Monday, December 20, 2021

बंगळूर येथील घटनेचा निषेध

महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना होणे दुर्दैवी. मुळात विटंबना करणाऱ्याला त्या महापुरुषांचे समकालीन कार्य आणि इतिहास माहीतच नसतो. अशा घटना वेगळ्याच हेतूने घडवल्या जात असतात. अटक होणे, गुन्हे दाखल करणे आणि मग वातावरण शांत झाले की त्याला जामिनावर सोडून देणे, कालांतराने आपणही विसरून जाणे असाच काहीसा पायंडा आजवर चालत आलाय. ज्यांच्यापर्यंत शिवरायांचा पराक्रमी इतिहास पोहोचतो ते आजन्म महाराजांचे मावळे म्हणून जगतात पण ज्यांच्यापर्यंत ते केवळ एका राज्याची, जातीची, धर्माची किंवा समूहाची अस्मिता म्हणून पोहोचतात त्यांच्यासाठी ते फक्त राजकारणाचा एक विषय म्हणून राहतात. 

मी कर्नाटकात अनेकवेळा व्याख्यानासाठी गेलो महाराजांबद्दल तिथल्या लोकांमध्ये प्रेम आहे विशेषतः सीमावर्ती भागात तर ते ओसंडून वाहत आहे. अगदी प्रत्येक गावातल्या चौकात छोटे का असेना पण शिवरायांचे स्मारक असतेच. कोण्या एका नालायकाने विटंबनेचे कृत्य केले म्हणून समस्त कर्नाटकी शिवभक्तांनाच दोषी धरणे मला संयुक्तिक वाटत नाही. आजवर महाराष्ट्रातही विटंबनेच्या अनेक घटना घडल्या त्या आरोपींना काय शिक्षा झाली ? तो छिंदम अजूनही उथळ माथ्याने फिरतोच आहे की समाजात. जिथे बलात्कार आणि मर्डरच्या गुन्ह्यात फाशी लागलेले आरोपी अजून जिवंत आहेत तिथे विटंबना करणाऱ्या आरोपींना शिक्षेची अपेक्षा काय ठेवावी.

"पुतळा विटंबना ही छोटीशी गोष्ट आहे" कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदारपणे केलेल्या या स्टेटमेंटवरून हे लक्षात येते की ज्या महापुरुषाचे उदोउदो केल्यावर त्यांना मते मिळतात त्यांचीच जर विटंबना झाली तर ती त्यांच्यादृष्टीने मोठी गोष्ट असावी बाकी त्यांना काही फरक पडत नाही. त्यांचेच काय आपलेही काही पुढारी सोयीनुसार जयजयकार आणि निषेध करतात त्यामागेही तेच कारण असते. हे भारत मातेच्या महापुरुषांनो, तुम्ही ज्या मातीच्या रक्षणासाठी तुमचं रक्त सांडलं, संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं, सर्वस्व अर्पण केलं त्याच मातीतल्या काही औलादींना मात्र तुमचं देणं घेणं फक्त तुमच्या अनुयायांना खुश ठेवण्यापूरतं आणि त्याचे रूपांतर मतदानात करण्यापर्यंतच उरलंय हे दुर्दैव.

विशाल गरड
२० डिसेंबर २०२१



Friday, December 3, 2021

राष्ट्रनमन

राष्ट्रपती नतमस्तक होणे म्हणजे संपूर्ण देश नतमस्तक होणे. आजघडीला महाराज असते तर काळाची गरज ओळखून त्यांनी नक्कीच रायगडावर हेलिपॅड तयार केले असते. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारा आपला राजा होता आपण त्यांचे अनुयायी म्हणल्यावर आपणही त्या गोष्टींचा अवलंब करायला हवा. हेलिकॉप्टर उतरताना धूळ उडेल आणि ती पुतळ्यावर जाईल हे आपण लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासन त्याची काळजी करेलच पण म्हणून गडावर हेलिकॉप्टरच नको असे म्हणणे काळानुरूप संयुक्तिक ठरणार नाही. उद्या जगातील प्रत्येक देशाचा प्रमुख जरी रायगडावर यायचा म्हणला तरी गडावर तशी सोय असायला हवी. आपल्या राजाचे कार्य आणि महती साडेतीनशे वर्षांपासून सर्वदूर आहे पण ती अशानिमित्ताने पुन्हा पुन्हा अधोरेखित होत असते. आपल्याच राज्यातले किती राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि मंत्री आजवर गडावर दर्शनाला गेले असतील ? मग राष्ट्रपती येत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. दुर्गराज रायगड हा देशा सोबत जगाच्या पटलावर पुन्हा पुन्हा चर्चेत यावा ज्यातून महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची पुन्हा पुन्हा उजळणी व्हावी यासाठी खासदार छत्रपती संभाजी महाराज करत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो.

विशाल गरड
३ डिसेंबर २०२१

Saturday, October 30, 2021

यष्टी डायवर

समोरून येणारी प्रत्येक गाडी यमदेवासारखी असते. प्रत्येक ओव्हरटेकला मृत्यूला घासून जाताना गाडीतील पन्नासहून अधिक लोकांचा जीव शाबूत ठेवण्यासाठी त्याचे हात, पाय आणि डोळे सदैव दक्ष असतात. तो उपाशी असेल, वैतागलेला असेल, त्याचे अंग दुखत असेल तरी त्याला थकायला परवानगी नाही. सध्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न बघता सगळ्यांना इच्छित स्थळी वेळेवर सुखरूप पोहोचवणाऱ्यावरच अशी वाईट वेळ येणे दुर्दैवी वाटते. माझ्या आजवरच्या एसटी प्रवासात ज्या ज्या एसटी ड्रायव्हर साहेबांनी सारथ्य केले त्या तमाम बांधवांसाठी हा माझा लेख समर्पित.

आर.टी.ओ चे नियम सगळ्या वाहनांना सारखेच पण यातून एसटीकडे मात्र ठरवून डोळेझाक करायची. पन्नास पंचावन्न क्षमतेच्या कधी दुप्पट तर यात्रा वगैरे असल्या की तिप्पट क्षमतेने भरलेली बस त्या ड्रायव्हरने गपगुमान चालवायची. गुडघ्या इतक्या खड्ड्यातून हादरे, झटके, धक्के या कशाचाही विचार न करता गाडी वेळेत पोहोचवायची, रातराणीच्या ड्रायव्हरने रात्रभर जागून गाडी चालवायची आणि आरामासाठी आगाराच्या एखाद्या अस्वच्छ खोलीत चटई टाकून झोपायचे, गाडी वेळेच्या आत आली किंवा उशीर झाला तर त्याला मेमो मिळणार पण जर त्याने गाडीच्या दुरुस्तीबद्दल, सर्व्हिसिंग बद्दल काही सांगितले की मग महामंडळ तोट्यात असल्याची कारणे द्यायची.

आयुष्यभर गाडी चालवणारा एसटी ड्रायव्हर त्याच्या आयुष्यात मात्र तो एक चार चाकी गाडी घेऊ शकत नाही, दोन मजली माडी बांधू शकत नाही, लेकरांच्या उच्च शिक्षणाचा खर्च पेलू शकत नाही, बायकोला चार सोन्याचे दागिने घेऊ शकत नाही, प्लॉट आणि फ्लॅट तर खूप दूरची गोष्ट आहे साहेब, तो आहे ती घरची शेती सुद्धा करू शकत नाही. त्याला मिळत असलेल्या पगारीतून तो फक्त कुटुंबाला दोन वेळचे जेवण देऊ शकतो तेही कधी कधी स्वतः उपाशी राहून. मग त्या एसटी ड्रायव्हरची ही स्वप्न नसतील का ? असतील पण मग तुमच्या स्वप्नांचा प्रवास कोण पूर्ण करणार ? म्हणून मग हेच एसटी ड्रायव्हर त्यांची स्वप्न बाजूला ठेवून तुटपुंज्या पगारावर अहोरात्र ड्रायव्हिंग करतात.

तुमचे विकासकामांचे प्रोजेक्ट्स, फ्लाय ओव्हर, मोनो रेल, बुलेट ट्रेन, स्मारके यांच्या टेंडरचे आकडे सामान्य माणसाला मोजता न येण्याएवढे बलाढ्य असतात आणि त्यात झालेल्या भ्रष्ट्राचाराचे व टक्केवारीचेही तेवढेच मोठे असतात. निर्जीव इमारती बांधण्यासाठी जर तुम्ही अब्जावधी खर्च करू शकता तर एसटी ड्रायव्हर सारख्या जिवंत माणसांच्या संसारासाठी तुम्ही काही कोटी बाजूला काढून ठेवू शकत नाहीत का ? मान्य आहे तिजोरीत खडखडाट वगैरे असतो मग आमदार खासदारांच्या, सनदी अधिकाऱ्यांच्या पगारी का बरे थांबत नसतील ? शेवटी सगळ्यांना पगार जनतेच्याच पैशातला मग तो वाटताना मात्र दुजाभाव का ?

एसटीमध्ये विधिमंडळ सदस्यांसाठी राखीव जागा असते. हुकून चुकून कधीतरी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या फॉरचुनर मधून उतरून एसटीने प्रवास करायला हवा तेव्हाच एसटी कर्मचाऱ्यांचे हाल अनुभवता येतील आणि तेच अनुभव विधिमंडळात मांडता येतील. शासकीय नोकऱ्या पैसे खायचं कुरण असतात (काहीजणांसाठी) पण सगळ्याच शासकीय नोकऱ्यात पगारी व्यतिरिक्त पैसे मिळतात असे नाही. जेवढ्या पगारात एसटी ड्रायव्हर काम करतात ते पाहून ते नोकरी नाही तर देशासाठी निशुल्क सेवाच बजावतात असे म्हणावे लागेल.

मायबाप सरकार,
दहा वर्षे सुरक्षित सेवा, पंधरा वर्षे सुरक्षित सेवा असले फक्त बिल्ले वाटल्याने त्यांचे पोट भरणार नाही त्यांच्या कामाच्या तुलनेत त्याचा मोबदलाही मिळायलाच हवा. अन्यथा एसटीला फाशी घेऊन लटकलेले मृतदेह एकसष्ठ वय असलेल्या महाराष्ट्राला परवडणारे नाहीत. त्यांचा विचार व्हावा एवढीच अपेक्षा.

विशाल गरड
३० ऑक्टोबर २०२१

Sunday, September 26, 2021

लप्पाछप्पी

मी बेडरूमच्या बाहेरून आवाज दिला "साऊ, मी तुला शोधायला येतोय, तू लपून बस" ती ड्रेसिंग टेबलच्या बाजूला जाऊन लपली. ती तिची लपायची नेहमीची जागा आहे हे ठाऊक असतानाही मी उगाच इकडे तिकडे साऊ-साऊ करत फिरत बसलो. विराने मला हळूच सांगितले की तुम्ही तिकडे पाहत असताना साऊ ड्रेसिंग टेबलच्या आडून तुम्हाला पाहून तुमची लोकेशन चेक करत आहे. तिचे हे असे पाहणे मला फोटोत कैद करायचे होते म्हणून मी बेडरूमच्या बाहेर जाऊन पुन्हा गुपचूप ड्रेसिंग टेबलच्या दुसऱ्या बाजूला येऊन थांबलो. मोबाईलचा कॅमेरा सुरू करून तो हळूच थोडा वरती करून मोबाईलच्या स्क्रिनमध्ये मी साऊची वाट पाहू लागलो. माझी लोकेशन स्पॉट करायला साऊने तिचे दोन डोळे हळूच बाहेर काढले तेवढ्यात मी मोबाईलमध्ये ते क्लिक केले आणि दुसऱ्याच क्षणात साऊ इज स्टॉप म्हणले. ती पळत येऊन मला बिलगली आणि अशा पद्धतीने आज आम्ही जागतिक कन्या दिन साजरा केला.

विशाल गरड
दिनांक : २६ सप्टेंबर २०२१

सप्तरंग स्वप्नपूर्ती

रविवार दर आठवड्याला येतो पण आजच्या रविवारची सकाळ स्वप्नपूर्तीची होती. झोपेतुन उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला तर पहाटेपासूनच मित्रांच्या मेसेजेसने इनबॉक्स भरून गेला होता. सर्वांचा एकच मेसेज होता "अरे विशाल, सकाळ सप्तरंगला तुझा मोठा लेख आलाय" बहुतांशी जणांनी पेपरचे फोटो काढून पाठवले होते. जेवढा आनंद त्यांना मला हे सांगताना झाला असेल तेवढाच मलाही त्यांचे ऐकून झाला. खरंतर आजपर्यंत खूप काही लिहिलंय, अनेक विषय हाताळले. माझी वेबसाईट अशा विविधांगी लिखाणाने नेहमीच भरलेली असते.

मी सप्तरंगचा नियमित वाचक असल्याने कधीतरी आपलाही लेख इथे येईल असे स्वप्न पाहिले होते. अहो काय सांगू तुम्हाला; स्वप्नपूर्तीच्या आनंदात मीच लिहिलेला लेख पुन्हा दोनदा वाचून काढलाय. आपले लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे निदान ज्यांच्यासाठी लिहिलंय त्यांच्यापर्यंत तरी पोहोचावेच असे प्रत्येक लेखकाला वाटत असते. मलाही ते वाटत होते. ते वाटणे आज सप्तरंग ने सार्थकी लावले. सप्तरंगच्या सात रंगांपैकी एक रंग होता आल्याचे आत्मिक समाधान खूप मोठं आहे जे आज मला अनुभवायला मिळाले.

