परिस्थिती अतिशय गरिब असतानाही आमच्या गल्लीतली गौराईची परंपरा त्यांनी आजवर समर्थपणे जोपासली आहे. त्यांच्या पश्च्यात ती सुद्धा नामशेष होईल. मला नेहमी गरिबीत जगणारी अशी श्रीमंत माणसं शोधण्याची सवय आहे आजही बऱ्याच दिवसांनी भऊंसोबत बोलायला मिळाले हे खरं तरं माझंच भाग्य समजतो. "भऊ, कधी काय गरज पडली तर नक्की या माझ्याकडं आय एम प्राऊड ऑफ यु". यातलं अर्धच वाक्य समजलं असल त्यांना परंतु एक गोड हास्य माझ्या पदरी टाकून हातातली बॅटरी सुरू करून भऊंनी उंबरा ओलांडला. ते गेल्यानंतर कितीतरी वेळ मी आणि दादा भऊंच्या आपुलकीचं आणि माणुसचीचं कौतुक करत होतो. खरंच हि नुसती माणसं नसुन ग्रामिण जिंदगीतले खरे रिअल हिरो आहेत. आजही असे कित्येक रामभाऊ आपल्या अवती भवती कष्ट करत आहेत. गरज आहे फक्त त्यांना आपलं म्हणण्याची.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ०४ एप्रिल २०१८



Tuesday, March 27, 2018

| दोस्ती ©

कवी विकास पाटील म्हणजे माझ्या फेसबुकवरचा एक फाॅलोअर गतवर्षी जयसिंगपूरला झालेल्या व्याख्यानात आम्ही पहिल्यांदा भेटलो. गेली तीन वर्षापासुन तो आणि मी फेसबुक मित्र आहोत. लांबच्या प्रवासावर असताना माझ्या विचारांवर प्रेम करणाऱ्या विकास सारख्या दोस्तांना भेटायला मला आवडते. काल सांगलीला जात असताना विकासच्या ईस्लामपूरातील नवनाथ टि स्टाॅलला सदिच्छा भेट दिली. विकासचे वडील गेल्या दहा पंधरा वर्षापासुन हा व्यवसाय करतात. अतिशय कष्टाच्या जोरावर त्यांनी सर्व मुलांचे शिक्षण पुर्ण केले आहे. छोट्याशा घराचा बंगला तयार करायला त्यांना तब्बल तेरा वर्ष लागली. मुंगी सारखे काम करून हत्ती एवढे सामर्थ्य तयार केलेल्या विकासच्या वडीलांचा अभिमान वाटला. पर्वा बेंबळी येथील व्याख्यान आटोपल्यानंतर रात्रभरचा प्रवास करून पहाटेच ईस्लामपूरात पोहचलो. विकास पहाटे पाच वाजल्यापासुनच स्टॅण्डवरच्या त्याच्या टपरीवर माझी वाट पहात होता. गाडीतुन उतरताच कडकडुन मारलेल्या मिठीतुन विकासचे प्रेम वाहू लागले. मग आम्ही लगोलगच त्याच्या घरी प्रस्थान केले. आंघोळ अष्टमी उरकुन मी तयार होईपर्यंत मला ओळखणारे ईस्लामपुरातील अनेक युवक विकासच्या घरी आले. कुणी फुले आणली, कुणी बुके आणले तर कुणी शाल आणली. कधीही न भेटलेली व पाहिलेली ही माणसं फक्त आपल्या शब्दांमुळे ईतके प्रेम करतात हे पाहुण कृतार्थ झालो. आयुष्यात ही खऱ्या माणसांची दौलत कमावल्याचे सार्थक वाटले.
जमलेल्यांपैकी अझर काझी कडुन माझ्याबद्दलचीच माहिती ऐकताना मी स्वतःला आरशात बघीतल्याचाच भास झाला. ही माणसं आपल्याबद्धल एवढं सगळं ऐकुण आहेत हि गोष्टच मुळात बळ देणारी असते. चार जिल्हे ओलांडूनही लोकं एवढं प्रेम करतात हे पाहूण शब्दावरची श्रद्धा अजून दृढ होते. खिशात किती पैसे याहून डोक्यात किती विचार आणि ह्रदयात किती प्रेम भरलंय यावरूनच निस्वार्थी प्रेमाचा जन्म होत असतो व असे प्रेम अनुभवने हा सुद्धा एक स्वर्गीय अनुभव असतो जो मला ईस्लामपूरातील मित्र मंडळींकडून मिळाला. दोस्तहो तुम्हा सर्वांचे मनापासुन धन्यवाद. माझ्यासारख्या वाटसरूला तुम्ही दिलेला पाहुणचार आणि प्रेम चार शब्दात व्यक्त करणे कठिणय बस्स हा प्रेम व जिव्हाळा असाच आखीरी दम तक आबाद रहे यही दुवा..

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २७ मार्च २०१८

Sunday, March 25, 2018

बबन | चित्रपट परिक्षण ©

बबनचा पहिल्याजुटचा शो बघाया मिळाला. आख्खा पिच्चर हुस्तोर कधी सुरू झाला आन् कधी संपला कळलच नाय. प्रिमियरला इंटरवल बिंटरवलची भानगड नस्ती त्यज्यामुळं आपुट पिच्चर सलग बगाया मिळाला. दोन तासाच्या आखंड पिच्चरमंदी भाऊराव कऱ्हाडेनी लई जीव वतलाय. गावाकडच्या माणसांला तर बबनमदल्या हारेक पात्रावुन जीव ववाळुन टाकू वाटलं आशी अॅक्टींग किलीया समद्यांनी. पिच्चरमदी सुरूवातीला पुलिस स्टेशनमदी साहेब पोट भरायला डबा उघडतंय आणि शेवटाला मानवी आत्याचाराची बळी ठरल्याली हिराॅईन तिज्या पोटातलं पाप कुंबडीचं आंडं फुटावं तसं भित्ताडावर आपटून संपीवती. सुरूवात आन् शेवट आंगावर काटा आणणारा हाय. मधल्या येळत दुधाच्या धंद्याचं वास्तव, गावातलं खत्रुड राजकारण, बैजू पाटलाची दारूगीरी, काॅलेजमदली मस्ती आन् भांडणं बगाया भेटत्याती. गावरान,ईरसाल बबन्या कोमलच्या माग फिरताना, बोलताना आणि टपकं खाताना दिसतंय तरीबी नाद नाय सोडत 'हम खडे तो साला सरकार से बडे' म्हणत म्हणत दुस्मानांशी दोन हात करत बसतंय.