आजचा हा लेख तुम्ही तर वाचाच पण  घरातील आई वडील आणि आज्जी आजोबांनाही आवर्जून वाचायला द्या. कुणाला वाचता येत नसेल, डोळ्याने दिसत नसेल तर त्यांना वाचून दाखवा. त्यांच्या आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. बाकी वाचक म्हणून तुम्ही सर्वजण माझ्यासारख्या नवख्या लेखकाचा आत्मविश्वास वाढवत आला आहात. त्यातच आज माझ्या लिखाणाचा 'स'काळ 'स'प्तरंगने केलेला 'स'म्राट 'स'न्मान अती प्रचंड बळ वाढवणारा ठरलाय. धन्यवाद टिम सप्तरंग आणि सम्राट फडणीस सर.

विशाल गरड
दिनांक : २६ सप्टेंबर २०२१

Thursday, September 23, 2021

मातीच्या सैतानांनो

सोयीनुसार सोयाबीन घेतात
भाव पाडतात वेगाने
सोयीनुसार तेल गाळतात
मग भाव चढवतात वेगाने

मातीतल्याची किंमत नाही
तिथं कारखान्यात किंमत वाढते
माऊली रानातली इथं
अश्रू पुसत पीक काढते

मातीच्या सैतानांनो
मतांची तरी जाण ठेवा
रगात आटवून शेत पोसलंय
त्याचा तरी मान ठेवा

विशाल गरड
दिनांक : २३ सप्टेंबर २०२१

Saturday, September 18, 2021

बायको

लग्ना आधीच्या स्वप्नात तू
मामाने फोडलेल्या सुपारीत तू
साखरपुड्याच्या साखरेत तू
लग्नाच्या मुंडावळीत तू

चुलीतल्या निखाऱ्यात तू
गॅसच्या फ्लेममध्ये तू
तू भाकरीत, तू भाजीत
तू चपातीत, तू भातात

घरातल्या केरसुनीत तू
तुळशीच्या पानात तू
ओट्यावरच्या रांगोळीत तू
देव्हाऱ्यातल्या करंडात तू

प्रेम ऊतू आलं तर ह्रदयात तू
भांडण झाले तर डोक्यात तू
आपल्या लेकरात तू
त्याच्या हसण्या रडण्यात तू

संसाराच्या प्रत्येक आनंदात तू
सुखात तू, दुःखात तू
तारुण्यात तू, उतारवयात तू
म्हातारपणाच्या काठीत तू

तू आहे म्हणून मी
मी आहे म्हणून तू 
आणि आपण आहोत म्हणून ती

विशाल गरड
दिनांक : १८ सप्टेंबर २०२१

प्रिय विरा तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

Friday, September 3, 2021

सोनवणे सरांचे अभिष्टचिंतन

एका कुटुंबात जी जबाबदारी एक बाप पार पाडत असतो तीच जबाबदारी सोनवणे सरांनी आजवर आमच्या संकल्प परिवारात पार पाडली आहे. अनुदानित संस्थांच्या तुलनेत लॉकडाऊन काळात विनाअनुदानित संस्थांना अनंत अडचणी आल्या, आर्थिक संकटे कोसळली पण त्या सगळ्या संकटांचा भार सरांनी स्वतःच्या खांद्यावर पेलला आणि आम्हाला संरक्षित केले.

विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना फॅमिलीवाली फीलिंग देणारा हा माणूस टिपिकल संस्थाध्यक्षांच्या व्याख्येला छेद देणारा आहे. शे पाचशे लोकवस्तीच्या खेडेगावात राहणारी, अतिशय बिकट परिस्थितीतुन शिकायला आलेली पोरं आज देशातील सर्वात मानाचे समजल्या जाणाऱ्या एम्स मेडिकल कॉलेज मध्ये शिकायल्याने संस्था उभारण्यामागचा सरांचा खरा हेतू पूर्णत्वास जात आहे.

प्रिय सर, तुम्ही आज एकसष्ठीत पदार्पण करत आहात त्यामुळे तुमचे वय आकड्यांमध्ये मोजता येईलही कदाचित पण सोनवणे कॉलेजच्या माध्यमातून गोरगरिबांची लेकरं नामांकित शासकीय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातुन डॉक्टर, इंजिनिअर करून तुम्ही जो त्यांचा उद्धार केलाय हे त्यांच्या कित्येक पिढ्यांनी लक्ष्यात ठेवण्यासारखं काम आहे ज्याचे मोजमाप होऊ शकत नाही.

सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना माझी वाटचाल दशकपूर्तीकडे होत आहे. माझी प्रबोधनाची मशाल केवळ सरांच्या पाठबळामुळे तेवत राहिली. भविष्यात अजून खूप मोठे कार्य उभा करायचे आहे त्यासाठी सरांना दिर्घायुष्य मिळावे हेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. 

प्रा.विशाल गरड
डॉ.चंद्रभानू सोनवणे क.महाविद्यालय, उक्कडगाव

फोटोआर्टीओ

फोटोग्राफीला फक्त व्यवसायापूरते मर्यादित न ठेवता या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्या युवकांना शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन त्यांच्यात आमूलाग्र बदल घडवणारे 'फोटोआर्टीओ' स्कूल ऑफ फोटोग्राफीचे संस्थापक द ग्रेट आर्टिस्ट सचिन भोर यांची आज सदिच्छा भेट झाली.

माझे अमेरिकास्थित प्रिय मित्र महेश भोर यांच्याकडून सचिनदादा बद्दल मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा पासूनच मला त्यांना भेटायची ओढ लागलेली आणि सचिन दादांना ही मला भेटायची ओढ लागलेली. एकमेकांच्या फेसबुक टाईमलाईनला रोज भेट देणारे आम्ही आज मात्र प्रत्यक्ष भेटलोत. दिड तासाच्या भेटीत दोघेही समृद्ध झालो. किती गप्पा माराव्या, किती किस्से सांगावे आणि किती आठवणी सांगाव्या असे झाले होते. आमच्या दोघांच्या विचारांची एकरूपता एवढी होती की बोलताना जणू आम्ही दोघे एकमेकांना आरशात पाहत आहोत असे वाटायचे. प्रियदर्शनी वहिनी सुद्धा सचिन दादाला खांद्याला खांदा लावून साथ देतात. मुलगा जैत्र बालवयातच कॅमेरा हाताळतोय हे पाहून कौतुक वाटले.

फोटोग्राफी बद्दलची दादाची भावना एवढी नितळ, शुद्ध आणि पवित्र आहे की इतक्या खोलवर कुणी विचार करू शकते याचे आश्चर्य वाटले. लहानपणी कला शिक्षक असलेल्या वडिलांच्या बोटाला धरून त्यांना त्यांच्या कलाकुसरीत मदत करता करता सचिनचा प्रवास आज फोटोग्राफीतला तेंडुलकर बनण्याएवढा अभिमानास्पद झालाय. त्यांच्या स्टुडिओत बसलो की आपण एका वेगळ्या दुनियेत असल्याची जाणीव होते. भिंतीवर असलेली प्रत्येक फ्रेम त्यांच्यातल्या टॅलेंटची साक्ष देते. फोटोग्राफी म्हणजे फक्त कॅमेऱ्याचे बटन दाबण्यापूर्ती मर्यादित नसून त्या मागे खूप मोठे शास्त्र आहे, अभ्यास आहे जे सर्वदूर वाहू देण्यासाठीच सचिन दादाने स्कुलची स्थापना केलीये तसेच त्यांच्या 'रिस्पेक्ट' फाउंडेशनचे कार्य ऐकून हा व्यक्ती माणूस म्हणून किती ग्रेट आहे याची जाणीव झाली.

स्वतःला आरश्यात बघत बसण्यापेक्षा सचिन भोर यांनी काढलेल्या फोटोत बघताना जास्त आनंद मिळतो. सगळे कॅमेरे सारखेच फोटो टिपतात पण ते कॅमेरे ज्याच्या हातात असतात त्याने जर कॅमेऱ्याचा हट्ट पुरवला तर फोटोचे रूपांतर चित्रात व्हायला वेळ लागत नाही. आज खरंतर फोटोग्राफीच्या विद्यापीठालाच भेट देऊन आल्याची जाणीव गडद झाली. कॅमेऱ्याचा गर्भ समजून सांगणाऱ्या आणि नवोदित फोटोग्राफर्सवर छायाचित्रणाचा गर्भ संस्कार करणारा सचिन भोर नावाचा शिक्षक खरंच अफलातून वाटला. 'विवाह' स्टुडिओत केलेल्या माझ्या सन्मानाबद्दल विवाह फोटोग्राफीच्या सर्व टिमचे तसेच कौटुंबिक आदरातिथ्याबद्दल सचिन भोर आणि प्रियदर्शनी भोर यांचे मनापासून आभार.

विशाल गरड
दिनांक : २७ ऑगस्ट २०२१

Tuesday, August 24, 2021

जाऊंद्या ना !

नेतेमंडळी वादग्रस्त आणि चिथावणीखोर विधाने करतात, प्रसार माध्यमे तेच ते अधोरेखित करून दाखवत राहतात. पक्षप्रेमापोटी किंवा व्यक्तिप्रेमापोटी सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आमने सामने टोकाचा विरोध करतात. त्यातून जो संघर्ष आणि लढाई होते त्यात सामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्तेच धारातीर्थी पडतात. अशा वेळी मग मिर्झापुर मधला हा डायलॉग आठवतो "जब कुर्बानी देणे का टाईम आये तो, कुर्बानी सिपाही की दि जाती है, राजा और राजकुमार तो जिंदा रेहते है गद्दीपे बैठणे के लिये."

Thursday, August 19, 2021

लग्नाचा तिसरा वाढदिवस

विरा सोबत संसार थाटून आज तीन वर्षे पूर्ण झाली. प्रथमतः लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त विराला मनःपूर्वक शुभेच्छा. प्रेम, जिव्हाळा, काळजी, आपुलकी, आदर यासोबतच रुसणं, फुगणं, रागावणं, रडणं, चिडणं हे सुद्धा संसाराचे अलंकार असतात हे धारण केल्याशिवाय कोणताच संसार परिपूर्ण होत नाही. लग्नाच्या पहिल्या वाढदिनी ती 'बायको' होती, दुसऱ्या वाढदिनी ती 'आई' झाली आणि आता तिसऱ्या वाढदिनी ती माझी चांगली 'मैत्रीण' झालीये. मैदानावर पळण्याची शर्यत जशी एक, दोन, साडे माडे तीन म्हणले की सुरू होते तशीच संसाराची खरी शर्यत सुद्धा वरील तीन टप्प्यानंतर सुरू होते. या शर्यतीत कुणा एकाने हरणे जिंकणे संयुक्तिक नसून दोघांनी सोबत जिंकण्यातच खरे यश आहे.

बायको जेव्हा आपली चांगली मैत्रीण होते तेव्हा नात्यातली लवचिकता आणखीन वाढते त्यामुळे नाती तुटण्याची शक्यता कमी होते. अनेक सात्यिकांनीही संसाराला वेलीची उपमा देण्याचे कारणही हेच असावे असे मला वाटते. वादळ वाऱ्यात मोठं मोठी झाडं उन्मळून पडतात पण वेल मात्र तुटत नाही. संसारात अशी अनेक वादळे येत जात असतात फक्त आपण आपला संसाराचा वेल फुलवत ठेवायचा. बाकी आज आमच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता एकमेकांचे नवरा बायको म्हणून घेण्यापेक्षा कादंबरी उर्फ साऊचे आई बाबा म्हणून घेण्यात जास्त आनंद वाटतोय.

आज पहाटेपासून आपण आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहात. इच्छा असतानाही प्रत्येकाला धन्यवाद देऊ शकत नाही म्हणून या पोस्टच्या शेवटी आम्हाला दिलेल्या आणि देणार असलेल्या शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद !

विशाल गरड
दिनांक : १९ ऑगस्ट २०२१

मातोश्री वृद्धाश्रमात व्याख्यान

संभाजीनगर (औरंगाबाद) येथील मातोश्री वृद्धाश्रमात "वृद्धपकाळातील आनंदाचा शोध" या विषयावर माझे व्याख्यान संपन्न झाले तसेच यानिमित्ताने 'बाटुक' या पुस्तकाचे प्रकाशनही वृद्धाश्रमातील आज्जी आजोबांच्या हस्ते केले. सदर कार्यक्रम मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात कार्यरत असलेल्या युवा विधिज्ञ ॲड.निकिता गोरे यांनी आयोजित केला होता. वृद्धाश्रमात व्याख्यान देण्याचा माझा पहिलाच अनुभव असल्याने आता व्याख्यानात विषयाला न्याय देण्यासाठी नेमके काय विचार मांडायला हवेत यासाठी आठवडाभरापासून तयारी सुरू होती.

वृद्धावस्थेत दुःख कवटाळत बसण्यापेक्षा सुखाला शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा, दुःखाच्या पायथ्याशीच सुख लपलेले असते, वृद्धाश्रमात येण्याची प्रत्येकाची कारणे जरी वेगवेगळी असली तरी इथे मिळून राहण्याचा आनंद मात्र सर्वांचा सारखाच असतो. प्रेम बाजारात विकत मिळत नाही ते रक्तात निर्माण व्हावं लागतं आणि त्यासाठी त्या रक्तावर चांगले संस्कार व्हावे लागतात जे संस्कार करण्याचे सामर्थ्य आज्जी आजोबांमध्येच असते. असे अनेक विचार तासभराच्या व्याख्यानात मांडले.

मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सागर पागोरे यांनी सुमारे साडेतीन एकरवर उभा असलेला हा विस्तीर्ण परिसर आणि त्यात राहणाऱ्या आज्जी आजोबांचे अतिशय सुंदर व्यवस्थापन केले आहे. तिथली स्वच्छता आणि नियोजन एवढे नीटनेटके आहे की ऐन तारुण्यात सुद्धा तिथे राहण्याचा मोह व्हावा. वृद्धाश्रमाबद्दल माहिती घेत असताना पागोरे साहेबांनी जेव्हा वृद्धांना या वृद्धाश्रमात टाकण्याची कारणे सांगितली तेव्हा माणूसपणाची लाज वाटावी एवढी ती भयंकर होती.

प्रकाशन आणि व्याख्यानानंतर काही आज्जी आजोबांनी डोक्यावर हात ठेवून, काहींनी पाठीवर हात फिरवून तर काहींनी हातात हात घेऊन ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या ऐकून नकळत डोळ्यात पाणी तरळले. माझी आजवर प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांच्या पंचवीस प्रती वृद्धाश्रमातील लायब्ररीला सुपूर्द करून निकिताने सर्वांना अल्पोपहार दिला. शब्द शिंपडून प्रचंड माया, प्रेम, ममता आणि जिव्हाळा वाटून सुंदर आठवणींचे क्षण हृदयात साठवून आम्ही आज्जी आजोबांचा निरोप घेतला.

याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक ॲड.ललित जोशी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर त्यांच्यासमवेत, माजी न्यायाधीश शरदचंद्र भारुखा, पुष्पा अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ॲड.निकिता गोरे, नीता वाघ, भाग्यश्री गोरे यांनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी अमोल मिसाळ, वेणूगोपाल आगळे आणि नेहमीप्रमाणे आमच्या हनुमंताची मला विशेष साथ लाभली.

विशाल गरड
दिनांक : १५ ऑगस्ट २०२१

Wednesday, August 11, 2021

थम्सडाऊन

भारताला टोकियो ऑलम्पिक मध्ये सिल्व्हर मेडल मिळवून दिलेला कुस्तीपटू राविकुमार दहियाचा फोटो थम्सअपच्या कॅनवर पाहून वाईट वाटले. या कंपन्या तांबडं विष पाजण्यासाठी काय काय क्लुप्त्या वापरतील सांगता येत नाही. भारतीयांच्या मानसिकतेचा फायदा कसा घ्यायचा हे यांच्याकडून शिकावं. प्रकाशझोतात असलेल्या अभियेनेत्यांना किंवा खेळाडूंना करोडो रुपये मानधन दिले की हे जाहिरात करायला मोकळे. यांच्या जाहिरातींचा युवा पिढीच्या मनावर किती भयानक परिणाम होतो याचे कुणालाच काही पडलेलं नाही.

सलमान खान असो किंवा राविकुमार त्यांनी त्यांची बॉडी दूध पिऊन तयार केली हे सत्य तेही सार्वजनिकपणे मान्य करतील. त्यांनी एखादया प्रोडक्टची जाहिरात करणे हा त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे पण केवळ ती जाहिरात पाहून जर आपण दुधाऐवजी कोक पीत असू किंवा आपल्या लेकरांना पाजत असू तर आपली लेकरं सिनेमात किंवा मैदानात नाही तर दवाखान्यात दिसतील. जगात सर्वाधिक मधुमेह आणि कॅन्सरचे रुग्ण असलेल्या देशात या गोड विष्याच्या जाहिराती प्रसिद्ध होतात हे भयानक आहे.

जागतिकीकरणाच्या दुनियेत या व अशा अनेक कंपन्या खोट्या जाहिराती करून आपल्याला अमिष दाखवण्याचा प्रयत्न करत राहतील. पैसे कमावण्याच्या अमिषापोटी त्या कंपन्यांना आपल्या आरोग्याशी काहीही देणे घेणे नसते. त्यामुळे सायन्सच्या युगात आपणच शहाणे होऊन कोल्ड्रिंक्सच्या जाहिरातींना फाट्यावर हाणून आपल्या युवा पिढीला फ्रुट ज्युस, दूध, नारळपाणी प्यायला प्रोत्साहित करायला हवे. बाकी डोळ्यातून डोक्यात कोल्ड्रिंक्स उतरवण्याचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे पण तुम्ही दुधावर ठाम राहा.

विशाल गरड
दिनांक : ११ ऑगस्ट २०२१

Friday, July 30, 2021

एक निमंत्रण आशीर्वादासाठी

माझ्या आजवरच्या सगळ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलाय. माझ्या सारख्या युवा लेखकावर तुम्ही केलेल्या प्रेमामुळे आजवर माझा लेखप्रपंच पाच पुस्तके प्रकाशित करण्यापर्यंत जाऊन ठेपला. 'हृदयांकित' आणि 'रिंदगुड' या दोन्ही पुस्तक प्रकाशनावेळी बार्शीतले सर्वात मोठे यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह तुडुंब भरून तुम्ही दिलेला प्रतिसाद आजीवन स्मरणात राहील असाच होता. 

बाटुकचे प्रकाशन सुद्धा तुमच्या प्रेमाच्या गर्दीत करायची इच्छा होती पण कोविड नियमावलीमुळे तुम्हा सर्वांना जाहीर निमंत्रण द्यायची मनापासून इच्छा असूनही ते करता येत नाही. पुस्तक प्रकाशन हा एक वैचारिक उंची असलेला कार्यक्रम असतो उलट अशा कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावायला हवी, आयुष्य बदलून जायला एखादे पुस्तकच काय पण त्या पुस्तकातले एखादे वाक्य देखील पुरेसं असतं. म्हणूनच मी प्रकाशन सोहळे करीत आलो. पण सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही कार्यक्रमास मोठे स्वरूप देणे संयुक्तिक ठरणार नाही म्हणूनच बाटुकचा प्रकाशन सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या आणि निमंत्रितांच्या  उपस्थितीत छोटेखानी स्वरूपात पार पाडत आहे.

मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्याच महाविद्यालयात माझ्या एका तरी पुस्तकाचे प्रकाशन व्हावे अशी इच्छा होती. बाटुकच्या निमित्ताने ती पूर्ण होत आहे आणि विशेष म्हणजे श्री शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर कॉलेज जीवनातले पाहिले लेक्चर मी ज्या हॉलमध्ये अनुभवले त्याच हॉलमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. त्या हॉल मधील बेंचवर बसून भविष्यात आपण कधी एखादे पान तरी लिहु असे वाटले नव्हते तिथेच माझे पाचवे पुस्तक प्रकाशित होतंय. कर्मवीर मामांच्या संकुलात संपन्न होणारा हा क्षण आणि सोहळा सदैव स्मरणात राहील. बाकी तुमच्या आशिर्वाद, प्रेम आणि सदिच्छांचा मी सदैव भुकेला.

विशाल गरड
दिनांक : ३० जुलै २०२१

Thursday, July 29, 2021

शेतीसंस्कृती

साऊ दिड वर्षाची झालीय तिच्या मेंदूवर छापलेली मराठी भाषा आता तोडक्या मोडक्या शब्दात आणि बोबड्या आवाजात उमटू लागली आहे. सांगितलेले सगळं तिला कळायला लागलंय. मोठ्यांच्या कृतीचे अनुकरण करायला तिच्याकडून सुरुवात झाली आहे, त्यामुळेच आज घरच्या अंगणाचा उंबरठा ओलांडून शेती संस्कृतीचा सिलॅबस शिकवण्यासाठी साऊला दुचाकीवर शेतात फिरायला घेऊन गेलो. जाता येता रस्त्याने हजारो गोष्टी तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. शेतात गेल्यावर कुत्र्याचे भौ भौ, गाईचा हंब्या, पक्ष्यांची चिऊ चिऊ, मांजराचे म्याव म्याव, वाऱ्याचा जुई जुई आवाज, फुलांचा सुगंध, विहिरीतले पाणी, हे सगळं तिने लाईव्ह अनुभवलं.

विरा रोज साऊला ज्या गाईचे दूध पाजते, आज तेच दूध नेमकं कुठून येतं आणि कसं काढलं जातं हे तिने प्रत्यक्ष पाहिले. आमचे आबा जेव्हा गाईची धार काढायला बसले तेव्हा तर साऊ एकटक सडातून बादलीत पडणारी दुधाची धार कुतूहलाने पाहत बसली. धारेचा आवाज ऐकण्यात ती तल्लीन झाली. शेतातल्या अनेक जिवंत गोष्टींशी तिचा संवाद आणि सहवास झाला. आपल्या ग्रामीण सांस्कृतीला फार मोठा इतिहास आहे ती शाश्वत आणि पौष्टीक आहे. वाढते शहरीकरण आणि वेस्टर्न लाईफच्या जाळ्यातून आपली सुटका होणे शक्य नसले तरी कधी कधी जमेल तसे आपल्या लेकरांची नाळ ग्रामीण जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न व्हायलाच हवा.

विशाल गरड
दिनांक : २९ जुलै २०२१

Wednesday, July 28, 2021

तारीख ठरली

'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशिया मध्ये गायला'. हे वाक्य काळजात रुतून बसलं होतं. मी आण्णांचे समग्र साहित्य वाचायला सुद्धा हेच वाक्य कारणीभूत ठरलं. ज्या परिस्थितीतुन अण्णांनी तब्बल साठ पुस्तकांची निर्मिती केली त्याला कालही तोड नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसेल. त्यांची एक तरी जयंती आयुष्यभर लक्षात राहील अशी साजरी करायची इच्छा होती. अखेर साहित्यरत्नाच्या जयंतीला एक साहित्यकृती जन्माला घालण्यापेक्षा भारी आदरांजली अजून काय असू शकते; म्हणूनच अण्णाभाऊंच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या १ ऑगस्ट रोजी माझे आगामी 'बाटुक' हे नवीन पुस्तक प्रकाशित करतोय. आशिर्वाद असुद्या.

विशाल गरड
दिनांक : २८ जुलै २०२१



Sunday, July 25, 2021

माने साहेब

मैत्रीला वय नसतं हे वाक्य ज्या माणसाकडे पाहून जगता येते ते म्हणजे लोकमतचे मा.संपादक, जेष्ठ पत्रकार आणि विचारवंत राजा माने साहेब होय. ते जेव्हा पण भेटतात तेव्हा जिवलग मित्राला भेटल्याचा फिल देतात. आज खूप दिवसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सप्रेम भेट घेतली. दिलखुलास गप्पा मारल्या, मार्गदर्शन आणि आशिर्वाद घेतले. साहेबांबरोबर काही वेळ जरी घालवला तरी हजार माणसांना भेटल्याचे समाधान भेटते. माने साहेबांचे मैत्र संबंध म्हणजे जणू मोहोळ आहे. महाराष्ट्रातले कोणतेही क्षेत्र निवडा त्या क्षेत्रातील शे पाचशे जिवलग माणसं माने साहेबांनी जोडलेली सापडतील. बाकी माने काकूंनी केलेला चहा एवढा अप्रतिम झाला होता की खास चहा साठी पुन्हा एकदा त्यांच्या घराची पायरी चढावी लागेल.

विशाल गरड
दिनांक : २५ जुलै २०२१

Tuesday, July 13, 2021

चष्मा

आजवर डोळ्यांना खूप ताण दिलाय, अजूनतरी चष्मा लागलेला नाही पण आज एका मित्राला चष्मा घेण्यासाठी सोबत गेलो असता हा फोटो सहज क्लिक केला. भन्नाट बुजुर्ग लूक आलाय. तसेही लेखकाचा आणि चष्म्याचा खूप जवळचा संबंध असतो, अजून काही वर्षांनी मीही याला अपवाद नसेल. तूर्तास तरी दोन्ही डोळ्यांना लांबचे आणि जवळचे सुस्पष्ट दिसतेय. पुस्तकांनी दृष्टी दिलीए खरी पण भविष्यात वयोमानानुसार जरी नजर कमी झालीच तरी वाचनाचा आणि लिखाणाचा छंद जोपासायला चष्मा नावाचा मित्र नक्कीच सोबत असेल.