पिच्चरचा हिरो जरी बबन आसला तरी समदी माणसं आपुणमत्त्याच बैजू पाटलाच्या पिरमात पडत्यात कारण ही भुमिका दस्तुरखुद्द डायरेक्टर भाऊरावनी वटीवल्यामुळं त्येला दोनशे टक्के न्याय मिळालाय. मला सुदा बैजू बेंद्रे पाटलाचं पात्र लयच झ्याक वाटलं. गावात राहत आसताना आपल्या तोंडात येणाऱ्या गावरान शिव्या जश्श्आन तश्श्या बबनमदी ऐकायला मिळत्यात्या. ती तसलं शिवी देताना बीप बीप ची भानगडं हितं आज्याबात नाय. ए ग्रेड तर ए ग्रेड गेलं झॅटमारी आशीच भुमिका डायरेक्टरनं घेतल्यामुळं समद्या शिव्या हितं ऐकायला मिळत्यात्या. हाँ आता आसल्या शिव्या ऐकायची सवय नसणाऱ्याला जरा कसनुसं वाटलं; पण बुरा ना मानो ये कलाकारी है आसं म्हणुनशान सुडुन द्या.

आमच्या बार्शीचा कलाकार अभय चव्हाण या चिकण्या हिरोनं व्हिलनगीरी भारी साकारली हाय, त्येज्यातला समदा मध हित बघाया भेटतंया. पिच्चरमदी त्येजा रोल जितका कडू हाय त्येज्याऊन जास्त मला आभ्याची अॅक्टींग जास्त ग्वाड वाटली. आमच्या पांगरीचा सुपुत्र आन् बबनचा लाईन प्रोड्युसर शुभम गोणेकरनंबी अॅक्टींगची झलक भारीच मारलीया. आन् व्हय व्हय महत्वाचं म्हंजी तब्बल पस्तीस तासाच्या फुटेजला कात्र्या लावू लावू फकस्त दोन तासाचा पिच्चर बनीवलेल्या बबनचा एडिटर प्रदिप पाटोळेचं सुद्धा लई कौतुक वाटतंय मला. हे तिघंबी जिगरी गँगमदली हैत आपल्या.

पडद्यामागच्या कलाकारांना भाऊंनी पडद्यावरबी चान्स दिलाय म्हणून योगेश डिंबळे,प्रमोद चौधरी, इंद्रभान कऱ्हे, संदिप बोरगे, संभाजी देवीकर हि माझी दोस्त गँग येगयेगळ्या पात्रात बबनमदी दिसली. यवग्याने नानाची भुमिका जग्वारमदी बसुन अरूण गवळीगत डॅशींग साकारली, तसंच भाऊसाहेब शिंदे यांनी बबनची भुमिका पायजे आशीच साकारली त्येला गायत्री जाधव व शितल चव्हानने चांगली साथ दिल्याली हाय, एकुनच समद्याची केमिस्ट्री, फिजिक्स आन् बायोलाॅजी चांगलं जमुन आलंया.

कंडोमचा किस्सा व मक्याच्या फडातली बबन्या आन् पप्पीची झकडपकड पोट दुखस्तोर हाशीवती. ह्यातच भरीसभर म्हणून बैजू पाटील जवा लिंबाच्या काडीला कोलगेट लावून दात घासतंय आणि सरीकडं दारू प्यायला शंभर रूपये मागतंय तवातर आतडी फाटूस्तर हासू वाटतंय. आता माझं लिव्हल्यालं वाचूनच हासत बसू नका थेट्रात जाऊन बबन बघून या आन् पुना तुमीच मला सांगचाल व्हय राव डिक्टो आसंच हाय.

बाकी शहरात राहिलेल्या माणसांला सुट्टयांत गावाकडं ययची गरज नाय तो फिल तुमास्नी बबन बगुन शंभर टक्के मिळलंच. पोट भरून हसायला, धिर गंभीर व्हायला, किव यायला, गुलाबी गोष्टी बघायला, फायटिंग पहाया, प्रेमाचं चाळं शिकाया, आन् ह्ये समदं बघीतल्यावर पिच्चरची लास्ट फ्रेम बगुन डोस्क्यात मुंग्या आणणारा ईच्चार घुसवुन घेण्यासाठी बबन नक्की बघा.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २५ मार्च २०१८


Wednesday, March 21, 2018

| जळलेला माळ ©

काही महिण्यांपुर्वी याच माळरानाला कास पठारची उपमा देऊन लेख लिहिला होता आज त्याच माळाला जळलेला माळ असं नांव देऊन लेख लिहित आहे. पहिला पाऊस पडल्यानंतर फुटणाऱ्या अंकुरापासुन सुरू झालेला गवताचा प्रवास अखेरीस राख होऊन संपतो. माळावर सहज चालता चालता किंवा मोहोळ वगैरे झाडताना गौरी पेटवण्यासाठी लावलेली आग जर वेळेवर नाही विझवली तर हजारो हेक्टरचे वाळलेले गवत जळून राख होतं. काडी टाकणाऱ्याला जर एवढी अक्कल आली तर अशी जळणारी कित्येक वने वाचतील. वाळलेलं गवत जळल्याचे दुःख आहेच परंतु त्याच गवताच्या आळवनात पक्षांनी घातलेल्या अंड्यांचा व डोळेही न उघडलेल्या पशुपक्षांच्या पिल्लांचा झालेला संहार मन हेलावून टाकणारा असतो. हजारो वन्यजीवांच्या तोंडचा घास धुरांच्या लोटात जळताना पाहून काळीज फाटून जातं. निसर्ग देवता हे सारं काही पाहत असते, एका क्षणात पाऊस पाडुन आग विझवण्याचे सामर्थ्य ठेवणारा निसर्ग अशा वेळी मात्र गप्प राहतो कारण त्याने मानवासाठी स्वतःला घालुन घेतलेले नियम तो शक्यतो स्वतःच पाळत असतो. परंतु असा वणवा पेटण्याच्या घटना पाहून त्याच्या लेकरासाठी त्याचाही जीव तिळतिळ तुटत असावा यातुनच जर उन्हाळ्यात पाऊस पडला तर आश्चर्य कशाचे. मी निसर्गाला देव मानणारा माणूस आहे. त्याच्याच लेकरांचा जर आपण असा छळ करायला लागलो तर तो वेळी अवेळी त्याच्या वेळापत्रकात बदल करून आपल्यावर बरसतो त्यालाच मग आपण अवकाळी व गारपीठ म्हणतो. आकाशात उडायची स्वप्न बघणारे पंख जेव्हा माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळे आगीत भस्मसाथ होतात तेव्हा त्याला कोण जबाबदार असतं ? परंतु ऐन तारूण्यातली पोरू जेव्हा अकाली मरतात तेव्हा देवाला शिव्या घालून आपण लगेच मोकळे होतो. निसर्ग स्वतःहून कुणाचं वाईट करत नाही आपणच आपल्या मृत्युची कारणे तयार करूण ठेवलेली असतात त्याला तो तरी काय करणार. जर माणसांचा तळतळाट एका माणसाला लागू शकतो तर निसर्गाचा तळतळाट का बरे आपल्याला लागणार नाही?

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २१ मार्च २०१८

Monday, March 19, 2018

| STEPHEN HAWKING ©

He is seating on a single chair since 33 years & his mind going out of earth for study. It doesn't matter where you are but what you think matters. His body parts not in his control still his brain was thinking about the universe. By overcoming personal disabilities he studied on wheelchair & achieved America's highest civilian award. He could't speak & move physically but he managed to write & speak with the help of technology. Here we have all the body organs in good condition & what we think ? What we study ? What we give to the nation ? This is a subject of introspection for all of us. Don't allow your disabilities to win over you instead defeat them & do as much as you can for nation.
Here is my small efforts to make his painting only by ball pen, at same time my fingers & eyes follow the instructions of my brain. My brain is full of his thoughts thats why it was possible. I have not only drawn this painting but also have studied the man who is in painting.

Author : Vishal Garad
Date : 19 March 2018


Sunday, March 11, 2018

| दिलखुलास ©

मी व्याख्यान करताना माझी ही छबी श्रोत्यांना एकदातरी पहायला मिळतेच. व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तीवर एखादी कोटी करून श्रोत्यांसह मनमुराद हसण्याचा मोह मला टाळताच येत नाही. धीरगंभीर व्याख्यान मला करता येत नसल्याने व्याख्यानाचा परिपुर्ण आनंद मी स्वतः घेतो म्हणूनच श्रोताही आनंदी होतो. वक्ता जर हजरबाबी आणि मिश्किल असेल तर श्रोत्यांसाठी ती एक वैचारिक मेजवानीच असते. मी व्याख्यानाच्या पाच सेंच्युऱ्या मारल्यानंतर आत्ता कुठे माझ्या अलिकडील व्याख्यानात वक्त्याचे हे दोन अलंकार स्वतःमध्ये उतरल्याची खात्री झाली आहे. अनुभव हाच सर्वात मोठा गुरू असतो याचीही जाणिव आता क्षणोक्षणी होत आहे.
व्याख्यानाच्या कार्यक्रमात समोर बसलेल्या श्रोत्यांचे आणि व्यासपीठावरील पाहुण्यांचे वक्त्याकडे बारिक लक्ष असते. गर्दीला खिळवुन ठेवण्याचे सामर्थ्य जसे जिव्हेत असते तसेच त्या गर्दीला आनंदी ठेवण्याचे सामर्थ्य देखील वक्त्याच्या हसण्यात असते. पुस्तक वाचल्यासारखी व्याख्याने, किंवा बोलण्याला ठरावीक आयत आखुन केलेली व्याख्याने श्रोत्यांना निरस वाटतात; कारण मी एक श्रोता म्हणुन केलेले हे परिक्षन आहे. आज जरी मी वक्ता असलो तरी माझ्या वक्तृत्वापेक्षा मी ईतरांना ऐकायला आणि ईतरांचे वाचायला जास्त वेळ देतो म्हणुनच माझी प्रगल्भता वाढत आहे. माझ्या तोंडापेक्षा माझे कान आणि डोळे मोठे आहेत (शब्दशः अर्थ घेऊ नये) म्हणुन शब्दांच्या फौजा माझ्या सदैव दिमतीला उभ्या असतात. सरतेशेवटी शब्दांच्या समुद्रात चमच्याने पाणी उपसणारा मी एक सामान्य वक्ता आहे अजुनतर सारा समुद्र उपसायचाय...