विशाल गरड
दिनांक : १३ जुलै २०२१

Sunday, July 11, 2021

पुनःश्च हरिओम

पुनःश्च हरिओम हा मराठी चित्रपट आज झी टॉकीजवर आम्ही सहकुटुंब पाहिला. आपल्यापैकी बहुतांशी जणांनी अनुभवलेलं हे कथानक माझा प्रिय दोस्त विठ्ठल आणि स्पृहाच्या दमदार अभिनयाने सजवलं गेलंय. सर्वच सहकलाकारांचा अभिनय दर्जेदार झाला असून या चित्रपटातले खूप सारे प्रसंग थेट आपल्या हृदयाला भिडणारे आहेत. शेवटी जेव्हा दिपालीच्या हातात तो चेक ठेवला जातो तेव्हा डोळ्यातील अश्रूंना बाहेर या म्हणायची गरजच पडत नाही ते आपसूक ओघळतात. संसाराला दोन चाके असतात त्यातलं एक बाहेर फिरत असतं तर एक घरातल्या घरातच फिरत असतं, बायको नावाच्या चाकाला विनाकारण ब्रेक लावण्यापेक्षा जर त्याला आपल्यासोबत फिरण्याची मुभा दिली तर संसाराची गाडी सुसाट धावायला मदत होते. हेच पुनःश्च हरी ओम पाहून अधोरेखित होतं.

चित्रपटाची शूटिंग म्हणलं तर सोपी म्हणलं तर तितकीच अवघड होती, लोकेशन्स फार नसल्या तरी वादळ आलेला सीन आणि रेसिपी तयार करतानाचे शूटिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन विविध कोरगावकर याने मोठ्या खुबीने केलं आहे. प्रत्येक फ्रेम मधली विविधता विविधने खूप सुंदररित्या टिपली आहे. स्पृहाच्या शब्द उच्चाराचा मी पहिल्यापासूनच फॅन आहे म्हणूनच तिला नुसतं बोलताना पाहणे सुद्धा आमच्यासाठी स्पृहणीय गोष्ट असते. दिपालीची भूमिका तिने मस्त साकारली आहे. विठ्ठलने सुद्धा रवीच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलाय. बॉक्स ऑफिसवर मसाला असलेले चित्रपट गल्ला जमवतात हे 'झी'ला चांगलं ठाऊक आहे तरीदेखील लॉकडाऊन मधलं सर्वसामान्य लोकांचं जगणं दाखवण्यासाठी 'झी'ने केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

याआधी 'राक्षस' आणि 'कागर' सारख्या चित्रपटातून विठ्ठल काळेला आपण पाहिलेच असेल. चितळेच्या जाहिरातीतला एस.टी ड्रायव्हर सुद्धा तुम्ही विसरला नसालच. शॉर्ट फिल्मस वगैरे म्हणाल तर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या 'काजरो'सह शेकडो शॉर्ट फिल्मस विठ्ठलच्या अभिनयाने सजल्या आहेत. सई ताम्हणकर, रिंकू राजगुरूसह आजपर्यंत कितीतरी आर्टिस्ट सोबत विठ्ठलने स्क्रिन शेअर केली आहे. बार्शी तालुक्यातील पानगाव सारख्या छोट्याशा गावातुन सुरू झालेला त्याचा प्रवास त्याच गावातल्या प्रत्येक टीव्हीवर दिसण्या इतपत येऊन ठेपलाय हे प्रचंड अभिमानाने सांगण्यासारखं आहे.

विठ्ठलच्या नावात 'ठ' ला 'ठ' जितकं घट्ट चिटकलंय तेवढंच घट्ट त्याचा अभिनय सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाला चिटकला आहे. काही अभिनेते चार दोन चित्रपट करतात आणि लुप्त होऊन जातात पण विठ्ठल म्हणजे दगडावर उगवलेलं झाड आहे जे दुष्काळात सुद्धा तग धरेल म्हणूनच राजकारणात जसे काही नेते मंडळी सरपंच ते केंद्रीय मंत्री पर्यंतचा प्रवास करतात तसाच विठ्ठलचा ज्युनिअर आर्टिस्ट ते लीड रोल पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. विठ्ठलचा स्ट्रगल एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल एवढा जबरदस्त आहे पण त्याला दुःखाचे आणि परिस्थितीचे भांडवल करायला आवडत नाही म्हणून त्याच्या आयुष्यातला संघर्ष काळ लिहिणे मी मुद्दामच टाळतो. अभिनयावर असलेली विठ्ठलची भक्ती त्याला अजून मोठी उंची प्राप्त करून देईल यात शंकाच नाही.

आपण कितीही मोठ्या पडद्यावर दिसोत पण जोपर्यंत आपण आपल्या घरातल्या टिव्हीत दिसत नाहीत तोपर्यंत हिरो झाल्याचा फिल येत नाही; मला वाटतं तो फिल आज विठ्ठलने घेतला असावा. या आधीही तो कितीतरी चित्रपटातून टीव्हीवर येऊन गेलाय पण झी सारख्या बड्या बॅनरखाली मुख्य भूमिकेत झळकण्याची ही त्याची पहिलीच वेळ त्यामुळे त्याने आज काही तासातच करोडो हृदय जिंकली आहेत. दोस्ता असंच जिंकत राहा.

विशाल गरड
दिनांक : ११ जुलै २०२१

Thursday, July 8, 2021

वृक्षप्रेमी कादंबरी

आमच्या हेमा आन्टी घरासमोरील झाडांना पाणी देत होत्या, साऊ जवळच वडाच्या झाडाखाली खेळत बसली होती. खेळता खेळता ती तिच्याकडे पाणी देताना पाहत होती, विरा घरात काहीतरी काम करत असल्याने तिने माझी ड्युटी साऊकडे लक्ष द्यायला लावली होती त्यामुळे मी झाडाखालील कट्ट्यावर बसून साऊचे दुडू दुडू चालणे न्याहाळत होतो, तेवढ्यात आन्टी पाईप खाली टाकून नळ बंद करण्यासाठी घरात गेल्याचे साऊने पाहिले आणि ती पळतच पाईपकडे गेली. तिने खाली पडलेला पाईप उचलून  झाडांच्या आळ्यात धरला आणि पाईपमधून झाडांच्या बुडाशी पडणारे पाणी कुतूहलाने पाहू लागली. साऊची ही कृती पाहून मी पळतच जाऊन हा क्षण मोबाईल मध्ये टिपला. शेवटी बापाचे काळीज ते, लेकीच्या एवढ्याशा गोष्टीचे सुध्दा कौतुक वाटणारंच की.

लहान लेकरांच्या मेंदूची ताजी ताजी निरीक्षण शक्ती आपल्यापेक्षा कैकपट जास्त असते. मोठ्यांच्या कितीतरी कृती, हावभाव, देहबोली आणि भाषा ती फक्त निरीक्षणातून शिकत असतात. पालकांनी लेकरांवर आवर्जून संस्कार करायची गरज नसते, आपण आपली कृती करत राहायची; लेकरं त्यांची ती शिकत राहतात. अर्थात निसर्गाने ती ताकद प्रत्येक सजीवाच्या पिल्लांना दिलेलीच असते. लेकराच्या वाढीची सुरुवातीची तीन चार वर्ष फार महत्वाची असतात यात त्यांच्या कोऱ्या मेंदूवर जे काही छापलं जातं ते खूप ठळकपणे उमटतं. मग पालक म्हणून आपणच ठरवायचं काय उमटलं पाहिजे आणि काय नाही ते.

विशाल गरड
दिनांक : ८ जुलै २०२१

Sunday, July 4, 2021

घटस्फोट

लग्नानंतर नवरा बायकोने परस्पर संमतीने कायदेशीर वेगळे होण्याच्या प्रक्रियेला घटस्फोट असे म्हणतात. इंग्रजीत याला डिवोर्स, हिंदीत तलाख तर मराठीत घटस्फोट आणि गावाकडच्या भाषेत काडीमोड म्हणतात. खरं म्हणजे नवरा बायकोचा संसार म्हणजे दारुगोळा भरलेलं एक गोदाम असतं ज्यात छाटूर मुटूर ठिणग्या नेहमीच पडत असतात आणि ताड ताड वाजून विझून पण जात असतात पण जर का कधी त्या गोदामाची मुख्य वात पेटली तर मात्र एक मोठा स्फोट होतो ज्याला आपण घटस्फोट म्हणतो. तसं तर दारूगोळा भरलेल्या गोदामाची वात अगदी छोट्या मोठ्या कारणानेही पेटू शकते, कुणी ती धुमसत ठेवतात तर कुणी लगेच विझवून टाकतात. ती वात दारूगोळ्या पर्यंत पोहोचु नये यासाठी बहुतांशीजणांची कसरत सुरू असते.

पेटलेल्या वातीवर एकाने पाय द्यायचा आणि त्याने पाय काढला की लगेच दुसऱ्याने फुंकर घालून ती पेटवत राहायचं अशाने स्फोट व्हायचा थांबेल का ? एक तर ती वात पेटुच नये याची काळजी घेतली पाहिजे, त्यातूनही पेटलीच तर ती दोघांनीच विझवली पाहिजे. कधी कधी हीच वात जरी इतरांनी विझवण्यासाठी प्रयत्न केला तरी मनात मात्र ती तशीच धुमसत राहिल्याने पुढे केव्हातरी स्फोट होण्याची शक्यता असतेच. अनैतिक संबंध, नपुंसकता, कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक आणि संपत्ती यापलीकडेही घटस्फोटाची असंख्य कारणे असतात जी प्रत्येकाची वेग वेगळी असू शकतात. घटस्फोट हा ज्याचा त्याचा खूपच वैयक्तिक विषय असला तरी इतरांच्या खाजगी गोष्टींबद्दल चर्चा करणे हा आपला आवडीचा विषय असतो. अशा घटना कानावर पडल्या की जो तो त्यांच्या नात्याला आपल्या नात्याशी जोडून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो मात्र माणसाच्या वागण्याचे अनेक रंग असल्याने त्याचा नेमका थांगपत्ता लागणे कठीण जाते.

पाश्चात्य देशात लग्न आणि घटस्फोट या गोष्टींचा आपल्या एवढा बाऊ केला जात नाही. जसे परस्पर पसंतीने लग्न होते तसेच परस्पर संमतीने तिथे घटस्फोटही होतात. तिथल्या नातेवाईकांना, लेकरांनाही हे अजिबात नवीन नसतं, तिथल्या दैनंदिन आयुष्यातला हा एक भाग आहे. कदाचित तिथला संस्कारच तसा असल्याने याचे त्यांना नवीन वाटत नाही पण पती परमेश्वर मानणाऱ्या आपल्या देशात घटस्फोट म्हणले की बॉम्बस्फोट झाल्या इतकाच धक्का बसतो आणि आपणही घटस्फोटित व्यक्तीकडे त्याने जणू काय अपराध केल्यासारखे पाहतो. त्यांच्या या निर्णयाच्या मुळाशी किती दुःख असू शकतं ? याची आपण कल्पना करू शकत नाही त्यामुळे बदलत्या काळानुसार घटस्फोटित महिला किंवा पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपणही बदलायला हवा. उगाच, लोक काय म्हणतील, मुलं बाळं काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील या भीतीने मन मारून फक्त दिखाव्यासाठी खोटारडा संसार करणारे आपल्याकडे कमी नाहीत, तसेच बायकांना वैतागलेले नवरे आणि नवऱ्याला वैतागलेल्या बायकाही कमी नाहीत. नात्यातले प्रेम संपल्यावर बळजबरीने एकत्र राहण्याला अर्थ असतो का ? तोही एकप्रकारे समाजमान्य बलात्कार ठरत नाही का ? 

मन मारून, तन मारून फक्त लोक काय म्हणतील या दबावाखाली संसार करणारे, नवऱ्याचा अत्याचार सहन करणाऱ्या बायका किंवा बायकांचा अत्याचार सहन करणारे नवरे घटस्फोटाचे भुकेले असतात पण 'लोक काय म्हणतील' या साखळदंडाने त्यांच्या पायाला अशा काही बेड्या ठोकलेल्या असतात की अखेर ते मरण पत्करतात पण घटस्फोट घेत नाहीत. संसाराच्या काडी मोडीचा निर्णय हा दुर्दैवीच पण भरपूर वेळ देऊनही जर नात्याला प्रेमाचा अंकुर फुटत नसेल तर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या वाटून घेऊन आपापल्या इच्छेनुसार आनंद शोधणे केव्हाही चांगले. बाकी संसाराच्या गाठी जरी देवाघरी बांधल्या जात असल्या तरी त्या सोडण्याचा किंवा घट्ट करण्याचा अधिकार मात्र देवाने त्या दोघांनाच दिलेला आहे तेव्हा त्यांनीच ठरवायचं संसाराला प्रेमाची माळ घालून सजवायचं, की त्याचा जाळ करायचा. त्याच जाळावर भाकरी थापत राहायचं, का घटस्फोट घेऊन दुसरं घर बांधायचं ? आपण फक्त शुभेच्छा द्यायच्या.

विशाल गरड
दिनांक : ४ जुलै २०२१

Wednesday, June 30, 2021

साऊचा हट्ट

माझ्या लहानपणी आमच्या दारापुढे जेव्हा बैलगाडी उभी असायची तेव्हा खांद्यावर चाबूक ठेवून त्या बैलगाडीच्या दांड्यावर बसायचा माझा हट्ट असायचा. आज गाडीकडे हात करत जेव्हा साऊ बोबड्या आवाजात "बाबाऽऽ,
गाडी" असे म्हणत होती तेव्हा तिला गाडीवर बसवताना मला माझे बालपण आठवले. काळ बदलला, परिस्थिती बदलली, वस्तू बदलली तरी आपण कुठेतरी उंचावर बसल्याचा आनंद मात्र प्रत्येक लेकरासाठी सारखाच असतो. आपलं लेकरू म्हणजे आपल्या लहानपणाचा आरसा आहे, त्या आरशात पाहण्याचा आनंदच वेगळा.

Saturday, June 26, 2021

माझं नवीन पुस्तक 'बाटुक'

सध्याच्या युवा पिढीची वाचनाची टेस्ट लक्षात घेता. कमी वेळात वाचून होईल आणि मोजक्या शब्दात मोठा विचार उमगून जाईल असे जवळपास वीस पेक्षा जास्त विविध विषयांना स्पर्श केलेले माझे 'बाटुक' हे पुस्तक लवकरच प्रकाशित करीत आहे. माझ्या प्रत्येक पुस्तकाला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलाय याही पुस्तकाला तुमचा उदंड प्रतिसाद मिळेल याची एक लेखक म्हणून खात्री आहे.

एखाद्याचे आयुष्य बदलून जायला पुस्तकातले एखादे वाक्य सुध्दा पुरेसे ठरते. तुमच्या मेंदूला विचार करायला भाग पाडणारी आणि थेट काळजात रुतणारी अशी अनेक वाक्य या पुस्तकात तुम्हाला वाचताना सापडतील पण त्यातले नेमकं तुम्हाला कोणतं भिडेल हे जाणून घेण्यासाठी बाटुक वाचावंच लागेल. सर्व वयोगटातील वाचकांना उपयुक्त ठरेल या पठडीतले हे पुस्तक असल्याने ते तुम्हा सर्वांच्या नक्कीच पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे.

हे पुस्तक म्हणजे विविधांगी विषयांवर लिहिलेल्या मार्मिक लेखांचा संग्रह आहे. रंग वाटून घेतलेल्या माणसांना सप्तरंगांची जाणीव करून देणारा हा एक वैचारिक वारसदार आहे. मी रेखाटलेल्या 'बाटुक' च्या कॅलिग्राफीला जयसिंह पवार यांनी इंद्रधनुष्यात स्थानबद्ध करून  पुस्तकाचे सुंदर आणि सुबक मुखपृष्ठ तयार केलंय, शब्दांची अक्षर जुळवणी राहुल भालकेंनी केली तर सियाटल प्रकाशनचे रोहितजी शिंदे 'बाटुक' प्रकाशित करीत आहेत, या सर्वांचे धन्यवाद.

पुस्तक: 'बाटुक' 
लेखक: विशाल गरड
मुखपृष्ठ : जयसिंह पवार
प्रकाशक: सियाटल पब्लिकेशन
पृष्ठे: ११२
मूल्य : १०० ₹

Friday, June 18, 2021

मायानगरी

"इथे करोडो रुपयांच्या फ्लॅट मधून डोकावून पाहिले की अब्जावधी रुपयांची स्वप्न पडतात. आपल्या कर्तृत्वावर कष्टाचे ढग दाटले की इथे पैशांचा पाऊस पडतो. पैसा इथला ऑक्सिजन आहे तो नाही भेटला तर गुदमरल्यासारखं होतं. इथे सतत धावत राहावं लागतं, थांबायचं म्हणलं तरी लोक ढकलत पुढे नेतात. इथं पावलो पावली कुणी कुणाला जात विचारत नाही कारण इथे फक्त दोनच जाती आहेत एक गरीब आणि दुसरी श्रीमंत".

विशाल गरड
दिनांक : १८ जून २०२१

Monday, May 24, 2021

Ban Renaissance State

Author Girish Kuber's rudeness is revealed on the cover of the book 'Renaissance State'. Shivaraya's sword was used to destroy the wicked, to challenge the Mughal sultanate, to protect the very poor, and to raise it to the sky. But In this cover Chhatrapati Shivaji Maharaj's sword is shown leaning on the ground. It's shameful. I think This is done consciously by Author. Many may not realize this but I am also an artist and writer so I can identify the mentality behind a picture.

Mr.Kuber, being the editor of a famous News paper does not mean that you have wisdom. If you have In any case, in the absence of any strong evidence, you would not have been so arrogant as to write a false text in the book, 'Chhatrapati Sambhaji Maharaj murdered Soyara Maharani Saheb'. Your writings on other topics may be famous and so on, you may have made many headlines but in this book you have given wrong information.

Originally very few English books have already been printed on Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj. It was thought that Girish Kuber's book in English would help English readers to understand the history of their king. But taking advantage of the fame of Chhatrapati Shivaji Maharaj's name, you painted a different picture. Hey, our Marathi people already reads less English literature. There was some hope when we heard that Kuber's scholarly book was published but you did not just get confused, but you cheated.

We have no objection to the other texts in this book. There may be some good things in it, but as a devotee of Chatrapati sambhaji Maharaj, we will never tolerate the false accusation of motherhood against Chhatrapati Sambhaji Maharaj. Mr.Kuber should publish a new edition excluding controversial parts from his book & There is disrespectfully mention of both Maharajas of Swarajya in the whole book, one should try to write 'Chhatrapati' before their names otherwise, the same writing that made you a hero will make you a villain.


Vishal Garad
Date : 24 may 2021

Sunday, May 23, 2021

खोटारडं Renaissance state

लेखक गिरीश कुबेरांचा खोडसाळपणा 'रिनायसन्स स्टेट' या पुस्तकाच्या मुखपृष्ठातच उघड होतो. दुर्जनांचा विनाश करणारी, मुघली सल्तनतला आव्हान देणारी, गोर गरिबांचे रक्षण करणारी आणि आभाळाकडे उंचावलेली शिवरायांची तलवार जेव्हा त्यांनी जमिनीवर टेकवलेली दाखवली तेव्हाच त्यांच्या डोक्यातल्या असूया बाहेर पडल्या. काहीतरी नाविन्यपूर्ण मुखपृष्ठ करण्याच्या नादात त्यांनी महाराजांचा अभाळाएवढा पराक्रम जमिनीवर टेकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलाय. कित्येकांच्या हे लक्षात पण येणार नाही पण मीही एक चित्रकार, कलाकार आणि लेखक आहे त्यामुळे एखाद्या चित्राच्या मागची मानसिकता ओळखू शकतो. खरं तर हे पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच मला शंका आली होती की यात वादग्रस्त मजकूर असणार आणि अंदाज खरा ठरला.

गिरीशजी, तुम्ही एका प्रसिद्ध दैनिकाचे संपादक आहात म्हणजे तुमच्याकडे शहाणपणा असेलच असे नाही. असला असता तर कसलाही प्रबळ पुरावा नसताना 'छत्रपती संभाजी महाराजांनी सोयरा महाराणी साहेबांचा खून केला' हा धाधांत खोटारडा मजकूर तुम्ही पुस्तकात लिहिण्याचा अतिशहानपणा केला नसता. इतर विषयावरचे तुमचे लिखाण प्रसिद्ध वगैरे असेलही, तुमचे कित्येक अग्रलेखही गाजले असतील पण या पुस्तकाच्या बाबतीत मात्र एका विशिष्ठ वर्गात तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करायची होती हे स्पष्ट झालंय.

मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर आधीच खूप कमी इंग्रजी पुस्तके छापली गेली आहेत. त्यात गिरीश कुबेर यांचे इंग्रजी पुस्तक येतंय म्हणल्यावर आपल्या राजाचा इतिहास  इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असे वाटले होते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांच्या नावाच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन तुम्हाला दुसरेच चित्र रंगवायचे होते हे माहीत नव्हते. अहो आधीच आपला मराठी माणूस इंग्रजी साहित्य कमी वाचतो, त्यात कुबेरांचे अभ्यासपूर्ण पुस्तक येतंय म्हणल्यावर जरा आशा होत्या पण तुम्ही नुसता भ्रमनिरासच नाही तर घात केलाय शिव शंभू भक्तांचा.

सदर पुस्तकातील इतर मजकूरावर आमचा आक्षेप नाही. यात काही चांगल्या गोष्टीही असतील पण छत्रपती संभाजी महाराजांवर केलेला मातृहत्येचा खोटा आरोप एक शिवभक्त या नात्याने आम्ही कदापी खपवून घेणार नाही. या पुस्तकातून चांगले ते घ्यावे वाईट ते सोडून द्यावे या विचारांती कुबेरांनी त्यांच्या या पुस्तकातून वादग्रस्त भाग वगळून नवीन आवृत्ती प्रकाशित करावी, संपूर्ण पुस्तकात  स्वराज्याच्या दोन्ही महाराजांचा एकेरी उल्लेख आहे, त्यांच्या नावाआधी 'छत्रपती' लिहिण्याचे कष्ट घ्यावे. अन्यथा ज्या लेखणीने तुम्ही हिरो झालात तीच लेखणी तुम्हाला व्हिलन ठरवेल. 

विशाल गरड
दिनांक : २३ मे २०२१

Saturday, May 22, 2021

दिठी - चित्रपट समीक्षण

आश्विनी परांजपे यांनी "विशाल, हा चित्रपट आजच बघ आणि मला जीवनाबद्दल तुला काय वाटते ते कळव असे सांगितले." मग काय मी देखील तितक्याच उत्सुकतेने सुमित्रा भावे कृत आणि डॉ.मोहन आगाशे निर्मित 'दिठी' हा मराठी चित्रपट सोनी लिव्ह वर पाहिला. एवढा सुंदर चित्रपट पाहायला सुचवल्याबद्दल पहिल्यांदा अश्विनीचे आभार मानतो.

काळ्या कागदावर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाने चित्र रेखाटावी अशी जिवंत सिनेमॅटोग्राफी डोळ्यांची बाहुली सुद्धा हिकडं तिकडं हालू देत नव्हती. प्रत्येक फ्रेम जणू काळजावर छापणारी; अर्थात सुमित्रा भावेचा चित्रपट म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या कलाकृतीचा आत्माच असतात. विशेष करून प्रकाश यंत्रणा आणि ध्वनीमुद्रनावर त्यांचे असलेले प्रेम सतत अधोरेखित होत राहतं.

रामजीची भूमिका साकारलेले किशोर कदम यांनी डोळ्यांनी बोललेले डायलॉग अंगावर काटा आणतात. दिलीप प्रभावळकर, गिरीष कुलकर्णी, अमृता सुभाष, शशांक शेंडे, कैलास वाघमारे, ओंकार गोवर्धन, उत्तरा बावकर आणि अंजली पाटील या सर्वांचा अभिनय पडणाऱ्या पावसाएवढा निर्मळ झालाय. तसेच गार्गी कुलकर्णी, धुमाळ काका, देविका दफ्तरदार यांच्या काही सेकंदाच्या भूमिकेनेही प्रभाव टाकलाय. सुनिल वडकेंनी अप्रतिम कॅलिग्राफी केलीय. चित्रपटाच्या सर्व विभागाच्या टिमने चोख कामगिरी बजावली आहे.

"आसच कर्तृत हाय देवाचं, एकएकट्याला गाठून मारतंय आन एकएकट्यालाच देतंय जनम"."तरी बरंय देवाने माणसाला इसराळू केलंय, नाहीतर जन्मभर फाटलेल्या पतंगाचं दुःख इसरलं असतं काय ?"
जोशी बुवा, गोविंदा आणि संतु वाणी यांचा पडत्या पावसातला हा संवाद लेखकाला नेमकं काय सांगायचंय हे दर्शवतो. "तू कशाला लुडबुड करतो रं मदी, जाऊन बस की तिकडं वळचणीला" शिवाने कैलासला बोललेल्या या एका वाक्यात 'घरी दारिद्र्य असले तरी अस्पृश्यता डोक्यातून जात नाही' हा विचार नकळतपणे गडद होऊन जातो. सगुणेच्या पोटाला कान लावून तिच्याशी संवाद साधताना रामजीने अख्या आकाशगंगेची फिलॉसॉफी समजून सांगितली आहे. 'जनम असाच असतो मरणाला शिवून येणारा' या वाक्यात जन्म मृत्यूचा परस्पर घनिष्ठ संबंध व्यक्त केलाय. शंकर पार्वतीने दिलेल्या इच्छापूर्ती मणीकडे पारुबाई स्वतःसाठी पंचपक्वान, सोने-नाणे आणि लुगडं मागते, सगुणेला कालवडच व्हावी अशी इच्छा ठेवते यातून माणवाची स्वार्थी वृत्ती ठळक होते. मग संबंध विश्वासाठी मागणे मागणारे संत ज्ञानेश्वर कुठे आणि आजचा माणूस कुठे ? याचे उत्तर सहज मिळून जाते.

अवघी अकरा माणसे आणि तीन प्राणी घेऊन एका कलाकृतीच्या माध्यमातून आपल्या जगण्याच्या अनुभवातून हा जगाचा उत्सव कसा साजरा केला पाहिजे याचे सार 'दिठी' मध्ये मांडले आहे. दुःखावर अध्यात्म कसे औषध म्हणून काम करते, ढस ढसा रडल्यावर कसे दुःख कमी होते आणि आयुष्यातल्या सगळ्या सुख दुःखाची उत्तरे कशी पोथी मध्ये सापडतात हे दिठी मध्ये अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा अर्थ चित्रपटातुन सांगण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय.