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : ११ मार्च २०१८


Tuesday, February 20, 2018

| कत्तल ©

मेरा देश बदल रहा है, झाडे तोड रहा है |
झाडे तोडेगा इंडिया, तभी तो रस्ता करेगा इंडिया |

शेकडो वर्ष लाखो वाटसरूंना व पंढरीच्या भक्तांना सावली दिलेल्या या जुन्या पिपरणीच्या वृक्षांची चौपदरी विकासाच्या नावाखाली शासनाने कत्तल केली. काल सातारा जिल्ह्यात व्याख्यानासाठी निघालो होतो तेव्हा पंढरपूर-सातारा मार्गावर वाखरीनजीक या शेकडो झाडांचे धड कापलेले दिसले. मी गाडी थांबवून अतिशय दुःखी होऊन या झाडांकडे बघत बसलो. शेकडो वर्ष जगलेल्या या झाडांना एका मिनिटांत हि माणसं जमिनधोस्त करून टाकत आहेत. चौपदरीकरनानंतर मधल्या जागेत छोटीशी रोपटी लावून त्या झाडांची जागा आम्ही भरून काढल्याचा आव आणतील परंतु अशी जुनी झाडे आता टिकणे आणि वाढणे अशक्य आहे. अरे एकीकडे आम्ही करोडो झाडे लावल्याची वल्गना करतो आणि दुसरीकडे अशी जुनी झाडे तोडुन नेस्तनाभूत करतो. वृक्षारोपण महत्वाचे आहे पण त्याहुन जास्त त्याचे पालनपोषण असते; जे सहसा कुणी लक्ष देऊन करत नाही. शासनाने गतवर्षी दोन कोटी झाडे लावल्याचे सांगीतले त्यातली किती झाडे चिटकली आणि पुर्ण आयुष्य जगणार आहेत याची आकडेवाडी समजेल काय ? निसर्ग झाडांच्याबाबतीत तुमच्या जीवावर अजिबात विसंबून नाही. त्याच्यात स्वतःमध्ये पुन्हा सगळीकडे जंगल उभा करण्याचे सामर्थ्य आहे फक्त तुम्ही निसर्गाने उगवलेली व वाढवलेली झाडे तोडू नका मग भले ती तुमच्या हद्दीत असो वा खाजगी मालकिची एवढीच विनंती.

जुन्या काळात रस्ते साधे होते माणसंही साधी होती. वाहने वगैरे तर नव्हतीच बहुतांशी प्रवास चालत किंवा बैलगाड्यांनी असायचा म्हणुन रस्त्याच्या कडेला सावलीसाठी झाडे लावलेली असायची. परंतु आता रस्ते डांबरी झाले आणि माणसंही डांबरट झाली. स्वतःला रस्त्याने ऐसपैस सुपफास्ट जाता यांव म्हणुन झाडांच्या जीवावर उठली. ती बिचारी मुकी झाडं फक्त आपल्याला निस्वार्थ भावनेने सावली आणि प्राणवायू देत होती. त्या जागेवर उगवून त्यांनी चूक नाही केली पण त्यांच्या जागेवर रोड करून आपणच चुक करत आहोत याची जाणिव व्हावी.
संत तुकारामांनी सांगुन ठेवलंय "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" आणि त्याच पांडुरंगाच्या मातीत होत असलेली या वृक्षाची अशी कत्तल बघवत नाही.

त्या झाडावर शेकडो पक्षांची घरटी होती त्या घरट्यात अंडी होती त्या अंड्यात पिल्ले होती. हि सुद्धा राष्ट्राची संपत्ती नाही का ? तीचं संवर्धन व जपणुक ही आपली जबाबदारी नाही का ? विकास करणे हे तर कर्तव्य आहेच परंतु तो करत असताना ही वृक्षवल्ली व पक्षी गुरे ढोरे हे पण जगले पाहिजे अन्यथा निसर्गदेवता माणवावर नाराज होऊन तीची नाराजी दुष्काळ, भुकंप आणि त्सुनामीमधुन दाखवून देईल जी तुम्हा आम्हाला कधीच न परवडणारी असेल.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २० फेब्रुवारी २०१८



Thursday, February 15, 2018

| मायेची ओढ ©

आज सकाळी काॅलेजला जाताना उक्कडगांपासुन तळ्याकडं जाणाऱ्या रस्त्यावर दोन लहाण मुले अनवाणी पायानं चिखल तुडवत चालताना दिसली, दोघंच बहिण भाऊ त्या सुमसान रस्त्याने चालताना बघुन मी गाडी थांबवली. खुप गोड आणि गोंडस परंतु तितकीच धाडसी असलेली हे लेकरं पाहुण मला माझं बालपण आठवलं. गावापासुन साधारणतः अर्धा किलोमिटरवर एक नदी वाहते त्या लेकरांची आई कदाचित तिथं धुणं धुवायला गेली असावी आणि तिलाच भेटायच्या ओढीणं हे चिमुकले चार पाय तिच्या दिशेने पडत असावे असा माझा अंदाज होता. मी देखील असे आईच्या मागे लागून कित्येकदा नदीवर गेलेलो आठवतंय, ह्या चिमुकल्यांना बघुन मला माझा भुतकाळ पाहत असल्यासारखंच वाटलं. हि लेकरं कुणाची आहेत म्हणुन कुणाला विचारावं म्हणलं तर त्या सुमसान वाटेवर चिटपाखरू देखील दिसत नव्हतं. दोन्ही बाजुला पुर्ण वाढ झालेला उसाचा फड आणि मधोमध असलेल्या चिखलवाटेवर चालत चाललेल्या त्या लेकरांची जरा काळजी वाटली म्हणुन गाडी थांबवून त्यांना बोलत बसलो. नुसता एकतर्फी संवाद सुरू होता माझा, ती छोटीशी चिमुरडी तिच्या दादाच्या पाठीशी लपून तोंडात अगठा धरून ईवल्याश्या डोळ्यांनी गंभीर होऊन बघत होती आणि तो मुलगा लाजत मुरडत फक्त माझ्याकडे पाहूण हसत होता.
अवघ्या दिड वर्षाची ती मुलगी आणि तीन वर्षाचा तो मुलगा गावाकडच्या वाटेने गुरांचा दल, गाई, म्हशी, शेरडं, कुत्री, डुकरं, साप, विंचू, असल्या कशाचिही भिडभाड न बाळगता आईच्या ओढीणे निघाली होती.
शेवटी बराच वेळ त्यांच्याजवळ थांबल्यावर दोन मुली गावाकडुन कमरेवर धुण्याची बादली घेऊन येताना दिसल्या या दोघांना त्यांच्या हवाली केलं आणि यांच्या आईपर्यंत पोहचवा काळजीनं असे सांगून गाडीला किक मारली. काॅलेजपर्यंत येईस्तोवर मनात एकच प्रश्न घुटमळत होता कि आईच्या भेटीची हि ओढं मोठे झाल्यावर का बरं कमी होत असावी ?