या चित्रपटातले सगळे कलाकार मुळातच अभिनयाचे बाप आहेत आणि या संपूर्ण कलाकृतीची आई म्हणजेच सुमित्रा भावे आहेत. आज सुमित्रा ताई हयात असत्या तर हे माझे मोडके तोडके पसाभर शब्द नक्कीच त्यांच्या पदरात टाकले असते. माझे निरीक्षण हाच माझा शिक्षक आहे. सुमित्रा भावेंचा सहवास लाभला नाही पण त्यांच्या अजरामर कलाकृतीतून मला खूप काही शिकायला मिळतंय भविष्यात माझ्या कलाकृतीतही जेव्हा सुमित्रा भावेंच्या दिग्दर्शनाची झलक दिसेल तेव्हा समजून जायचे आईची छबी लेकरात दिसायली म्हणून. सुमित्राजी तुम्ही शरीराने गेलात आम्ही तुम्हाला कलेतून जिवंत ठेवुत.

दिठी पाहून मला उमगलं की,
जन्माला कुठं आन् काय म्हणून यायचं, कुठवर जगायचं आणि कधी मरायचं हे आपल्या हातात नसतं. आयुष्य जसं क्षणभंगुर आहे तसंच दुःख देखिल क्षणभंगुर असतं तेव्हा दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा गमावलेले सोडून जे शिल्लक राहिले त्यासोबतच जगण्याचा उत्सव साजरा करायचा. सुख दुःख योग्य वेळी पचवता आलं की प्रत्येकाचे आयुष्य सुंदर होतं. आज मावळलेलं तांबडं उद्या  पहाट म्हणून उगवतं.

विशाल गरड
दिनांक : २२ मे २०२१

Friday, May 14, 2021

ही वेळ निघून जाईल

दुधात मिठाचा खडा पडावा आणि क्षणात दूध नासावं तसं गेल्या महिनाभरात सभोवतालचे वातावरण नासले आहे. अनेक जवळचे नातेवाईक कोरोनामुळे गमवावे लागले. अजूनही काहीजण हॉस्पिटलमध्येच ऍडमिट आहेत. एखादा दिवस अपवाद वगळता रोजच कुणी ना कुणी पॉझिटिव्ह निघाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. वेळीच निदान करणारे घरी क्वारंटाईन होऊन बरे होत आहेत तर ज्यांनी दुखणे अंगावर काढले त्यांच्यासाठी बेड आणि इंजेक्शन मिळवता मिळवता नाकी नऊ येत आहेत. ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात प्रत्येकजण अनुभवतो आहे. आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा व्हेंटिलेटरवर असते तेव्हा आपल्या मोबाईलवर येणारा प्रत्येक कॉल जणू यम देवाचा निरोप वाटू लागतो. मातीला जाणे, सावडायला जाणे, दहाव्याला आणि तेराव्याला जाणे हे जणू रोजची रुटिंग झाली आहे.

सुख आणि दुःख हे एका पाठोपाठ एक येत असतात तो मानवी आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आजचे दिवस जरी दुःखाचे असले तरी सुखाचे दिवस पुढे वाट पाहत असतील हेच सांगून स्वतःच्या मनाची समजूत घाला. गमावलेल्या माणसांच्या स्मृती जिवंत ठेवा आणि काळजी घेऊन स्वतःलाही जिवंत ठेवा. निष्काळजी करून परत धावाधाव करण्यापेक्षा काळजी घ्या, आजार अंगावर काढू नका. ताप आणि अंगदुखी असतानाही जर टेस्ट करायला उशीर केला तर मग तुम्ही यमदेवाच्या टप्प्यात आलेच म्हणून समजा. रोगराई आली की गोळ्या, सलाईन, इंजेक्शन, लस हे औषधे म्हणून वापरली जातात पण जेव्हा काळंच वाईट येतो तेव्हा 'वेळ' हेच सर्वात प्रभावी औषध असतं पण त्यासाठी किंमतही तितकीच मोठी मोजावी लागते जी आपण मोजली आहे. निसर्ग जसा रागावतो तसाच प्रेमही करतो तेव्हा खात्री बाळगा 'ही वेळ निघून जाईल.'

विशाल गरड
दिनांक : १४ मे २०२१

Friday, April 30, 2021

कोरोना

हे सगळ्यांनीच अनुभवलंय तरीही या कवितेच्या शेवटच्या ओळीसाठी मला एवढ्या सगळ्या शब्दांची गुंफण करावी लागली. गेल्या पंधरा दिवसात आपण खूप जवळचे नातेवाईक गमावले आहेत, अजूनही काही झुंज देत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याशिवाय आणि राहिलेल्यांना खबरदारी घ्या म्हणण्याशिवाय तूर्तास तरी आपल्याकडे काहीच शिल्लक नाही. कोरोनाचे तिमिर जावो आणि लवकरच चांगले दिवस येवो.

Thursday, April 29, 2021

मला तोडले नसतेस तर ?

विकासकामे, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या नावाखाली आजपर्यंत माणसाने करोडो झाडांच्या कत्तली केल्या आहेत. क्षणाक्षणाला रक्तातली ऑक्सिजन पातळी तापसणारा माणूस वातावरणातली ऑक्सिजन पातळी तपासायला विसरत चाललाय. याच विचाराला अनुसरून निदान या कोरोनाच्या भयंकर वातावरणात तरी आपल्या आयुष्यातील झाडांचे महत्त्व अधोरेखित व्हावे यासाठी लिहिलेली ही माझी काव्य रचना.


Wednesday, April 21, 2021

ग्रेट भेट वुइथ कवी बालाजी मगर

कोरोनाच्या निगेटिव्ह वातावरणात आज माझ्या या दोस्ताच्या मार्मिक आणि दर्जेदार कविता ऐकून तुफान पोसिटीव्ह झालो. बालाजीचे प्रत्येक काव्य नेहमीच माझ्या काळजाला भिडते आज मात्र बालाजीने त्याच्या खास ठेवणीतल्या जब्राट कविता त्याच्या आवाजात ऐकवल्या. त्याने ऐकवलेले प्रत्येक शब्द जणू उन्हाने तापलेल्या मातीवर पहिल्या पावसाचे थेंब पडल्यावर जसे ढेकूळ फुगतो तसं माझं हृदय फुगून त्यात झिरपले. भविष्यात जेव्हा केव्हा बालाजीचा काव्यसंग्रह प्रकाशित होईल तेव्हा तो नक्कीच साहित्य अकादमीचा पुरस्कार पटकावेल यात शंका नाही.

शेती माती वरील त्याच्या काव्यरचना साहित्यातील एक अद्भुत आणि उत्कट वर्णन आहेत. आता जोपर्यंत त्याच्या सगळ्या कविता पुस्तक स्वरूपात संग्रह करत नाही तोपर्यंत मलाच चैन पडणार नाही. प्रिय बालू, पोलिस अधिकाऱ्याच्या जाड जुड वर्दीत तुझ्या मनाला फुटलेला हा कवी मनाचा झरा संबंध मानवजातीला सुखावणारा आहे. दोस्ता, असंच लिहीत राहा आणि ऐकवत राहा. तुझ्या काव्यरुपी कस्टडीत राहायला आम्हाला नेहमीच आवडेल.

विशाल गरड
दिनांक : २१ एप्रिल २०२१

Sunday, April 18, 2021

प्राधान्यक्रम बदलावाच लागेल

आजपर्यंत प्रत्येक गावातील नुसत्या समाज मंदिरांवर झालेला खर्च जर काढला तर कमीत कमी २० लाख जास्तीत जास्त १ कोटी एवढा आहे. त्या समाज मंदिरांचा उपयोग आजपर्यंत लग्नात जेवणावळीसाठी, सुगीत शेतमाल साठवणीसाठी, गणेशोत्सव व विविध जयंत्या साजऱ्या करण्यासाठी आणि फावल्या वेळेत पत्ते खेळण्यासाठी झाला. श्रद्धेपोटी आपण मंदिर, मस्जिद, चर्च करोडो रुपये खर्चून बांधले त्यामुळे माणसाच्या अशा वागण्याने देव देवतांचे सुद्धा गरिब देव आणि श्रीमंत देव असे वर्गीकरण झाले हे दुर्दैवी आहे.

नेत्याला तुमच्या मतदानाशी देणे घेणे असते त्यामुळे एखाद्या गावातून जर अमुक ठिकाणी एवढा निधी द्या असे एकमुखाने मागणी केली तर ती लगेच मान्य होते त्यामुळे गावासाठी काय मागावे यासाठी गावातील लोकांनी शहाणे होणे काळाची गरज आहे. आजही मी कित्येक गावे पाहतो जिथे रोड नाही, पाण्याची टाकी नाही, एक दवाखाना नाही, शाळेची इमारत नाही पण त्या गावात पंचवीस लाखाचे समाजमंदिर किंवा सभागृह नक्कीच आहे. निधी मिळाला पण तुम्ही त्याचा वापर कशासाठी केला ?

इथून पुढे आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी समाज मंदिरांसाठी दिला जाणारा आपला निधी गावातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळा व ग्रामीण रुग्णालये यांच्या बांधकामासाठी वापरायला हवा. कुणी नेता आला की ज्या त्या समाजाने आपल्या गल्लीत, पेठेत, आळीत, मंदिरासमोर, मशीदीसमोर एक समाज मंदिर द्या अशी मागणी करणे निदान इथून पुढे तरी थांबवायला हवे. परिस्थितीने आपल्याला आपला प्राधान्यक्रम बदलायला लावलाय. शिक्षण आणि आरोग्यासाठी खर्च करण्यावर भर द्यायला हवा.

समाज मंदिरांवर खर्च झालेला पैसा हा लोकप्रतिनिधीच्या खिशातला नसतो तो कर स्वरूपात जमा झालेला आपलाच पैसा असतो. राजकारणातून मिळणारी सत्ता पैसे जमवण्याचा, कमावण्याचा द्रुतगती मार्ग असतो म्हणूनच सत्ता प्रत्येकाला हवी असते. काही नेते मंडळी प्रामाणिक आहेत तर काही मात्र फक्त टक्केवारी, कमिशन आणि हफ्ते गोळा करण्यासाठी राजकारणात आहेत. देशाची अर्धी संपत्ती भ्रष्टाचारी राजकारणी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरात आहे हे दुर्दैवाने म्हणावे लागते.

आज गावपातळीवर आणि शहरात उभा राहत असलेल्या कोविड सेंटर आणि क्वारंटाईन सेंटरसाठी प्रशासन शाळांच्या खोल्या वापरत आहे. माणसाचे हे वागणे पाहून अब्जावधी रुपये खर्च करून तयार केलेली पक्क्या स्वरूपाची आर.सी.सी मध्ये बांधलेली सभागृहे हसत असतील. शेवटी म्हणतात ना आपण आपल्या कर्माची फळे भोगत असतो. ऑक्सिजन बेड नाही, रुग्णालयात जागा नाही, औषधे नाहीत हा आजवर आपण दिलेल्या प्राधान्यक्रमाचा परिणाम आहे जो भोगावाच लागेल.

विशाल गरड
दिनांक : १८ एप्रिल २०२१

Wednesday, April 14, 2021

पंधरा दिवस

आधीच लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या पोलीस दलात सुमारे दिड लाख पोलिस कमी आहेत. आरोग्य विभागात सुद्धा लाखभर कर्मचारी कमीच आहेत अशा परिस्थितीत सरकारने कठोर निर्बंध लावले आहेत. कोणत्याच सरकारला वाटत नसते माणसं मरावी पण शेवटी एक वेळ येत असते जेव्हा हात टेकावेच लागतात. मग हिच ती वेळ जी आपल्या सर्वांना स्वयं निर्बंध घालून मारून न्यायची आहे.

काही काम नसताना उगं चौकातले पोलिस ओळखीचे आहेत म्हणून फिरणारे, घरात किराणा असताना रोज पाव पाव किलो वस्तू घेण्यासाठी किराणा दुकानात जाणारे, डॉक्टरचे लेटरप्याड घेऊन रोज नवीन औषध लिहून बाहेर पडणारे, खोटी ओळखपत्रे दाखवून फ्रंट लाईन कर्मचारी म्हणून फिरणारे अशा वाय झेड व्यक्तींना पोलिसांच्या फायबर काठीचा प्रसाद नितांत गरजेचा आहे.

अपुरे मनुष्यबळ, अपुरी रुग्णालये, अपुरे ऑक्सिजन बेड, अपुरे रेमडीसिव्हीअर, अपुरे व्हेंटिलेटर्स, अपुऱ्या अँबुलन्स, अपुरे कोविड सेंटर्स, हे सगळं अपुरे आहे म्हणून या अपुऱ्या  व्यवस्थेत पेशंट म्हणून भरती होण्यापेक्षा पुढील पंधरा दिवस घराबाहेर न पडण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवा. स्वतःसह कुटूंबाची काळजी घ्या आणि व्यवस्थेला सहकार्य करा ती आपल्यासाठीच राबत आहे. युअर टाइम स्टार्ट नाऊ.