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १५ फेब्रुवारी २०१८



Wednesday, February 14, 2018

| ढिश्क्यांव ©

ऐन व्हॅलेंटाईन दिवशी सक्काळ सक्काळ त्या प्रिया वरिअरने ढिश्क्यांव केलं आन् तिच्या गुळीनं करोडो युवकांच्या ह्रदयाचा छेद घेतला. आपापल्या व्हॅलेंटाईन तशाच लपवून समदी तीच्याच गोळ्या छाताडावर झेलायला सरसावली. माणसाचं आंग म्हंजी या निसर्गाची एक आद्भुत निर्मिती हाय आन् त्यातला डोळा म्हंजी त्या निर्मितीचा प्राण. जिथं गाजायला कित्येक दशकं वाहून जातात तिथं ही पोरगी तीन तासाच्या पिच्छर मधल्या; साडे तीन मिनटाच्या गाण्यातल्या; चोवीस सेकंदाच्या व्हिडोओत दोन भुवया उडवून, एक डोळा मारून आन् फकस्त एकदा ढिश्क्यांव करून कोट्यावधी तरूणांच्या ह्रदयात जाऊन बसली. कला आणि अदाकरीची ताकदच न्यारी आस्तीया फकस्त ती नेमक्या येळी आन् नेमक्या ठिकाणी दाखीवता आली पायजे मग तुम्हाला गाजण्यापसुन कुणीच रूकु शकत नाय. आवं डोस्क्यात शिरल्यालं ईसरत्याती माणसं पण जर कुणी ह्रदयात घुसलं तर ईसरणं अवघड हुन बसतंया, आता हि बया कवर रूतून बस्तीया कुणास ठाव ?
आन् व्हय आजुन एक सांगायचंय की, प्रिया जरी आज लई गाजली आस्ली तरी तीजी हि अदाकरी आपल्याला ज्यंच्यामुळं बघाया मिळाली ते डायरेक्टर, हिडिओग्रापर, एडीटर, मेकअपमॅन, व शेवटी आपला मार्क झुकरबर्ग हे सुद्धा खरे हिरो हैत. ह्यंच्याबी कलाकारीचं क्वाडकौतुक झालं पायजे म्हणुनशान उल्लेख केला. बाकी प्रिया मॅडमला आता "ओरू अदार लव्ह" ह्यो पिच्छर रिलीज व्हयची सुद्धा गरज नाय यवढी ती गाजुन बसली. तीला निट मराठी येत नाय मग गावठी मराठी तर लांबचीच गोष्टय पण तीला मल्याळम येतंय म्हणून शेवटी तीज्याच भाषेत तीज्यासाठी हे तीन शब्द നിങ്ങളെ അഭിനയം ബ്യൂട്ടിഫുൾ ह्यजा मराठीत आर्थ असाय की, "तुझा अभिनय सुंदर आहे".
आन् आजुन एक; प्रिया मॅडमनी ती ठरवून क्याल्याली अॅक्टींग हाय ऊगं लई मनावर घिऊ नका, कला म्हणून बघा आन् सुडुन द्या न्हायतर तुमी आपापल्या जिंदगीत ह्यज्यापेक्षाबी लई भारी भारी ओरीजनल इक्सप्रेशन्स बघीतलं आस्त्याल फकस्त कुणी शुट नाय केलं म्हणून; न्हायतर तुमच्या 'ती'च्यापुढं आस्ल्या छप्पन वरिअर फिक्या पडल्या आस्त्या. खरंय ना ?

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १४ फेब्रुवारी २०१८




Tuesday, February 13, 2018

| रामफळ ©

आज रोजच्यागत काॅलेजवर निघालो व्हतो. आमचं काॅलेज निवासी आसल्यामुळं तीतं सुट्टी बीट्टीची भानगड नस्ती. डोंगरवाटेला लागल्यावर फुफ्फुटा उडवीत माझी हिरोव्हंडा निगाली व्हती; तेवढ्यात हागवण्याच्या वस्तीवर रोडच्याच कडंला भिमाभऊ वाट बघत बसल्यालं दिसलं. गाडी जवळ येताच त्यंनी मोठ्यांनं आरूळी ठुकली "अयंऽऽऽ सरंयययय...थांबा थांबा" मी बी लगीच ब्रेक मारला. भऊ हातातल्या पिवळ्या पिशवीत कायतरी घिऊन माझ्याकडे दमानं येतं व्हतं. जवळ आल्यावर त्या पिशवीतून एक 'रामफळ' काढून माझ्या हातात देत बोललं "आवं धरा ही, पाडाचं हाय. सकाळ-सकाळ झाडाला दिसलं. तुमच्यासाठी ठिवलं व्हतं म्हणुनच वाट बघत बसलो व्हतो..खावा आता पटमन" भऊचं वय पंच्याहत्तर पण कामाला आजुनबी खंबीरखट्ट हायतं. शेतातली समदी कामं करताना मी त्यंला रोजच बघतोय. काॅलेजला जायच्या रस्त्यावरच भऊचा कोटा आसल्यानं आमचा रोजचाच रामराम पुढं त्यज्यातुनच हि दुस्ती झाली.
माझ्या पोटामंदी दोन घास जावं असं घरच्यांना सोडून दुसरं कुणालाबी वाटणं म्या भाग्याचं समजतुय. आजपतुर कमीवलेली माणसं मला कधीच उपाशी झुपू द्यानार न्हायती ह्यची प्रचीत भऊ सारख्या माणसाचं प्रेम बगुण व्हती, कारण त्यंच्याबी घरात लहाण-लहाण नातवंडं आस्ताना माझ्यासाठीबी त्यंनी पाडाचं रामफळ राखुन ठिवलं. आज महाशिवरात्रीच्या दिवशी भिमाभऊकडून मिळाल्याला हा प्रसाद व्हॅलेंटाईन्सडेला मिळणाऱ्या गुलाबापरिस श्रेष्ठ वाटतुय."आपुण जर चांगलं काम करत आसु तर देव नक्कीच फळ देतंय" आसं म्या लईंदा ऐकलं व्हतं आज ते आनुभवायलाबी मिळालं. हि आठवण लक्षात राहावी म्हणुन भऊकडून रामफळ घेतानाचा ह्यो फुटू भऊची नात पिंकीनं टिपलाय. अशाच आठवणींचं गठुडं रूदयात ठिऊन म्या पुढं-पुढं चालतुय पण एकटा नाही तर माज्यावर प्रेम करणाऱ्या भऊ सारख्या हजारो माणसांना सोबत घिऊन.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १३ फेब्रुवारी २०१८




Monday, February 12, 2018

प्रेमवीर (कविता)

तुझ्या एका नजरेत ईतकी ताकद आहे की;

त्यापुढं लाखो शब्द आणि करोडो अलंकार
निशब्द होऊन शेपुट घालुन बसतील.

शेवटचा ठोका टाकायलेलं ह्रदय
पुन्हा बाहत्तर ठोक्याकडे वळेल.

मेंदुतल्या अब्जावधी पेशींना
नवसंजीवनी मिळेल.

बंद डोळे सुद्धा
पापण्यांच्या कातडीला भेदून तुला पाहतील.

अशातच जर हसलीस तू गालातल्या गालात;

मग तर वाळवंटातही नद्या वाहतील,
दगडातही झाडे उगवतील आणि
हाडा मांसाच्या शरिराला प्रेमाचे अंकुर फुटतील.

या दोन डोळ्यातले अंतर कमी करण्यासाठी हि दोन शरिरं
रात्रंदीन झगडत राहतील कुणाचीही व कशाचीही पर्वा न करता.


कवी | लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ फेब्रुवारी २०१८



विचारांची शिवजयंती ©

रोज नवे गांव आणि रोज नव्या गर्दीत पेरायचंय शिवचरित्र परंतु जे गर्दीला अपेक्षीत आहे ते नाही तर जे मला अपेक्षीत आहे ते.
यंदाच्या शिवजयंतीला सामोरे जात असताना शिवचरित्रातले नुसते ठरावीक प्रसंग सांगण्यापेक्षा शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण, न्यायव्यवस्थेचे धोरण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे धोरण, धर्मनिरपेक्षतेचे धोरण, महिला सबलीकरणाचे धोरण, औद्योगिक धोरण, आर्थीक सुबत्तेचे धोरण, हे सर्व सांगण्यावरच मी जास्त भर देणार आहे. तसेच शिवचरित्रातून प्रेरणा घेतलेल्या महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्राला देखील स्पर्श केल्याशिवाय माझे व्याख्यान परिपुर्ण होणार नाही.
मी शिवचरित्रकार नाही आणि ईतिहासतज्ञ देखील नाही. मी तर स्वतःला फक्त शिवरायांच्या धोरणांचा अभ्यास करणारा एक सर्वसामान्य वक्ता समजतो. शिवचरित्र अभ्यासताना अखेरपर्यंत विद्यार्थीदशेतच राहणे मला पसंद राहील. महाराजांच्या विचारांवर प्रेम करणारा व त्यांच्या विचारांचे शब्द गर्दीच्या डोक्यात पेरणारा एक शेतकरी म्हणून हा संपुर्ण महिना दिवसभर वाचन, चिंतन, मनन आणि संध्याकाळी व्याख्यान अशा दिनक्रमात जाणार आहे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज या सत्कार्यासाठी सदैव प्रेरणा देत आहेत. आता फक्त तुमचे आशिर्वाद, प्रेम आणि पाठबळाच्या प्रतिक्षेत...
जय भवानी जय शिवाजी !

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : १२ फेब्रुवारी २०१८



Friday, January 26, 2018

माझ्या राजाची नजर खाली का ?