विशाल गरड
दिनांक : १४ एप्रिल २०२१

Saturday, April 10, 2021

काळाची गरज Remdesivir

सध्या रेमडीसिव्हीअर या इंजेक्शनचे उत्पादन वाढवणे ही प्राथमिकता असायला हवी. राज्यकर्त्यांनी, अधिकाऱ्यांनी आपले जे काही वजन आहे ते तिथे वापरायला हवे. सर्वसामान्य माणसाच्या हातात जेव्हा डॉक्टर रेमडीसिव्हीअरची चिठ्ठी लिहून देतात तेव्हा तो फक्त फेसबुकवर टाकून याचना करू शकतो अथवा पेशंट मरायला सोडून देऊ शकतो. यापलीकडे त्याच्या हातात काहीच नाही. त्याची हतबलता डोळ्यात पाणी आणणारी आहे. मायबाप सरकार, राज्यातील प्रत्येक कोविड सेंटरला इंजेक्शनचा पुरवठा तात्काळ सुरू करा, लाखो जीव वाचतील, इंजेक्शन काय खायची किंवा प्यायची वस्तू नक्कीच नाही पण जे कोणी त्याचा पैसे कमवायची वस्तू म्हणून साठेबाजी करत आहेत त्यांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. प्रचंड बिकट परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या दोस्तांनो. या पोस्टचे गांभीर्य तेच समजू शकतात ज्यांच्या घरातली व्यक्ती ऑक्सीजन बेडवर सिरीयस आहे आणि डॉक्टरांनी त्यांना चिठ्ठीवर रेमडीसिव्हीअर लिहून दिले असेल. देव करो ही वेळ कुणावरही येऊ नये. काळजी घ्या !

विशाल गरड
दिनांक : १० एप्रिल २०२१

Monday, April 5, 2021

साऊचे प्रथम अभिष्टचिंतन

प्रथमतः साऊला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझ्या बापपणाला आणि विराच्या आईपणाला एक वर्ष पूर्ण झाली. साऊचा बाळूत्यात गुंडाळल्यापासून ते चालण्यापर्यंतचा प्रवास मागील एका वर्षात आम्ही अनुभवला. प्रत्येकाचे लेकरू त्यांच्या त्यांच्या आईबापाला लय अप्रूप असतं त्याला आम्हीही अपवाद नाहीत. लग्न का करावं, संसार का थाटावा त्या संसाराच्या वेलीवर ही कळी का फुलवावी याचे उत्तर म्हणजे लेकरू असतं. जगातली जी काही सर्वोत्तम सुखं असतील त्यापैकी एक सुख म्हणजे लेकरू आणि त्या लेकराचे लहानपण होय, तिच्या सोबत जगायला मिळणारा प्रत्येक क्षण जणू आनंदाचा डोंगर वाटतो.

ती थोडीशी आजारी पडली तरी वाटणारी हुरहूर,चालताना  कुठे पडू नये म्हणून तिचा सतत केलेला पाठलाग, खेळता खेळता तिने चुकून काही तोंडात घातले तर लगेच तोंडात बोट घालून ते बाहेर काढण्याची आपली तत्परता, गाढ झोपित असताना कधी मध्यरात्री, तर कधी भल्या पहाटे तिचे आपल्या पोटावर येऊन बसने, तिचे झोपितले हसणे. इवल्याशा हातांनी चेहऱ्यावर हात फिरवणे, तिला झोप लागत नाही तोपर्यंत जागणे, ती निट खाईना, लवकर झोपेना म्हणून चीड चीड होणे, तिचे बोबड्या आवाजात आई बाबा म्हणणे, हे सगळं अब्जावधी रुपयांचे सुख आहे जे अनुभवण्यासाठी तुमच्या गरिबी किंवा श्रीमंतीचा संबंध येत नाही.

आमच्या घरातलं हे साऊ नावाचं आनंदाचं झाड आज एक वर्षाचं झालंय. या झाडाच्या सावलीत मिळणारे सुख प्रचंड समाधान देणारं आहे. तिच्या सोबत आजपर्यंत घालवलेला आणि पुढे जाणारा प्रत्येक दिवस रोज एक नवा अनुभव असतो. रोज वाचणे आणि लिहिणे हा जसा माझा छंद आहे तसेच साऊसोबत खेळणे आणि तिला पाहणे हा सुद्धा  रोज जोपासला जाणारा एक छंद झाला आहे. माझ्या या कादंबरीच्या आयुष्यातली एक एक पाने तयार व्हायला सुरुवात झाली आहे. ती हजार पानांची अर्थपूर्ण कादंबरी व्हावी हेच तिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन.

फोटो
सोबतचा सुंदर फोटो उस्मानाबादचे टॅलेंटेड छायाचित्रकार जयसिंह पवार यांनी पांगरी येथील निलकंठेश्वर मंदिरात टिपला असून साऊच्या पारंपरिक वेशभूषेची संकल्पना विरा गरड यांची आहे. बाकी मेकअप बिकअपची भानगड अजिबात नाही लेकरू जसं आहे तसं टिपलं गेलंय. धन्यवाद जयसिंह.

विशाल गरड
दिनांक : ५ एप्रिल २०२१

Wednesday, March 24, 2021

करंट कनेक्शन

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन्स तोडण्याचे काम सुरू झालंय. वापरलेल्या विजेचे बिल भरायला हवे यात दुमत नाही पण बिल भरण्यासाठी शेतकऱ्याकडे तेवढे पैसे का नाहीत आले याचा विचार झाला असता तर बरे झाले असते. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे सगळा शेतमाल मातीत पुरावा लागला, जोडीला लहान सहान उद्योग होते ते पण बंद झाले. यावर्षी चार दोन पैसे पदरात पडतील या आशेने शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवला; तो विकण्याचा काळ नुकताच सुरू झालाय तोवर सरकारला पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय सुचायलाय. एकिकडे तुमच्या लॉकडाऊनच्या अफवेमुळे आधीच द्राक्षे, आंबे पिकांचा भाव जाणून बुजून पाडला गेलाय तर दुसरीकडे वीज कनेक्शन तोडल्यामुळे पुन्हा तो शेतमाल शेतातच वाळून जाणार आहे.

शेतकऱ्यांना कुठून हफ्ते येत नाहीत, ते बिचारे आहे हेच कर्जाचे हफ्ते फेडण्यात आयुष्य खर्ची घालतात. सरकारला  उत्पन्नाचे हजारो स्त्रोत असतात शेतकऱ्यांना मात्र एकुलता एक स्रोत असतो, तेव्हा सरकारने वीज तोडणी बंद करून लॉकडाऊन सारखा अपयशी उपाय डोक्यातून काढून टाकून शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात योग्य भावात कसा विकेल याचा विचार करावा. एकदा शेतकऱ्याकडे पैसे आले की मग तुम्ही वसुली सुरू केली तरी हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांना तगाई दिली जायची पण ती वसूल करताना एक दंडक असायचा. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यावरच त्याचा वसूल व्हायचा हे ध्यानात घ्यावे.

मागिल निवडणुकीत ईव्हीएम मशीनची बटणे दाबून शेतकऱ्यांनी मोठया आशेने या सरकारशी कनेक्शन जोडले होते, आता तुम्ही जर त्याच्या शेतातले कनेक्शन तोडत असाल कि ज्याचे कनेक्शन थेट त्याच्या संसाराशी आहे तर मग तो देखील सरकारचे कनेक्शन तोडू शकतो एवढी त्याच्यात ताकद आहे. मतदानाच्या टक्केवारीत वेळ काढून तुमचा प्रचार करून तुम्हाला मत दिलेला सर्वात मोठा घटक शेतकरी आहे तेव्हा त्याच्या संबंधित प्रत्येक गोष्टीबाबत थोडा वेगळा विचार व्हावा ही विनंती अन्यथा शेतकऱ्यांचा करंट तोडण्याच्या नादात सरकारला करंट देण्याची भावना शेतकऱ्यांमध्ये बळावेल.

विशाल गरड
दिनांक : २४ मार्च २१

Saturday, March 20, 2021

प्रति महिना १०० कोटी

१००,००००००० प्रति महिना. (शंभर कोटी म्हणजे एकवर नेमके किती शुन्य असतात हे माहीत व्हावे म्हणून असे लिहिले) अरे काय बापाची पेंड आहे काय ? महाराष्ट्राची अर्धी संपत्ती फक्त या बड्या राजकारण्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बुडाखाली आहे हे आज निदर्शनास आले. सदर आरोप कुणा ऐऱ्या गैऱ्याने नाही तर एका IAS अधिकाऱ्याने केले आहेत त्यामुळे यात काहीतरी तथ्य असेलच. खरंतर प्रत्येक खात्यात या गोष्टी संगनमताने होत असतात, त्या सगळ्यांनाच माहितही असतात पण मग असा एखादा लेखी पुरावा मिळाला की त्यावर शिक्कामोर्तब होते; जे आज झाले.

एकीकडे लॉकडाऊनच्या भितीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला घोडा लागलाय आणि यांचा इन्कम बघा. सर्वसामान्य जनतेचे अब्जो रुपये अशा जबराट सिस्टीमने वसूल केले जातात म्हणूनच विकास राज्याचा नाही तर पक्षाचा होत राहतो, सामान्य कार्यकर्ते आणि जनता मात्र फुकटचे उदो उदो करायला उरतात. हे म्हणून हेच नाही तर कमी अधिक प्रमाणात सर्वच सरकारे अशीच चालतात, बाकी तुम्ही आम्ही फक्त बटणं दाबण्यापूरतीच. आज यशवंतराव चव्हाण असते तर दोषी राजकारण्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावली असती. लाजिरवाणी आहे सगळं.

विशाल गरड
दिनांक : २० मार्च २०२१

(संदर्भ : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी केलेल्या प्रति महिना १०० कोटी रुपये मागणी संदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र)



Wednesday, March 17, 2021

मुख्यमंत्र्यांस पत्र

मुख्यमंत्री महोदय,
तुम्ही नुसतं लॉकडाऊन करणार असं म्हणुस्तोर,

दारूचा स्टॉक करायला सुरुवात झाली.

किराणा दुकानात मालाची थाप्पी वाढली.

दिड दोन लाख बिल करणारी कोविड सेंटर सुरू व्हायली.

डुप्लिकेट सॅनिटायझरच्या कंपन्यांची कुलपं उघडली.

शेतकऱ्यांकडून कवडी मोल भावात शेतमाल विकत घ्यायला सुरुवात झाली.

शेतमालाचा साठा करण्यासाठी व्यापाऱ्यांची कोठारे भराय लागली.

कच्चा माल बेभाव विकत घेऊन पक्का माल लॉकडाऊन काळात चौपट किमतीत विकण्याची स्पर्धा लागली.

स्थलांतर होणार हे ध्यानात घेऊन ट्रॅव्हल्स वाल्यांनी गाड्यांची टायर बदलली.

तेलबिया कवडीच्या भावात विकत घेऊन तेल मात्र चढ्या दरात विकण्याची तजवीज झाली.

महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती आणि पोलिस स्टेशनांनी दंडाची पावती बुके छपाईची ऑर्डर दिली.


मायबाप सरकार,
सगळ्यांनी सगळी तयारी सुरू केली, बस्स आता तुम्ही एकदा लॉकडाऊन जाहीर करून टाका म्हणजे या राज्यातला शेतकरी पण त्याची तिरडीची तयारी सुरू करेल. तेव्हा तुम्ही फक्त कोरोनाने किती मरतील हे मोजत बसा, लॉकडाऊनमुळे किती मरतील याची चिंता करू नका कारण ही प्रसार माध्यमे देखील ते तसले बिनकामी आकडेवारी दाखवण्याचे कष्ट घेणार नाही. मरणारा शेतकरीही मी लॉकडाऊनमुळे मेलो असे लिहिणार नाही.

काही जास्तीचे बोललो असेल तर माफी असावी सरकार,
पण गेल्यावर्षीच्या नुकसानीतुन उभा राहण्यासाठी यंदा आमचं माय बाप रक्ताचं पाणी करून राबलेत रानात. आत्ता कुठं तोंडात घास पडायला होता; तवर तर तुम्ही लॉकडाऊनची भिती दाखवायला सुरुवात केली. जनतेला भिती दाखवण्याबद्दल दुमत नाही ओ पण एकदा ते लाईव्ह येऊन व्यापाऱ्यांना पण सांगा "अजून लॉकडाऊन जाहीर नाही केलं तेव्हा शेतमालाचे भाव पाडू नका" म्हणून. लंय उपकार व्हत्याल जी.

विशाल गरड
दिनांक : १७ मार्च २०२१

Tuesday, March 16, 2021

जमली पुस्तकाशी गट्टी

ते काहीतरी आहे, ओढले की फाटते एवढंच काय ते तिच्या जीवाला ठाऊक. लेकराला हजारो रुपयांची महागडी खेळणी देण्याची ऐपत नसेल कदाचित माझ्याकडे; पण हे वैचारिक खेळणे देण्याची श्रीमंती नक्कीच आहे. छोट्या मोठ्या खेळण्यांसोबत साऊच्या हातात पुस्तके ठेवण्यावर मी ठाम आहे. तिला लवकरात लवकर वाचायला शिकवायच्या प्रयत्नात आहे मी.