दिल्ली येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ राजपथावर अवतरला याचा अभिमान वाटला परंतु ज्या राजाने दिल्लीच्या औरंगजेबाला भरल्या दरबारात डोळ्यात डोळे घालून अपमानास्पद वागणूकीबद्दल ठणकावून महाराष्ट्राची अस्मिता जोपासली त्याच दिल्लीवर राजाचा खाली मान झुकलेला अश्वारूढ पुतळा मिरवला गेला. अरे गावात साधं घरात लावायला शिवरायांचे पोष्टर जरी घ्यायचे म्हणले तरी राजाच्या बाणेदार नजरेला आपण महत्व देतो पण ज्या सोहळ्यावर साऱ्या जगाचे लक्ष होते त्या महाराष्ट्राच्या चित्ररथातल्या महाराजांच्या मुर्तीची नजर उंच आणि मान ताठ दाखवणे बंधनकारकच असायला हवे होते. मी कुणी ईतिहासकार वगैरे अजिबात नाही. परंतु महाराजांच्या विचारावर प्रेम करणारा एक युवक या नात्याने मला एवढं तरी नक्कीच कळतं की माझ्या राजाने दिल्लीत कधीच मान झुकवली नव्हती. मग हा चित्ररथातला पुतळा नेमका असाच का बरं बनवला? तो बनवताना एवढी साधी गोष्ट का बरं कुणाच्या लक्षात आली नाही? एरवी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बनवताना उधळलेल्या घोड्यावर बसुन तलवार उंच उगारलेली, मान ताठ ठेवून महाराजांची नजर आभाळाकडे असते मग नेमकं या चित्ररथातल्या दर्शनीय पुतळ्यातच तलवार जमिनीकडे, मान आणि नजर झुकलेली असे का बरे ? हि मुर्ती बनवलेल्या त्या कलाकाराच्या कलेला मी दाद देतो परंतु चित्ररथावरची मुर्ती अशीच असावी अशी संकल्पना मांडलेल्या मेंदुचा मी निषेध करतो.
महाराजांची प्रतिभा, किर्ती, पराक्रम, साहस, आणि अस्मिता या एका चित्ररथामुळेच प्रचंड वाढली किंवा कमी झाली हा विषय नाही परंतु जर दिल्लीत राजाची मुर्ती मिरवायची होती तर नजर आणि मान ताठच असायला हवी होती असे मला वाटते. बाकी सगळ्या गोष्टींत भव्य दिव्यता नसती तरी चालले असते पण निदाना नजरेत तरी ती दाखवायला हवी होती. आज हा चित्ररथ शेअर करताना करोडो लोकं पाहिली परंतु राजाच्या नजरेकडे कुणाचे लक्ष गेले नाही याचे दुःख वाटले. या चित्ररथातली शिवरायांची झुकलेली नजर पाहुन तो व्हिडीओ शेअर करण्याची माझी ईच्छाच नाही झाली. उलट सकाळपासुनच राजाची ही खिन्न मुद्रा पाहुन माझ्या मनात कालवाकालव सुरू होती. सरतेशेवटी मनातुन उचंबळून बाहेर पडलेला माझा हा वैयक्तिक विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जिवावर आपल्या सर्वांसमोर मांडला आहे. अखेरीस एवढंच वाटतं की; महापुरूषांसंदर्भातली कोणतीही गोष्ट बनवताना, दाखवताना, लिहिताना, बोलताना आणि मिरवताना खबरदारी घ्यायलाच हवी अन्यथा विचारांची विटंबना होते जी सहजा सहजी भरून काढता येत नाही.
ज्यांना छत्रपतींचा ईतिहास माहित नाही त्यांनी फक्त कलाकृती पाहुण आनंद व्यक्त करणे स्वाभाविक आहे परंतु ज्यांना माहित आहे त्यांनी तरी निदान विचार करावा. महापुरूष हे मुर्त्यामध्ये जिवंत नसुन ते विचारांनी जिवंत आहेत पण जर मुर्त्यांतून कुणी विचार मारण्याचा प्रयत्न करत असेल तर हे कदापी खपवून घेतले जाणार नाही.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २६ जानेवारी २०१८ 




Tuesday, January 23, 2018

| गुडदानीवाला ©

लहानपणीचा गुडदानीवाला आज अचानक स्टॅण्डवर दिसला. गणेश देशमुख त्यांचे नांव. सडपातळ बांधा, सावळा रंग, थोडे केस गेलेले, थोडी पांढरी दाढी वाढलेली, नेहमीच मळलेला तीन गुंड्याचा (ज्या कधीच न लावलेल्या; कारण शर्ट शिवताना फक्त फाॅरमॅलिटी म्हणुन लावलेल्या पण नंतर त्या काज्या आणि गुंड्यांची कधी भेटच नव्हती झालेली) भाया सारलेला शर्ट आणि ढगळी विजार असा पोशाख. तिच सायकल आणि त्याच वायरच्या पिशव्या फक्त त्यात आता गुडदानी नव्हती. दिवसभर गोळा केलेलं भंगार सायकलच्या कॅरेजवर रबराने ताणुन बांधलेले. नळीच्या मध्ये प्लॅस्टीकचे तुटलेले पाईप, लोखंडी वाकडे तिकडे चेंबटलेले पत्रे ठेवलेले. सायकलवर फक्त दोन्ही हॅण्डलला हाताने धरता येईल एवढीच जागा अशातच हे गुडदानीवाले मामा "अऽऽएए लोखंड पत्रेयययय" अशी आरोळी ठोकत आमच्या पांगरीच्या हरएक गल्ली बोळातुन फिरायचे. त्यांची हि आरोळी आजही जस्सीन तस्सी कानात कैद आहे. लहानपणी घरात एखादा लोखंडाचा तुकडा पडलेला असला आन् या गुडदानीवाल्या मामाची आरोळी ऐकली की तोंडाला पाणी सुटायचे.
तब्बल ४२ वर्ष भंगार गोळा करून यशस्वी संसार जोपासलेल्या या गुडदानीवाल्या मामांना पाच पोरी आणि दोन मुले आहेत यापैकी पाचही मुलींची लग्न आणि प्रत्येकीची दोन बाळंतपण या गण्या मामाने याच व्यवसायावर केली. संसार यशस्वी करायला नोकरीच लागते असे काही नाही तो कष्टावर सुद्धा यशस्वी उभा राहू शकतो हेच गण्यामामाने दाखवून दिले. या गुडदानीवाल्या गण्या मामाची आख्खी हयात प्लॅस्टीक, पत्रे, लोखंड आणि बाटल्या गोळा करण्यात गेली पण त्यांच्यातला प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची ताकद थोडीही कमी झाली नाही. आज खुप दिवसांनी भेटलेल्या या गुडदानीवाल्या मामांना श्रीराम आप्पाच्या हाॅटेलात चहा पाजला. सोबत राहूल पवार होताच. खुप वेळ चाललेल्या आमच्या आपुलकीच्या गप्पात लहाणपणीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एकीकडे गण्यामामा सारखे ६७ वर्षाचे तरूण आजही गल्ली बोळातुन भंगार आणि प्लॅस्टिक गोळा करून रोजगार मिळवत आहेत आणि दुसरीकडे २०-२५ वर्षाचे म्हातारे बेरोजगारीची कारणे सांगत बापाच्या जिवावर रेघोट्या मारत आहेत.


लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २३ जानेवारी २०१८ 




Sunday, January 21, 2018

| कंडक्टर ©

आज बऱ्याच दिवसानंतर बार्शी ते पांगरी असा एस.टी.प्रवास केला. अख्खा संसार डोक्यावर तर कुणी खांद्यावर घेऊन चाललेली अनेक नानाविध माणसं इथे मला पहायला आणि अनुभवायला मिळतात. आजचाही अनुभव असाच काहीसा होता. अहमदपूर डेपोच्या गाडीत बार्शीहुन बसलो. रविवार असल्याने गाडी हाऊसफुल्ल झालेली. त्यातच गाडीच्या दारातुन माणसंच पुढे जात नव्हती. मला वाटले आता कंडक्टर येऊन तणतण करतंय काय की; पण झाले उलटेच त्या दरवाज्यातुन काका, मामा, दादा थोडी जागा द्या म्हणत एक ऐण पंचवीशीतले कंडक्टर गाडीत चढले. गाडीतर माणसांनी भरून वाहत होती अशात कंडक्टर सिट तरी थोडीच रिकामी राहणार; तिथेपण एक आजीबाई, आजोबा आणि ताई बसलेल्या. कंडक्टरला बघून त्या उठू लागल्या तेवढ्यात कंडक्टर बोलले "बसा आज्जी मी उभा राहतो". मी पण दरवाज्याजवळच एक हात अँगलला धरून उभाच होतो. साहेब पांगरीला किती तिकीट हाय ? मी विचारले. मशनीवर बटने दाबुन लगेच तिकीट फाडुन ते म्हणले "द्या तेवीस रूपये". माझ्याकडे बरोब्बर बावीस रूपये होते. एक रूपया शोधुन सापडेना तेव्हा कंडक्टर मला म्हणाले "राहुद्या नसला तर मी भरतो". त्यांच्या या उत्तराचे मला फार कौतुक वाटले. खरं म्हणजे कंडक्टरची नोकरी अंगाचा खुळखुळा आणि डोक्याचे दही करणारी; अशातही संयम ठेऊन आनंदाने कार्य करणाऱ्या एका युवा कंडक्टरला पाहुन मी सुखावलो. एकुणच प्रवाशांना मदत करण्याची त्यांची वृत्ती वीस किलोमिटरच्या प्रवासात जाणवली. हितुन तिथुन माझ्यासोबतच उभा राहिलेले कंडक्टर साहेब घारीत एक जागा झाल्यावरच बसले. पांगरीत गाडी आल्यावर मी उतरताना "साहेब, एक सेल्फी द्याल का तुमच्या सोबत ?" असे विचारल्यावर गाडीतले सर्व प्रवासी माझ्या तोंडाकडे टकामका बघायला लागले. मी सर्वांना सांगीतले "असे कंडक्टरच देशाला कंडक्ट करत आहेत. मला यांच्याबद्दल अभिमान वाटतो म्हणुन सेल्फी काढतोय." सेल्फी काढताना प्रवाशांनी वाजवलेल्या टाळ्या आणि कंडक्टर साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुण प्रवासाचा शिन निघून गेला. गाडीतुन खाली उतरून दरवाजा ढकलला तोच दरवाज्या शेजारील खिडकीतून कंडक्टर साहेबांना आनंदाश्रू पुसताना पाहिले. आजवरच्या माझ्या जिवन प्रवासात असाच आनंद देत घेत आलोय म्हणुनच या प्रेमाचा हकदार झालोय.
भारत महासत्ता होईल तेव्हा होईल पण आजवरच्या भारताच्या जडणघडणीत एस.टी.ड्रायव्हर, कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर, कंडक्टरचे खुप मोठे योगदान आहे. आजही रोज अर्ध्याहुन जास्त ग्रमिण भारत यांच्याच जिवावर हिकडुन तिकडं आन् तिकडुन हिकडं फिरतंय. परंतु चतुर्थ श्रेणीतल्या या लोकांना हिरो म्हणायला अजुनही आमच्या सिस्टीमचा ईगो कमी नाही झालेला. तुटपुंज्या पगारावर रोज हजारो माणसांचे बोलणे खायचे, खड्ड्यातुन गाडीचे हेलखावे खायचे, जर हिशोबात काही गोंधळ झाला तर वरिष्ठांच्या कारवाईचे ओझे पण वहायचे आणि यातुनही प्रवासी देवो भवः म्हणायचे. खरंच हे ग्रेट आहे.
विषय एक रूपयाच्या मदतीचा नव्हता ती करण्या मागच्या वृत्तीचा होता. विषय सिटवर बसण्याचा नव्हता तर बसलेल्यांना न उठवण्याचा होता. विषय हक्काच्या जागेचा नव्हता, हक्काची जागा गरजूंना दिल्याचा होता. विषय तिकिटाचा नव्हता ते तिकीट हातात देताना केलेल्या स्मितहास्याचा होता. विषय सेल्फीचा नव्हता आपल्यासाठी कष्ट उपसणाऱ्या नोकरदारांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा होता. विषय फक्त कंडक्टरचा नव्हता, एका माणसाच्या माणुसकीचा होता.

लेखक : प्रा.विशाल गरड
दिनांक : २१ जानेवारी २०१८




गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...