तूर्तास इवल्याश्या हाताने पुस्तकाची पाने चाळायला शिकली, पुस्तक कुठेही पडलेले दिसुद्या ते उचलून माझ्या हातात आणून द्यायला शिकली. पुस्तके न्याहाळायला शिकली हे ही अकरा महिन्यांच्या जीवाच्या मानाने थोडके नव्हे. शेवटी लेखक असलेल्या बापाचं काळीज आहे कौतुक तर वाटणारंच की ओ. किप इट अप #कादंबरी (साऊ)

विशाल गरड
दिनांक : १६ मार्च २०२१

Friday, March 12, 2021

डॉ.कुंताताई जगदाळे जीवन गौरव पुरस्कार २०२१

डॉ.कुंताताई नारायण जगदाळे जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच बार्शी येथे पार पडला. सदर पुरस्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने, बार्शीचे नगराध्यक्ष असिफ भाई तांबोळी यांच्या शुभहस्ते मी सपत्नीक स्वीकारला. आयुष्याच्या या टप्प्यावर जीवनाचा गौरव होणे म्हणजे माझ्या खांद्यावर पडलेले हे कलारसिकांच्या अपेक्षांचे ओझे आहे जे पुढील काळात मी समर्थपणे पेलेन.

पुरस्कार हे वय पाहून नाही कर्तृत्व पाहून दिले जात असतात याची अनुभुती या पुरस्कार सोहळ्यात आली. विविध क्षेत्रातील नऊ रत्नांचा यावेळी सन्मान करण्यात आला. "मला मिळालेला हा पुरस्कार आजवर माझ्या कलाकृतीला दाद देणाऱ्या तमाम कलारसिक श्रोत्यांना अर्पण करत आहे" पुढील काळात अजून दर्जेदार कलाकृतींना जन्माला घालण्याचा प्रयत्न असाच सुरू राहील त्यासाठी तुमचे आजवर लाभलेले प्रेमही असेच सुरू ठेवा.

पुरस्काराला उत्तर म्हणून मनोगत व्यक्त करताना मी वायपुत्र नारायणराव जगदाळे यांच्या स्मृती जागवल्या, डॉ.कुंताताई जगदाळे यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकला. तसेच संस्थेच्या जडणघडणीतील योगदानाबद्दल डॉ.यादव साहेब आणि नंदनजी जगदाळे यांचा कार्यकर्तृत्वाचा शब्दांनी गौरव केला. थोडक्यात मांडलेल्या विचारांनी सभागृह दणाणून सोडले. मला प्रथमच ऐकलेल्या श्रोत्यांच्या प्रतिक्रियांनी भारावून गेलो.

आम्हाला पुरस्कृत करून आमचा यथोचित सन्मान केल्याबद्दल डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, निवड समितीतील सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच आम्हाला सन्मानित करण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि पुरस्कार हातात घेतल्यानंतर ज्या हातांनी टाळ्यांचा कडकडाट केला त्या प्रत्येक हातांचे देखील मी आभार मानतो.

विशाल गरड
दिनांक : ११ मार्च २०२१

Thursday, February 18, 2021

पुन्हा लॉकडाऊन नको

'पुन्हा लॉकडाऊन होणार ?' अशा मथळ्याच्या बातम्या
कृपा करून पेरू नका, तुमच्या शक्यता तुमच्याच डोक्यात ठेवा. फक्त जीव गेला म्हणजे मरण नसतं तर पोटच्या लेकरासारखं वाढवलेलं पिक जेव्हा तुमच्या अचुक निर्णयामुळे शेतातच फेकून द्यावं लागतं ते सुध्दा मरण असतं. हे मरण मागच्या लॉकडाऊन मध्ये अनेक शेतकऱ्यांसह इतर व्यवसायिकांनी भोगलंय. 

ए.सी मध्ये बसून तुम्हाला निर्णय घेणं सोप्पं असतंय पण रात रात जागून पाणी दिलंय शेतकऱ्यांनी, मागील वर्षीचं पिक मातीत पुरून टाकलंय. कोरोना पेक्षा जास्त लॉकडाऊनमुळे माणसं मेली आहेत ती आकडेवारी तशीच खुंटीला टांगून ठेवली तुम्ही. दुसऱ्या लॉकडाऊनचा अविचारी निर्णय घेऊ नका ही विनंती.

लॉक डाऊन मध्ये जरी सरकार शेतमाल विक्रीला परवानगी देत असेल तरी व्यापारी मात्र फक्त लॉकडाऊनचे कारण सांगून शेतकऱ्यांकडून कवडी मोल किमतीने माल विकत घेतात. शेतकऱ्याचा दहा रुपये किंमतीचा माल लोकांच्या उंबऱ्यापर्यंत जाईस्तोवर शंभर रुपयांचा होतो. फायदा कुणाला ? तोटा कुणाला ?

इलेक्ट्रॉनिक मिडियाला कळकळीची विनंती, सरकारच्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टी 'शक्यता' या शब्दाच्या आधारावर लक्ष्यात आणून देऊ नका. टीव्ही वर सतत चालणाऱ्या बातम्या बघून तुमच्या दबावाने सुद्धा सरकार निर्णय घायची तयारी करेल अर्थात तुमची तेवढी ताकद असते म्हणून म्हणलं.

तरीबी सरकारला लॉकडाऊन करायचे असेल तर शेतकऱ्यांच्या शेतावर पिकून तयार झालेल्या मालाची बाजार भावानुसार किंमत ठरवून ती शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा करा किंवा शेतकऱ्यांना सामूहिक आत्महत्या करायची तरी परवानगी द्या. साहेब, आता रोगापेक्षा ईलाजच भयंकर वाटायलाय.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १८ फेब्रुवारी २०२१

Sunday, February 14, 2021

हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे विरा

एका प्रियकराला प्रियसीला सतत सांगावे लागत असते की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण संसारात मात्र ते सतत सांगायची गरज न पडू देणे हेच खरे प्रेम आहे. अडीच अक्षराच्या या शब्दावरच सारं जग उभं आहे. आता आपले आपण ठरवायचं इथे बसून राहायचं का उभं राहायचं. तसेही नाती, वय, रंग, भाषा, प्रांत, जात, धर्म, लिंग या सगळ्यांना भेदून ह्रदयावर ताबा मिळवणारी एकमेव गोष्ट जर कोणती असेल तर ती 'प्रेम' आहे. निसर्गाने बहाल केलेला हा जन्मसिद्ध हक्क मर्जीने मिळवण्यासाठी कुणाच्याही एन.ओ.सी ची गरज नसते फक्त दोन ह्रदयाचा निखळ संवाद हवा.
Do Love,
Take Love,
Spread Love.

वक्ता तथा लेखक : विशाल गरड
दिनांक : १४ फेब्रुवारी २०२१


बुचाडला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार

अखेर 'बुचाड' लघुचित्रपटाने पुरस्कारावर मोहर उमटवली
आज नॅशनल कमुनिटी मेडिया फिल्म फेस्टिव्हल, तेलंगणा (आंध्रप्रदेश) मध्ये 'बुचाड'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मी शेतकरी वेशात स्वीकारून अवकाळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भारत देशातील तमाम शेतकऱ्यांना अर्पण केलाय.

दुःखाचे अनेक प्रकार असतात पण गेल्या शेकडो वर्षात न पाहिलेले आणि अनुभवलेले दुःख 'बुचाड' या लघुचित्रपटात मांडले आहे. शेतकऱ्यांची अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा हा एक गडद प्रयत्न होता, स्क्रिनिंगच्या वेळेस सर्वांच्या डोळ्यात आलेले पाणी आणि आज मिळालेल्या पुरस्काराने ते अधोरेखित झालंय.

फिल्म फेस्टिव्हल मधील सर्व नामवंत परीक्षकांचे मनापासून आभार, बुचाड च्या निर्मिती प्रक्रियेत सहभाग नोंदवलेल्या प्रत्येकाचे आभार, इंगित प्रॉडक्शनच्या सर्व टीमचे आभार आणि आमच्या सोबत पुरस्कार प्राप्त झालेल्या सहविजेत्यांचे अभिनंदन.

या नविन क्षेत्रात टाकलेल्या पहिल्याच पाऊलाचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मान झालाय. यातून मिळालेला आत्मविश्वास आणि उत्साह भविष्यात माझ्याकडून अजून दर्जेदार कलाकृती निर्माण करण्यासाठीचे कारण ठरेल. दोस्तांनो, आमचे कष्ट आणि तुमच्या शुभेच्छा फळास आल्या. धन्यवाद !

लेखक तथा दिग्दर्शक : विशाल विजय गरड
दिनांक : १३ फेब्रुवारी २०२१
स्थळ : झहीराबाद, तेलंगणा (आंध्रप्रदेश)

Friday, February 12, 2021

विचारांची शिवजयंती २०२१

शिवचरित्रातले नुसते ठरावीक प्रसंग सांगण्यापेक्षा शिवरायांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण, न्यायव्यवस्थेचे धोरण, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचे धोरण, धर्मनिरपेक्षतेचे धोरण, महिला सबलीकरणाचे धोरण, औद्योगिक धोरण, आर्थिक सुबत्तेचे धोरण समजून सांगणे ही माझ्या व्याख्यानातली प्राथमिकता असेल.

शिवचरित्रातून प्रेरणा घेतलेल्या महात्मा फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, आण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, भाऊराव पाटील यांच्या जीवन चरित्राला देखील स्पर्श केल्याशिवाय माझे व्याख्यान परिपुर्ण होणार नाही.
मी शिवचरित्रकार नाही ना कुणी ईतिहासतज्ञ. मी तर फक्त शिवरायांच्या धोरणांचा अभ्यास करून प्रबोधन करणारा एक सामान्य मावळा आहे.

शिवजयंतीचा हा संपुर्ण सप्ताह दिवसभर वाचन, चिंतन, मनन, प्रवास आणि संध्याकाळी व्याख्यान अशा दिनक्रमात जाणार आहे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज या सत्कार्यासाठी सदैव प्रेरणा देत आहेत. तुमचे आशिर्वाद, प्रेम आणि पाठबळाच्या बळावर प्रबोधनाची मशाल अशीच तेवत राहील.

वक्ता तथा लेखक : प्रा.विशाल गरड

Tuesday, February 9, 2021

बुचाड लघूचित्रपटास नामांकन

काल दुपारी मी लेक्चर घेऊन नुकताच ऑफिस मध्ये आलो होतो. सध्या व्याख्यानासाठी नविन नंबर वरून अनेक फोन येत असतात तसाच एका नविन नंबर वरून एक कॉल आला. मी मोबाईल कानाला लावून हॅलो म्हणलो तेवढ्यात तिकडून आवाज आला. "Congratulation ! Mr.Vishal Garad, your film 'Buchad' is Nominated for award in National Community Media film festival at Telangana." खरंतर हे शब्द ऐकून माझ्यातल्या कलाकाराला एवढा आनंद झाला होता की तो चार दोन शब्दात मांडणे कठीण होते. पहिल्याच प्रयत्नाला मिळालेले हे यश स्वतःवरचा विश्वास वाढवणारे ठरलंय. बाकी १३ फेब्रुवारी रोजी झहीराबाद, तेलंगणा (आंध्रप्रदेश) येथे पुरस्काराची घोषणा होणार आहे. इंगित प्रॉडक्शनच्या सर्व टिमने घेतलेले कष्ट आणि तुम्हा मायबाप कलारसिकांनी दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर 'बुचाड' १३ तारखेला पुरस्कारावर नक्की नाव कोरेल अशी आशा ठेवुयात, तूर्तास नामांकन मिळालंय हे ही काही कमी नाही. We are hopeful.

लेखक तथा दिग्दर्शक : विशाल विजय गरड
दिनांक : ९ फेब्रुवारी २०२१


Sunday, January 10, 2021

दुर्दैवी

आईच्या स्तनात दूध भरेल तेव्हा ते प्यायला तिचे लेकरू नसेल, बापाला गोड मुका घ्यावा वाटेल तेव्हा त्याचे लेकरू नसेल. अजून तर कपडेही नव्हते त्यांना घालण्यासाठी नुकतीच बाळुत्यात गुंडाळलेली. त्या आईबापाचे दुःख मोजण्याचे एकक अस्तित्वातच येऊ शकत नाही. जग बघण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस पोटात राहून काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या लेकरांवर काळाचा असा घाला प्रचंड दुर्दैवी आहे. लागलेली आग पाण्याने विझवाल पण लेकरू गमावलेल्या त्या माता पित्याच्या हृदयातली आग कधीच विझणार नाही. भांडाऱ्यातील नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लेकरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

वक्ता तथा लेखक : विशाल गरड

गुलीगत सुरजचा विजय असो !

निर्विवाद, निखळ आणि निरागस विजय !  ना मी बिग बॉस पाहिला, ना मी कुणाला मतदान केलय. त्याचे कारण असे की मी मुळात टीव्हीच फार कमी पाहतो. महत्वाच...